Posts

अमृतवर्षा ०१

साधक : खरेखुरे स्वातंत्र्य अस्तित्वातच नाही का? प्रत्येकच गोष्ट ही पूर्णपणे पूर्वनिर्धारित असते का, अगदी स्वातंत्र्य सुद्धा पूर्वनिर्धारित असते का ? प्रारब्धवाद हेच सर्वोच्च रहस्य आहे का?

श्रीमाताजी : स्वाधीनता आणि प्रारब्ध (Freedom and fatality) स्वातंत्र्य आणि निश्चयवाद (liberty and determinism) या गोष्टी म्हणजे चेतनेच्या भिन्नभिन्न पातळ्यांवर प्राप्त होणारी सत्य आहेत. त्या दोहोंना समान पातळीवर आणून, परस्परांविरोधात उभे करण्यास मनाला भाग पाडणारे जर कोणी असेल तर ते अज्ञानच असते.

चेतना ही काही एकच एक एकसंध अशी वास्तविकता नसते, तर ती खूप जटिल असते; एखादे सरळसोट प्रतल असल्यासारखी ती नसते; तर ती बहुआयामी असते. एका बाजूला सर्वोच्च उंचीवर ‘अव्यक्त परात्पर’ असते तर सर्वात खाली ‘जडद्रव्य’ असते आणि या दोहोंच्या दरम्यान, म्हणजेच सर्वोच्च उंची आणि निम्नतम खोली यांच्या दरम्यान चेतनेच्या स्तरांच्या अगणित छटा असतात.

जडभौतिकाच्या प्रतलावर आणि सामान्य चेतनेच्या स्तरावर तुमचे हातपाय बांधलेले असतात. तेथे तुम्ही प्रकृतीच्या यंत्रणेचे गुलाम असता; तुम्ही कर्मबंधांनी बद्ध झालेले असता, आणि तेथे जे जे काही घडते ते, जे आधी घडून गेले आहे त्याचा काटेकोर परिणाम असतो. तेथे स्वतंत्र कृतीचा व कर्माचा आभास असतो पण वास्तविक, इतर जण जे काही करत असतात त्याच गोष्टी तुम्ही करत असता, या जगतामध्ये प्रकृतीच्या लौकिक व्यापारांचे तुम्ही केवळ प्रतिध्वनी असता, प्रकृतीच्या वैश्विक यंत्राच्या रहाटगाडग्यावर तुम्ही असहाय्यपणे फिरत राहता.

पण हे असेच असायला पाहिजे असे मात्र नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमचे स्थान बदलू शकता; तुम्ही खाली असण्याऐवजी, या अजस्त्र यंत्रणेखाली चिरडून जाण्याऐवजी, किंवा कळसूत्री बाहुलीप्रमाणे हालचाली करत राहण्याऐवजी, तुम्ही वर उठू शकता आणि वरून पाहू शकता; आणि तुमच्या चेतनेमध्ये परिवर्तन घडवून त्यायोगे, वरकरणी अपरिहार्य भासणारी परिस्थिती आणि बंधवत वाटणारी स्थिती यामध्ये बदल घडवून आणणाऱ्या सुकाणूचा तुम्ही ताबा घेऊ शकता.

एकदा का तुम्ही त्या रहाटगाडग्याच्या वर उठलात आणि वर भरभक्कमपणे उभे राहिलात तर तुमच्या असे लक्षात येते की, तुम्ही मुक्त आहात. तुम्ही सर्व प्रकारच्या सक्तींपासून मुक्त आहात. तुम्ही आता केवळ एक अगतिक साधन राहत नाही; इतकेच नव्हे, तर तुम्ही आता एक सक्रिय असे माध्यम बनता. आता तुम्ही तुमच्या कर्मफलांनी बद्ध राहत नाही; तर, तुम्ही त्या कर्मफलांमध्ये बदलसुद्धा घडवून आणू शकता.

एकदा का तुम्ही या साऱ्याकडे शक्तींची लीला या दृष्टीने पाहू लागलात; एकदा का तुम्ही या शक्तींचा उगम जेथे आहे त्या चेतनेच्या स्तरावर जाऊन पोहोचलात, आणि त्या गतिमान अशा शक्ति-उगमाशी तद्रूप झालात की मग, तुम्ही केवळ एखाद्या कळसूत्री बाहुलीप्रमाणे हालचाल करणारे राहात नाही तर तिची सूत्रे हालविणाऱ्यांपैकी एक बनता.

कर्माच्या चक्रातून बाहेर पडून दिव्य गतिविधींमध्ये प्रवेश होणे हेच खरंतर योगसाधनेचे उद्दिष्ट असते. योगसाधनेच्या साहाय्याने तुम्ही प्रकृतीच्या यांत्रिक चक्रामधून बाहेर पडता. प्रकृतीच्या यांत्रिक चक्रामध्ये तुम्ही केवळ एक अज्ञानी गुलाम असता; असहाय्य, अगतिक असे साधन असता, अशा यांत्रिक चक्रामधून योगसाधनेच्या आधारे तुम्ही बाहेर पडता आणि एका निराळ्या स्तरावर चढून जाता; तेथे तुम्ही ‘उच्चतर नियती’च्या कार्याचे जागरूक सहभागीदार आणि क्रियाशील माध्यम बनता.

– श्रीमाताजी [CWM 03 : 29-30]

(भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला पुढील संदेश तिरूचिरापल्लीच्या ‘ऑल इंडिया रेडिओ’ वरून प्रसारित करण्यात आला. त्या भाषणातील हा अखेरचा भाग…)

विश्वाला भारताचे जे आध्यात्मिक योगदान आहे ते प्रदान करण्यास त्याने केव्हाच प्रारंभ केला आहे. सतत चढत्यावाढत्या प्रमाणात भारताची आध्यात्मिकता युरोप आणि अमेरिकेमध्ये प्रवेश करत आहे. ही चळवळ वाढतच राहील. काळाच्या आपत्तींमध्ये भारताकडे जगाचे अधिकाधिक डोळे मोठ्या आशेने वळत आहेत. केवळ भारताच्या शिकवणुकीकडेच नाही तर भारताच्या अंतरात्मिक आणि आध्यात्मिक साधनापद्धतींचा ते उत्तरोत्तर अधिकाधिक आश्रय घेत आहेत.

