Posts

विचार शलाका – ०४

भारतीय धर्माने व्यक्तीला सुप्रस्थापित, सुसंशोधित, बहुशाखीय आणि नित्य विस्तीर्ण होत जाणारा असा ज्ञानाचा तसेच आध्यात्मिक वा धार्मिक साधनेचा मार्ग दाखवून दिला.

त्या उच्च पायऱ्यांवर जाण्याची ज्यांची तयारी झालेली नाही त्यांच्याकरिता, भारतीय धर्माने व्यक्तीजीवन व समाजगत जीवन यासंबंधातील व्यवस्था घालून दिली, व्यक्तिगत शिस्त व सामाजिक शिस्त, व्यक्तिगत वर्तन व समाजगत वर्तन या संबंधात एक आराखडा पुरवला; मानसिक, नैतिक व प्राणिक संवर्धनाची चौकट पुरवली. ही व्यवस्था, आराखडा, चौकट मान्य करून कोणीही आपल्या मर्यादेत, आपल्या प्रकृतीला धरून असे वागू शकतो की, अंतत: श्रेष्ठ अस्तित्वात व जीवनात प्रविष्ट होण्याची त्याची तयारी होते.

हिंदूधर्माने…जीवनाचा कोणताही भाग धार्मिक व आध्यात्मिक जीवनाला परका मानला नाही व ठेवला नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 20 : 181)

संक्रमणकाळात विचारांची अधिकच आवश्यकता असते. क्रांतिकारी कालखंड दोन प्रकारच्या अविचारी, कोणतेही आकलन नसलेल्या, कोणताही विचारविमर्श न केलेल्या मनांना जन्म देतो; एक असे मन की जे जुन्या गोष्टींना, केवळ ते जुने आहे म्हणून चिकटून राहते आणि दुसरे मन अमुक एक गोष्ट केवळ नवीन आहे म्हणून त्याच्या पाठीमागे वेड्यासारखे धावत सुटते. या दोहोंमध्ये स्वयंघोषित मध्यममार्गी माणूस उभा राहतो. तो म्हणतो, जुन्यामधले काहीतरी आणि नवीन मधलेही काहीतरी असे दोन्ही असू दे. या दोन टोकांच्या माणसांपेक्षा हा मध्यममार्गी माणूस काही कमी अविचारी नसतो. तो मध्यममार्गाच्या सूत्राच्या आणाभाका घेतो आणि अशक्य असा ताळमेळ घालू पाहतो. ‘जुन्या बाटल्यांमध्ये नवीन वाईन भरता येत नाही’ असे जेव्हा येशू ख्रिस्त म्हणतात तेव्हा त्याच्या म्हणण्याचा हाच आशय असतो.

विचार केव्हाही एखादे सूत्र ठरवीत नाही, आधीच अंदाज बांधत नाही, तर तो प्रत्येक गोष्टीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करतो, प्रत्येक गोष्टीचे मोजमाप करतो. जर एखादा माणूस म्हणेल की, प्रबुद्ध युरोपाच्या मार्गानुसार तुमच्या सर्व सवयी, संकल्पना बदला तर विचार उत्तर देईल, ”मला आधी विचार करू दे. युरोप हा प्रबुद्ध आहे आणि भारत अडाणी आहे असे मी का गृहीत धरू? कदाचित असेही असू शकेल की, युरोपियन लोक हेच खरे अडाणी असू शकतील आणि भारतीय ज्ञानामध्ये खरेखुरे तथ्य असेल. मला शोधले पाहिजे.” आणि दुसऱ्या बाजूने जर एखादा माणूस म्हणेल, ”भारतीय बन आणि भारतीयांप्रमाणे वाग,” तर विचार म्हणेल, ”भारतीय बनण्यासाठी मला भारतीयांप्रमाणेच वागावे लागेल का याविषयी माझ्या मनात संभ्रम आहे. कदाचित असेही असू शकेल की, भारतीयांना जे अपेक्षित नव्हते तेच आत्ताच्या काळातील या देशातील माणसे बनली असतील. भारतीय संस्कृतीच्या वेगवेगळ्या कालखंडांमध्ये भारतीय कसे होते हे मला शोधलेच पाहिजे आणि संस्कृतीमधील शाश्वत काय आणि तात्पुरते काय ह्याचा शोध मला घेतलाच पाहिजे. असेही शक्य आहे की, आम्ही गमावलेल्या काही खऱ्याखुऱ्या भारतीय गोष्टी युरोपयिनांकडे असू शकतील.” भारतीय असणे चांगलेच आहे, पण भारतीय असणे म्हणजे ज्ञानाने भारतीय असणे होय, केवळ पूर्वग्रहाने नव्हे.

