Tag Archive for: सावधानता

पूर्णयोग आणि बौद्धमत – १३

धम्मपद : सत्कृत्य करण्याची त्वरा करा, सारे दुष्ट, अनिष्ट विचार मागे सारा. कारण सत्कृत्य करण्यामागे उत्साह नसेल तर ते मन अनिष्ट गोष्टींमध्ये रममाण होऊ लागते.

श्रीमाताजी : तुम्हाला असे वाटते की, तुम्ही खूप चांगले आहात, दयाळू आहात, विरक्त आहात आणि नेहमीच सद्भावना बाळगता – असे तुम्ही स्वत:लाच आत्मसंतुष्टीने सांगत असता. पण जर तुम्ही विचार करत असताना, स्वत:कडे प्रामाणिकपणे बघितले तर, तुमच्या असे लक्षात येईल की, तुमच्या डोक्यामध्ये असंख्य विचारांचा कल्लोळ असतो आणि कधीकधी त्यामध्ये अत्यंत भयावह असे विचारही असतात आणि त्याची तुम्हाला अजिबात जाणीवदेखील नसते.

उदाहरणार्थ, काहीतरी तुमच्या मनासारखे जेव्हा घडत नाही तेव्हाच्या तुमच्या प्रतिक्रिया पाहा : तुम्ही तुमचे मित्र, नातेवाईक, परिचित, कोणालाही सैतानाकडे पाठविण्यासाठी किती उतावीळ झालेले असता पाहा. तुम्ही त्यांच्याबद्दल किती नको नको ते विचार करता ते आठवून पाहा, आणि त्याची तुम्हाला जाणीवदेखील नसते. तेव्हा तुम्ही म्हणता, “त्यामुळे त्याला चांगलाच धडा मिळेल.” आणि जेव्हा तुम्ही टिका करता तेव्हा तुम्ही म्हणता, “त्याला त्याच्या चुकांची जाणीव व्हायलाच हवी.” आणि जेव्हा कोणी तुमच्या कल्पनेनुसार वागत नाही तेव्हा तुम्ही म्हणता, “त्याला त्याची फळे भोगावीच लागतील.” आणि असे बरेच काही…

तुम्हाला हे कळत नाही कारण विचार चालू असताना, तुम्ही स्वत:कडे पाहत नाही. जेव्हा तो विचार खूप प्रबळ झालेला असतो तेव्हा तुम्हाला त्याची कधीतरी जाणीव होतेही. पण जेव्हा ती गोष्ट निघून जाते, तेव्हा तुम्ही तिची क्वचितच दखल घेता. – तो विचार येतो, तुमच्यामध्ये प्रवेश करतो आणि निघून जातो. तेव्हा तुमच्या लक्षात येते की, जर तुम्हाला खरोखर शुद्ध आणि सत्याच्या पूर्ण बाजूचे बनायचे असेल तर, त्यासाठी सावधानता, प्रामाणिकता, आत्मनिरीक्षण, आणि स्वयंनियंत्रण या गोष्टी आवश्यक असतात, की ज्या सर्वसाधारणपणे आढळत नाहीत. तुम्हाला समजायला लागते की, खरोखरीच प्रामाणिक असणे ही खूप अवघड गोष्ट आहे.

तुमच्या मनात काही नाही, फक्त सद्भावना व सद्हेतूच आहेत आणि तुम्ही जे सारे काही करता ते फक्त चांगल्यासाठीच करता, असे समजून तुम्ही तुमची पाठ थोपटून घेता – हो, जोपर्यंत तुम्ही जागृत आहात आणि तुमचे स्वत:वर नियंत्रण आहे तोपर्यंत, पण ज्या क्षणी तुम्ही सावधानता गमावता, त्या क्षणीच तुमच्या आतमध्ये अशा काही गोष्टी घडतात की, त्याची तुम्हाला जाणीव नसते, आणि त्या फार काही सुखकर नसतात.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 231)

पूर्णयोग आणि बौद्धमत – १०

धम्मपद : तुम्ही स्वत:ला निष्काळजी बनू देऊ नका, किंवा इंद्रियोपभोगामध्येही रममाण होऊ नका. जो सावधचित्त आहे आणि ज्याने आपले चित्त ध्यानमग्न केले आहे, त्याला परमानंद प्राप्त होतो.