उर्वरित जे काही आहे ती अजूनतरी वैयक्तिक आशा आहे आणि एक अशी संकल्पना, एक असे उद्दिष्ट आहे की, ज्याने भारतातील आणि पाश्चात्त्य देशांमधील पुरोगामी मनांचा ठाव घ्यायला सुरुवात केली आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रयत्न करू लागल्यावर, मार्गामध्ये ज्या अडीअडचणी येतात त्यापेक्षा कितीतरी कठीणतर अडचणी या मार्गावर आहेत; परंतु अडचणी ह्या त्यांवर मात करण्यासाठीच असतात आणि जर ‘ईश्वरी इच्छा’ तेथे असेल तर अडचणींवर मात केली जाईलच. येथे देखील, जर अशा प्रकारचे विकसन होणारच असेल तर ते आत्म्याच्या विकसनातूनच आणि आंतरिक जाणिवेतूनच उदयास यावयास हवे, यामध्ये भारत पुढाकार घेऊ शकतो. आणि त्याची व्याप्ती वैश्विक असणेच भाग आहे, त्याची केंद्रवर्ती प्रक्रिया भारताचीच असू शकेल.

भारताच्या स्वातंत्र्यदिनी मी हा आशय आपणापुढे मांडू इच्छितो. हा विचारांचा धागा पूर्णत्वास जाईल किंवा नाही, तो किती प्रमाणात पूर्णत्वास जाईल, हे सर्व काही या नूतन आणि स्वतंत्र भारतावर अवलंबून आहे.
– श्रीअरविंद
(CWSA 36 : 477)

(दिनांक : १९ जून १९०९)

भारतामध्ये राष्ट्रनिर्माणाचे जे कार्य सुरु झाले आहे, ते इतक्या वेगाने, इतक्या सुस्पष्टपणे जगासमोर येत आहे की, त्यामुळे सर्वांनाच ही प्रक्रिया दिसू शकत आहे. आणि ज्यांच्यापाशी थोडी सहानुभूती आहे, अंतर्दृष्टी आहे ते ह्या दैवी रचनेची दिशा, त्यामध्ये कार्यकारी असणाऱ्या शक्ती, आणि त्यामध्ये उपयोगात आणले गेलेले साहित्य यामधील वेगळेपण पाहू शकत आहेत.

हे राष्ट्र म्हणजे प्रकृतीच्या कार्यशाळेमध्ये कच्च्या मालातून तयार झालेला नवीन वंश नव्हे किंवा हे राष्ट्र आधुनिक परिस्थितीमुळे निर्माण झाले आहे, असेही नव्हे. तर येथील संस्कृती ही, या पृथ्वीवरील महान संस्कृतींपैकी, प्राचीन वंशांपैकी एक आहे; दुर्दम्य प्राणशक्ती, महानतेची, सखोलतेची जणू खाणच, अद्भुत क्षमता असणारी, अशी ही संस्कृती; मानवी संस्कृतीच्या इतर प्रकारांपासून तसेच परकीय वंशप्रकारांपासून सामर्थ्याचे अगणित उगमस्त्रोत स्वत:मध्ये सामावून घेत, आता ती कायमसाठी एका सुसंघटित अशा राष्ट्रीय एकात्मतेमध्ये स्वत:चे उन्नयन करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

आमच्या पुरातन कालापासून जो प्रयत्न आजवर आमचा वंश करत होता, तो प्रयत्न आता संपूर्णत: नवीन परिस्थितीमध्ये तो करेल. एखादा जाणकार निरीक्षक त्याच्या यशस्वितेचे भाकीत करू शकेल कारण जे काही महत्त्वाचे अडथळे होते ते दूर करण्यात आले आहेत किंवा ते दूर होण्याच्या प्रक्रियेत आहेत. परंतु आम्ही याही पुढे जातो आणि अशी खात्री बाळगतो की, यश मिळण्याची खात्रीच आहे कारण भारताची महानता, भारताची एकात्मता, आणि भारताचे स्वातंत्र्य ही आता संपूर्ण जगाचीच आवश्यकता बनली आहे.

ही अशी श्रद्धा आहे की, जिच्यामध्ये कार्य करण्यासाठी ‘कर्मयोगिन’ने (श्रीअरविंद यांनी सुरु केलेले इंग्रजी साप्ताहिक) हात घातला आहे आणि कितीही प्रचंड आणि वरवर पाहता कितीही दुस्तर संकटे का येईनात, त्यामुळे ‘कर्मयोगिन’ नाउमेद होणार नाही आणि त्या कार्यामध्ये चिकाटीने प्रयत्नशील राहील. ईश्वर आमच्या सोबत आहे आणि या श्रद्धेमुळेच आमचा विजय होईल असा आमचा विश्वास आहे.

आम्हाला अशी खात्री आहे की, मानवतेला आमची गरज आहे आणि मानवतेविषयीचे, आमच्या देशाविषयीचे, वंशाविषयीचे, आमच्या धर्माविषयीचे आमचे प्रेम आणि तिची सेवा, आमची अंत:करणे शुद्ध करेल आणि या लढ्यातील कृतीसाठी ती आम्हाला प्रेरित करेल.