मानवी समाजाच्या रक्षणासाठी, तसेच व्यक्तीच्या आणि मानवी समूहाच्या परिपूर्णतेसाठी नेमका कोणता आचार उत्तम आहे हे विचार, विवेक आणि ज्ञान यांच्या साहाय्याने ठरविणे ह्यावरच हिंदुधर्माची उभारणी करण्यात आलेली आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 01 : 499-500)

जर कोणी आम्हाला असा प्रश्न विचारला की, “हिंदुधर्म म्हणजे काय, तो कसा आहे? हा धर्म काय शिकवतो, कसा आचार करतो, यात सर्वसामान्य घटक कोणते आहेत?” तर उत्तरादाखल आम्ही असे म्हणू शकतो की, सर्वोच्च असूनही, व्यापक अशा तीन आध्यात्मिक अनुभूतींवर, तीन मूलभूत संकल्पनांवर भारतीय धर्म आधारलेला आहे.

‘एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति’
पहिली गोष्ट वेदामध्ये म्हटल्याप्रमाणे, एक अस्तित्व आहे ज्याला सज्जन अनेक नावे देतात. (‘एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति’) उपनिषदात याचे वर्णन एकमेवाद्वितीय ब्रह्म असे केले आहे; हे एकच सर्व काही असून, ते या सर्वांच्या अतीतदेखील आहे. बुद्धधर्मीय या तत्त्वाला ‘चिरंतन तत्त्व’ म्हणतात. मायावादी याला ‘केवल तत्त्व’ म्हणतात; देववादी याला ‘ईश्वर किंवा पुरुष’ म्हणतात. जीव आणि निसर्ग किंवा प्रकृती या ईश्वराच्या आधीन असतात. एका शब्दात या तत्त्वाला ‘शाश्वत, अनंत’ म्हणता येते. हिंदुधर्माचा हा सर्वत्र समान असा पाया आहे; मानवी बुद्धीने या तत्त्वाचे वर्णन अनेक प्रकारे केले आहे. या चिरंतनाचा, अनंताचा शाश्वताचा शोध लावणे, त्याच्या अगदी निकट जाणे, त्यात प्रविष्ट होणे, त्याच्याशी कोणत्या तरी प्रमाणात, कोणत्या तरी प्रकारे एकरूप होणे, हा त्याच्याविषयीच्या आध्यात्मिक अनुभूतीचा कळस होय. हा कळस गाठणे, त्यासाठी अंतिम प्रयत्न करणे ही पहिली सार्वत्रिक श्रद्धा भारताच्या धार्मिक मनात आढळते. हिंदुधर्माचे हे पहिले पायाभूत तत्त्व अनेक सूत्रांनी सांगितले आहे. हे पायाभूत तत्त्व कोण्या एका सूत्ररूपाने माना, हे महान आध्यात्मिक ध्येय, भारतात संमत असलेल्या सहस्त्रावधि मार्गांपैकी कोण्या एका मार्गाने अनुसरा, अथवा त्यातून फुटणाऱ्या एखाद्या नव्याच मार्गाने त्या ध्येयाचा मागोवा घ्या; असे तुम्ही केलेत की, या धर्माच्या हृदयाला तुम्ही गाठले असे होईल.

