Posts

साधना, योग आणि रूपांतरण – २२७

सर्वसाधारणपणे आपण अज्ञानामध्ये जीवन जगत असतो आणि आपल्याला ‘ईश्वर’ काय आहे हे माहीत नसते. सामान्य प्रकृतीच्या शक्ती या अ-दिव्य शक्ती असतात कारण त्या अहंकार, इच्छावासना आणि अचेतनेचा जणू एक पडदाच विणतात की, ज्यामुळे ‘ईश्वर’ आपल्यापासून झाकलेला राहतो. जी चेतना, ‘ईश्वर’ काय आहे ते जाणते आणि त्यामध्ये जाणीवपूर्वक निवास करते, अशा उच्चतर आणि गहन, सखोल चेतनेमध्ये आपला प्रवेश व्हायचा असेल तर, कनिष्ठ प्रकृतीच्या शक्तींपासून आपली सुटका झाली पाहिजे आणि ‘दिव्य शक्ती’च्या कृतीसाठी आपण स्वतःला खुले केले पाहिजे; म्हणजे मग ती ‘दिव्य शक्ती’ आपल्या चेतनेचे ‘दिव्य प्रकृती’मध्ये रूपांतरण घडवून आणेल.

‘दिव्यत्वा’च्या या संकल्पनेपासून आपण प्रारंभ केला पाहिजे; त्याच्या सत्याचा साक्षात्कार चेतनेच्या विकसनातून आणि तिच्या परिवर्तनामधूनच होणे शक्य आहे.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 07-08)

साधना, योग आणि रूपांतरण – २२४

अर्थातच, आत्तापर्यंत, ज्यांनी कोणी हे सचेत रूपांतरण (transformation) साध्य करून घेतले आहे त्यांना स्वतःच्या अंतरंगामध्ये असलेल्या, व्यक्तित्वाच्या अगदी गहनतेमध्ये असलेल्या, शाश्वत आणि अनंत जीवनाची जाणीव झालेली आहे आणि ही चेतना टिकवून ठेवण्यासाठी म्हणून, त्यांना या आंतरिक अनुभवाशी सातत्याने संबंधितच राहावे लागते, यासाठी त्यांना आंतरिक निदिध्यासामध्ये म्हणजे कमीअधिक प्रमाणात सातत्याने ध्यानामध्ये राहणे आवश्यक असते. आणि जेव्हा ते त्या ध्यानावस्थेमधून बाहेर येतात तेव्हा, (जर त्यांनी संपूर्णपणे कर्मव्यवहार करणे सोडून दिले नसेल तर), त्यांची बाह्यवर्ती प्रकृती आधी जशी होती तशीच असते; त्यांची विचारपद्धती, प्रतिक्रिया देण्याची पद्धती यामध्येदेखील फारसा काही फरक झालेला नसतो.

या उदाहरणाबाबत, हा आंतरिक साक्षात्कार, चेतनेचे हे रूपांतरण, ज्या व्यक्तीने ते साध्य करून घेतलेले असते त्या व्यक्तीपुरतेच उपयोगी असते. त्यामुळे जडद्रव्याच्या किंवा पृथ्वीवरील जीवनाच्या परिस्थितीमध्ये यत्किंचितही फरक होत नाही. समग्र रूपांतरण जर यशस्वी व्हायचे असेल तर, सर्व मनुष्यमात्र, किंबहुना सर्व सजीव आणि त्यांचे भौतिक पर्यावरण हेदेखील रूपांतरित करण्याची आवश्यकता असते. अन्यथा गोष्टी जशा आहेत तशाच राहतील. व्यक्तिगत अनुभव पार्थिव जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणू शकत नाही. रूपांतरणाच्या जुन्या संकल्पनेमध्ये चैत्य पुरुषाविषयी आणि आंतरिक जीवनाविषयी सचेत होणे अभिप्रेत असते. परंतु, रूपांतरणाची आमची जी संकल्पना आहे, ज्याविषयी आपण बोलत आहोत, ती संकल्पना आणि रूपांतरणाची जुनी संकल्पना यामध्ये हा मूलभूत फरक आहे.

