Posts

विचारशलाका १५

‘दिव्य अस्तित्व’ तुमच्या अंतरंगातच असते. ते तुमच्या आतच असते, आणि तुम्ही मात्र त्याचा बाहेर शोध घेत राहता; अंतरंगात डोकावून पाहा. ते तुमच्या आतच आहे. तेथे त्या ‘अस्तित्वा’ची उपस्थिती असते. सामर्थ्य मिळण्यासाठी तुम्हाला इतरांकडून प्रशंसा हवी असते – त्यातून ते सामर्थ्य तुम्हाला कधीही मिळणार नाही. सामर्थ्य तुमच्या अंतरंगातच आहे. तुम्हाला जर ते सामर्थ्य हवे असेल तर, तुम्हाला जे सर्वेाच्च उद्दिष्ट – सर्वोच्च प्रकाश, सर्वोच्च ज्ञान, सर्वोच्च प्रेम – आहे असे वाटते, त्यांविषयी तुम्ही अभीप्सा बाळगू शकता. ते तुमच्या अंतरंगातच आहे – अन्यथा तुम्ही कधीच त्याच्याशी संपर्क साधू शकणार नाही. तुम्ही जर अंतरंगात पुरेसे खोलवर गेलात तर नेहमीच सरळ वर जाणाऱ्या प्रज्वलित ज्योतीप्रमाणे तेथे तुम्हाला ‘त्या’चे अस्तित्व सापडेल.

आणि हे करणे खूप अवघड आहे, असे समजू नका. ते अवघड आहे, असे वाटते कारण तुमची दृष्टी कायम बाह्याकडेच वळलेली असते आणि त्यामुळे तुम्हाला ‘त्या’च्या उपस्थितीची जाणीव होत नाही. पण जर आधारासाठी, साहाय्यासाठी तुम्ही बाहेरच्या ऐवजी अंतरंगांत लक्ष केंद्रित केलेत आणि – प्रत्येक क्षणी काय करायला हवे ते जाणण्यासाठी, त्याचा मार्ग जाणण्यासाठी, अंतरंगांमध्ये, सर्वोच्च ज्ञानाकडे – प्रार्थना केलीत; आणि तुम्ही जे काही आहात व तुम्ही जे काही करता, ते सर्व तुम्ही पूर्णत्वप्राप्तीसाठी समर्पित केलेत, तर तुम्हाला तेथेच अंतरंगातच आधार असल्याचे आणि तो तुम्हाला कायमच साहाय्य व मार्गदर्शन करत असल्याचे जाणवेल.

आणि जर कधी अडचण आली तर तिच्याशी दोन हात करण्यापेक्षा; तिला हाताळण्यासाठी – सर्व वाईट इच्छा, सर्व गैरसमजुती आणि सर्व अनिष्ट प्रतिक्रिया यांना हाताळण्यासाठी – तुम्ही त्या अडचणीला सर्वोच्च प्रज्ञेकडे सुपुर्द करा. जर तुम्ही पूर्णपणे समर्पित झालात, तर तो आता तुमच्या काळजीचा विषय उरतच नाही : तो त्या ‘परमेश्वरा’चा विषय बनतो, ‘परमेश्वर’ स्वत:च तो हाती घेतो आणि त्यातून मार्ग कसा काढायचा हे इतर कोणापेक्षाही तोच अधिक चांगल्या रीतीने जाणतो. यातून बाहेर पडण्याचा हाच एकमेव मार्ग आहे, केवळ हाच मार्ग आहे.

– श्रीमाताजी [CWM 15 : 399-400]

विचार शलाका – १६

श्रीमाताजी : हे जग संघर्ष, दुःखभोग, अडचणी, ताणतणाव यांचे बनलेले आहे. ते अजूनही बदललेले नाही, ते बदलण्यासाठी काही काळ लागेल. आणि प्रत्येकाला या सगळ्यांतून बाहेर पडण्याची संधी उपलब्ध असते. जर तुम्ही ‘परमोच्च कृपे’च्या सान्निध्यावर विसंबून राहिलात, तिच्यासमोर नतमस्तक झालात तर तोच एकमेव मार्ग आहे…

प्रश्न : पण हे असे सामर्थ्य कोठे मिळवायचे ?

श्रीमाताजी : तुमच्याच अंतरंगात. ‘दैवी सान्निध्य’ तुमच्या आतच आहे. तुम्ही त्याचा शोध बाहेर घेता; अंतरंगात पाहा. ते तुमच्या आतच आहे. तेथे ‘त्या’चे सान्निध्य आहे. तुम्हाला सामर्थ्य मिळण्यासाठी इतरांकडून प्रशंसा हवी असते – तुम्हाला त्यातून ते सामर्थ्य कधीही मिळणार नाही. सामर्थ्य तुमच्या आतच आहे. तुम्हाला जर ते सामर्थ्य हवे असेल तर, तुम्हाला जे सर्वोच्च उद्दिष्ट, सर्वोच्च प्रकाश, सर्वोच्च ज्ञान, सर्वोच्च प्रेम वाटते, त्यांविषयी तुम्ही अभीप्सा बाळगली पाहिजे. पण ते तुमच्या आतच आहे – अन्यथा तुम्ही त्याच्याशी कधीच संपर्क साधू शकणार नाही. तुम्ही जर अंतरंगात पुरेसे खोलवर गेलात तर नेहमीच सरळ वर जाणाऱ्या प्रज्ज्वलित ज्योतीप्रमाणे तेथे तुम्हाला ‘त्या’चे अस्तित्व गवसेल.

