Posts

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१८)

मनुष्याला ज्या आदर्शांचे अनुसरण करणे शक्य आहे असे दोन आंतरिक आदर्श आहेत. पहिला आहे सामान्य मानवी जीवनाचा सर्वोच्च आदर्श आणि दुसरा आहे ‘योगमार्गा’चा दिव्य आदर्श.

..आपल्या समग्र अस्तित्वावर सुस्पष्ट, सशक्त व तर्कशुद्ध मनाचे आणि योग्य व तर्कशुद्ध इच्छाशक्तीचे नियंत्रण प्रस्थापित करणे; आपल्या भावनिक, प्राणिक आणि शारीरिक अस्तित्वावर प्रभुत्व संपादन करणे; आपल्या समग्र व्यक्तित्वामध्ये सुसंवाद निर्माण करणे आणि आपल्यामध्ये असलेल्या क्षमता, मग त्या कोणत्याही असोत, त्या विकसित करणे आणि जीवनामध्ये त्यांची परिपूर्ती करणे, हा मानवी जीवनाचा आदर्श आहे. विशुद्ध आणि ‘सात्त्विक बुद्धी’चे राज्य प्रस्थापित करणे, स्वतःच्या ‘स्वधर्मा’ची परिपूर्ती करत, ‘धर्मा’चे पालन करणे आणि स्वतःच्या क्षमतांनुसार सुयोग्य असे कर्म करणे आणि ‘बुद्धी’ व ‘धर्मा’च्या नियंत्रणाखाली ‘अर्थ’प्राप्ती आणि ‘काम’ पूर्ती करणे, हा हिंदू विचारप्रणालीनुसार, मानवी जीवनाचा आदर्श आहे.

तर दुसऱ्या बाजूला, स्वतःच्या सर्वोच्च ‘जीवात्म्या’चा किंवा ‘ईश्वरा’चा साक्षात्कार करून घेणे आणि आपले समग्र अस्तित्व त्या सर्वोच्च जीवात्म्याच्या सत्याशी किंवा दिव्य प्रकृतीच्या कायद्याशी सुसंवादी करणे; स्वतःमधील लहान-मोठ्या दिव्य क्षमतांचा शोध घेणे आणि जीवनामध्ये त्या क्षमतांची सर्वोच्च असलेल्या जीवात्म्याप्रति ‘यज्ञ’ म्हणून किंवा दिव्य ‘शक्ती’चे खरेखुरे साधन म्हणून परिपूर्ती करणे हे ‘दिव्य जीवना’चे उद्दिष्ट असते.

– श्रीअरविंद (CWSA 36 : 303-304)

(दिनांक : ०६ नोव्हेंबर १९०९)

हिंदुत्वाला एकत्रित आणण्यासाठी केवळ दोनच गोष्टी पुरेशा समर्थ आहेत – एक अशी नवी आध्यात्मिक प्रेरणा की जी, वेदान्तावर आधारलेली असेल, मानवाच्या मूलभूत एकत्वावर भर देणारी असेल, …ती बंधुता, स्वातंत्र्य, समता यांच्या भव्यदिव्य आदर्शावर उभारलेली असेल आणि तिला भारतीय वंश तसेच हिंदु आध्यात्मिक संकल्पना आणि साधना यांच्या थोर कार्याची आणि दमदार भवितव्याची जाण असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, एक पुरेशी जोमदार राजकीय लाट की जी, त्या समाजाच्या रक्षणासाठी आणि त्याच्या उन्नतीसाठी सर्व हिंदूंना संघटित करू शकेल.

– श्रीअरविंद
(CWSA 08 : 302-303)

(दिनांक : ०६ नोव्हेंबर १९०९)

एकेकाळी ‘भारतीय’ एकता आणि सहिष्णुता यांच्याकडे कल असणारी ‘मोगल’ सत्ता पुढे जेव्हा दडपशाही करणारी आणि विघातक अशी बनली तेव्हा ती उलथून टाकणे हे राष्ट्रीय पुनरुज्जीवनाचे उद्दिष्ट होते आणि तेव्हा म्हणजे ‘शिवाजीमहाराज’ आणि ‘समर्थ रामदास’ यांच्या काळात ‘हिंदु’ राष्ट्रीयत्वाला काही एक अर्थ होता. हे त्याकाळी शक्य होते कारण ‘भारत’ तेव्हा स्वत:च एक जग असल्यासारखा होता आणि ‘महाराष्ट्र’ व ‘राजपुताना’, हे दोन भौगोलिक प्रांत पूर्णत: ‘हिंदु’ होते, त्यांनी याला भक्कम पाया पुरविला होता. ते आवश्यकही होते कारण ‘मोगल साम्राज्यवादी’ घटकांनी त्यांच्या सत्तेचा जो गैरवापर केला होता तो ‘भारता’च्या भवितव्यासाठी घातक होता आणि त्यांना दंडित करून, ‘हिंदु’चे पुनरुत्थान आणि वर्चस्व यांच्या आधारे त्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्याची आवश्यकताच होती. आणि ते आवश्यक होते, शक्यही होते त्यामुळे ते अस्तित्वात आले. परंतु आधुनिक काळातील परिस्थिती विचारात घेता, भारत हा एकसंधपणेच अस्तित्वात राहू शकतो. एखाद्या राष्ट्राचे अस्तित्व हे त्याच्या भौगोलिक सीमांवर आणि भौगोलिक सघनतेवर, एक विशिष्ट, स्वतंत्र राष्ट्र असण्यावर अवलंबून असते. वंश, भाषा, धर्म, इतिहास यांमधील भेद अखेरीस भौगोलिक भिन्नत्वाच्या अस्तित्वामुळे निश्चितच विराम पावतील. ग्रेट ब्रिटन, स्वित्झर्लंड आणि जर्मनीमध्ये असेच झालेले आहे. भारतातदेखील तसेच होईल. परंतु भौगोलिक एकसंधतादेखील आवश्यक आहे. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे तर, देश इतका एकसंध असला पाहिजे की परस्परांतील संवाद आणि केंद्रवर्ती शासनाचे संघटन हे सोपे झाले पाहिजे, किमान ते अवघड तरी होता कामा नये.