श्रीमाताजी : असावधानता ह्याचा खरा अर्थ म्हणजे, इच्छाशक्तीची शिथिलता की, ज्यामुळे व्यक्ती तिचे उद्दिष्ट विसरून जाते आणि जे उद्दिष्ट साध्य करावयाचे आहे त्यापासून दूर नेणाऱ्या गोष्टींमध्ये वेळ व्यर्थ खर्च करते. त्यामुळे ती व्यक्ती एकप्रकारे मार्गात एकाच जागी थांबून राहते आणि बरेचदा तर ही शिथिलता व्यक्तीला मार्गापासून परावृत्त करते. अभीप्सेची ज्वालाच भिक्षूच्या असावधानतेचा निरास करते. दर क्षणाला त्याला ह्या गोष्टीची आठवण असते की, त्याच्या हाती असलेला अवधी अगदी अल्प आहे, त्यामुळे क्षणभरदेखील वेळ वाया न घालविता, शक्य तितक्या त्वरेने मार्गक्रमण केले पाहिजे. आणि जो अशा रीतीने सावध आहे, जो वेळ वाया घालवीत नाही, त्याच्यावरील सर्व बंधने, लहानमोठी सर्व बंधने एकापाठोपाठ एक गळून पडताना त्याला दिसतात. त्याच्या सर्व अडीअडचणी या सावधानतेमुळे नाहीशा होतात. आणि त्याचा हा दृष्टिकोन जर असाच कायम राहिला, आणि त्यातच त्याला संपूर्ण समाधान गवसू लागले तर, कालांतराने त्याला या सावधानतेतच इतका प्रगाढ आनंद अनुभवायला मिळतो की, लवकरच अशी वेळ येते की, जेव्हा तो सावधचित्त नसतो तेव्हा, त्याला चुकल्याचुकल्यासारखे वाटू लागते, त्याला अस्वस्थ वाटू लागते.

ही वस्तुस्थिती आहे की, जेव्हा एखादी व्यक्ती वेळ व्यर्थ न घालविण्याचा प्रयत्न करू लागते, तेव्हा वाया घालविलेला प्रत्येक क्षण हा तिच्यासाठी दुःखदायक असतो आणि त्यात तिला कोणताही आनंद लाभत नाही. आणि एकदा का तुम्ही या अवस्थेप्रत जाऊन पोहोचलात, प्रगती आणि रूपांतरणासाठीचे प्रयत्न ही तुमच्या जीवनातील सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट बनली, तुम्ही तिचाच सातत्याने विचार करू लागलात, तर खरोखरच तुम्ही शाश्वत अस्तित्वाच्या, तुमच्या अस्तित्वाच्या सत्याच्या मार्गावर आहात, असे समजायला हरकत नाही.

या आंतरिक विकासाच्या वाटचालीमध्ये एक क्षण असा निश्चितपणे येतो की, जेव्हा एकाग्रता साधण्यासाठी, ध्यानामध्ये, चिंतनामध्ये निमग्न होण्यासाठी आणि सत्यशोधनासाठी व त्याचे सर्वोत्तम आविष्करण करण्यासाठी – ज्याला बुद्धमार्गी लोक ‘ध्यान’ म्हणतात – ते करण्यासाठी फार प्रयत्न करावे लागत नाहीत तर उलट, त्यामध्ये एक प्रकारची विश्रांती, आनंद, सुटकेचा मोकळा श्वास अनुभवास येतो आणि त्या अवस्थेमधून बाहेर पडून, ज्या गोष्टी खरोखरीच आवश्यक नाहीत, अशा गोष्टी करण्यासाठी वेळ खर्च करावा लागणे, यामध्ये वेळेचा अपव्यय आहे असे त्याला वाटू लागते; त्या गोष्टी त्याच्यासाठी भयंकर वेदनादायक वाटू लागतात. सर्व प्रकारच्या बाह्य गतिविधी, कृती ह्या अगदी अनिवार्यपणे आवश्यक अशा गोष्टींपुरत्याच सीमित होऊन, ईश्वरोपासना म्हणून केलेल्या कृतींपुरत्याच त्या शिल्लक राहतात. व्यर्थ, निरुपयोगी असणाऱ्या सर्व गोष्टी, ज्या गोष्टी निश्चितपणे काळाचा व प्रयत्नांचा अपव्यय करणाऱ्या आहेत, त्या सर्व गोष्टी, तीळमात्रही समाधान देत नाहीत तर, उलट असमाधान व थकवा उत्पन्न करतात. जेव्हा तुमचे लक्ष त्या एकमेव उद्दिष्टावर केंद्रित झालेले असते तेव्हाच तुम्हाला आनंद वाटतो. तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने मार्गावर आहात, असे समजावे.
– श्रीमाताजी
(CWM 03 : 209)