म्हणजे एखादी व्यक्ती किंवा कोणता एखादा व्यक्तीसमूह किंवा सर्व मनुष्यमात्र एवढेच नव्हे तर, संपूर्ण जीवन, कमीअधिक विकसित झालेली ही एकंदर जड-भौतिक चेतनाच रूपांतरित झाली पाहिजे. हे असे रूपांतरण घडून आले नाही तर या जगातील सर्व दुःख, सर्व संकटं आणि सर्व अत्याचार आत्ताप्रमाणेच कायम राहतील. काही व्यक्ती त्यांच्यामध्ये झालेल्या आंतरात्मिक विकसनामुळे यातून सुटका करून घेऊ शकतील पण सर्वसाधारण समाज मात्र त्याच दुःखपूर्ण स्थितीमध्ये खितपत पडलेला असेल. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 15 : 293-294)

साधना, योग आणि रूपांतरण – १७८

‘पूर्णयोग’ हा संपूर्ण ‘ईश्वर’-साक्षात्काराचा, संपूर्ण ‘आत्म’साक्षात्काराचा, आपल्या अस्तित्वाच्या आणि चेतनेच्या संपूर्ण परिपूर्तीचा, आपल्या प्रकृतीच्या संपूर्ण रूपांतरणाचा मार्ग आहे. आणि त्यामध्ये अन्यत्र कोठेतरी असणाऱ्या शाश्वत परिपूर्णतेकडे परत जाणे नव्हे; तर येथील जीवनाचेच संपूर्ण परिपूर्णत्व अभिप्रेत आहे. हे उद्दिष्ट आहे आणि त्याच्या कार्यपद्धतीमध्येसुद्धा तीच परिपूर्णता आहे. कारण कार्यपद्धती परिपूर्ण असल्याशिवाय उद्दिष्टाची समग्रता साध्य होऊ शकत नाही. या पद्धतीमध्ये आपण ज्याचा साक्षात्कार करून घेऊ इच्छितो त्या ईश्वराप्रत आपल्या अस्तित्वाने, प्रकृतीने तिच्या सर्व घटकांसहित, मार्गांसहित, गतिविधींसहित पूर्णत्वाने वळणे, उन्मुख असणे आणि आत्म-दान करणे अंतर्भूत असते.

अशा प्रकारे आपले मन, इच्छा, हृदय, प्राण, शरीर, आपले बाह्य, आंतरिक आणि आंतरतम अस्तित्व, आपल्या सचेतन घटकांप्रमाणेच आपले अतिचेतन (superconscious) आणि अवचेतन (subconscious) घटकदेखील अर्पण केले पाहिजेत. हे सारे घटक साक्षात्काराचे आणि रूपांतराचे क्षेत्र झाले पाहिजेत, हे सारे घटक म्हणजे माध्यमं झाली पाहिजेत, त्यांनी प्रदीपनामध्ये (illumination) आणि मानवाच्या दिव्य चेतनेमधील व प्रकृतीमधील परिवर्तनामध्येही सहभागी झालेच पाहिजे. हे पूर्णयोगाचे स्वरूप आहे.

– श्रीअरविंद (CWSA 12 : 358)

साधना, योग आणि रूपांतरण – १७७

(श्रीअरविंद यांनी पत्राद्वारे एका साधकाला पूर्णयोग म्हणजे काय ते समजावून सांगितले आहे.)

(०१) ‘ईश्वरा’कडे फक्त मनाच्या माध्यमातून (ज्ञानयोग) किंवा फक्त हृदयाच्या माध्यमातून (भक्तियोग) किंवा फक्त इच्छा व कर्म यांच्या माध्यमातून (कर्मयोग) जाण्याऐवजी, पूर्णयोगामध्ये व्यक्ती चेतनेच्या आणि अस्तित्वाच्या सर्व अंगांनिशी आणि शक्तींनिशी ‘ईश्वर’प्राप्तीसाठी प्रयत्न करते. तो प्रयत्न करत असताना व्यक्ती उपरोक्त तिन्ही मार्गांचे आणि अन्य अनेक मार्गांचे एकाच योगमार्गामध्ये (ईश्वराशी ऐक्य साधण्याची पद्धत) एकीकरण करते आणि ‘ईश्वरा’चे, ‘त्या’च्या उपस्थितीसहित, चेतना, शक्ती, प्रकाश आणि आनंद यांसहित सर्वकाही, आपल्या स्वतःच्या चेतनेमध्ये आणि व्यक्तित्वामध्ये ग्रहण करते.

