Tag Archive for: स्वप्न

साधना, योग आणि रूपांतरण – २९०

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

इच्छावासना, लालसा या शरीराच्या जुन्या सवयी असतात, त्या वैश्विक प्रकृतीकडून शरीराकडे आलेल्या असतात आणि शरीराने त्या स्वीकारलेल्या असतात आणि त्यांना जणू काही स्वतःचा आणि स्वतःच्या जीवनाचा एक भाग बनवून टाकलेले असते.

जागृतावस्थेतील चेतनेकडून जेव्हा या गोष्टींना नकार दिला जातो तेव्हा त्या अवचेतनामध्ये (subconscient) किंवा ज्याला ‘परिसरीय चेतना’ (environmental consciousness) असे म्हणता येईल, त्यामध्ये आश्रय घेण्याचा प्रयत्न करतात आणि तेथून त्या काही काळपर्यंत पुन्हा पुन्हा येत राहतात किंवा तेथून ताबा मिळविण्याचा प्रयत्न करत, चेतनेवर दबाव टाकतात.

त्या (इच्छावासना) परिसरीय चेतनेमधून येत असतील तर त्या विचार-सूचनांचे किंवा आवेगांचे रूप घेतात किंवा मग त्यांचा अस्वस्थ करणारा एक अंधुकसा दबाव व्यक्तीला जाणवतो. त्या जर अवचेतनामध्ये गेल्या असतील तर तेथून त्या बरेचदा स्वप्नांद्वारे पृष्ठभागावर येतात, परंतु त्या जागृतावस्थेत सुद्धा पृष्ठभागावर येऊ शकतात.

जेव्हा शरीर नव-चेतनामय झालेले असते आणि त्याच वेळी त्याच्या ठायी ‘दिव्य शांती’ आणि ‘दिव्य शक्ती’ असते तेव्हा, व्यक्तीला बाह्यवर्ती दबावाची जाणीव होते परंतु त्यामुळे व्यक्ती अस्वस्थ होत नाही आणि मग (शारीर-मनावर किंवा शरीरावर तत्काळ दबाव न टाकता) तो दबाव सरतेशेवटी (व्यक्तीपासून) दूर निघून जातो किंवा मग तो हळूहळू किंवा त्वरेने नाहीसा होतो.

मी ज्याला ‘परिसरीय चेतना’ असे संबोधतो ती चेतना प्रत्येक मनुष्य, त्याच्या नकळत, स्वतःच्या शरीराच्या बाहेरच्या बाजूस, सभोवार वागवत असतो आणि या परिसरीय चेतनेच्या माध्यमातून तो इतरांच्या आणि वैश्विक शक्तींच्या संपर्कात असतो. या चेतनेद्वारेच इतरांच्या भावना, विचार इत्यादी गोष्टी व्यक्तीमध्ये प्रवेश करतात. याच चेतनेद्वारे वैश्विक शक्तींच्या लहरी म्हणजे इच्छावासना, लैंगिकता इत्यादी गोष्टी व्यक्तीमध्ये प्रवेश करतात. आणि व्यक्तीच्या मन, प्राण व शरीराचा ताबा घेतात.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 601)

साधना, योग आणि रूपांतरण – २८९

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुम्हाला जे स्वप्न पडलं होतं ते म्हणजे खरंतर, तुमच्या (subconscient) अवचेतनामधून वर आलेल्या गतकालीन रचना होत्या किंवा त्यांचे ठसे होते. आपण जीवनामध्ये जे जे काही करतो, आपल्याला जे जाणवते किंवा ज्याचा आपण अनुभव घेतो, त्या सगळ्यांचा काही एक ठसा, एक प्रकारची मूलभूत स्मृती अवचेतनामध्ये जाऊन बसते आणि आपल्या सचेत अस्तित्वामधून त्या (जुन्या) भावना, वृत्तीप्रवृत्ती किंवा ते अनुभव पुसले गेले तरी त्यानंतरही दीर्घ काळपर्यंत ते स्वप्नांद्वारे पृष्ठभागावर येतात. अनुभव जेव्हा नुकतेच घडून गेलेले असतात किंवा मन वा प्राणामधून ते अगदी नुकतेच फेकले गेलेले असतात, त्यांच्यापेक्षाही या जुन्या गोष्टी आधिक्याने पृष्ठभागावर येतात.

