ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

अभीप्सा आणि चैत्य उपस्थिती

ईश्वराशी एकात्म पावण्याची इच्छा, ईश्वरच हवा ह्या भावनेतील खरीखुरी उत्कटता म्हणजे काय असे एकाने विचारले आहे. आणि त्यालाच स्वत:मधील दोन वेगवेगळ्या प्रकारच्या अभीप्सांचा स्वत:मध्ये शोध लागलेला आहे, विशेषत: ईश्वरविषयक उत्कटतेबाबत असणाऱ्या दोन प्रकारांचा शोध लागला आहे. तो म्हणतो, त्यातील एका वेळी एक प्रकारची यातना असते, एक हृदयस्पर्शी वेदना असते, आणि दुसऱ्या वेळी, एक प्रकारची आतुरता आणि त्याच वेळी खूप आनंददेखील असतो. हे त्याचे निरीक्षण अगदी अचूक आहे. आणि आता त्याचा प्रश्न असा आहे की, आपल्याला वेदनामिश्रित अशी उत्कटता कधी जाणवते आणि प्रसन्नतायुक्त उत्कटता कधी जाणवते?

मला माहीत नाही, तुमच्यापैकी किती जणांना ह्याचा किंवा अशासारखा अनुभव आलेला आहे पण हा अगदी दुर्मिळ पण सहजस्फूर्त येणारा असा अनुभव आहे आणि त्याचे उत्तरही अगदी साधे आहे. चैत्य जाणिवेची उपस्थिती त्या अभीप्सेबरोबर संयुक्त झाली की लगेचच, त्या उत्कटतेला एक निराळेच रूप प्राप्त होते, जणु काही अवर्णनीय अशा आनंदाच्या अर्काने ती भरून जाते. हा अशा प्रकारचा आनंद असतो की, तो इतर सर्व गोष्टींमध्ये भरलेला असल्याचे जाणवते. ह्या अभीप्सेचे बाह्य रूप कोणते का असेना, मार्गामध्ये त्याला कितीही अडचणी, अडथळे आले तरी, ही प्रसन्नता तिथे असतेच; जणुकाही ती सर्वत्र भरून राहिलेली असते आणि इतर काहीही असले तरी ती तुम्हाला तिच्याबरोबर घेऊन जाते. चैत्य उपस्थितीचे हे एक खात्रीशीर लक्षण आहे.

ह्याचा अर्थ असा की, तुमच्या चैत्य जाणिवेबरोबर तुमचा संपर्क प्रस्थापित झालेला आहे, तो कमीअधिक परिपूर्ण असेल, सातत्याच्या दृष्टीने तो अधिक-उणा असेल पण तो संपर्क प्रस्थापित झालेला आहे. त्या क्षणी मात्र त्या चैत्य पुरुषामुळे, चैत्य जाणिवेमुळेच तुमची अभीप्सा भरून जाते की, ज्यामुळे तिला तिचे खरे सत्त्व लाभते. आणि तीच गोष्ट प्रसन्नतेच्या रूपाने अभिव्यक्त झालेली असते. आणि जेव्हा ती चैत्य जाणीव तेथे नसते, तेव्हा मग ती अभीप्सा अस्तित्वाच्या भिन्न भिन्न भागांमधूनसुद्धा उदित होऊ शकते; ती मुख्यत: मनातून उदित होऊ शकते, किंवा मुख्यत्वेकरून प्राणामधून किंवा अगदी शरीरामधूनही उदित होऊ शकते किंवा कधीकधी तर ती तिन्हींमधून एकत्रितपणे उदित होऊ शकते – ती सर्व प्रकारच्या संमिश्रणांमधून उदित होऊ शकते.

पण सर्वसाधारणपणे सांगावयाचे झाले तर, जर उत्कटता असेल तर तेथे प्राण आवश्यकच असतो. प्राणामुळे उत्कटता येते आणि प्राण हे जसे उत्कटतेचे केंद्र आहे तसेच ते अडीअडचणी, अडथळे, विरोधाभास यांचे पण स्थान असते आणि अडचणींची तीव्रता व अभीप्सेची तीव्रता यांच्यामध्येच संघर्ष होऊन, ही व्यथा निर्माण होते. परंतु त्यामुळे व्यक्तीने अभीप्सा बाळगणे सोडून देण्याचे काही कारण नाही. तुम्हाला या व्यथावेदनेचे कारण उमगले की झाले.

आणि मग जर का तुम्ही, तुमच्या अभीप्सेमध्ये अजून एका घटकाचा प्रवेश करून देऊ शकलात तर, हा घटक म्हणजे ईश्वरी कृपेवरील तुमचा विश्वास, ईश्वरी प्रतिसादाविषयीची खात्री, ही जर त्या अभीप्सेमध्ये मिसळली तर व्यथावेदना, दुःख या सगळ्या गोष्टी प्रतिसंतुलित होऊन जातात आणि मग तुम्ही कोणत्याही अडथळ्याविना वा भीतिविना अभीप्सा बाळगू शकता.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 248-250)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…

8 hours ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा‌ या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…

1 day ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…

2 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…

3 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…

4 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…

5 days ago