शाश्वत अनंताकडे जाण्याचे अनंत मार्ग
या धर्माची दुसरी पायाभूत कल्पना हीच आहे की, शाश्वत अनंताकडे जाण्याचे मार्ग अनेक आहेत. अनंत जे मूळ आहे त्यात अनेक अनंते आहेत आणि या अनेक अनंतांपैकी प्रत्येक अनंत शाश्वतच आहे. विश्वाच्या मर्यादांमध्ये ईश्वर स्वत:ला अभिव्यक्त करतो आणि अनेक मार्गांनी या विश्वामध्ये तो स्वत:ची परिपूर्ती अनुभवतो; आणि हा प्रत्येक मार्ग त्या ‘शाश्वता’चा मार्ग असतो. प्रत्येक सान्तामध्ये आपल्याला ‘अनंता’ची भेट होऊ शकते. सर्व गोष्टी ह्या अनंताच्या मूर्ती व प्रतीके असल्याने, कोणत्याही गोष्टीच्या द्वारा आम्ही अनंताकडे जाऊ शकतो. सर्व विश्वशक्ती ह्या ‘एका’चे आविष्कार आहेत. सर्व शक्ती ह्या ‘एका’च्या शक्ती आहेत. प्रकृतीच्या कार्यामागील देवदेवतांकडे, त्या एका ईश्वराच्या विविध शक्ती आहेत, एका ईश्वराची विविध नामे आहेत, एका ईश्वराची विविध व्यक्तित्वे आहेत या भावनेने पाहिले पाहिजे आणि पूजले पाहिजे. सर्व घटनांच्या पाठीमागे, मग त्या घटना चांगल्या दिसोत वा वाईट, ग्राह्य वाटोत वा अग्राह्य वाटोत, भाग्याच्या वाटोत वा दुर्भाग्यपूर्ण वाटोत, त्यांच्या पाठीमागे अनंत जाणीवयुक्त शक्ती आहे, कार्यकारी शक्ती आहे, ‘अनंता’ची इच्छा आहे, कायदा आहे, माया आहे, प्रकृती आहे, शक्ती किंवा कर्म आहे. ‘अनंत’ निर्मिती करतो आणि ब्रह्मा होतो, तो रक्षण करतो आणि विष्णु होतो, संहार करतो किंवा स्वत:मध्ये सामावून घेतो आणि रुद्र वा शिव होतो. सर्वश्रेष्ठ शक्ती ही आधार देणारी, संरक्षण करणारी होते, ती लक्ष्मी किंवा दुर्गा किंवा विश्वमाता म्हटली जाते. अगदी संहारक रूप धारण करूनदेखील, जी कल्याणकारिणीच असते; तिला चंडी, काली, कालीमाता म्हणतात. एकच ईश्वर विविध नामांनी आणि विविध देवदेवतांच्या रूपाने, विभिन्न गुणवैशिष्ट्यांच्या द्वारे अभिव्यक्त होतो. वैष्णवांचा दिव्य प्रेमाचा देव आणि शाक्तांचा दिव्य सामर्थ्याचा देव हे दोन वेगळे देव असल्याचे भासतात, परंतु खरेतर वेगवेगळ्या रूपांमधून अभिव्यक्त होणारी ती एकच अनंत देवता असते. सर्वश्रेष्ठ देवाकडे, अनंत शाश्वताकडे यांपैकी कोणत्याही नामरूपाच्या आधाराने जावे, ज्ञान असता जावे, ज्ञान नसताही जावे; कारण या नामरूपांच्या द्वारा, त्यांच्या पलीकडे, त्यांच्या अतीत असलेल्या सर्वश्रेष्ठ तत्त्वाचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला पुढे जाता येते….