(०२) पूर्णयोगामध्ये व्यक्ती आपल्या ‘स्व’मध्ये आणि ‘जिवा’मध्येच ‘ईश्वरा’चा साक्षात्कार करून घेण्यासाठी नव्हे, तर आपल्या संपूर्ण प्रकृतीमध्येच ‘ईश्वरा’चा साक्षात्कार करून घेण्यासाठी प्रयत्नशील असते. (म्हणजे या कनिष्ठ मानवी प्रकृतीचे ईश्वरी आध्यात्मिक प्रकृतीमध्ये रूपांतर करण्यासाठी व्यक्ती प्रयत्नशील असते.)

(०३) पूर्णयोगामध्ये जन्म-प्रक्रियेला विराम देऊन, व्यक्ती फक्त पारलौकिकात ‘ईश्वर’प्राप्ती व्हावी यासाठी प्रयत्नशील नसते तर, ती या जीवनामध्येच त्याची प्राप्ती करून घेण्यासाठी प्रयत्नशील असते; जेणेकरून जीवन हे देखील ‘ईश्वरा’चा साक्षात्कार आणि ‘दिव्य’ प्रकृतीचे आविष्करण व्हावे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 373)

साधना, योग आणि रूपांतरण – ७९

साधक : बाह्यवर्ती घटकांमध्ये (मन, प्राण आणि शरीर) परिवर्तन होण्यासाठी आंतरिक साक्षात्कार आणि अनुभव यांचे साहाय्य होते का ?

श्रीमाताजी : साहाय्य झालेच पाहिजे असे काही आवश्यक नाही. त्यांचे साहाय्य व्हावे अशी तुमची इच्छा असेल तरच साहाय्य होईल. अन्यथा, व्यक्ती बाह्यवर्ती प्रकृतीपासून स्वतःला अधिकाधिक अलिप्त करत नेते. मुमुक्षू (मुक्तीची आस असलेल्या) लोकांबाबत नेहमीच असे घडत असते. बाह्य प्रकृती, तिचे स्वरूप आणि तिच्या सवयी या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्यामध्ये व्यक्तीने गुंतून पडता कामा नये अशा काहीतरी पूर्णपणे तिरस्करणीय गोष्टी आहेत, असे समजून ते त्या गोष्टी नाकारतात. त्यांच्या सर्व ऊर्जा, चेतनेच्या सर्व शक्ती (बाह्यवर्ती प्रकृतीमधून) काढून घेतात आणि उच्चतेप्रत वळवितात. आणि त्यांना हे जर पुरेशा पूर्णत्वाने साध्य करता आले तर सहसा ते कायमसाठी स्वतःच्या देहाचा त्याग करतात.

परंतु अशा उदाहरणांमध्ये, पुष्कळ वेळा असे आढळते की, ही गोष्ट ते आंशिकरितीनेच करतात आणि जेव्हा ते त्यांच्या ध्यानामधून, त्यांच्या निदिध्यासनामधून किंवा त्यांच्या समाधी अवस्थेमधून बाहेर येतात तेव्हा ते बहुधा इतरांपेक्षाही अधिक वाईट ठरतात कारण त्यांनी त्यांच्या बाह्यवर्ती प्रकृतीवर (परिवर्तनाचे) कोणतेही परिश्रम न घेता तिला आहे त्याच परिस्थितीत बाजूला सारलेले असते.

अगदी सामान्य माणसांच्या बाबतीत सुद्धा असे आढळते की, जर त्यांच्यातील दोष, दुर्गुण अगदी ठळकपणे नजरेत भरत असतील तर, जीवनामध्ये त्यामुळे फार त्रास होऊ नये म्हणून, ती माणसं त्या दोषांमध्ये सुधारणा करण्याचा किंवा त्यांच्यावर थोडे का होईना पण नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. (आणि या मुमुक्षू मंडळींच्या बाबतीत काय परिस्थिती असते?) व्यक्तीने आपले शरीर आणि आपली बाह्यवर्ती चेतना ही पूर्णपणे सोडली पाहिजे आणि संपूर्णपणे ”आध्यात्मिक उंची”प्रत स्वतःला नेले पाहिजे, हाच योग्य दृष्टिकोन आहे, अशी ज्यांची समजूत असते अशी माणसं शरीराला आणि बाह्यवर्ती प्रकृतीला एखादा जुना कपडा असावा त्याप्रमाणे टाकून देतात आणि त्यामध्ये सुधारणा करत नाहीत आणि मग जेव्हा तो कपडा पुन्हा वापरण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तो वापरण्याजोगा राहिलेला नसतो. त्याचा काहीही उपयोग होत नाही. परंतु परिवर्तन घडवावे अशी तुमच्यापाशी जर प्रामाणिक इच्छा असेल तरच आंतरिक अनुभव आणि साक्षात्कार यांचे साहाय्य होते.