– श्रीअरविंद
(CWSA 08 : 23-24)

इसवी सन १९१४. ‘बॉम्बे क्रॉनिकल’ या नियतकालिकामध्ये, पाँडिचेरी येथून प्रकाशित होणाऱ्या श्री. अरविंद घोष यांच्या ‘आर्य’ मासिकाविषयीचे निवेदन आले होते, आणि ते निवेदन तेव्हा नवयुवक असलेल्या अंबालाल पुराणी यांच्या वाचनात आले. त्यांनी त्याची वर्गणी भरली. तत्पूर्वी बडोद्याच्या ‘दांडिया बाजार’ येथे झालेली लोकाग्रणी असलेल्या श्री. अरविंद घोष यांची व्याख्याने त्यांनी ऐकलेली होती. पुराणी तत्कालीन स्वातंत्र्यचळवळीत सहभागी झालेले होते. गुजराथमध्ये कार्यरत असणाऱ्या त्यांच्या एका छोट्या गटाने भारताची स्वातंत्र्यप्राप्ती हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून कार्याला सुरुवातही केलेली होती. भारताचे स्वातंत्र्य हे अंतिम साध्य नसून, भारताच्या सांस्कृतिक आत्म्याच्या अभिव्यक्तीसाठी आवश्यक असणारी ती पूर्वअट आहे, असे अंबालाल पुराणी यांचे विचार होते. त्यामुळे स्वामी श्रद्धानंद, पंडित मदन मोहन मालवीय, रविन्द्रनाथ टागोर आणि महात्मा गांधी या सगळ्या नेत्यांच्या तुलनेत त्यांना श्री. अरविंद घोष यांचे विचार अधिक तर्कशुद्ध आणि अधिक समाधानकारक वाटले. श्री. अरविंद घोष यांच्या विचारांशी पुराणी यांना एक आत्मीय जवळीक जाणवू लागली. आणि त्यांच्याच परवानगीने इ. स. १९१६ साली ‘आर्य’मधील लिखाणाचे श्री. पुराणी यांनी गुजराथीमध्ये भाषांतर करायला सुरुवात केली. इ. स. १९०७ साली सुरत काँग्रेसच्या निमित्ताने झालेल्या भेटीत पुराणी यांच्या बंधुना श्री. अरविंद घोष यांनी क्रांतिकार्याची काही योजना सांगितली होती. ती प्रत्यक्षात उतरविण्यापूर्वी, त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांची एकदा परवानगी घ्यावी, अशी आवश्यकता अंबालाल पुराणी यांना जाणवली.

डिसेंबर १९१८ साली श्रीअरविंद यांना भेटण्यासाठी म्हणून, पुराणी ‘आर्य’ मासिकाच्या कार्यालयात जाऊन पोहोचले. श्रीअरविंदांचे वास्तव्य तेव्हा तेथेच होते. पुराणी सकाळी आठ वाजता तेथे पोहोचले आणि भेटीची वेळ ठरली होती दुपारी तीनची.

*

(श्री. अंबालाल पुराणी स्वत: या भेटीची साद्यंत हकिकत येथे सांगत आहेत…)

मी जेव्हा श्रीअरविंदांना भेटण्यासाठी गेलो तेव्हा ते वरच्या मजल्यावर असलेल्या व्हरांड्यामध्ये बसलेले होते. त्यांच्या समोर एक छोटे टेबल होते आणि त्या पाठीमागे असलेल्या एका लाकडी खुर्चीमध्ये ते बसलेले होते. त्यांच्या चेहऱ्याभोवती एक आध्यात्मिक आभा पसरलेली मला जाणवली. त्यांची दृष्टी अंतःकरणाचा ठाव घेणारी होती. आधी झालेल्या पत्रव्यवहाराच्या निमित्ताने ते मला ओळखत होते. बडोद्यामध्ये माझ्या भावासोबत झालेल्या त्यांच्या भेटीची आठवणही मी त्यांना करून दिली. ती भेट ते विसरले नव्हते. मी त्यांना असे सांगितले की, आता आमचा गट क्रांतिकार्यासाठी सुसज्ज झालेला आहे. (आम्हाला संघटित होण्यासाठी अकरा वर्षांचा कालावधी लागला होता.) श्रीअरविंद काही काळ स्तब्ध राहिले. नंतर त्यांनी मला माझ्या साधनेसंबधी काही प्रश्न विचारले. त्यांना मी काय करतो, ते सांगितले आणि म्हणालो की, “साधना वगैरे सगळे ठीक आहे. परंतु जोपर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळणार नाही, तोपर्यंत माझ्या चित्ताची एकाग्रता होणे कठीण आहे.”

श्रीअरविंद म्हणाले, “भारत स्वतंत्र होण्यासाठी कदाचित क्रांतिकार्याची आवश्यकता भासणार नाही, असे दिसते.”

“पण त्याशिवाय ब्रिटिश सरकार भारतातून कसे निघून जाईल?” मी त्यांना विचारले.

“तो एक वेगळाच प्रश्न आहे. पण कोणत्याही क्रांतिकारक कृतीची आवश्यकता न भासता भारत स्वतंत्र झाला तर? मग तुम्हाला तुमची योजना प्रत्यक्षात आणण्याची गरजच काय? तेव्हा तुम्ही आता आपले लक्ष योगसाधनेवर केंद्रित केलेले बरे,” ते म्हणाले.

“भारतभूमीच्या धमन्यांमध्येच साधना आहे. त्यामुळे, मला असे वाटते की, भारत जेव्हा स्वतंत्र होईल तेव्हा, हजारो लोक योगसाधनेसाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावतील. परंतु आजच्या घडीला या जगामध्ये, सत्याविषयी किंवा आध्यात्मिकतेविषयी, आमच्यासारख्या गुलामांकडून कोण ऐकून घेईल?” मी विचारले.

ते म्हणाले, “स्वातंत्र्य मिळवायचेच आहे हे भारताने अगोदरच निर्धारित केले आहे आणि त्या उद्दिष्टाप्रत कार्य करण्यासाठी आवश्यक ती नेतेमंडळी आणि कार्यकर्ते भारताला निश्चितपणे मिळतील. परंतु योगाची हाक काही प्रत्येकालाच येत नाही. तेव्हा, तुम्हाला जर ती हाक आलेली आहे, तर तुम्ही त्यावर लक्ष केंद्रित करणे बरे नाही का? आणि याउपरही तुम्हाला जर क्रांतिकारक कृतिकार्यक्रम हाती घ्यायचा असेल तर, तुम्ही तो खुशाल हाती घ्या, पण मी मात्र त्याला संमती देणार नाही.”

तेव्हा मी म्हणालो की, “पण आमच्या क्रांतिकारक चळवळीचा प्रारंभ तुम्हीच करून दिला होतात, आणि त्यामागची प्रेरणादेखील तुमचीच होती. तर मग आता त्याची अंमलबजावणी करतेवेळी मात्र त्याला संमती देण्यास तुम्ही नकार का बरे देत आहात?”

