Tag Archive for: साक्षात्कार

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

विचारी मनाच्या (thinking mind) माध्यमातून ईश्वरी शक्तीचे ग्रहण करणे शक्य होणार नाही असे तुम्हाला का वाटते? व्यक्ती ज्याप्रमाणे प्राणाद्वारे, भावनिक अस्तित्वाद्वारे, शरीराद्वारे ईश्वरी शक्तीचे ग्रहण करू शकते, तशीच ती विचारी मनाच्या माध्यमातूनसुद्धा शक्तीचे ग्रहण करू शकते. विचारी मनदेखील प्राण आणि शरीराइतकेच सक्षम असते. अस्तित्वाच्या इतर घटकांप्रमाणेच विचारी मनाचेसुद्धा रूपांतरण करण्याची आवश्यकता असते. त्यासाठी त्याला ईश्वरी शक्ती कशी ग्रहण करायची याचे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता असते. ते दिले गेले नाही तर विचारी मनाचे रूपांतरण शक्य होणार नाही.

शरीराची तामसिकतेने झाकोळलेली, मूढ, बाधक असणारी चेतना ही जशी आध्यात्मिक अनुभवामधील अडथळा ठरते किंवा प्राणाची सुसंस्कारित न झालेली सामान्य कृती ही जशी अडथळा ठरते; अगदी त्याचप्रमाणे बुद्धीची अज्ञानग्रस्त कृती ही देखील आध्यात्मिक अनुभवामधील अडथळा ठरते. त्यामुळे साधकाला पुढील गोष्टींची जाणीव असली पाहिजे.

• पहिली गोष्ट म्हणजे त्याने मानसिक संकल्पना किंवा संस्कार किंवा बौद्धिक निष्कर्ष या गोष्टींना साक्षात्कार समजण्याची चूक करता कामा नये.

• दुसरी गोष्ट म्हणजे मनाची चंचलता, अस्वस्थता. त्यामुळे आंतरात्मिक (psychic) आणि आध्यात्मिक (spiritual) अनुभवाच्या उत्स्फूर्त अचूकतेमध्ये बाधा निर्माण होते. आणि त्यामुळे प्रकाशित करणाऱ्या खऱ्या ज्ञानाच्या अवतरणाला वावच दिला जात नाही किंवा मग, या ज्ञानाचा मानवी मानसिक स्तराला स्पर्श झाल्याबरोबर किंवा पूर्णपणे तो स्पर्श होण्याआधीच, त्या ज्ञानामध्ये विकार निर्माण होतो. (म्हणून या गोष्टी घडू नयेत यासाठी साधकाने खबरदारी घेतली पाहिजे.)

…बुद्धी जर समर्पित झाली; ती जर खुली, अविचल, ग्रहणशील झाली तर, ती प्रकाश ग्रहण करण्याचे माध्यम किंवा आध्यात्मिक अवस्थेच्या अनुभवाला व आंतरिक परिवर्तनाच्या पूर्णतेला साहाय्यक का बरे होऊ शकणार नाही?

– श्रीअरविंद (CWSA 31 : 13-14)

 

(मनुष्याने स्वत:ला उच्चतर चेतनेप्रत समर्पित करायचे हा माणसाच्या चिंताग्रस्ततेवरील एक उपाय आहे, असे श्रीमाताजींनी सांगितले. ते आपण आजवर विचारात घेतले. त्या विवेचनाचा हा संपादित केलेला अंतिम भाग आहे. विषय समजण्यास सोपा जावा या दृष्टीने मराठी भाषांतरामध्ये वाक्यांचा क्रम व मांडणी यामध्ये बदल केला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.)

सर्व आध्यात्मिक साधनापद्धतींचा प्रारंभ सर्व जबाबदाऱ्या उच्चतर तत्त्वावर सोपवून, त्याला समर्पित होण्याच्या आवश्यकतेपासून होते. अन्यथा शांती लाभणे अशक्य असते. ‘शांततावादी’ (quietist) पद्धत असे त्या साधनापद्धतींचे वर्णन करता येईल.