अंत:करणातील ईश्वर
भारतीय धर्माला आधारभूत अशा उच्चतम आध्यात्मिक अनुभवाच्या ज्या तीन गोष्टी आहेत, त्यातील दोन गोष्टींचा विचार आत्तापर्यंत झाला. तिसरी पायाभूत गोष्ट आंतरिक आध्यात्मिक जीवनाला अतिशय गती देणारी आहे. सर्वश्रेष्ठाकडे वा ईश्वराकडे विश्वात्मक जाणिवेच्या द्वारे जाता येते किंवा सर्व आंतरिक व बाह्य प्रकृतीचा भेद करून जाता येते, हे खरे आहे पण तो ईश्वर प्रत्येक व्यक्तिभूत आत्म्याला स्वत:मध्येच, म्हणजे स्वत:च्या आध्यात्मिक भागामध्ये भेटू शकतो, कारण त्यामध्ये असे काहीतरी असते की, जे त्या ईश्वरी अस्तित्वाशी एकत्व पावणारे असते, किमान त्या दिव्य ईश्वरी अस्तित्वाशी संबंधित असते. भारतीय धर्माचे सार हे आहे की, मानवाने आपला विकास करून घ्यावा, आपल्याला अज्ञानातून पार व्हावयाचे आहे, आपल्या मनापासून व जीवनापासून आत्मज्ञान दडवून ठेवणाऱ्या अज्ञानातून आपल्याला पार व्हावयाचे आहे आणि आपल्यातील ईश्वराची ओळख करून घ्यावयाची आहे हे ध्येय मनात ठेवून मानवाने आपले जीवन जगावे; ह्या तीन गोष्टी एकत्र केल्या तर त्यामध्येच हिंदु धर्म सामावलेला आहे, हेच त्याचे मूलभूत सार आहे आणि जर कोणता मार्ग आवश्यक असेल तर तो हाच मार्ग आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 20 : 193-195)

ज्याला आपण शाश्वत धर्म असे म्हणतो तो धर्म आहे तरी काय? तो एवढ्यासाठी हिंदु धर्म आहे कारण हेच की हिंदु राष्ट्रामध्ये त्याचे जतन झाले आहे. समुद्र आणि हिमालय ह्यांनी वेढल्यामुळे अलग झालेल्या ह्या द्विपकल्पातच त्याचा उदय झाला आणि त्याचे शतकानुशतके जतन करण्याची जबाबदारी या प्राचीन पुण्यभूमीतच आर्यांकडे देण्यात आली. पण हा शाश्वत धर्म कोणत्याही एका देशापुरताच मर्यादाबद्ध करण्यात आलेला नाही, तो जगातील अमुक एखाद्या नेमक्या ठरावीक भागापुरता व सदा सर्वकाळासाठी बांधला गेलेला नाही.

ज्याला आपण हिंदुधर्म म्हणतो तो खरोखर शाश्वत धर्मच आहे. ह्याचे कारण, तो असा एक विश्वात्मक धर्म आहे की ज्याने इतर सर्वांना कवेत घेतले आहे. जर एखादा धर्म विश्वात्मक नसेल तर तो शाश्वत असूच शकणार नाही. जो धर्म संकुचित आहे, एखाद्या विशिष्ट लोकांचा अगर पंथाचा आहे, जो मर्यादित स्वरूपाचा आहे, असा धर्म मर्यादित कालापर्यंतच टिकेल; व ठरावीक हेतु अगर कार्य या पुरताच अस्तित्वात राहील.

विज्ञानाने लावलेल्या शोधांची आणि तत्त्वज्ञानाच्या भाकितांची अगोदरच अटकळ बांधून, आणि त्यांचा स्वत:मध्ये समावेश करून घेत, जडवादावर मात करू शकेल असा हा एकच धर्म आहे.

ईश्वराचे सान्निध्य मानवजातीवर ठसवू पाहणारा आणि ईश्वराप्रत पोहोचण्याचे मानवाचे जेवढे म्हणून मार्ग आहेत त्या सर्वांना आपल्या कवेत कवळू पाहणारा हा एकच धर्म आहे.