तुमच्यापाशी परिवर्तन करण्याची प्रामाणिक इच्छा असेल तर मग मात्र त्याचे खूप साहाय्य होते कारण परिवर्तन घडवून आणण्यासाठी आवश्यक असणारी शक्ती त्यातून तुम्हाला मिळते, परिवर्तनासाठी आवश्यक असा आधार त्यातून तुम्हाला मिळतो. परंतु तुम्हाला परिवर्तन करण्याची खरोखरच प्रामाणिक इच्छा असली पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 04 : 348-349)

साधना, योग आणि रूपांतरण – ७६

(कधीकधी) असे होते की साधकांना अवरोहणाचा अनुभव येतो; पण त्यांना हे ‘अवरोहण’ (descent) आहे हे लक्षात येत नाही. कारण त्यांना केवळ त्याच्या परिणामाचीच जाणीव होते. प्रचलित योग आध्यात्मिक मनाच्या पलीकडे जात नाही. अनेकांना मस्तकाच्या शिखरावर ब्रह्माशी ऐक्य झाल्याचे जाणवते, परंतु त्यांना मस्तक-शिखराहूनही वर असलेल्या चेतनेची जाणीव नसते. त्याचप्रमाणे प्रचलित योगामध्ये व्यक्तीला जागृत झालेल्या आंतरिक चेतनेच्या (कुंडलिनीच्या) ब्रह्मरंध्राप्रत होणाऱ्या आरोहणाची जाणीव असते; (येथे प्रकृती ब्रह्म-चेतनेशी युक्त होते.) मात्र व्यक्तीला अवरोहणाचा अनुभव येत नाही.

काही जणांना अशा गोष्टी अनुभवास आल्याही असतील पण, त्यांचे स्वरूप, त्यांचे तत्त्व किंवा समग्र साधनेमधील त्यांचे स्थान त्यांना उमगले होते की नाही, कोण जाणे? मला स्वतःला जोपर्यंत असा अनुभव आला नव्हता तोपर्यंत, मी तरी हे इतर कोणाकडून कधी ऐकले नव्हते. याचे कारण पूर्वीचे योगी जेव्हा आध्यात्मिक मनाच्या अतीत जात असत, तेव्हा ते समाधीमध्ये निघून जात असत; याचा अर्थ असा की, (आध्यात्मिक मनाच्या वर, ब्रह्मरंध्राच्या वर असणाऱ्या) या उच्चतर पातळ्यांविषयी सजग होण्याचा त्यांनी कधी प्रयत्न केला नव्हता. ‘अतिचेतनेमध्ये (Superconscient) निघून जाणे’ हे त्यांचे उद्दिष्ट होते. ‘जाग्रत चेतनेमध्ये (waking consciousness) अतिचेतन उतरविणे’ हे त्यांचे उद्दिष्ट नव्हते, परंतु हे माझ्या योगाचे उद्दिष्ट आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 377-378)

साधना, योग आणि रूपांतरण – ७५

निश्चल – नीरवतेचे (silence) ‘अवरोहण’ ही गोष्ट मी इतर योग-प्रणालींमध्ये ऐकलेली नाही; इतर योगांमध्ये मन निश्चल-नीरवतेमध्ये ‘प्रविष्ट होणे’ हा भाग आढळून येतो. पण तरीदेखील मी जेव्हापासून आरोहण (ascent) आणि अवरोहण (descend) यांविषयी लिहीत आहे तेव्हापासूनच मला अनेक ठिकाणाहून असे सांगितले जात आहे की, (मी सांगत आहे त्या) या योगामध्ये नवीन असे काहीच नाही. आणि म्हणून मला नवल वाटते की, आरोहण आणि अवरोहण म्हणजे काय, हे माहीत नसताना त्यांना त्याचा अनुभव येत होता की काय? किंवा असे होते काय की, त्यांचे त्या प्रक्रियेकडे लक्ष गेले नव्हते?