आणि असे समजू नका की, हे खूप अवघड आहे. ते अवघड आहे कारण तुमची दृष्टी कायम बाह्याकडेच वळलेली असते आणि त्यामुळे तुम्हाला ‘त्या’च्या सान्निध्याची जाणीव होत नाही.

पण जर आधारासाठी, साहाय्यासाठी तुम्ही बाहेरच्या ऐवजी अंतरंगांत लक्ष केंद्रित केलेत आणि – प्रत्येक क्षणी काय करायला हवे, त्याचा मार्ग कोणता, हे जाणण्यासाठी अंतरंगांतील सर्वोच्च ज्ञानावर एकाग्रता केलीत व प्रार्थना केलीत; आणि तुम्ही जे काही आहात व तुम्ही जे काही करता, ते सर्व तुम्ही पूर्णत्वप्राप्तीसाठी समर्पित केलेत, तर तुम्हाला तेथे अंतरंगातच, आधार असल्याचे आणि तो तुम्हाला कायमच साहाय्य व मार्गदर्शन करीत असल्याचे जाणवेल.

आणि जर काही अडचण आलीच तर तिच्याशी दोन हात करण्यापेक्षा; तिला हाताळण्यासाठी – सर्व वाईट इच्छा, सर्व गैरसमजुती आणि सर्व अनिष्ट प्रतिक्रिया यांना हाताळण्यासाठी; तुम्ही त्या अडचणीला परम प्रज्ञेकडे सुपूर्द करा. जर तुम्ही पूर्णपणे समर्पित झालात, तर तो तुमच्या चिंतेचा विषय उरतच नाही; तो त्या ‘परमेश्वरा’चा विषय बनतो, जो स्वत:च तो विषय हाती घेतो आणि त्याचे काय करायचे ते इतर कोणाहीपेक्षा तोच अधिक चांगल्या रीतीने जाणत असतो. यातून बाहेर पडण्याचा हाच एकमेव मार्ग आहे, केवळ हाच मार्ग आहे.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 399-400)

(श्रीअरविंदांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधील हा अंशभाग)

तुम्ही बाह्य गोष्टींवर फार अवलंबून असता कामा नये; कारण तुमच्या अशा प्रवृत्तीमुळेच तुम्ही परिस्थितीला एवढे अवास्तव महत्त्व देता. परिस्थिती साहाय्य किंवा अडथळा करू शकत नाही, असे माझे म्हणणे नाही – परंतु परिस्थिती ही केवळ परिस्थिती असते, ती काही आपल्यामध्ये असणारी मूलभूत गोष्ट नाही आणि त्या परिस्थितीचे साहाय्य किंवा तिचा अडथळा ही मूलभूत महत्त्वाची गोष्ट असता असता कामा नये.

कोणत्याही मानवी महत्त्प्रयासामध्ये किंवा गंभीर मानवी प्रयासांमध्ये असते त्याप्रमाणेच योगामध्येही, अधिक प्रमाणात विरोधी हस्तक्षेप आणि प्रतिकूल परिस्थिती असणे स्वाभाविकच असते; ज्यावर मात करावीच लागते. त्यांना एवढे अतिरिक्त महत्त्व देणे म्हणजे त्यांचे महत्त्व वाढविण्यासारखे आहे, आणि त्यांची संख्यावृद्धी करत करत, त्यांची ताकद वाढविण्यासारखे हे आहे; त्यामुळे जणू काही त्यांच्या आत्मविश्वासामध्ये आणि पुन्हा पुन्हा (चाल करून) येण्याच्या त्यांच्या सवयीमध्ये वाढ करण्यासारखे आहे.

व्यक्ती त्यांच्या विरोधात, विश्वासपूर्ण व निर्धारपूर्वक संकल्पाचे कौशल्यपूर्ण प्रयत्नसातत्य राखू शकत नसेल तर, किमानपक्षी जर त्या परिस्थितीला समतेने सामोरे जाईल तर, ती त्या गोष्टींचे महत्त्व, त्यांचे परिणाम क्षीण करते आणि अंततः, (अगदी क्षणार्धात असे नव्हे, पण अंततः) त्यांच्या चिवटपणापासून आणि पुनरुद्भवण्यापासून सुटका करून घेऊ शकते.

आणि म्हणूनच, आपल्या अंतरंगामध्ये असणारी ही संकल्पक शक्ती (determining power) ओळखणे – कारण हेच गहन सत्य आहे; ती व्यवस्थित मार्गी लावणे आणि बाह्य परिस्थितीच्या ताकदी विरोधात आंतरिक सामर्थ्य पुनर्स्थापित करणे हेच योगाचे तत्त्व आहे.

अगदी दुर्बलातील दुर्बल व्यक्तीमध्ये सुद्धा हे सामर्थ्य असते; व्यक्तीने ते ओळखले पाहिजे, ते प्रकट केले पाहिजे आणि सर्व जीवन-प्रवासात व समरप्रसंगांत ते सदासर्वकाळ अग्रस्थानी ठेवले पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 697)