ईश्वर हा सर्व मानवजातीत, वस्तुमात्रांत आहे; ईश्वरातच आपण आपले सर्व व्यवहार करतो व ईश्वराशिवाय आपणास अस्तित्व नाही; हे सत्य सर्व धर्म जाणतात पण हिंदुधर्म हा एकच असा धर्म आहे की जो हरघडी, दरक्षणी केवळ ह्याच सत्यावर भर देतो.

हा असा एकच धर्म आहे की, जो आपल्याला केवळ सत्य समजावून देऊन त्याविषयी विश्वास बाळगण्यासाठीच सक्षम करत नाही तर, त्या सत्याची आमच्या अस्तित्वाच्या सर्व अंगांना साक्षात अनुभूती यावी यासाठीदेखील तो आम्हाला सक्षम करतो.

हा असा एकच धर्म आहे की, जो जगाला, जग काय आहे हे दाखवून देतो, जग ही वासुदेवाची लीला आहे हे तो दाखवून देतो. या लीलेचे सूक्ष्मतम कायदे, त्याचे उदात्त नियम काय आहेत हे तो दाखवतो आणि या लीलेमध्ये आपण आपली भूमिका सर्वोत्तमपणे कशी पार पाडू शकतो हेही तो दाखवतो.

हिंदुधर्म हा असा एकमेव धर्म आहे की, ज्याने जीवनाच्या अगदी लहानात लहान भागाची देखील धर्माशी फारकत होऊ दिलेली नाही. हा धर्म अमरत्व काय आहे हे जाणतो. ह्या धर्माने आमच्यामध्ये असणारी मृत्यूची वास्तविकताच पूर्णत: पुसून टाकली आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 08 : 11-12)

हिंदुधर्माचे मूलभूत वैशिष्ट्य लक्षात घेतले तर आणि तरच हिंदुधर्मातील विधी, संस्कार, धार्मिकविधी, उपासनापद्धती आणि पूजाविधी यांचे आकलन होऊ शकेल. मूलत: हा धर्म अनाग्रही आणि सर्वसमावेशक स्वरूपाचा आहे. या धर्माने त्याच्या सहवासात आलेल्या सर्व धर्मांना स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतले; त्या त्या धर्मातील विधींचा, अतिभौतिक जगताच्या सत्याशी व अनंताच्या सत्याशी योग्य नाते तो जर प्रस्थापित करू शकला तर तो समाधानी होत असे.

धर्म हा केवळ संत वा विचारवंतांनाच नव्हे तर, सर्वसामान्य लोकांना देखील सत्य म्हणून उपयोगात यावयाचा असेल तर त्याची हाक आपल्या सर्व अस्तित्वाला पोचली पाहिजे, केवळ आपल्या अतिबौद्धिक व बौद्धिक अंगांना पोचून भागणार नाही. कल्पना, भावना, सौंदर्यसंवेदना यांना ती हाक पोचली पाहिजे. अर्धवट अवचेतन असलेल्या अंगांच्या सहज जन्मजात भावनांना देखील ती हाक पोचली पाहिजे. ही सर्व अंगे धर्माच्या प्रभावाखाली आली पाहिजेत; ह्याचीदेखील हिंदु धर्माला जाण होती. धर्माने मनुष्याला अतिबौद्धिक, आध्यात्मिक सत्याकडे घेऊन गेले पाहिजे, मार्गात त्याने प्रकाशपूर्ण बुद्धीची मदत घेतली पाहिजे हे खरे आहे, तरी आमच्या संकीर्ण प्रकृतीची बाकीची अंगेसुद्धा ईश्वराकडे धाव घेतील असेही त्याने केले पाहिजे; धर्माने त्या अंगांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

आणखी एक गोष्ट, प्रत्येक मनुष्य जेथे उभा असेल, ज्या ज्ञानाच्या व भावनेच्या अवस्थेत असेल, तेथेच, त्या अवस्थेतच त्याला धर्माने हात देऊन आध्यात्मिक केले पाहिजे, अध्यात्मपरायण केले पाहिजे; त्याच्यावर कोणतीही गोष्ट लादता कामा नये. सत्य जिवंतशक्ती देखील, त्याला तशी ती दिसत नाही तोपर्यंत त्याच्यावर लादली जाता कामा नये.

