Posts

साधना, योग आणि रूपांतरण – २६८

(कालपर्यंत आपण मनाचे आणि प्राणाचे रूपांतरण समजावून घेतले. आजपासून आता शरीराच्या रूपांतरणाबद्दलचे श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांचे विचार जाणून घेऊ या.)

शरीराचे रूपांतरण

तुम्हाला प्राणिक इच्छावासनांपासून मुक्त होण्यामध्ये खूप अडचण जाणवत आहे कारण आता साधना थेटपणे जडभौतिक, शारीरिक स्तरावर (physical plane) सुरू झाली आहे. येथे एखादी सवय जडली असेल किंवा एखादी गोष्ट सवयीची झाली असेल तर तिची ताकद खूप जास्त असते.

जेव्हा साधना मानसिक किंवा प्राणिक स्तरावर चालू असते तेव्हा प्राणिक इच्छावासनांवर नियंत्रण मिळविणे किंवा त्यामध्ये परिवर्तन घडविणे अधिक सोपे असते कारण शरीराच्या तुलनेत मन आणि प्राण हे अधिक घडणसुलभ (plastic) असतात.

परंतु दुसऱ्या बाजूने असेही म्हणता येते की, जडभौतिकाच्या, शरीराच्या स्तरावर जर एखादी गोष्ट निश्चितपणे प्राप्त झाली असेल तर ती सिद्धी केवळ मानसिक किंवा केवळ प्राणिक स्तरावरील सिद्धीपेक्षा अधिक टिकाऊ आणि संपूर्ण असते.

*

शरीर आणि अवचेतनेमध्ये (subconscient) जेव्हा कार्य चालू असते तेव्हा ते कार्य मनामध्ये आणि प्राणामध्ये चालू असलेल्या कार्यापेक्षा नेहमीच अधिक संथ असते. कारण जडभौतिक द्रव्याकडून होणारा प्रतिकार हा नेहमीच अधिक जड, आणि निर्बुद्ध आणि कमी समायोजनक्षम (adaptable) असतो. परंतु जणूकाही त्याची भरपाई म्हणून, या संथ प्रक्रियेद्वारे व्यक्तीमध्ये जे कार्य केले जाते ते सरतेशेवटी अधिक संपूर्ण, अधिक सघन आणि अधिक टिकाऊ असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 365, 365-366)

विचारशलाका ०७

हृदय-चक्राने त्याच्या मागे असलेल्या आणि मनाच्या चक्रांनी त्यांच्यापेक्षा वर असणाऱ्या सर्वांप्रत खुले होणे, उन्मुख होणे, या दोन गोष्टी (साधनेमध्ये) सर्वाधिक महत्त्वाच्या असतात. कारण हृदय हे चैत्य-पुरुषाप्रत (psychic being) खुले होते आणि मनाची चक्रं उच्चतर चेतनेप्रत (higher consciousness) खुली होतात. चैत्य पुरुष व उच्चतर चेतना यांच्यामधील परस्परसंबंध हेच तर ‘सिद्धी’चे मुख्य साधन असते.

‘ईश्वरा’ने आमच्यामध्ये आविष्कृत व्हावे म्हणून तसेच, त्याने चैत्यपुरुषाद्वारे आमच्या सर्व प्रकृतीचा ताबा घेऊन, तिचे नेतृत्व करावे म्हणून त्याला हृदयामध्ये एकाग्रतापूर्वक आवाहन केल्याने पहिली उन्मुखता (opening) घडून येते. साधनेच्या या भागाचा मुख्य आधार म्हणजे अभीप्सा, प्रार्थना, भक्ती, प्रेम व समर्पण या गोष्टी असतात. आणि आपण ज्याची आस बाळगत असतो, त्याच्या वाटेत अडसर बनू पाहणाऱ्या सर्व गोष्टींना नकार देणे ही बाब देखील यामध्ये समाविष्ट असते.