सर्व प्रकारच्या कृतींना नकार देत, अचल आंतरिक निश्चल-नीरवतेमध्ये बुडी घेण्यावर या शांततावादी पद्धती आधारलेल्या असतात. त्याचे अनुसरण करणाऱ्या व्यक्तींना अचानकपणे अशी जाणीव होते की, शांतीशिवाय कोणताच आंतरिक साक्षात्कार होणे शक्य नाही. आणि म्हणून अगदी स्वाभाविकपणे, त्यांच्या मनात असा विचार येतो की, कधीच न सुटणारे प्रश्न जोपर्यंत त्यांना भेडसावत आहेत आणि जोपर्यंत बाह्य अस्वस्थतेच्या परिस्थितीमध्ये त्यांना जीवन कंठावे लागत आहे, तोपर्यंत त्याना कधीच शांती लाभणे शक्य नाही.’ कारण ते प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक असणारे ज्ञानच त्यांच्यापाशी नाहीये. आणि म्हणून, शांती लाभावी यासाठी त्या शांततावादी साधनापद्धती सर्व प्रकारच्या जीवनाचा परित्याग करतात. (‘शांततावादी’ पद्धतीचे अनुसरण करणाऱ्या माणसांची विचारसरणी ही अशा प्रकारची असते.)

परंतु या अचल (immobile) व स्थिर शांतीपेक्षा (static peace) अधिक उच्च असणारी अशी आणखी एक स्थिती असते. मनुष्याला अशी एक चेतना प्रदान करण्यात आलेली आहे की, ज्यामुळे तो प्रगती करू शकतो, त्याला जे ज्ञात नाही ते तो शोधून काढू शकतो; तो जे अजूनपर्यंत होऊ शकलेला नाही त्यामध्ये तो विकसित होऊ शकतो. आणि हा जो विश्वास असतो तो, व्यक्तीने प्रगती करण्याची इच्छा कायम ठेवावी, सर्व प्रकारच्या चिंता व काळज्यांपासून मुक्त होऊन, फलिताची व परिणामांची कोणतीही काळजी न करता, प्रगतीसाठीचे प्रयत्न चालू ठेवावेत यासाठी पुरेसा असतो. शांततावादी पद्धतींपेक्षा एक पाऊल पुढे टाकणारी ही पद्धत आहे.

हे पुढचे पाऊल म्हणजे (जीवनाचा त्याग न करता, जीवनात राहून) प्रश्नांना सामोरे जाणे. ज्या परमशक्तीला सर्व काही ज्ञात आहे आणि जी तुम्हाला कार्यप्रवृत्त करू शकते, तिच्यावर संपूर्ण विश्वास ठेवून, त्या खात्रीनिशी आणि स्थिरचित्ताने प्रश्नांना सामोरे जायचे. आणि अशा वेळी व्यक्ती (शांततावादी पद्धतीप्रमाणे) कृती करण्याचे सोडून देत नाही तर ती आता, बलशाली आणि गतिशील असणाऱ्या उच्चतर शांतीमध्ये राहून कार्य करू शकते. ईश्वर आपल्याला जीवनामध्ये जो मदतीचा हात देतो त्याचा हा एक नवीन पैलू आहे; व्यक्तीमध्ये ईश्वरी शक्ती कार्यरत असल्याचे हे एक नवीन रूप आहे; किंबहुना आध्यात्मिक साक्षात्काराचा हा एक नवीनच आयाम आहे, असे म्हणता येईल.

– श्रीमाताजी (CWM 09 : 304-305)

आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन साक्षात्कार आणि आजवर स्वप्नातही कधी पाहिले नव्हते असे प्रभुत्व संपादन करणे हे आपले काम आहे. काळ, आत्मा आणि जग हे आपल्याला प्रदान करण्यात आलेले क्षेत्र आहे; दृष्टी, आशा आणि सर्जनशील कल्पनाशक्ती या गोष्टी आपल्याला काय करायचे आहे याची आठवण करून देणाऱ्या आहेत; तर इच्छा, विचार आणि परिश्रम ही आपली सर्वार्थाने कार्यक्षम अशी साधनं आहेत.

– श्रीअरविंद (CWSA 13 : 200)

 

साधक : पृथ्वीवरील जीवनाचे औचित्य काय आहे?

श्रीमाताजी : ईश्वरा‌चा साक्षात्कार करून घेण्यासाठी व्यक्ती या पृथ्वीवर आलेली असते, हेच पृथ्वीवरील जीवनाचे औचित्य आहे. हे प्रयोजन नसेल तर भौतिक अस्तित्व म्हणजे एक अप-रूप, विकारित रूप (monstrosity) ठरेल.