या योगामध्ये मला आणि इतरांना जो अनुभव आलेला आहे तो असा आहे की, चेतना मस्तकाच्या वर आरोहण करते आणि तेथे वास्तव्य करते. मी जेव्हा प्रथम याविषयी बोललो होतो तेव्हा लोकं माझ्याकडे बघायला लागले आणि मी काहीतरी निरर्थक बोलत आहे असा विचार करू लागले. पूर्वीच्या योगमार्गाचा अवलंब करणाऱ्या व्यक्तींना व्यापकतेची जाणीव नक्कीच झालेली असली पाहिजे कारण अन्यथा स्वतःमध्ये विश्व सामावले असल्याचा अनुभव त्यांना आला नसता किंवा शारीर-चेतनेपासून स्वतंत्र झाल्याचा किंवा ‘अनंतम् ब्रह्मा’शी एकत्व पावल्याचा अनुभव त्यांना आला नसता.

सर्वसाधारणपणे, उदाहरणार्थ तंत्रयोगामध्ये, मस्तकाच्या शिखरावर, ब्रह्मरंध्रापर्यंत आरोहण करणाऱ्या चेतनेचा अनुभव हा सर्वोच्च असल्याचे सांगितले जाते. राजयोगामध्येसुद्धा सर्वोच्च अनुभव घेण्याचे साधन म्हणून ‘समाधी’वर भर दिलेला आढळतो. परंतु हे स्पष्टच आहे की, व्यक्ती जर जाग्रतावस्थेमध्ये ‘ब्राह्मी स्थिती’ मध्ये नसेल तर त्या साक्षात्काराला पूर्णता प्राप्त होऊ शकत नाही. भगवद्गीता अगदी सुस्पष्टपणे ‘समाहित’ असण्यासंबंधी सांगते. (ही अवस्था समाधीमध्ये असणाऱ्या अवस्थेशी समांतर असते.) तसेच ब्राह्मी स्थितीसंबंधीही भगवद्गीतेमध्ये सुस्पष्टपणे उल्लेख येतो. ही अशी एक स्थिती असते की, ज्यामध्ये व्यक्ती जाग्रतावस्थेमध्ये (समाधी-अवस्थेत असल्याप्रमाणे) जीवन व्यतीत करते आणि सर्व क्रियाकलाप करते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 377)

साधना, योग आणि रूपांतरण – ७४

(एका साधकाने ‘ध्याना’मध्ये त्याला जो साक्षात्कार झाला त्यासंबंधी श्रीअरविंद यांना लिहून कळविले आहे, असे दिसते. त्यावर श्रीअरविंद यांनी दिलेले हे उत्तर…)

वास्तविक, हा साक्षात्कार जाग्रतावस्थेमध्ये होणे आवश्यक आहे आणि तो जीवनाची वास्तविकता व्हावी यासाठी टिकून राहणेदेखील आवश्यक आहे. केवळ समाधी अवस्थेमध्येच जर त्याचा अनुभव आला तर तो अतिचेतन (superconscient) स्थितीचा, आंतरिक अस्तित्वाच्या फक्त काही भागांसाठीच खरा असणारा अनुभव असेल; मात्र तो संपूर्ण चेतनेला खरा वाटणार नाही.

समाधी अवस्थेमधील अनुभवांचा उपयोग व्यक्तित्व खुले होण्यासाठी आणि त्याच्या तयारीसाठी होतो. परंतु (ध्यानामधील) साक्षात्कार जेव्हा जाग्रतावस्थेमध्येही नित्य टिकून राहतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने प्राप्त झालेला असतो. त्यामुळे ‘पूर्णयोगा’मध्ये जाग्रतावस्थेतील अनुभवाला आणि साक्षात्काराला सर्वाधिक महत्त्व दिले जाते.

‘स्थिरचित्त नित्य-विस्तारत जाणाऱ्या या चेतनमध्ये कर्म करणे ही एकाच वेळी साधना असते आणि तीच सिद्धीही असते,’ हे जे तुम्ही कर्माबाबत लिहिले आहे ते योग्य आहे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 253)

साधना, योग आणि रूपांतरण – ६४

भौतिक मनाच्या (physical mind) गोंगाटाला, तुम्ही अस्वस्थ न होता, अविचलपणे नकार दिला पाहिजे. इथपर्यंत नकार दिला पाहिजे की तो (गोंगाट) नाउमेद होऊन जाईल आणि मान हलवत निघून जाईल आणि म्हणेल, “छे! हा माणूस फारच शांतचित्त आणि कणखर आहे.”

