Posts

साधना, योग आणि रूपांतरण – ८३

(साधकाला चेतनेच्या आरोहणाचा आणि अवरोहणाचा अनुभव कसा प्रतीत होतो, हे कालच्या भागात आपण पाहिले.)

आरोहण प्रक्रियेचे (ascension) विविध परिणाम आढळून येतात. ही प्रक्रिया चेतनेला मुक्त करू शकते त्यामुळे तुम्ही शरीरामध्ये बंदिस्त नाही किंवा शरीराच्या वर आहात असा अनुभव तुम्हाला येतो, किंवा तुम्ही शरीरासह इतके विशाल होता की जणूकाही तुमचे शारीर-अस्तित्व उरतच नाही. किंवा तुम्ही म्हणजे तुमच्या मुक्त विशालतेमधील केवळ एक बिंदू आहात असा तो अनुभव असतो. त्यामुळे व्यक्तीला किंवा तिच्या एखाद्या घटकाला शरीरातून बाहेर पडता येते आणि तो घटक इतरत्र जाऊ शकतो. शरीरातून बाहेर पडून इतरत्र जाण्याच्या या कृतीसोबतच सहसा एक प्रकारच्या आंशिक समाधीची अन्यथा संपूर्ण योगतंद्रीची अवस्था येते. किंवा त्यामुळे चेतना सशक्त होऊ शकते. आता ती चेतना शरीरापुरतीच किंवा बाह्यवर्ती प्रकृतीच्या सवयींपुरतीच मर्यादित राहत नाही. त्याची परिणती चेतना अंतरंगामध्ये शिरण्यामध्ये, आंतरिक मानसिक गहनतांमध्ये प्रवेश करण्यामध्ये, तसेच चेतना आतंरिक प्राणामध्ये, आंतरिक सूक्ष्म देहामध्ये, अंतरात्म्यामध्ये प्रवेश करण्यामध्ये होते. त्यामुळे व्यक्ती स्वतःच्या अगदी आंतरतम चैत्य अस्तित्वाविषयी किंवा आंतरिक मानसिक, प्राणिक आणि सूक्ष्म शारीर अस्तित्वाविषयी सजग होते. त्यामुळे व्यक्ती प्रकृतीच्या घटकांशी संबंधित असणाऱ्या त्या त्या क्षेत्रांमध्ये, त्या स्तरांमध्ये, त्या जगतांमध्ये वास्तव्य करण्यास आणि तेथे वावरण्यास सक्षम होते.

कनिष्ठ चेतनेच्या या पुनःपुन्हा आणि नित्य होणाऱ्या आरोहणामुळे मन, प्राण आणि शरीर हे घटक अतिमानसिक स्तरापर्यंतच्या उच्चतर स्तरांच्या संपर्कात येण्यासाठी सक्षम होतात आणि त्या उच्चतर स्तरांच्या प्रकाशामुळे, त्यांच्या शक्तीमुळे आणि त्यांच्या प्रभावामुळे भारित होतात. आणि पुनःपुन्हा व नित्य होणारे ‘दिव्य चेतने’चे आणि तिच्या ‘ऊर्जे’चे हे अवरोहण हेच समग्र अस्तित्वाच्या आणि समग्र प्रकृतीच्या रूपांतरणाचे साधन असते. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 216)

साधना, योग आणि रूपांतरण – ७८

साधक : समाधीमध्ये काही गोष्टी करणे सोपे जात असेल तर समाधी ही पूर्णयोगासाठीसुद्धा एक अतिशय चांगली अवस्था नाही का? काही महिन्यांपूर्वी मी जेव्हा समाधीसंबंधी बोललो होतो तेव्हा तुम्ही असे म्हटल्याचे मला स्मरते की, “समाधीची आवश्यकता नाही तर एका नवीन चेतनेची आवश्यकता आहे.”

श्रीअरविंद : निश्चितच (समाधी ही चांगली अवस्था आहे); समाधीला या योगामध्ये प्रतिबंध करण्यात आलेला नाही. श्रीमाताजी नेहमी समाधी-अवस्थेमध्ये प्रविष्ट होतात ही गोष्ट हा त्याचा पुरेसा पुरावा आहे. मी जेव्हा तुम्हाला तसे म्हणालो होतो तेव्हा ‘’समाधीची कधीच आवश्यकता नाही किंवा ती कधीच उपयुक्त नाही’’, अशा अर्थाचे ते सार्वत्रिक विधान नव्हते तर, ते विधान तुमच्या तेव्हाच्या गरजेला अनुसरून केलेले होते. (विशिष्ट परिस्थितीत, विशिष्ट संदर्भाने, विशिष्ट व्यक्तीला उद्देशून केलेली) विशिष्ट विधाने मनाद्वारे अनन्य आणि त्रिकालाबाधित नियमामध्ये परिवर्तित करू नयेत.