जर हे परमोच्च प्रयोजन नसते, म्हणजे ईश्वरा‌चा पुनर्शोध घेणे, ईश्वर‌च होणे, ईश्वरा‌ला आविष्कृत करणे आणि या भौतिक जीवनात देखील ईश्वराचा साक्षात्कार करून घेणे, हे जर पृथ्वीवरील जीवनाचे प्रयोजन नसते तर, आत्ता हे जीवन जसे आहे तसे ते विकारित रूप ठरेल.

साहजिकच आहे की, माणसं जितकी जास्त अजाण असतात तितके आत्ता मी जे सांगितले ते त्यांना समजणे कठीण जाते. कारण अशी माणसं (जीवनाकडे, स्वत:कडे) वस्तुनिष्ठपणे पाहू शकत नाहीत. ती यांत्रिकपणे, सवयीनुसार जीवन जगत असतात; म्हणजे स्वतःच्या जीवनाच्या पद्धतीबद्दल माणसं जागरूक नसतात किंवा त्याकडे ती अलग होऊन वस्तुनिष्ठपणे पाहू शकत नाहीत. पण जसजशी त्यांची चेतना वृद्धिंगत होत जाते तसतसे, सद्यस्थितीतील जीवन हे किती भयावह नरक आहे, हे त्यांना जाणवू लागते.

आणि जेव्हा हे जीवन कोणत्या दिशेने चालले आहे याची त्यांना जाणीव होते तेव्हाच मग ते त्याचा स्वीकार करतात, त्यांना जीवनाचे प्रयोजन समजते. मगाशी मी जीवनाचे जे प्रयोजन सांगितले आहे तेच जीवनाला स्वीकारार्ह बनवते. ते जर जीवनाचे प्रयोजन नसेल तर, जीवन हे खरोखरच एक भयंकर आपत्ती ठरेल.

– श्रीमाताजी (CWM 08 : 119-120)

आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये सामर्थ्याला निश्चितच एक महत्त्व असते; पण आध्यात्मिक साक्षात्कार हा केवळ सामर्थ्यामुळेच होऊ शकतो आणि तो अन्य कोणत्याच मार्गामुळे होऊ शकत नाही, असे म्हणणे ही खूपच अतिशयोक्ती ठरेल.

‘ईश्वरी कृपा’ ही काही एखादी काल्पनिक गोष्ट नाही, तर ती अनुभवास येणारी आध्यात्मिक वस्तुस्थिती आहे. विद्वान आणि सामर्थ्यवान माणसं ज्यांना अगदीच नगण्य समजतात अशा अनेक व्यक्तींना ईश्वरी कृपे‌मुळे आध्यात्मिक साक्षात्कार झालेला आहे. अशिक्षित असताना किंवा फारशी मानसिक शक्ती नसताना किंवा कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नसताना किंवा त्यांच्या व्यक्तित्वामध्ये (तुम्ही म्हणता तसे) कोणतेही ‘सामर्थ्य’ नसताना किंवा संकल्पशक्ती नसताना देखील, त्यांना एकाएकी किंवा अगदी अल्पावधीतच आध्यात्मिक साक्षात्कार झाला होता; कारण त्यांच्यापाशी श्रद्धा होती किंवा ते प्रामाणिक होते आणि त्यांनी अभीप्सा बाळगली होती.

ही आध्यात्मिक इतिहासातील तथ्यं आहेत आणि ती तथ्यं अगदी सार्वत्रिक आध्यात्मिक अनुभवाचा भाग आहेत. असे असूनही या गोष्टी काल्पनिक आहेत असे समजून, त्यांचा एवढा ऊहापोह का केला जातो, किंवा इतके युक्तिवाद का केले जातात, किंवा या गोष्टी नाकारल्या का जातात हेच मला कळत नाही.