पूर्णयोग आणि बौद्धमत – ०८

धम्मपद : सावधानता हा अमरत्वाकडे वा निर्वाणाकडे नेणारा मार्ग आहे, बेसावधपणा हा मृत्यूकडे नेणारा मार्ग आहे. सावध मनुष्य कधीही मृत्यू पावत नाही, बेसावध मनुष्य हा मृतवतच असतो.

श्रीमाताजी : सावधानता म्हणजे नित्य जागृत असणे, दक्ष असणे, प्रामाणिक असणे – कोणत्याच गोष्टीने आश्चर्याचा धक्का बसता कामा नये. जेव्हा तुम्हाला साधना करावयाची असते, तेव्हा जीवनात प्रत्येक क्षणाला तुम्हाला निवड करावयाची असते – ध्येयाप्रत जाणाऱ्या मार्गावर पाऊल टाकावयाचे की गाढ झोपी जायचे, “आत्ताच नको, नंतर पाहू” असे म्हणत, मार्गात मध्येच बसून राहावयाचे, यांपैकी एकाची हरक्षणी निवड करावयाची असते.

तुम्हाला खाली खेचणाऱ्या गोष्टींना प्रतिकार करावयाचा एवढाच सावधानतेचा अर्थ नाही, तर प्रगतीकडे घेऊन जाणारी कोणतीही संधी तुम्ही गमावणार नाही यासाठी जागरुक राहावयाचे हाही त्याचा अर्थ आहे. एखाद्या दुर्बलतेवर मात करण्याची संधी, प्रलोभनाला बळी पडण्यापासून रोखणे, काही नवीन शिकण्याची, काही दुरुस्त करण्याची, कशावर तरी प्रभुत्व मिळविण्याची संधी न गमावणे म्हणजे सावधानता होय. तुम्ही जर का सावध असाल, जागरुक असाल तर तुम्हाला जे करावयास काही वर्ष लागली असती, ते तुम्ही काही दिवसांतच साध्य करून घेऊ शकता. तुम्ही जर सावध असाल, दक्ष असाल तर तुमच्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीला, प्रत्येक कृतीला, प्रत्येक हालचालीला, तुमच्या ध्येयाप्रत घेऊन जाणाऱ्या संधीमध्ये तुम्ही बदलवून टाकू शकता.

सावधानता दोन प्रकारची असते, सक्रिय आणि निष्क्रिय. तुमच्या हातून एखादी चूक घडणार असेल, जर तुम्ही एखादा चुकीचा निर्णय घेणार असाल, जर तुम्ही दुबळे ठरण्याचा वा तुम्ही मोहात पडण्याचा क्षण असेल तर अशा वेळी सावधनता तुम्हाला धोक्याचा इशारा देते. तर प्रगतीच्या संधीच्या शोधात असणारी सक्रिय सावधानता ही प्रत्येक परिस्थितीचा उपयोग करून घेऊन त्वरेने प्रगती करण्यासाठी धडपडत असते.

तुम्हाला पडण्यापासून वाचविणे आणि प्रगतिपथावरून वेगाने वाटचाल करणे या दोहोंमध्ये पुष्कळच फरक आहे. आणि या दोन्ही गोष्टी आवश्यकच आहेत.

जो सावधान, दक्ष नाही तो जणू काही आधीच मरण पावलेला असतो. जीवनाच्या आणि अस्तित्वाच्या खऱ्या हेतूशी त्याचा असणारा संपर्क तो केव्हाच गमावून बसलेला असतो.

