Posts

आध्यात्मिकता १८

जे साधक परिपूर्णतेपर्यंत किंवा त्या जवळपाससुद्धा पोहोचलेले नाहीत त्यांच्या बोलण्यातले आणि वागण्यातले अंतर, त्यांचे विपरीत वर्तन तुम्ही पाहता आणि आध्यात्मिक अनुभव वगैरे असे काही नसते किंवा त्यात काही अर्थ नसतो असे तुम्ही म्हणता; परंतु त्या साधकांचे वर्तन हे तुमच्या म्हणण्यासाठी पुरावा कसा काय ठरू शकतो? एखाद्या माणसाला जेव्हा कधी कोणत्याही प्रकारचा आध्यात्मिक अनुभव येतो किंवा साक्षात्कार होतो तेव्हा लगेचच त्या क्षणी तो माणूस एक निर्दोष किंवा दुर्बलता-विरहित असा परिपूर्ण मनुष्य बनला पाहिजे, असे तुम्ही लिहिले आहे. हे म्हणजे एक अशी अपेक्षा करण्यासारखे आहे की, ज्या अपेक्षेचे समाधान करणे अशक्य आहे आणि अशी अपेक्षा बाळगणे म्हणजे, ‘आध्यात्मिक जीवन हा एकाएकी घडून येणारा, अवर्णनीय असा चमत्कार नसून, आध्यात्मिक जीवन म्हणजे एक प्रकारचा विकास आहे.’ या तथ्याकडे दुर्लक्ष करण्यासारखे आहे. एखादा साधक हा आधीपासूनच सिद्ध-योगी आहे असे समजून त्याचे मूल्यमापन करता येऊ शकत नाही. प्रदीर्घ मार्गावरील जेमतेम पाव टक्के किंवा त्याहूनही कमी अंतर जे चालून गेले आहेत, त्यांच्याबाबतीत तर असे मूल्यमापन करताच कामा नये….

इतकेच काय पण, अगदी महान योगीसुद्धा पूर्णत्वप्राप्तीचा दावा करत नाहीत, आणि ते तसे अगदी परिपूर्णतया निर्दोष नसल्यामुळे, त्यांची ‘आध्यात्मिकता’ मिथ्या आहे किंवा तिचा या जगाला काही उपयोगच नाही, असे तुम्ही म्हणू शकत नाही. शिवाय आध्यात्मिक माणसं ही अनेक प्रकारची असतात. त्यांच्यापैकी काही जण त्यांना आलेल्या आध्यात्मिक अनुभवांवरच समाधानी असतात आणि बाह्य जीवनातील पूर्णत्व किंवा प्रगती यांच्यासाठी प्रयत्नशील नसतात. काहीजण संत असतात, तर काही जणांना संतत्वाचा ध्यास नसतो. अन्य काही जण वैश्विक चेतनेमध्ये, ‘सर्वव्यापी ईश्वरा’च्या संपर्कात किंवा त्याच्याशी सायुज्य पावून जीवन जगण्यामध्ये आणि स्वत:च्या माध्यमातून सर्व प्रकारच्या शक्तींना क्रीडा करू देण्यामध्ये समाधानी असतात, म्हणजेच ते ‘परमहंस’ स्थितीमध्ये असलेल्या व्यक्तीच्या वर्णनाप्रमाणे असतात.

…कोणत्यातरी एका काटेकोर व्याख्येमध्ये बसावावी किंवा एखाद्या ठरावीक बंदिस्त मानसिक नियमामध्ये बांधून ठेवावी अशी ‘आध्यात्मिक जीवन’ ही काही एक वस्तू नाही, तर ‘आध्यात्मिक जीवन’ हे उत्क्रांतीचे एक विशाल क्षेत्र आहे, ‘आध्यात्मिक जीवन’ म्हणजे असे एक विशाल साम्राज्य असते, की त्याच्या अधिपत्याखाली असणाऱ्या अन्य सर्व साम्राज्यांहूनही अधिक विशाल असण्याची क्षमता त्याच्या ठायी असते; ज्यामध्ये शेकडो प्रांत असतात, हजारो प्रकार असतात, स्तर असतात, रूपं असतात, मार्ग असतात, आध्यात्मिक आदर्शांमध्ये विभिन्नता असते, आध्यात्मिक उपलब्धीच्या विविध श्रेणी असतात.

– श्रीअरविंद [CWSA 31 : 656-657]

आध्यात्मिकता ११

मानसिक विचार, नैतिक प्रयास, उत्तम चारित्र्य, जनहित, आत्म-त्याग, आत्म-परित्याग, परोपकार, मानवाची किंवा मनुष्यमात्राची सेवा या गोष्टींना पाश्चात्य लोक आध्यात्मिक अभीप्सेचे किंवा आध्यात्मिक सिद्धीचे शिखर मानतात. यासंबंधी लिहून झाल्यावर श्रीअरविंद या पत्रामध्ये पुढे लिहितात…..