“कारण एकेकाळी मी तसे कार्य केलेले आहे आणि मला त्यातल्या अडचणींची चांगली कल्पना आहे. आदर्शवादाने भारावून जाऊन, उत्साहाच्या भरात, तरुण मुले या चळवळीमध्ये सहभागी होण्यासाठी पुढे येतात. परंतु या गोष्टी दीर्घकाळ टिकून राहात नाहीत. शिस्तीचे पालन करणे आणि त्यात निभाव लागणे हे अतिशय कठीण होऊन बसते. एकाच संघटनेमध्ये छोटेछोटे गट निर्माण होतात, त्यांच्यामध्ये गटबाजी सुरु होते, इतकेच काय पण माणसांमध्येसुद्धा आपापसात शत्रुत्व वाढीस लागते. नेतृत्वासाठी स्पर्धा सुरु होते. आणि अशा या संघटनांमध्ये अगदी सुरुवातीपासूनच सरकारचे काही हस्तक बेमालूमपणे मिसळून गेलेले असतात. आणि त्यामुळे अशा चळवळी प्रभावीरीतीने कार्य करू शकत नाहीत. कधीकधी त्या इतक्या हीन पातळीवर उतरतात की त्यांच्यामध्ये पैशावरूनसुद्धा भांडणे सुरु होतात”, ते शांतपणाने म्हणाले.

“पण समजा, साधनेचे महत्त्व हे काकणभर अधिक आहे, असे मी मान्य केले आणि मी त्यावर लक्ष केंद्रित करायचे असे अगदी बुद्धिपूर्वक ठरविले तरी, आता माझी अडचण अशी आहे की, भारताच्या स्वातंत्र्यासाठी मी काहीतरी केलेच पाहिजे, असे मला खूप तीव्रपणे वाटते आहे. या विचारांनी गेले अडीच वर्षे मला सुखाची झोपसुद्धा लागलेली नाही. तसाच जोरकस प्रयत्न केला तरच मी शांत राहू शकेन, असे मला वाटते. भारताच्या स्वातंत्र्यावरच माझे सारे लक्ष खिळलेले आहे. आणि ते मिळाल्याशिवाय मला झोप लागणेसुद्धा अवघड आहे.” असे मी सांगितले.

श्रीअरविंद दोन ते तीन मिनिटे स्तब्ध राहिले. ती दोनतीन मिनिटे मला खूप मोठी वाटली. नंतर ते म्हणाले, ” भारत स्वतंत्र होईल अशी खात्री तुम्हाला समजा कोणी दिली तर?”

“पण अशी खात्री कोण देऊ शकेल?” मला माझ्या स्वतःच्याच प्रश्नामध्ये शंकेचा आणि आव्हानाचा सूर जाणवला.

परत ते दोनतीन मिनिटांसाठी स्तब्ध राहिले. ते माझ्याकडे पाहत म्हणाले, “समजा मी तुम्हाला तशी खात्री दिली तर?”

मी एक क्षणभर थांबलो आणि माझ्या मनाशीच विचार करून म्हटले, “तुम्ही खात्री दिलीत, तर मग मात्र मी ते मान्य करेन.”

अत्यंत गंभीरपणे ते उद्गारले, “तर मग, भारत स्वतंत्र होईल अशी खात्री मी तुम्हाला देतो.”

माझे काम झाले होते – माझा पाँडिचेरीच्या भेटीचा हेतू सफल झाला होता. माझा वैयक्तिक प्रश्न आणि आमच्या गटाची समस्या अशा रीतीने सुटली होती. त्यानंतर बडोद्यातील परिचितांविषयी काही गप्पागोष्टी झाल्या.

आता माझी निरोप घेण्याची वेळ आली. पुन्हा एकदा माझ्या मनात भारताच्या स्वातंत्र्यासंबंधीचा प्रश्न उफाळून आला. निघण्यासाठी मी जेव्हा उठलो तेव्हा तो प्रश्न मला मनात तसाच दाबून ठेवता आला नाही – कारण माझ्यासाठी तो जीवन-मरणाचा प्रश्न होता, “भारत स्वतंत्र होईल अशी खरंच तुम्हाला खात्री आहे?” मी पुन्हा एकदा त्यांना विचारले. माझ्या स्वतःच्याच या प्रश्नाचा खरा गर्भितार्थ मला तत्क्षणी तरी जाणवला नव्हता. वास्तविक, त्यांनी मला खात्री दिली होती आणि तरीसुद्धा माझ्या मनातील शंकांचे पूर्णतः निरसन झाले नव्हते, मला वचन हवे होते.

श्रीअरविंदांची चर्या अतिशय गंभीर झाली. खिडकीमधून पलीकडे दिसणाऱ्या आकाशामध्ये दूरवर त्यांची नजर खिळली. नंतर त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि समोरच्या टेबलावर अत्यंत ठाशीवपणाने आपली मूठ काहीशी आपटत ते म्हणाले, “माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवा, उद्याच्या उगवत्या सूर्याइतकेच भारताचे स्वातंत्र्य निश्चित आहे. तसा ईश्वरी आदेश अगोदरच निघालेला आहे. – आता तो प्रत्यक्षात उतरायला फार काळ लागणार नाही.”

मी त्यांच्यासमोर नतमस्तक झालो.

आगगाडीमध्ये परतीच्या प्रवासात असताना, सुमारे दोन-अडीच वर्षानंतर प्रथमच मला अगदी निवांत झोप लागली. माझ्या मनामध्ये त्या दृश्याने आयुष्यभरासाठी घर केले. ते चित्र असे – एका छोट्या टेबलापाशी आम्ही दोघे उभे आहोत, माझा कळकळीचा प्रश्न, त्यांची ती ऊर्ध्वाभिमुख खिळलेली नजर, आणि त्यांचा तो धीरगंभीर पण ठाम असा आवाज, ज्यामध्ये जगाला हादरवण्याची ताकद होती, आणि त्या टेबलावर घट्ट आवळलेली त्यांची ती मूठ, जी ईश्वरी सत्यावरील त्यांच्या आत्म-विश्वासाची निदर्शक अशी खूण होती.