अशा रीतीने, घटिका जातात, वेळ, परिस्थिती निघून गेलेली असते, जीवन निरर्थकपणे सरून जाते, हाती काहीही गवसत नाही आणि मग तुम्ही कधीतरी झोपेतून, सुस्तीतून जागे होता आणि स्वत:ला अशा एका विवरात पाहता की, जेथून सुटका होणे हे अतिशय कठीण असते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 202-203)

(आश्रमीय जीवनाच्या सुरुवातीच्या काळात, श्रीमाताजींनी धम्मपदातील वचनांचे विवेचन केले होते, त्यातील हे एक वचन.)

धम्मपद : सावधानता हा अमरत्वाकडे वा निर्वाणाकडे नेणारा मार्ग आहे, बेसावधपणा हा मृत्यूकडे नेणारा मार्ग आहे. सावध मनुष्य कधीही मृत्यू पावत नाही, बेसावध मनुष्य हा मृतवतच असतो.

श्रीमाताजी : सावधानता म्हणजे नित्य जागृत असणे, दक्ष असणे, प्रामाणिक असणे – कोणत्याच गोष्टीने आश्चर्याचा धक्का बसता कामा नये. जेव्हा तुम्हाला साधना करावयाची असते, तेव्हा जीवनात प्रत्येक क्षणाला तुम्हाला निवड करावयाची असते – ध्येयाप्रत जाणाऱ्या मार्गावर पाऊल टाकावयाचे की, गाढ झोपी जायचे, ‘आत्ताच नको, नंतर पाहू’ असे म्हणत, मार्गात मध्येच बसून राहावयाचे, यांपैकी एकाची हरक्षणी निवड करावयाची असते.

तुम्हाला खाली खेचणाऱ्या गोष्टींना प्रतिकार करावयाचा एवढाच सावधानतेचा अर्थ नाही, तर प्रगतीकडे घेऊन जाणारी कोणतीही संधी तुम्ही गमावणार नाही यासाठी जागरुक राहावयाचे हाही त्याचा अर्थ आहे. एखाद्या दुर्बलतेवर मात करण्याची संधी, प्रलोभनाला बळी पडण्यापासून रोखणे, काही नवीन शिकण्याची, काही दुरुस्त करण्याची, कशावर तरी प्रभुत्व मिळविण्याची संधी न गमावणे म्हणजे सावधानता होय.

तुम्ही जर का सावध असाल, जागरुक असाल तर तुम्हाला जे करावयास काही वर्षे लागली असती, ते तुम्ही काही दिवसांतच साध्य करून घेऊ शकता. तुम्ही जर सावध असाल, दक्ष असाल तर तुमच्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीला, प्रत्येक कृतीला, प्रत्येक हालचालीला, तुमच्या ध्येयाप्रत घेऊन जाणाच्या संधीमध्ये तुम्ही बदलवून टाकू शकता.

सावधानता दोन प्रकारची असते, सक्रिय आणि निष्क्रिय. तुमच्या हातून एखादी चूक घडणार असेल, जर तुम्ही एखादा चुकीचा निर्णय घेणार असाल, जर तुम्ही दुबळे ठरण्याचा वा तुम्ही मोहात पडण्याचा क्षण असेल तर अशा वेळी सावधनता तुम्हाला धोक्याचा इशारा देते. तर प्रगतीच्या संधीच्या शोधात असणारी सक्रिय सावधानता ही प्रत्येक परिस्थितीचा उपयोग करून घेऊन, त्वरेने प्रगती करण्याची इच्छा बाळगते.

तुम्हाला पडण्यापासून वाचविणे आणि प्रगतिपथावरून वेगाने वाटचाल करणे या दोहोंमध्ये पुष्कळच फरक आहे. आणि या दोन्ही गोष्टी आवश्यकच आहेत.

जो सावध, दक्ष नाही तो जणू काही आधीच मरण पावलेला असतो. जीवनाच्या आणि अस्तित्वाच्या खऱ्या हेतूशी त्याचा असणारा संपर्क तो केव्हाच गमावून बसलेला असतो.

अशा रीतीने, घटिका जातात, वेळ, परिस्थिती निघून गेलेली असते, जीवन निरर्थकपणे सरून जाते, हाती काहीही गवसत नाही आणि मग तुम्ही कधीतरी झोपेतून, सुस्तीतून जागे होता आणि स्वत:ला अशा एका विवरात पाहता की, जेथून सुटका होणे हे अतिशय कठीण असते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 202-203)