नेहमीच अशा दोन गोष्टी असतात की ज्या वर उफाळून येतात आणि तुमच्या शांत अवस्थेवर हल्ला चढवितात. प्राणाकडून आलेल्या सूचना आणि भौतिक मनाची यांत्रिक पुनरावृत्ती या त्या दोन्ही गोष्टी असतात. दोन्ही बाबतीत शांतपणे नकार देत राहणे हाच उपाय असतो.

अंतरंगात असणारा पुरुष हा प्रकृतीला आदेश देऊ शकतो आणि तिने काय स्वीकारावे किंवा काय नाकारावे हे तिला सांगू शकतो. मात्र त्याची इच्छा ही शक्तिशाली, अविचल इच्छा असते; तुम्ही जर अडचणींमुळे अस्वस्थ झालात किंवा क्षुब्ध झालात तर एरवी त्या ‘पुरुषा’ची इच्छा जितकी परिणामकारक रीतीने कार्य करू शकली असती तितकी परिणामकारक रीतीने (तुम्ही अस्वस्थ किंवा क्षुब्ध असताना) ती कार्य करू शकत नाही.

उच्चतर चेतना ही प्राणामध्ये पूर्णपणे उतरली असताना कदाचित सक्रिय साक्षात्कार (dynamic realisation) होऊ शकेल. उच्चतर चेतना जेव्हा मनामध्ये उतरते तेव्हा ती आपल्याबरोबर ‘पुरुषा’ची शांती आणि मुक्ती तसेच ज्ञानसुद्धा घेऊन येते. ती जेव्हा प्राणामध्ये उतरते तेव्हा सक्रिय साक्षात्कार वर्तमानात प्रत्यक्षात होऊ शकतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 304-305)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (२४)

माझ्या योगामध्ये (पूर्णयोगामध्ये) खरोखर, इतर जगतांचा – ‘परम आत्म्या’च्या स्तराचा, भौतिक जगताचा आणि दरम्यानच्या सर्व स्तरांचा – तसेच त्यांचा आपल्या जीवनावर व भौतिक जगतावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा आणि त्यांच्या पूर्ण अनुभवांचादेखील समावेश होऊ शकतो. पण हेदेखील शक्य आहे की, आधी केवळ ‘परमपुरुषा’च्या साक्षात्कारावर भर द्यायचा अन्यथा, ‘ईश्वरा’च्या अगदी एखाद्या पैलूवर म्हणजे जगदाधिपती आणि आपला व आपल्या कर्मांचा स्वामी असलेल्या ‘कृष्ण’, ‘शिव’ यांच्या साक्षात्कारावर भर द्यायचा; अन्यथा, विश्वात्मक ‘सच्चिदानंदा’वर भर द्यायचा आणि या ‘योगा’साठी (पूर्णयोगासाठी) आवश्यक असणारे पायाभूत परिणाम साध्य करून घ्यायचे; आणि नंतर त्या परिणामांपासून प्रगत होत, समग्र परिणामांकडे वळायचे. (म्हणजे) जर एखाद्याने ‘दिव्य जीवना’कडे वाटचाल करणे आणि भौतिक जीवनावर आत्म्याचे आधिपत्य निर्माण करणे’ हे ध्येय स्वीकारलेले असेल तर पूर्णयोगाचे पायाभूत परिणाम साध्य करून घेतल्यानंतर, मग त्याच्या समग्र परिणामांकडे वळायचे, हे शक्य आहे.

‘ईश्वरा’चा, ‘परमेश्वरा’चा साक्षात्कार ही निश्चितच आवश्यक गोष्ट आहे. पण प्रेम, श्रद्धा, भक्ती यांसहित त्याच्याकडे वळणे, स्वतःच्या कर्मांद्वारे त्याची सेवा करणे आणि त्याला जाणणे – त्याला ‘बौद्धिक आकलना’द्वारेच जाणले पाहिजे असे नाही तर ‘आध्यात्मिक अनुभूती’च्या माध्यमातून त्याला जाणणे – यादेखील ‘पूर्णयोगा’च्या मार्गावरील आवश्यक गोष्टी आहेत.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 375)