‘सामर्थ्य’, जर ते आध्यात्मिक असेल तर, त्यामध्ये आध्यात्मिक साक्षात्काराची शक्ती असते; (पण) त्याहूनही अधिक शक्ती ‘प्रामाणिकपणा’मध्ये असते; आणि सर्वाधिक शक्ती ‘ईश्वरी कृपे‌’मध्ये असते. कितीही वेळ लागला आणि कितीही अडचणी आल्या तरी, एखादी व्यक्ती जर प्रामाणिक असेल तर ती त्या सगळ्यातून पार होतेच, हे मी आजवर अनेकदा सांगितले आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 172)

 

(भाग ०४)

व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं आहे. पण प्रत्येक वेळी या अप्रामाणिकपणाचा उद्भव एक सारख्याच गतीविधीतून होतो — ती गतीविधी कधी इच्छांमधून उद्भवलेली असते तर, कधी व्यक्ती स्वत:च्या वैयक्तिक उद्दिष्टांसाठी जी धडपड करत असते, त्यातून उद्भवलेली असते. म्हणजे अहंभावामधून, अहंकारातून निर्माण झालेल्या मर्यादांच्या सरमिसळीतून आणि वासनांमधून उत्पन्न होणाऱ्या सर्व प्रकारच्या विकृतींमधून या अप्रामाणिकपणाचा उद्भव होतो.

व्यक्ती जरी प्रामाणिक बनण्याची धडपड करत असली तरीसुद्धा तिच्यामध्ये जोपर्यंत अहंकार शिल्लक असतो तोपर्यंत ‘मी पूर्णपणे प्रामाणिक आहे,’ असे ती व्यक्ती म्हणू शकत नाही. व्यक्तीने अहंकाराच्या पलीकडे जायला पाहिजे, स्वत:ला संपूर्णपणे दिव्य संकल्पा‌च्या (divine Will) हाती सोपविले पाहिजे, समर्पित केले पाहिजे. हातचे काहीही राखून न ठेवता आणि लाभहानीचा कोणताही विचार मनात न ठेवता हे समर्पण केले पाहिजे… तेव्हाच व्यक्ती संपूर्णतया प्रामाणिक असू शकते, तत्पूर्वी मात्र ती प्रामाणिक नसते.

अर्थात, व्यक्तीने आहे त्यापेक्षा अधिक प्रामाणिक होण्याचा प्रयत्न करू नये, असा याचा अर्थ नाही. एखादी व्यक्ती असेही म्हणण्याची शक्यता आहे की, ‘ठीक आहे, मी माझा अहंकार नाहीसा होण्याची वाट पाहीन आणि मग प्रामाणिक होईन,’ (परंतु असे करता कामा नये.) व्यक्तीने ती सध्या जेवढी प्रामाणिक आहे त्यापेक्षा, अधिक प्रामाणिक बनण्याचा प्रयत्न अवश्य केला पाहिजे. किंवा असेही म्हणता येईल की, व्यक्तीने जर प्रामाणिकपणे प्रयत्नच केला नाही, तर तिचा अहंकार कधीच नाहीसा होणार नाही.

प्रामाणिकपणा हा खऱ्या साक्षात्काराचा पाया आहे, तो साक्षात्काराचे साधन आहे, तोच मार्ग आहे आणि प्रामाणिकपणा हेच एक साध्य आहे. तुमच्याकडे प्रामाणिकपणा नसेल तर, तुम्ही हमखास असंख्य घोडचुका करत राहता आणि तुम्ही स्वतःला व इतरांना जी हानी पोहोचविलेली असते, त्याचे तुम्हाला सातत्याने निवारण करत बसावे लागते.

प्रामाणिक असण्यामध्ये एक अद्भुत आनंद असतो. प्रामाणिकपणाच्या प्रत्येक कृतीमध्येच प्रामाणिकपणाचे स्वतःचे असे एक फल अंतर्भूत असते. आपले शुद्धिकरण झाले आहे ही भावना किंवा ऊर्ध्वमुख होत झेपावत जाणे किंवा व्यक्तीने मिथ्यत्वाचा अगदी एखादा छोटासा कण दूर केला तरी त्यामुळे तिला मिळालेला मुक्तीचा अनुभव या गोष्टी हे प्रामाणिकपणाचे फलित असते. प्रामाणिकपणा हे सुरक्षाकवच असते, तेच संरक्षण असते, प्रामाणिकपणा हाच मार्गदर्शक असतो आणि अंतिमतः प्रामाणिकपणा ही एक रूपांतरकारी शक्ती असते.