– श्रीअरविंद
(CWSA 08 : 304)

(डिसेंबर १९०९)

‘आपली माता’ ह्या स्वरूपात आम्हाला देशाचे दर्शन घडत नाही, हा आपला मुख्य अडथळा आहे. आमच्यापैकी बहुतांशी राजकारणी ‘भारतमाते’चे पूर्ण आणि जवळून दर्शन घेण्यामध्ये अक्षम ठरले आहेत. रणजितसिंग किंवा गुरु गोविंद सिंग ह्यांना भारतमातेऐवजी ‘पंचनद्यां’च्या ‘भूमाते’चेच दर्शन झाले. शिवाजीमहाराज किंवा बाजीराव पेशवे यांना भारतमातेऐवजी, ‘हिंदूंची माता’ या स्वरूपात तिचे दर्शन झाले. इतर महाराष्ट्रीय मुत्सद्द्यांनी फक्त ‘महाराष्ट्रातील लोकांची माता’ या स्वरूपातच तिच्याकडे पाहिले. वंगभंगाच्या काळामध्ये, आम्हाला ‘बंगाल-माते’च्या स्वरूपात तिचे दर्शन होण्याचे भाग्य लाभले, ते एकात्मतेचे दर्शन होते आणि त्यामुळे बंगालची भावी एकात्मता आणि प्रगती सुनिश्चित आहे. पण ‘भारतमाते’ची एकात्म प्रतिमा अजूनही साकार व्हायची आहे. आम्ही काँग्रेसमध्ये ज्या ‘भारतमाते’चे स्तुतिगान करायचो, आराधना करायचो ती पाश्चात्त्य पेहरावातील, ब्रिटिश राजवटीची उपकारांच्या ओझ्याखाली दबलेली एक दासी होती, एक सखी होती, ती काल्पनिक मूर्ती होती, ती अदैवी (undivine) असा भ्रम होती. खरंच ती आमची माता नव्हती. पण त्याहीवेळी, एका निगूढ, धूसर अशा अंधारात लपून असलेली आमची ‘खरी माता’च आमचा आत्मा व आमचे अंत:करण वेधून घेत होती. ज्या दिवशी आपण भारतमातेची खरीखुरी अखंड प्रतिमा पाहू शकू, जेव्हा तिच्या सौंदर्याने आणि कृपाशीर्वादाने मोहित होऊन, आपण आपली जीवने तिच्या सेवेमध्ये मोठ्या आतुरतेने समर्पित करू, तेव्हा हा अडथळा दूर होईल आणि भारताची एकात्मता, स्वातंत्र्य आणि प्रगती ह्या गोष्टी साध्य करण्यास सोप्या झालेल्या असतील. भाषाभाषांमधील भेद हे तेव्हा आपल्यामध्ये दरी निर्माण करणार नाहीत. हिंदी भाषेचा मध्यस्थ भाषा म्हणून स्वीकार केल्याने, परंतु तरीही आपापल्या प्रादेशिक भाषांचा यथोचित सन्मान केल्याने, आपली अक्षमतेपासून सुटका होईल. ‘हिंदु-मुस्लीम’ संघर्षावरील खराखुरा उपाय शोधण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ. ‘माता’ म्हणून देशाचे दर्शन होत नसल्यामुळे, या अडथळ्यांना भेदून जावे ही आस आमच्यामध्ये पुरेशा तीव्रतेने, गांभीर्याने जाणवत नाही. आणि म्हणूनच ते अडथळे भेदण्याचे मार्गही आम्हाला आजवर गवसलेले नाहीत आणि संघर्ष अधिकाधिकच उग्र रूप धारण करत चालला आहे. आम्हाला जर कशाची गरज असेल तर ती ‘भारतमाते’च्या खऱ्याखुऱ्या अखंड प्रतिमेची! पण, खऱ्याखुऱ्या दर्शनाऐवजी त्याच्या आभासालाच भुलून, जर का आपण केवळ हिंदुंची माता, किंवा हिंदु राष्ट्रवाद ही कल्पना जोपासली तर आपण पुन्हा एकदा त्याच जुन्या चुकांच्या भक्ष्यस्थानी पडू आणि ‘राष्ट्रवादा’च्या पूर्ण उन्मीलनापासून स्वत:ला वंचित ठेवू.

– श्रीअरविंद
(CWSA 09 : 225-226)