(वर उल्लेख केलेल्या गोष्टी) म्हणजे पृथ्वीवरील उपलब्धींचा जर अखेरचा शब्द असता, तर अन्य कोणत्या गोष्टींची आवश्यकताच भासली नसती. आत्म्याचा किंवा स्वतःचा अगदी जवळून आणि सुस्पष्टपणे घेतलेला शोध, प्राणाच्या पाठीमागे आणि मनाच्या वर असणाऱ्या गोष्टींसाठी झटून केलेले प्रयत्न, ‘चिरंतना’विषयी किंवा ‘अनंता’विषयी असलेली ओढ, बुद्धिच्या, चारित्र्याच्या आणि मानवतेच्या गतकालीन जीवनध्येयांच्या संकुचित साच्यांमुळे मर्यादित न झालेली, चेतनेच्या आणि अस्तित्वाच्या स्वातंत्र्यासाठी आणि विशालतेसाठी असलेली भूक, ‘ईश्वरा’च्या किंवा विशुद्ध आनंदाच्या ऐक्यासाठी असलेली तृष्णा, मानसिक व प्राणिक मूल्यांशी जखडल्या न गेलेल्या आध्यात्मिक अस्तित्वाचे सौंदर्य या साऱ्या गोष्टींना येथे स्थान नसल्यामुळे आणि त्यांची येथे आवश्यकतादेखील नसल्यामुळे, त्या अनावश्यक स्वप्न म्हणून बाद कराव्या लागल्या असत्या. परंतु असे असूनही, या गोष्टींची नुसती स्वप्नंच पाहिली गेली आहेत, अथवा नुसता त्यांचा ध्यासच घेतला गेला आहे असे नाही, तर मर्त्य, मानवी देहामध्ये जन्म घेतलेले जीव तेथवर जाऊन पोहोचले आहेत, त्या गोष्टींचा पडताळा त्यांनी घेतला आहे. तेथे ‘आध्यात्मिकता’ असते.

मानवी मानसिक, नैतिक, सौंदर्यात्मक, प्राणिक साच्यांच्या पलीकडे जाण्यासाठी, ते साचे मोडणे आणि (चिरंतनाविषयीची ओढ इ. गोष्टी, ज्यांचा वर उल्लेख झाला) त्या गोष्टी ज्या चेतनेचे मूलद्रव्य आहेत, हे अनुभव ज्या चेतनेच्या दृष्टीने अगदी सहज-स्वाभाविक आहेत अशा चेतनेमध्ये प्रवेश करणे हा ‘आध्यात्मिकते’चा गाभा आहे. त्यापेक्षा निम्नतर अशी कोणतीही गोष्ट, किंवा उपरोक्त गोष्टींपेक्षा निम्नतर अशा कोणत्याही गोष्टीचा ध्यास किंवा अगदीच काही नाही तरी, त्यांचा झालेला आंशिक साक्षात्कार या गोष्टी म्हणजे ‘आध्यात्मिकता’ नव्हे. यांपैकी कोणत्यातरी एखाद्या गोष्टीचा साक्षात्कार, त्याच्या अनेक पैलूंपैकी, किमान एका पैलूचा तरी अनुभव, ज्याला आला आहे तो मनुष्य ‘आध्यात्मिक’ असतो; या गोष्टींचा ध्यास घेऊन, त्यासाठी जो प्रयत्नशील आहे, तो ‘आध्यात्मिक साधक’ असतो.

अन्य गोष्टी बौद्धिक, नैतिक दृष्टीने कितीही उदात्त असल्या, सौंदर्यदृष्ट्या अतिशय सुंदर आणि सुसंवादी असल्या, प्राणिकदृष्ट्या वैभवसंपन्न, महान आणि शक्तिशाली असल्या किंवा शारीरिकदृष्ट्या निर्दोष असल्या तरी या सर्व गोष्टी म्हणजे मार्गावरील एक मौलिक उपलब्धी आहे एवढेच म्हणता येईल, या गोष्टी म्हणजे स्वयमेव ‘आध्यात्मिकता’ नव्हे, कारण येथे अजूनही व्यक्तीने मनाची ‘सीमारेषा’ ओलांडून एका नव्या साम्राज्यात प्रवेश केलेला नसतो. [‘आध्यात्मिकता’ मालिकेमधील ‘मानवी परिपूर्णत्व आणि आध्यात्मिकता’ हा भाग येथे संपला.]

– श्रीअरविंद [CWSA 28 : 424-425]