– श्रीमाताजी (CWM 08 : 399-400)

(व्यक्ती बाह्य परिवर्तन [म्हणजे स्वत:च्या मन, प्राण व शरीरात परिवर्तन] करू इच्छित असेल तर, आंतरिक अनुभूती व साक्षात्कार या गोष्टींची त्यास मदत होते का? असा प्रश्न एका साधकाने विचारला आहे; त्याला श्रीमाताजींनी दिलेल्या उत्तरातील हा अंशभाग…)

आपल्यामध्ये परिवर्तन घडावे ही प्रामाणिक इच्छा जर व्यक्तीकडे असेल तर तिला आंतरिक अनुभूती व साक्षात्कार यापासून खूप साहाय्य मिळते; कारण त्यातून व्यक्तीला परिवर्तनासाठी आवश्यक असणारी शक्ती आणि परिवर्तनासाठी आवश्यक असणारा आधार मिळतो. मात्र परिवर्तन घडावे अशी खरी प्रामाणिक इच्छा त्या व्यक्तीकडे असली पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 04 : 349)

(पूर्वार्ध)

बरेचदा असे आढळते की, ध्यानधारणादी करण्यासाठी जे लोक अरण्यामध्ये एकटेच राहतात त्यांची आजूबाजूच्या पशुपक्ष्यांशी, झाडांशी मैत्री होते. म्हणजे केवळ एकटे राहिल्यामुळे, आंतरिक ध्यानामध्ये प्रविष्ट होण्याची आणि परमसत्याशी योगयुक्त होऊन राहण्याची शक्ती तुम्हाला प्राप्त होते, असे अजिबात नाही. जेव्हा तुम्हाला अन्य काहीच करण्यासारखे नसते, अशा परिस्थितीमध्ये कदाचित योगयुक्त राहणे सोपे असेलही पण मला काही ते तितकेसे पटत नाही. कारण व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत काही ना काही उद्योग शोधून काढते. (आणि त्यात गुंतून पडू शकते.) मला माझ्या अनुभवावरून असे वाटते की, सर्व अडीअडचणींच्या धुमश्चक्रीत असतानासुद्धा जी व्यक्ती स्वत:च्या वृत्तीप्रवृत्तींना ताब्यात ठेवण्यात यशस्वी होते; ईश्वरी कृपे‌ने जी बाह्य परिस्थिती प्रदान केली आहे त्या परिस्थितीमध्ये राहूनच जी व्यक्ती आपल्या अंतरंगातील शाश्वत अस्तित्वा‌सोबत एकांतात राहण्याचा प्रयत्न करत असते; अशा वेळी त्या व्यक्तीला जो साक्षात्कार होतो तो अनंतपटीने अधिक खरा, अधिक गहन व अधिक चिरस्थायी असतो.

अडीअडचणींपासून पलायन करणे हा पर्याय आकर्षक असला तरी, तो त्यांच्यावर विजय प्राप्त करण्याचा उपाय होऊ शकत नाही. जे लोक आध्यात्मिक जीवन जगू इच्छितात त्यांच्यामध्ये अशी एक मानसिकता असते आणि त्या मानसिकतेपोटी ते म्हणत असतात, ”झाडाखाली अगदी एकांतात, एकटे बसणे, ध्यानमग्न होऊन राहणे आणि बोलण्याची किंवा काहीतरी करण्याची कोणतीही उर्मी नसणे, हे किती रम्य असेल नाही?” या दिशेने त्यांच्या विचारांची ठाम बैठक तयार झालेली असते पण ती फारच भ्रामक असते. (उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (CWM 03 : 276)

अधिक गहन व आध्यात्मिक अर्थाने सांगायचे झाले तर, ज्या गोष्टीचा साक्षात्कार झाला आहे ती गोष्ट, जेव्हा इतर कोणत्याही भौतिक गोष्टीपेक्षाही अधिक वास्तव व गतिशील आणि चेतनेच्या दृष्टीने अधिक निकट असल्याचे जाणवते, तेव्हा अशा साक्षात्काराला ‘सघन साक्षात्कार’ (concrete realisation) म्हणतात.