आपण आपल्या जुन्या परिचितांविषयी किंवा नातेवाईकांविषयी विचार करणे थांबविल्यानंतरसुद्धा दीर्घ काळ त्यांच्याबद्दलची स्वप्नं ही अवचेतनामधून पृष्ठभागावर येत राहतात. त्याचप्रमाणे, सचेत प्राणाला जरी आता, लैंगिकतेचा किंवा रागाचा त्रास होत नसला तरीसुद्धा लैंगिकतेबद्दलची किंवा राग आणि भांडणतंट्यांची स्वप्नं पडू शकतात.

अवचेतन शुद्ध झाल्यानंतरच ती स्वप्नं पडायची थांबतात. परंतु तोपर्यंत म्हणजे व्यक्ती त्या जुन्या गतिप्रवृत्ती जागृतावस्थेमध्ये टिकून राहण्यास किंवा जागृतावस्थेमध्ये पुन्हापुन्हा घडण्यास संमती देत नसेल (त्या स्वप्नांचे स्वरूप काय हे व्यक्तीला समजत असेल आणि त्यामुळे तिच्यावर त्यांचा परिणाम होत नसेल तर) ती स्वप्नं तितकीशी महत्त्वाची ठरत नाहीत.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 606)

साधना, योग आणि रूपांतरण – २८५

अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण

आपल्या शरीरामध्ये उच्चतर चेतना जेथून उतरते, तो अतिचेतनाचा (superconscient) प्रांत आपल्या डोक्याच्या वर (आपल्या वर्तमान चेतनेच्या वर) असतो, त्याचप्रमाणे (आपल्या वर्तमान चेतनेच्या खाली) आपल्या पावलांच्या खाली अवचेतनाचा (subconscient) प्रांत असतो.

जडभौतिकाची (Matter) निर्मिती ही अवचेतनामधून झालेली असल्यामुळे, जडभौतिक हे या शक्तीच्या नियंत्रणाखाली असते. आणि असे असल्यामुळे आपल्याला जडभौतिक हे काहीसे अचेतन, चेतनाविहीन (unconscious) असल्यासारखे वाटते. याच कारणामुळे जडभौतिक शरीर (material body) हे अवचेतनाच्या शक्तीच्या प्रभावाखाली असते. आणि म्हणूनच, आपल्या शरीरामध्ये काय चाललेले असते याविषयी आपण बहुतांशी प्रमाणात सचेत (conscious) नसतो.

आपण जेव्हा झोपी जातो तेव्हा आपली बाह्यवर्ती चेतना या अवचेतनामध्ये उतरते आणि म्हणून आपण झोपलेलो असताना आपल्यामध्ये काय चाललेले असते याची आपल्याला, काही थोड्या स्वप्नांचा अपवाद वगळता, जाणीव नसते. त्यापैकी बरीचशी स्वप्नं या अवचेतनामधून पृष्ठभागी येतात. जुन्या स्मृती, आपल्या मनावर उमटलेले ठसे इत्यादी गोष्टी असंबद्ध रीतीने एकत्र येऊन ही स्वप्नं तयार होतात. आपण आपल्या जीवनामध्ये जे जे काही करतो किंवा जे काही अनुभवतो त्याचे प्रभाव अवचेतनाकडून ग्रहण केले जातात आणि त्यामध्ये ते साठवून ठेवले जातात. झोपेमध्ये त्यातील काही अंशभाग बरेचदा पृष्ठभागावर पाठविले जातात.

अवचेतन हा व्यक्तित्वाचा एक अगदी महत्त्वाचा भाग असतो परंतु आपल्या सचेत संकल्पशक्तीद्वारे आपण त्यामध्ये फार काही करू शकत नाही. आपल्यामध्ये कार्यकारी असणारी उच्चतर ‘शक्ती’ ही तिच्या स्वाभाविक क्रमानुसार अवचेतनास स्वतःप्रति खुले करेल आणि त्यामध्ये स्वतःचा प्रकाश पोहोचवेल आणि नियंत्रण प्रस्थापित करेल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 599-600)

साधना, योग आणि रूपांतरण – १०

(ध्यानामध्ये, निद्रेमध्ये किंवा जागेपणी जी सूक्ष्म पातळीवरील दृश्यं दिसतात, विविध देवदेवतादींची दर्शनं होतात ती खरी असतात की खोटी असा प्रश्न कोणी साधकाने विचारलेला दिसतो, त्यासंबंधी श्रीअरविंद येथे खुलासेवार लिहीत आहेत….)