– श्रीअरविंद
(CWSA 20 : 147-148)

उच्च आणि सत्यतर हिंदुधर्मामध्ये ही दोन प्रकार आहेत – सांप्रदायिक आणि असांप्रदायिक, विध्वंसक आणि समन्वयात्मक. एक स्वत:ला कोणत्यातरी एकाच पैलूला जखडून ठेवतो आणि दुसरा ‘सर्वात्मका’ला मिळविण्याची खटपट करतो.

धर्मविषयक सांप्रदायिक संकल्पना
एखादी संकल्पना, एखादा अनुभव, एखादे मत वा मतप्रणाली, एखादी प्रवृत्ती, कल, एक विशिष्ट गुरु, एखादा निवडक अवतार यांच्याबद्दलच्या राजसिक किंवा तामसिक आसक्तीमधून सांप्रदायिक संकल्पनांचा उदय होतो. त्यांविषयी असलेली ही बांधिलकी असहिष्णु, गर्विष्ठ असते. ती आपल्या तोकड्या ज्ञानाविषयी अभिमान बाळगणारी आणि आपल्याकडे नसलेल्या ज्ञानाविषयी कुत्सित भूमिका घेणारी असते. ती दुसऱ्यांचे कुसंस्कार, अंधश्रद्धा याविषयी बडबड करत राहते आणि स्वत:चे कुसंस्कार आणि अंधश्रद्धा यांविषयी अंध असते. किंवा ती संकल्पना म्हणते, ”माझे गुरु हेच तेवढे खरे एकमेव गुरु आहेत आणि इतर एकतर भोंदू आहेत किंवा कनिष्ठ प्रतीचे आहेत,” किंवा “माझी मानसिकताच फक्त योग्य आहे आणि जे माझा मार्ग अनुसरत नाहीत ते मूर्ख आहेत किंवा पढिक वा अप्रामाणिक आहेत,” किंवा ”माझा अवतार हाच खराखुरा ईश्वर आहे आणि इतर सर्व कनिष्ठ आविष्कार आहेत.” किंवा ”माझी इष्ट देवता हीच ईश्वर आहे आणि इतर देवता ह्या केवळ तिची आविष्करणं आहेत.”

धर्मविषयक समन्वयी संकल्पना
जेव्हा जीव अधिकाधिक उन्नत होत जातो, तेव्हाही तो त्याच्या संकल्पना, अनुभव, मते, प्रकृती, गुरु, इष्ट देवता यांचे अग्रक्रमाने अनुसरण करतो, पण आता तो इतरांकडे अज्ञानी आणि वर्जक दृष्टीने पाहत नाही. तो म्हणतो, “ईश्वराकडे जाणारे अनेक मार्ग आहेत आणि सर्वच मार्ग समानतेनेच ईश्वराकडे जाऊन पोहोचतात. सर्व माणसं, मग ती गुन्हेगार असू देत वा नास्तिक असू देत, सर्वच माझे साधनेतील बंधू आहेत आणि तो ईश्वर प्रत्येकाला त्याच्या त्याच्या मार्गाने त्या ‘एकमेवाद्वितीया’कडे घेऊन जात आहे.”

मात्र जेव्हा पूर्ण ज्ञान उदित होते तेव्हा तो स्वत:मध्ये सर्वच अनुभव कवळून घेतो. त्याला उमगते की, सर्वच संकल्पना सत्य आहेत, सर्व मतमतांतरं उपयुक्त आहेत; सर्व अनुभव आणि वृत्तीप्रवृत्ती ह्या वैश्विक अनुभव आणि पूर्णता मिळविण्याची साधने आणि स्तर आहेत; सर्व गुरु हे त्या एका आणि एकमेव गुरुची अपूर्ण माध्यमं वा अवतार आहेत; सर्व इष्टदेवता आणि अवतार हे ईश्वरच आहेत…..