मस्तकामध्ये (आणि नंतर मस्तकाच्या वर) चेतनेचे एककेंद्रीकरण केल्याने दुसरी उन्मुखता घडून येते. (प्रथम फक्त शांती, किंवा शक्ती व शांती एकत्रितपणे) अशा ईश्वरी ‘शांती’चे, आणि ईश्वरी ‘शक्ती’, ‘प्रकाश’, ‘ज्ञान’, ‘आनंद’ यांचे व्यक्तित्वामध्ये अवतरण घडून यावे यासाठी आवाहन केल्याने, आणि तशी आस व सातत्यपूर्ण इच्छा बाळगल्याने दुसरी उन्मुखता (opening) घडून येते.

– श्रीअरविंद [CWSA 30 : 327-328]

विचार शलाका – ३७

पूर्ण ज्ञान, पूर्ण कर्म आणि पूर्ण भक्ती यांचे एकत्रीकरण करणे, त्यांचा समन्वय करणे आणि त्यांना मनोमय पातळीवरून ‘विज्ञाना’च्या अतिमानसिक पातळीवर उन्नत करून, त्यांना परिपूर्ण असे पूर्णत्व प्रदान करणे, हे ‘पूर्णयोगा’चे मूलतत्त्व आहे. जुन्या योगमार्गांध्ये अशी त्रुटी होती की, मन आणि बुद्धी ज्ञात असूनही, ‘आत्मा’ ज्ञात असूनही, ते योग केवळ मनाच्या स्तरावरील आध्यात्मिक अनुभव घेण्यावरच समाधानी राहिले. परंतु मन हे अनंताचे, अ-भंगाचे केवळ आंशिकच आकलन करून घेऊ शकते; ते अनंत, अ-भंगाला पूर्णांशाने कवळू शकत नाही. त्याला कवळून घेण्याचा मनाचा मार्ग म्हणजे एकतर भावसमाधीद्वारे, मोक्षाच्या मुक्तीद्वारे किंवा निर्वाणाच्या विलयाद्वारे किंवा तत्सम गोष्टींद्वारे त्याला जाणून घेणे हा असतो. त्याच्यापाशी अन्य कोणताच मार्ग नाही. कोठे तरी कोणीतरी एखादाच खरोखरी ही अ-लक्षण मुक्ती मिळविण्यामध्ये यशस्वी होतो, पण त्याचा काय उपयोग? ‘चैतन्य’, ‘आत्मा’, ‘ईश्वर’ कायम आहेतच की! परंतु मनुष्य या इथेच मूर्तिमंत ‘ईश्वर’ व्हावा, व्यक्तिगतरित्या आणि सामूहिकरित्याही तो ‘ईश्वर’च व्हावा, त्याने या जीवनामध्येच ‘देवा’चा साक्षात्कार करून घ्यावा, अशी ‘ईश्वरा’ची अपेक्षा आहे. योगाच्या जुन्या पद्धती, आत्मा आणि जीवन यांचे ऐक्य घडवून आणू शकल्या नाहीत किंवा त्या त्यांचा समन्वयही घडवून आणू शकल्या नाहीत. एकतर माया म्हणून किंवा ‘देवा’ची ही अनित्य लीला आहे असे समजून त्यांनी ऐहिकाची उपेक्षा केली. त्याचा परिणाम म्हणून जीवनशक्तीचा ऱ्हास झाला आणि ‘भारता’ची अवनती झाली. ‘भगवद्गीते’मध्ये सांगितले आहे की, ‘उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम्’ म्हणजे, ”मी जर कार्य केले नाही तर हे लोक छिन्नविछिन्न होऊन जातील.” आणि खरोखर भारतातील अशी माणसं दुर्दशेला जाऊन पोहोचली आहेत. काही मोजक्या तपस्व्यांना, संन्याशांना, पुण्यात्म्यांना आणि साक्षात्कारी जीवांना मुक्ती मिळाली; काही थोडे भक्त हे देवधुंद होऊन, त्याच्या आनंदाने, देवाविषयीच्या प्रेमावेशाने नाचूबागडू लागले पण दुसरीकडे मात्र एक संपूर्ण मानववंश प्राण आणि बुद्धी यांच्या अभावी, जर अंधकाराच्या आणि निष्क्रियतेच्या खाईत जात असेल तर, ही कोणत्या प्रकारची आध्यात्मिक सिद्धी म्हणायची?

– श्रीअरविंद
(CWSA 09 : 360-361)