संपूर्ण जगभरामध्ये कलियुग असेल, लोहयुग असेल पण भारतमातेचे हे सद्भाग्य आहे की, तिची मुले सत्यज्ञानी आहेत, आणि त्यांची त्या सत्यावर अविचल श्रद्धा आहे आणि प्रसंगी त्यासाठी प्राण पणाला लावण्याचीदेखील त्यांची तयारी असते. आणि मला वाटते, या महत्त्वपूर्ण गोष्टीमध्येच भारताचे आणि संपूर्ण विश्वाचे दिव्य सद्भाग्य सामावलेले आहे!

(Evening talks : 16-19)

*

वाचक मित्रांनो, हा प्रसंग घडला आहे इ. स. १९१८ मध्ये; म्हणजेच स्वातंत्र्यापूर्वी साधारण एकोणतीस वर्षं आधी आणि याला म्हणतात, ‘क्रांतदर्शित्व’.
स्वातंत्र्यसैनिक बनू पाहणाऱ्या अंबालाल पुराणी यांचे येथे मन-परिवर्तन झाले आणि पुढे ते आयुष्यभर श्रीअरविंद यांचे निकटवर्ती अनुयायी बनून, अंधाराशी झुंज देणाऱ्या प्रकाश-सेनेचे सैनिक बनले.

भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे आणि श्रीअरविंद यांची १५० वी जयंती या सुवर्ण-मुहूर्तावर उद्यापासून आपण – ‘क्रांतदर्शी श्रीअरविंदांना दिसलेला भारत’ – ही मालिका सुरु करत आहोत.

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

आमच्या auromarathi.org या वेबसाईटला आणि AUROMARATHI या युट्यूब चॅनलला जरूर भेट द्या आणि सबस्क्राईब करा.

श्रीअरविंदांच्या राजकीय कार्याने प्रभावित होऊन, क्रांतिकारक कार्य करण्याची परवानगी घेण्याच्या हेतूने, त्यांना पाँँडिचेरी येथे प्रथमच भेटावयास गेलेल्या श्री.अंबालाल पुराणी यांनी सांगितलेली ही हकिकत :

श्रीअरविंदांनी मला माझ्या साधनेविषयी विचारले.

मी म्हणालो, “साधना वगैरे ठीक आहे पण जोवर भारताला स्वातंत्र्य प्राप्त होत नाही तोवर मला इतर कशावरही लक्ष केंद्रित करणे अवघड आहे.”

तेव्हा श्रीअरविंद म्हणाले, “कदाचित भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी क्रांतिकार्याची आवश्यकता भासणार नाही. जर भारत त्याशिवायच स्वतंत्र होणार असेल तर तुम्ही साधनेवर, योगावर लक्ष का केंद्रित करत नाही? भारताचा स्वातंत्र्य मिळविण्याचा निर्धार पक्का झाला आहे आणि त्यामुळे त्या उद्दिष्टपूर्तीसाठी झटणारे पुष्कळ जण मिळतील पण योगाची हाक सर्वांनाच येत नाही. आणि जर तुम्हाला ती हाक आली आहे तर तुम्ही योगसाधनेवर लक्ष केंद्रित करणे योग्य नाही का?”

तेव्हा मी म्हणालो, “पण गेली दोन वर्षे माझे सारे लक्ष स्वातंत्र्यप्राप्तीकडे लागलेले आहे. ते मिळाल्याशिवाय मला सुखाची झोपदेखील लागणार नाही.”

माझ्या मन:चक्षूसमोर होते, एकेकाळी ज्यांनी भारतामध्ये प्रथमच संपूर्ण स्वराज्याची मागणी केली होते ते श्री. अरविंद घोष. आणि तेच श्रीअरविंद आता पाँडिचेरीला योगसाधनेमध्ये निमग्न होते. श्रीअरविंद दोनतीन मिनिटांसाठी स्तब्ध झाले होते, मग त्यांनी विचारले, ”भारत स्वतंत्र होणार आहे अशी खात्री तुम्हाला देऊ केली तर?”

तेव्हा मी म्हणालो, “पण मला अशी खात्री कोण देऊ शकेल?”

श्रीअरविंद माझ्याकडे पहात म्हणाले, “समजा मी दिली तर?”

मी म्हणालो, “जर तुम्ही मला खात्री दिलीत तर मी मान्य करेन.”

तेव्हा ते गंभीरपणे म्हणाले, “मग मी तुम्हाला खात्री देतो की, भारत स्वतंत्र झालेला असेल.”

दोन दिवसांनंतर पुन्हा एकदा मी त्यांना विचारले, “खरंच तुम्हाला खात्री आहे?”

तेव्हा श्रीअरविंद गंभीर झाले आणि खिडकीतून पलीकडच्या अवकाशात पहात राहिले. नंतर माझ्याकडे पाहून समोरील टेबलावर आपली मूठ आपटत ते म्हणाले, “उद्याच्या उगवणाऱ्या सूर्याइतकेच हे निश्चित आहे. निर्णय केव्हाच झाला आहे, तो प्रत्यक्षात उतरायला आता फार काळ लागणार नाही.”

आमची ही भेट झाली ते साल होते इ.स. १९१८. मी त्यांना वंदन करून शांतपणे बाहेर पडलो. दोन वर्षांनंतर प्रथमच मला सुखाची झोप लागली होती. *

(भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला संदेश तिरूचिरापल्लीच्या ऑल इंडिया रेडिओ वरून प्रसारित करण्यात आला. तो येथे देत आहोत.)

१५ ऑगस्ट हा स्वतंत्र भारताचा जन्मदिवस! भारतासाठी हा जुन्या युगाच्या अंताचा आणि नव्या युगाच्या प्रारंभाचा संकेत आहे. ही गोष्ट केवळ आपल्यापुरतीच महत्त्वाची आहे असे नाही, तर त्याचे मोल आशिया आणि अखिल विश्वासाठी देखील आहे. मानवतेचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक भवितव्य निर्धारित करण्यामध्ये ज्या शक्तीचा मोठा वाटा असणार आहे, अशा एका नव्या शक्तीचा, अकथित अशी क्षमता असलेल्या एका नव्या शक्तीचा, राष्ट्रसमूहांमध्ये प्रवेश होत असल्याचे हे द्योतक आहे.