– श्रीअरविंद
(CWSA 01 : 551)

संक्रमणकाळात विचारांची अधिकच आवश्यकता असते. क्रांतिकारी कालखंड दोन प्रकारच्या अविचारी, कोणतेही आकलन नसलेल्या, कोणताही विचारविमर्श न केलेल्या मनांना जन्म देतो; एक असे मन की जे जुन्या गोष्टींना, केवळ ते जुने आहे म्हणून चिकटून राहते आणि दुसरे मन अमुक एक गोष्ट केवळ नवीन आहे म्हणून त्याच्या पाठीमागे वेड्यासारखे धावत सुटते. या दोहोंमध्ये स्वयंघोषित मध्यममार्गी माणूस उभा राहतो. तो म्हणतो, जुन्यामधले काहीतरी आणि नवीन मधलेही काहीतरी असे दोन्ही असू दे. या दोन टोकांच्या माणसांपेक्षा हा मध्यममार्गी माणूस काही कमी अविचारी नसतो. तो मध्यममार्गाच्या सूत्राच्या आणाभाका घेतो आणि अशक्य असा ताळमेळ घालू पाहतो. ‘जुन्या बाटल्यांमध्ये नवीन वाईन भरता येत नाही’ असे जेव्हा येशू ख्रिस्त म्हणतात तेव्हा त्याच्या म्हणण्याचा हाच आशय असतो.

विचार केव्हाही एखादे सूत्र ठरवीत नाही, आधीच अंदाज बांधत नाही, तर तो प्रत्येक गोष्टीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करतो, प्रत्येक गोष्टीचे मोजमाप करतो. जर एखादा माणूस म्हणेल की, प्रबुद्ध युरोपाच्या मार्गानुसार तुमच्या सर्व सवयी, संकल्पना बदला तर विचार उत्तर देईल, ”मला आधी विचार करू दे. युरोप हा प्रबुद्ध आहे आणि भारत अडाणी आहे असे मी का गृहीत धरू? कदाचित असेही असू शकेल की, युरोपियन लोक हेच खरे अडाणी असू शकतील आणि भारतीय ज्ञानामध्ये खरेखुरे तथ्य असेल. मला शोधले पाहिजे.” आणि दुसऱ्या बाजूने जर एखादा माणूस म्हणेल, ”भारतीय बन आणि भारतीयांप्रमाणे वाग,” तर विचार म्हणेल, ”भारतीय बनण्यासाठी मला भारतीयांप्रमाणेच वागावे लागेल का याविषयी माझ्या मनात संभ्रम आहे. कदाचित असेही असू शकेल की, भारतीयांना जे अपेक्षित नव्हते तेच आत्ताच्या काळातील या देशातील माणसे बनली असतील. भारतीय संस्कृतीच्या वेगवेगळ्या कालखंडांमध्ये भारतीय कसे होते हे मला शोधलेच पाहिजे आणि संस्कृतीमधील शाश्वत काय आणि तात्पुरते काय ह्याचा शोध मला घेतलाच पाहिजे. असेही शक्य आहे की, आम्ही गमावलेल्या काही खऱ्याखुऱ्या भारतीय गोष्टी युरोपयिनांकडे असू शकतील.” भारतीय असणे चांगलेच आहे, पण भारतीय असणे म्हणजे ज्ञानाने भारतीय असणे होय, केवळ पूर्वग्रहाने नव्हे.

मानवी समाजाच्या रक्षणासाठी, तसेच व्यक्तीच्या आणि मानवी समूहाच्या परिपूर्णतेसाठी नेमका कोणता आचार उत्तम आहे हे विचार, विवेक आणि ज्ञान यांच्या साहाय्याने ठरविणे ह्यावरच हिंदुधर्माची उभारणी करण्यात आलेली आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 01 : 499-500)