वस्तुनिष्ठ (objective) दृश्यांइतकीच व्यक्तिनिष्ठ (Subjective) अंतर्दर्शनेदेखील खरी असू शकतात – फरक इतकाच की, वस्तुनिष्ठ दृश्य हे स्थूल, भौतिक अवकाशातील वास्तव गोष्टींबाबतचे असते, तर अंतर्दर्शने ही अन्य स्तरांवरील वास्तव गोष्टींची असतात; जे स्तर सूक्ष्म भौतिक पातळीपर्यंत उतरत आलेले असतात. अगदी प्रतीकात्मक दर्शनंसुद्धा, जर ती वास्तविकतेची (reality) प्रतीकं असतील तर ती खरी असतात. एवढेच काय तर, स्वप्नांनासुद्धा सूक्ष्म क्षेत्रामध्ये एक वास्तविकता असू शकते. जे सत्य आहे किंवा सत्य होते किंवा जे सत्य असणार आहे अशा गोष्टींचे प्रतिनिधित्व जर ही दर्शनं करत नसतील आणि ती दर्शनं म्हणजे नुसत्या काल्पनिक मनोमय रचना असतील तर मात्र ती दर्शनं अ-सत्य, मिथ्या असतात. तुम्हाला ‘कृष्णा’चे जे दर्शन झाले आहे (चंदेरी निळसर रंगातील, बासरी वाजविणारा आणि नृत्यमुद्रेमध्ये उभा असणारा ‘कृष्ण’ हे जे दर्शन झाले आहे) ते खरे असू शकते….

कधीकधी विकसनासाठी कोणतेही प्रयत्न न करतादेखील ही सूक्ष्मदृष्टी जन्मजात आणि सवयीची अशी असू शकते; काहीवेळा ती स्वतःहून जागृत होते आणि मग तिचा अनुभव पुष्कळ वेळा येतो किंवा तिच्या विकसनासाठी अगदी थोडीशी साधनादेखील पुरेशी असते. (अर्थात) अशी दृश्यं दिसणे हे अनिवार्यपणे आध्यात्मिक उपलब्धीचे लक्षण असतेच असे नाही; परंतु सहसा व्यक्ती ‘योगसाधने’च्या माध्यमातून जसजशी अंतरंगात प्रवेश करू लागते, ती अंतरंगात राहून जीवन जगू लागते तसतशी ही सूक्ष्मदृष्टीची शक्ती कमीअधिक प्रमाणात जागृत होऊ लागते. परंतु ही गोष्ट नेहमीच अगदी सहजपणे घडते असेही नाही, विशेषतः व्यक्तीला जर प्रामुख्याने बुद्धिप्रधान जीवन जगण्याची सवय असेल किंवा तिला बाह्यवर्ती प्राणिक चेतनेमध्येच जीवन जगण्याची सवय असेल तर ही गोष्ट तितकीशी सहजपणे घडत नाही.

मला वाटते, तुम्ही ‘दर्शना’चा, म्हणजे ‘देवतेने आपल्या भक्तासमोर स्वतःला प्रकट करणे’ या गोष्टीचा विचार करत आहात, परंतु ती गोष्ट निराळी असते. तिथे त्या ‘देवते’च्या अस्तित्वावरील आवरण दूर होते, मग ते अनावरण तात्पुरते असेल किंवा स्थायी स्वरूपाचे असेल, आणि मग ते दर्शन म्हणून घडेल किंवा त्या देवतेच्या सान्निध्याची अगदी आत्मीय भावना या स्वरूपात अनुभवास येईल. ही अस्तित्वाची जाणीव दृश्यापेक्षा अधिक सघन असते आणि त्या देवतेबरोबर वारंवार किंवा नित्य होणाऱ्या संवादाच्या स्वरूपात ती अनुभवास येते. व्यक्ती जेव्हा आपल्या अंतरात्म्यामध्ये खोलखोल जाऊ लागते आणि चेतनेचा विकास घडू लागतो किंवा भक्तीच्या उत्कटतेमध्ये वाढ होते तेव्हा त्या देवतेच्या अस्तित्वाची जाणीव होते. चढत्यावाढत्या आणि तल्लीन भक्तीच्या भारामुळे (pressure) जेव्हा बाह्यवर्ती चेतनेचे कवच पुरेसे मोडून पडते, तेव्हा अशा प्रकारचा संपर्क अनुभवास येतो.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 103-104)