माझ्या जीवनामध्ये ज्या जागतिक घडामोडी पाहता याव्यात अशी माझी मनीषा होती, जरी तेव्हा त्या स्वप्नवत वाटत होत्या तरी, त्या मला आजच्या ह्या दिवशी फळाला येताना दिसत आहेत वा त्यांची सुरुवात तरी झाली आहे किंवा त्या त्यांच्या परिपूर्तीच्या मार्गावरती तरी आहेत. या निमित्ताने, माझ्या बालपणी आणि तरुणपणी, माझ्यामध्ये ज्या ध्येयांची, आदर्शाची रुजवण झाली होती, त्या ध्येयांचा, आदर्शाच्या सार्थकतेचा प्रारंभ झालेला मला दिसत आहे, अशी मी व्यक्तीश: उद्घोषणा करू शकतो; कारण ही ध्येयधोरणं भारताच्या स्वातंत्र्याशी निगडित आहेत. ही ध्येयधोरणं म्हणजे माझ्या दृष्टीने भारताचे भावी कार्य आहे, हे असे कार्य आहे की, जेथे भारताने नेतृत्व स्वीकारणे आवश्यकच आहे.

कारण मला नेहमीच असे वाटत आले आहे आणि तसे मी सांगत आलो आहे की, भारताचा उदय होतो आहे तो केवळ त्याचे स्वत:चे भौतिक हेतू म्हणजे त्याचा विस्तार व्हावा; महानता, शक्तिसामर्थ्य, समृद्धी ह्या गोष्टी त्याला साध्य व्हाव्यात म्हणून नाही, अर्थात त्याकडेही भारताने दुर्लक्ष करता कामा नये, किंवा इतरांप्रमाणे इतरेजनांवर प्रभुत्व संपादन करावे म्हणूनही भारताचा उदय होत नाहीये तर ईश्वरासाठी, या जगतासाठी, अखिल मानवी वंशाला साहाय्य करण्यासाठी, त्यांचे नेतृत्व करण्यासाठी भारताचा उदय होतो आहे.

ही ध्येयं आणि आदर्श त्यांच्या स्वाभाविक क्रमाने अशी आहेत :
१) भारताचे स्वातंत्र्य आणि भारताची एकात्मता ज्यातून साध्य होईल अशी क्रांती.
२) आशिया खंडाची मुक्ती आणि त्याचे पुनरुत्थान, मानवी सभ्यतेच्या प्रगतीमध्ये आशिया खंडाने आजवर जी थोर भूमिका निभावली होती त्याकडे त्याचे परतून येणे.
३) मानवजातीसाठी एका नूतन, अधिक महान, अधिक तेजस्वी आणि उदात्त अशा जीवनाचा उदय की, जे जीवन परिपूर्णतया साकारण्यासाठी बाह्यत: ते पृथगात्म अस्तित्व असणाऱ्या लोकसमूहांच्या आंतरराष्ट्रीय एकीकरणावर आधारित असेल; ते समूह त्यांचे त्यांचे राष्ट्रीय जीवन जतन करतील, त्याचे संरक्षणही करतील पण ते जीवन त्या सर्वांना एकत्रितपणे एका नियंत्रित आणि परम एकात्मतेकडे घेऊन जाणारे असेल.
४) भारताकडे असलेले आध्यात्मिक ज्ञान आणि जीवनाच्या आध्यात्मिकीकरणासाठी वापरण्यात येणारी साधने ही भारताची संपूर्ण मानवजातीला देणगी असेल.

भारत स्वतंत्र झाला आहे पण त्याला एकात्मता साध्य झालेली नाही, एक भंगलेले, विदीर्ण झालेले स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे. एकवेळ तर असे वाटून गेले की, भारत पुन्हा एकदा ब्रिटिशांच्या सत्तेपूर्वी जसा विभिन्न राज्याराज्यांमध्ये विभागलेला होता तशाच अराजकतेमध्ये जाऊन पडतो की काय. परंतु सुदैवाने हे विनाशकारी पुनर्पतन टाळता येईल अशी एक दाट शक्यता अलीकडे विकसित झाली आहे. संविधान सभेच्या समजुतदार, मूलगामी धोरणामुळे उपेक्षित वर्गाच्या समस्या ह्या कोणत्याही फाटाफूटीविना वा भेगाळल्याविना दूर होतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.

परंतु हिंदु आणि मुस्लीम यांतील जुने जातीय भेद हे देशाच्या दृष्टीने एका कायमस्वरूपी राजकीय भेदाभेदाची मूर्तीच बनून, दृढमूल झालेले दिसत आहेत. तोडगा निघालेली ही आत्ताची परिस्थिती हा कायमचाच उपाय आहे असे काँग्रेस आणि राष्ट्र धरून चालणार नाहीत किंवा एक तात्पुरता उपाय आहे, ह्या पलीकडे फारसे महत्त्व ते त्याला देणार नाहीत, अशी आशा आहे. कारण असे झाले नाही तर, भारत गंभीररित्या दुर्बल होईल, कदाचित लुळापांगळाही होईल. अंतर्गत कलहाची शक्यता तर कायमच भेडसावत राहील, किंवा कदाचित एखादे नवे आक्रमण वा परकीय सत्तेचा विजय अशा धोक्यांची शक्यताही संभवते.

या देशाची फाळणी नष्ट व्हायलाच पाहिजे. दोन्ही देशांमधील ताणतणाव कमी करून, शांती आणि सद्भाव यांविषयीच्या गरजेबद्दलची चढतीवाढती जाणीव बाळगून, एकत्रित आणि एकदिश होऊन केलेल्या कृतीची वाढती गरज लक्षात घेऊन, किंवा ह्याच हेतूसाठी अस्तित्वात आलेल्या एकात्मतेच्या साधनाद्वारे ही फाळणी नष्ट होईल अशी आशा बाळगता येईल.

कोणत्याही मार्गाने का असेना ही भेदात्मकता, ही फाळणी नाहीशी व्हायलाच पाहिजे आणि ती नाहीशी होईलच. कारण त्याविना भारताचे भवितव्य हे खरोखर दुर्बल आणि निराशाजनक असेल. परंतु ते कदापिही तसे असता कामा नये.