अशा प्रकारे सगुण ईश्वराचा (personal Divine) किंवा निर्गुण ब्रह्माचा (impersonal Brahman) किंवा आत्म्याचा (Self) साक्षात्कार हा सहसा, साधनेच्या प्रारंभीच किंवा साधनेच्या पहिल्या काही वर्षांत होत नाही किंवा साधनेला खूप वर्ष झाली तरीही होत नाही. साधनेच्या प्रारंभीच असा साक्षात्कार होणे ही गोष्ट फारच थोड्या जणांच्या बाबतीत घडते. कोणतीही योगसाधना न करतासुद्धा, लंडनमध्ये मला आलेल्या अनुभवानंतर, पंधरा वर्षांनी म्हणजे, मी योगसाधनेला सुरुवात केल्यानंतर, पाचव्या वर्षी मला तो अनुभव आला. आणि तो सुद्धा माझ्या दृष्टीने खूप असाधारणरित्या लवकरच आलेला आहे, जणू जलदगती आगगाडीचा वेगच. अर्थात, यापेक्षाही अधिक लवकर काही उपलब्धी घडून आल्या आहेत, यात शंका नाही.

पण इतक्या लवकर त्याची अपेक्षा बाळगणे आणि त्याची मागणी करणे आणि अनुभव आला नाही म्हणून हताश होणे, तसेच युगा-युगामध्ये दोन तीन व्यक्तींचा अपवाद वगळता, इतरांना हा योग करता येणे अशक्य आहे असे म्हणणे, ही गोष्ट एखाद्या अनुभवी योग्याच्या किंवा साधकाच्या दृष्टीने पाहता, उतावळ्या आणि विकृत अधीरतेमध्ये गणली जाईल. बहुतेक जण हेच सांगतील की, पहिल्या काही वर्षांमध्ये धीम्या गतीने प्रगतीची आशा बाळगणे हे चांगले. आणि जेव्हा प्रकृती तयार होते आणि जेव्हा ती पूर्णपणे ईश्वराभिमुख होते, तेव्हाच असे परिपक्व अनुभव येऊ शकतात.

काही जणांच्या बाबतीत तुलनेने अगदी सुरुवातीच्या काळात देखील, काही पूर्वतयारी करून घेणारे अनुभव अपेक्षेपेक्षा लवकर येऊ शकतात, पण तेथेही चेतनायुक्त परिश्रम करावेच लागतात, त्यापासून त्यांची सुटका नसते; या प्रयत्नांमुळे पुढे अशा अनुभवांची, चिरस्थायी आणि परिपूर्ण अशा साक्षात्कारामध्ये परिणती होते…

वास्तविक, जी माणसं कृतज्ञ असतात, आनंदी असतात; आवश्यकता पडली तर, अगदी छोटी छोटी पावले का असेनात, पण एकेक पाऊल टाकण्याची ज्यांची तयारी असते, अशी माणसंच खरंतर अधिक वेगाने वाटचाल करतात आणि आणि जे प्रत्येक पावलागणिक निराश होतात, कुरकूर करत राहतात अशा अधीर, उतावळ्या लोकांपेक्षा ही माणसं अधिक खात्रीने वाटचाल करतात. मला तरी नेहमी असेच आढळून आले आहे; याला विरोधी अशीही काही उदाहरणे असतील देखील, पण मला एवढेच सांगायचे आहे की, जर तुम्ही ‘आशा, उत्साह आणि श्रद्धा’ कायम बाळगू शकलात तर, अधिक मोठ्या शक्यतेला वाव असेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 112)

अधीरता नेहमीच चुकीची असते. ती साधनेला साहाय्य करत नाही तर, ती अडथळे निर्माण करते. अविचल, प्रसन्न श्रद्धा आणि विश्वास हा साधनेसाठी सर्वोत्तम पाया असतो. उर्वरित गोष्टींसाठी साधकामध्ये अभीप्सेबरोबरच, ग्रहणशीलतेसाठी सातत्यपूर्ण असे संपूर्ण खुलेपण असणे आवश्यक असते. ही अभीप्सा उत्कट असू शकेल पण ती नेहमीच स्थिरशांत आणि अविचल असली पाहिजे. योगाचा संपूर्ण साक्षात्कार अचानक होत नाही. आधाराची (मन, प्राण व शरीर यांची) बरीच तयारी झाली की मग, साक्षात्कार होतो आणि ती तयारी होण्यासाठी कधीकधी खूप दीर्घ कालावधी लागू शकतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 111-112)