साधना, योग आणि रूपांतरण – ०९

(एका साधकाला त्याच्या मिटल्या डोळ्यांसमोर जी दृश्यं दिसली त्याचे वर्णन त्याने श्रीअरविंदांना लिहून पाठविले आहे, असे दिसते. त्यावर श्री अरविंदांनी त्याला दिलेले हे उत्तर… )

तुम्ही ज्या दृश्यांचे वर्णन केले आहे ती दृश्यं साधनेच्या प्रारंभिक टप्प्यांवर दिसतात. येथे दिसणारी बहुतांशी दृश्यं म्हणजे मानसिक स्तरावरील रचना असतात आणि (त्यामुळे) प्रत्येक वेळी त्यांना नेमका अर्थ देता येतोच असे नाही. कारण ती दृश्यं साधकाच्या व्यक्तिगत मनावर अवलंबून असतात.

साधनेच्या नंतरच्या एका टप्प्यावर सूक्ष्मदृष्टीची शक्ती साधनेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरते; परंतु सुरुवातीला, साधकाने त्याच्या तपशीलांना अतिरिक्त महत्त्व न देता, चेतना अधिक विकसित होईपर्यंत, मार्गक्रमण करत राहिले पाहिजे. ‘दिव्य प्रकाश’, ‘दिव्य सत्य’ आणि ‘ईश्वराच्या उपस्थितीची जाणीव’ यांच्याप्रति असलेली चेतनेची उन्मुखता ही नेहमीच ‘योगसाधने’मधील एक महत्त्वाची गोष्ट असते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 100)

आपण जर प्राचीन ग्रंथ अभ्यासले तर ‘जाग्रत अवस्था’ (Waking State) म्हणजे भौतिक विश्वाची जाणीव असल्याचे आपल्या लक्षात येईल. सर्वसाधारणपणे भौतिक मनाची हुकमत असलेल्या आपल्या देहधारी अस्तित्वामध्ये ही जाणीव असते.

‘स्वप्नावस्था’ (Dream State) म्हणजे भौतिक पातळीच्या मागे असणाऱ्या सूक्ष्म प्राणिक व सूक्ष्म मानसिक पातळ्यांशी संवादी असलेली जाणीव होय; या सूक्ष्म पातळ्यांबाबतचे संकेत जरी आपल्याला मिळाले तरीदेखील, आपल्याला भौतिक अस्तित्वातील गोष्टी जेवढ्या खऱ्या वाटतात तेवढ्या या पातळ्या खऱ्या आहेत असे वाटत नाही.

‘सुषुप्तावस्था’ (Sleep State) म्हणजे विज्ञानसदृश (The Gnosis) असणाऱ्या अतिमानसिक पातळीशी संवादी असलेली जाणीव होय; ही जाणीव आपल्या अनुभवाच्या पलीकडे आहे; कारण, आपले कारणशरीर (Causal Body) किंवा विज्ञानकोश (Envelope of Gnosis) आपल्यामध्ये विकसित झालेला नाही; त्याच्या शक्ती आपल्यामध्ये सक्रिय झालेल्या नाहीत; त्यामुळे, या अतिमानसिक पातळीच्या अनुषंगाने पाहता, आपली सद्यस्थिती ही गाढ स्वप्नरहित झोपेत असल्यासारखीच आहे.

या अवस्थांच्या पलीकडे जी ‘तुरिया’ अवस्था आहे, ती म्हणजे आपल्या शुद्ध आत्मिक अस्तित्वाची जाणीव किंवा आपल्या पूर्ण चरमअस्तित्वाची जाणीव होय. जरी कधीकधी आपल्याला जाग्रत अवस्थेत, किंवा स्वप्नावस्थेत त्याची मनोमय प्रतिबिंब दिसली, किंवा जागे झाल्यावर न आठवणारी अशी मनोमय प्रतिबिंब सुषुप्तावस्थेत जरी दिसली तरी; असे असूनदेखील त्या आत्मिक अस्तित्वाशी आपला थेट संबंध मुळीच असत नाही.

जिच्या साहाय्याने चढून आपण परत, परमात्म्याप्रत पोहोचतो अशी आपल्या अस्तित्वाची जी शिडी आहे, तिच्या पायऱ्यांशी संवादी अशी ही चतुर्विध श्रेणी आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 520)