*

समाधी ही वर्ज्य करायला हवी अशी गोष्ट नाही पण ती अधिकाधिक चेतनायुक्त करणे आवश्यक असते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 41), (CWSA 30 : 250)

साधना, योग आणि रूपांतरण – ७६

(कधीकधी) असे होते की साधकांना अवरोहणाचा अनुभव येतो; पण त्यांना हे ‘अवरोहण’ (descent) आहे हे लक्षात येत नाही. कारण त्यांना केवळ त्याच्या परिणामाचीच जाणीव होते. प्रचलित योग आध्यात्मिक मनाच्या पलीकडे जात नाही. अनेकांना मस्तकाच्या शिखरावर ब्रह्माशी ऐक्य झाल्याचे जाणवते, परंतु त्यांना मस्तक-शिखराहूनही वर असलेल्या चेतनेची जाणीव नसते. त्याचप्रमाणे प्रचलित योगामध्ये व्यक्तीला जागृत झालेल्या आंतरिक चेतनेच्या (कुंडलिनीच्या) ब्रह्मरंध्राप्रत होणाऱ्या आरोहणाची जाणीव असते; (येथे प्रकृती ब्रह्म-चेतनेशी युक्त होते.) मात्र व्यक्तीला अवरोहणाचा अनुभव येत नाही.

काही जणांना अशा गोष्टी अनुभवास आल्याही असतील पण, त्यांचे स्वरूप, त्यांचे तत्त्व किंवा समग्र साधनेमधील त्यांचे स्थान त्यांना उमगले होते की नाही, कोण जाणे? मला स्वतःला जोपर्यंत असा अनुभव आला नव्हता तोपर्यंत, मी तरी हे इतर कोणाकडून कधी ऐकले नव्हते. याचे कारण पूर्वीचे योगी जेव्हा आध्यात्मिक मनाच्या अतीत जात असत, तेव्हा ते समाधीमध्ये निघून जात असत; याचा अर्थ असा की, (आध्यात्मिक मनाच्या वर, ब्रह्मरंध्राच्या वर असणाऱ्या) या उच्चतर पातळ्यांविषयी सजग होण्याचा त्यांनी कधी प्रयत्न केला नव्हता. ‘अतिचेतनेमध्ये (Superconscient) निघून जाणे’ हे त्यांचे उद्दिष्ट होते. ‘जाग्रत चेतनेमध्ये (waking consciousness) अतिचेतन उतरविणे’ हे त्यांचे उद्दिष्ट नव्हते, परंतु हे माझ्या योगाचे उद्दिष्ट आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 377-378)

साधना, योग आणि रूपांतरण – ७५

निश्चल – नीरवतेचे (silence) ‘अवरोहण’ ही गोष्ट मी इतर योग-प्रणालींमध्ये ऐकलेली नाही; इतर योगांमध्ये मन निश्चल-नीरवतेमध्ये ‘प्रविष्ट होणे’ हा भाग आढळून येतो. पण तरीदेखील मी जेव्हापासून आरोहण (ascent) आणि अवरोहण (descend) यांविषयी लिहीत आहे तेव्हापासूनच मला अनेक ठिकाणाहून असे सांगितले जात आहे की, (मी सांगत आहे त्या) या योगामध्ये नवीन असे काहीच नाही. आणि म्हणून मला नवल वाटते की, आरोहण आणि अवरोहण म्हणजे काय, हे माहीत नसताना त्यांना त्याचा अनुभव येत होता की काय? किंवा असे होते काय की, त्यांचे त्या प्रक्रियेकडे लक्ष गेले नव्हते?

या योगामध्ये मला आणि इतरांना जो अनुभव आलेला आहे तो असा आहे की, चेतना मस्तकाच्या वर आरोहण करते आणि तेथे वास्तव्य करते. मी जेव्हा प्रथम याविषयी बोललो होतो तेव्हा लोकं माझ्याकडे बघायला लागले आणि मी काहीतरी निरर्थक बोलत आहे असा विचार करू लागले. पूर्वीच्या योगमार्गाचा अवलंब करणाऱ्या व्यक्तींना व्यापकतेची जाणीव नक्कीच झालेली असली पाहिजे कारण अन्यथा स्वतःमध्ये विश्व सामावले असल्याचा अनुभव त्यांना आला नसता किंवा शारीर-चेतनेपासून स्वतंत्र झाल्याचा किंवा ‘अनंतम् ब्रह्मा’शी एकत्व पावल्याचा अनुभव त्यांना आला नसता.