आशिया खंडाचा उदय होत आहे आणि या खंडातील बहुतांशी भाग हे स्वतंत्र झाले आहेत किंवा ह्या घडीला ते स्वतंत्र होत आहेत; त्यातील इतर काही अंकित भाग हे स्वातंत्र्यप्राप्तीसाठी झगडत आहेत, लढा देत आहेत. अगदी थोड्याच गोष्टी करण्याची आवश्यकता आहे आणि त्या आज ना उद्या केल्या जातीलच. तेथे भारताला त्याची भूमिका पार पाडावीच लागेल आणि भारताने पूर्ण सामर्थ्यानिशी आणि क्षमतेनिशी ती भूमिका पार पाडायला सुरुवात देखील केली आहे; आणि त्यातून भारताच्या अंगी असणाऱ्या संभाव्यतेच्या मोजमापाचा आणि राष्ट्रसमूहांच्या समितीमध्ये तो जे स्थान प्राप्त करून घेईल त्याचा निर्देश होत आहे.

समग्र मानवजात आज एकात्म होण्याच्या मार्गावर आहे. तिची ही वाटचाल सदोषपूर्ण अशी, अगदी प्रारंभिक अवस्था ह्या स्वरूपात असली तरी, असंख्य अडचणींशी झगडा देत, परंतु सुसंघटितपणे तिची वाटचाल चालू आहे. आणि त्याला चालना मिळालेली दिसत आहे आणि इतिहासाचा अनुभव गाठीशी धरला, त्याला मार्गदर्शक केले तर विजय प्राप्त होत नाही तोवर ती गती अगदी अनिवार्यपणे वाढवत नेली पाहिजे. अगदी येथेसुद्धा भारताने त्याची महत्त्वाची भूमिका बजावयाला सुरुवात केली आहे, आणि केवळ सद्यकालीन तथ्यं आणि नजीकच्या शक्यता एवढ्यापुरतेच स्वत:ला मर्यादित न ठेवता भारत जर, भविष्याचा वेध घेऊ शकला आणि ते भविष्य निकट आणू शकला तर, आणि तसेच, एक व्यापक मुत्सद्देगिरी विकसित करू शकला तर मग, स्वत:च्या निव्वळ अस्तित्वानेही भारत, मंदगती व भित्रे तसेच धाडसी व वेगवान प्रगती करणारे यांच्यामध्येसुद्धा फरक घडवून आणू शकेल. यामध्ये एखादे अरिष्टसुद्धा येऊ शकते, हस्तक्षेप करू शकते वा जे काही घडविण्यात आलेले आहे त्याचा विध्वंसही करू शकते, असे घडले तरीसुद्धा अंतिम परिणामाची निश्चित खात्री आहे.

कोणत्याही परिस्थितीमध्ये, एकत्रीकरण ही प्रकृतीच्या विकासाची एक आवश्यकता आहे, एक अपरिहार्य अशी हालचाल आहे आणि त्याच्या परिणामाविषयी, साध्याविषयी सुरक्षित भाकीत करता येणे शक्य आहे. एकत्रीकरणाची राष्ट्रांसाठी असलेली आवश्यकता पुरेशी स्पष्ट आहे, कारण त्याच्याशिवाय ह्यापुढील काळात छोट्या समूहांचे स्वातंत्र्य कधीच सुरक्षित राहू शकणार नाही आणि अगदी मोठी, शक्तिशाली राष्ट्रदेखील अबाधित राहू शकणार नाहीत. भारत, जर असा विभागलेलाच राहिला तर त्याला त्याच्या सुरक्षिततेची खात्री बाळगता येणार नाही. आणि म्हणूनच सर्वांच्या हितासाठी सुद्धा हे एकीकरण घडून यावयास हवे. केवळ मानवी अल्पमती आणि मूर्ख स्वार्थीपणाच ह्याला आडकाठी करेल.

एक आंतरराष्ट्रीय वृत्ती आणि दृष्टिकोन वाढीला लागावयास हवा; आंतरराष्ट्रीय रचना, संस्था ह्या वाढीस लागावयास हव्यात, राष्ट्रीयत्व तेव्हा स्वत:च परिपूर्ण झालेले असेल; अगदी दुहेरी नागरिकत्व किंवा बहुराष्ट्रीय नागरिकत्वासारख्या घडामोडीदेखील घडून येतील. या परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये संस्कृतींचा ऐच्छिक संगमदेखील दिसू लागेल आणि राष्ट्रीयत्वाच्या भावनेमधील आक्रमकता नाहीशी झाल्याने, ह्या साऱ्या गोष्टी या एकात्मतेच्या स्वत:च्या विचारसरणीशी अगदी पूर्णत: मिळत्याजुळत्या आहेत, असे आढळून येईल. एकतेची ही नवी चेतना संपूर्ण मानवी वंशाचा ताबा घेईल.

ह्या विश्वाला भारताचे जे आध्यात्मिक योगदान आहे ते प्रदान करण्यास त्याने केव्हाच प्रारंभ केला आहे. सतत चढत्यावाढत्या प्रमाणात भारताची आध्यात्मिकता युरोप आणि अमेरिकेमध्ये प्रवेश करत आहे. ही चळवळ वाढतच राहील. काळाच्या आपत्तींमध्ये भारताकडे जगाचे अधिकाधिक डोळे मोठ्या आशेने वळत आहेत. केवळ भारताच्या शिकवणुकीचाच नव्हे तर भारताच्या अंतरात्मिक आणि आध्यात्मिक साधनापद्धतींचाही ते उत्तरोत्तर अधिकाधिक आश्रय घेत आहेत. उर्वरित जे काही आहे ती अजूनतरी वैयक्तिक आशा आहे आणि एक अशी संकल्पना, एक असे उद्दिष्ट आहे की, ज्याने भारतातील आणि पाश्चात्त्य देशांमधील पुरोगामी मनांचा ठाव घ्यायला सुरुवात केली आहे.

कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रयत्न करू लागल्यावर, मार्गामध्ये ज्या अडचणी येतात त्यापेक्षा कितीतरी अधिक भीषण अडचणी या मार्गावर आहेत; परंतु अडचणी ह्या त्यांवर मात करण्यासाठीच असतात आणि जर ईश्वरी इच्छा तेथे असेल तर अडचणींवर मात केली जाईलच. येथे देखील, जर अशा प्रकारचे विकसन होणारच असेल तर ते आत्म्याच्या विकसनातूनच आणि आंतरिक जाणिवेतूनच उदयास यावयास हवे, यांमध्ये भारत पुढाकार घेऊ शकतो. आणि त्याची व्याप्ती वैश्विक असणेच भाग आहे, त्याची केंद्रवर्ती प्रक्रिया भारताचीच असू शकेल.

भारताच्या स्वातंत्र्यदिनी मी हा आशय आपणापुढे मांडू इच्छितो. हा विचारांचा धागा पूर्णत्वास जाईल किंवा नाही, तो किती प्रमाणात पूर्णत्वास जाईल, हे सर्व काही या नूतन आणि स्वतंत्र भारतावर अवलंबून आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 474)

प्रश्न : खरेखुरे स्वातंत्र्य अस्तित्वातच नाही का? प्रत्येकच गोष्ट ही पूर्णपणे पूर्वनिर्धारित असते का, अगदी स्वातंत्र्य सुद्धा? प्रारब्धवाद हेच सर्वोच्च रहस्य आहे का?

श्रीमाताजी : मुक्तता आणि प्रारब्ध, स्वातंत्र्य आणि निश्चयवाद ह्या गोष्टी म्हणजे चेतनेच्या भिन्नभिन्न पातळ्यांवर प्राप्त होणारी सत्य आहेत. त्या दोहोंना समान पातळीवर आणून, परस्परांविरोधात उभे करण्यास मनाला भाग पाडणारे जर कोणी असेल तर ते अज्ञानच असते.

चेतना ही काही एकच एक एकसंध अशी वास्तविकता नाही, तर ती खूप जटिल आहे; एखादे सरळसोट प्रतल असल्यासारखी ती नाही तर ती बहुआयामी आहे. एका बाजूला सर्वोच्च उंचीवर ‘अव्यक्त परात्पर’ आहे तर सर्वात खाली ‘जडद्रव्य’ आहे आणि या दोहोंच्या दरम्यान, म्हणजेच सर्वोच्च उंची आणि निम्नतम खोली यांच्या दरम्यान चेतनेच्या अगणित पातळ्या आहेत, स्तर आहेत.

जडभौतिकाच्या प्रतलावर आणि सामान्य चेतनेच्या पातळीवर तुमचे हातपाय बांधलेले असतात. तेथे तुम्ही प्रकृतीच्या यंत्रणेचे गुलाम असता तुम्ही कर्मबंधांनी बांधलेले असता, आणि तेथे जे काही घडते ते, जे आधी घडून गेले आहे त्याचा काटेकोर परिणाम असतो. तेथे स्वतंत्र कृतीचा व कर्माचा आभास असतो पण वास्तविक, इतर जण जे काही करत असतात त्याच गोष्टी तुम्ही करत असता, या जगतामध्ये प्रकृतीच्या ज्या वैश्विक घडामोडी चालतात त्यांचा तुम्ही केवळ प्रतिध्वनी असता, तिच्या वैश्विक यंत्राच्या रहाटगाडग्यावर तुम्ही असहाय्यपणे फिरत राहता.

पण हे असेच असायला पाहिजे असे मात्र नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमचे स्थान बदलू शकता; तुम्ही खाली असण्याऐवजी, या अजस्त्र यंत्रणेखाली चिरडून जाण्याऐवजी, किंवा कळसूत्री बाहुलीप्रमाणे हालचाली करण्याऐवजी, तुम्ही वर उठू शकता आणि वरून पाहू शकता; आणि तुमच्या चेतनेमध्ये परिवर्तन घडवून त्यायोगे, वरकरणी अपरिहार्य भासणारी परिस्थिती आणि बंधवत वाटणारी स्थिती यामध्ये बदल घडवून आणणाऱ्या जणू एखाद्या दांड्याचाच तुम्ही ताबा घेऊ शकता. एकदा का तुम्ही त्या रहाटगाडग्याच्या वर उठलात आणि वर भरभक्कमपणे उभे राहिलात तर तुमच्या असे लक्षात येते की तुम्ही मुक्त आहात.

तुम्ही सर्व प्रकारच्या सक्तींपासून मुक्त होता; तुम्ही आता केवळ एक अगतिक साधन राहत नाही; इतकेच नाही, तर तुम्ही आता एक सक्रिय असे माध्यम बनता. आता तुम्ही तुमच्या कर्मफलांनी बद्ध राहत नाही; तर, तुम्ही त्या कर्मफलांमध्ये बदल सुद्धा घडवून आणू शकता.

एकदा का तुम्ही ह्या साऱ्याकडे शक्तींची लीला या दृष्टीने पाहू लागलात; एकदा का तुम्ही या शक्तींचा उगम जेथे आहे त्या चेतनेच्या प्रतलावर जाऊन पोहोचलात, आणि त्या गतिमान अशा शक्ति-उगमाशी तद्रूप झालात की मग, तुम्ही केवळ एखाद्या कळसूत्री बाहलीप्रमाणे हालचाल करणारे उरत नाही तर ती सूत्रे हालविणाऱ्यांपैकी एक बनता.

प्रकृतीच्या यांत्रिक रहाटगाडग्यामधून बाहेर पडून दिव्य गतिविधींमध्ये प्रवेश होणे हेच खरंतर योगसाधनेचे उद्दिष्ट आहे. योगसाधनेच्या साहाय्याने तुम्ही प्रकृतीच्या यांत्रिक चक्रामधून बाहेर पडता. प्रकृतीच्या यांत्रिक चक्रामध्ये तुम्ही केवळ एक अज्ञानी गुलाम असता; असहाय्य, अगतिक असे साधन असता, अशा यांत्रिक चक्रामधून योगसाधनेच्या आधारे बाहेर पडून; तुम्ही, उच्चतर नियतीचे कामकाज जेथे चालू असते त्या एका निराळ्या चेतनेच्या प्रतलावरील जागरूक सहभागीदार आणि क्रियाशील माध्यम बनता.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 29-31)