सर्वसाधारणपणे, उदाहरणार्थ तंत्रयोगामध्ये, मस्तकाच्या शिखरावर, ब्रह्मरंध्रापर्यंत आरोहण करणाऱ्या चेतनेचा अनुभव हा सर्वोच्च असल्याचे सांगितले जाते. राजयोगामध्येसुद्धा सर्वोच्च अनुभव घेण्याचे साधन म्हणून ‘समाधी’वर भर दिलेला आढळतो. परंतु हे स्पष्टच आहे की, व्यक्ती जर जाग्रतावस्थेमध्ये ‘ब्राह्मी स्थिती’ मध्ये नसेल तर त्या साक्षात्काराला पूर्णता प्राप्त होऊ शकत नाही. भगवद्गीता अगदी सुस्पष्टपणे ‘समाहित’ असण्यासंबंधी सांगते. (ही अवस्था समाधीमध्ये असणाऱ्या अवस्थेशी समांतर असते.) तसेच ब्राह्मी स्थितीसंबंधीही भगवद्गीतेमध्ये सुस्पष्टपणे उल्लेख येतो. ही अशी एक स्थिती असते की, ज्यामध्ये व्यक्ती जाग्रतावस्थेमध्ये (समाधी-अवस्थेत असल्याप्रमाणे) जीवन व्यतीत करते आणि सर्व क्रियाकलाप करते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 377)

साधना, योग आणि रूपांतरण – ७३

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)
चेतना अंतरंगामध्ये प्रविष्ट झाल्याचा तुम्हाला आलेला हा अनुभव म्हणजे ज्याला सामान्यत: ‘समाधी’ असे संबोधले जाते तो अनुभव होता. वास्तविक त्यातील सर्वाधिक महत्त्वाचा भाग म्हणजे मन आणि प्राणामध्ये (तुम्हाला) आलेला निश्चल-नीरवतेचा अनुभव, की जी नीरवता अगदी शरीरापर्यंत पूर्णपणे विस्तारित झाली होती.

निश्चल-नीरवतेची (silence) आणि शांतीची (peace) क्षमता प्राप्त होणे ही साधनेमधील सर्वाधिक महत्त्वाची पायरी असते. ती प्रथमतः ध्यानामध्ये प्राप्त होते आणि ती निश्चल-नीरवता चेतनेस अंतर्मुख करून, तिला समाधी-अवस्थेकडे नेण्याची शक्यता असते. परंतु नंतर ही क्षमता जाग्रतावस्थेमध्ये सुद्धा प्राप्त होणे आवश्यक असते आणि समग्र जीवन व कार्य यासाठी तिने एक स्थायी पाया म्हणून स्वतःला प्रस्थापित करणे आवश्यक असते. ही स्थिती ‘आत्म’साक्षात्कारासाठी आणि प्रकृतीच्या आध्यात्मिक रूपांतरणासाठी आवश्यक असते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 248)

साधना, योग आणि रूपांतरण – ७१

(आपण आजवर ‘साधना, योग आणि रूपांतरण’ या मालिकेमध्ये ध्यान म्हणजे काय, एकाग्रता म्हणजे काय, त्याच्या विविध पद्धती कोणत्या, ध्यानामध्ये येणाऱ्या अडथळ्यांवर कशी मात करावी इत्यादी गोष्टी समजून घेतल्या. आता ध्यानाची परिणती ज्या ‘समाधी’मध्ये होत असते त्या समाधी-अवस्थेसंबंधी काही जाणून घेऊया.)

समाधी अवस्थेमध्ये असताना, आंतरिक मन, प्राण आणि देह ही अस्तित्वं बाह्यवर्ती मन, प्राण आणि शरीरापासून अलग झालेली असतात, ती बाह्यवर्ती अस्तित्वाने आच्छादलेली नसतात आणि त्यामुळे त्यांना सहजतेने आंतरिक अनुभव येऊ शकतात.

बाह्यवर्ती मन हे एकतर शांत, निश्चल झालेले असते किंवा काही प्रकारे ते आंतरिक अनुभव प्रतिबिंबित करत असते किंवा त्या अनुभवामध्ये सहभागी झालेले असते.

मध्यवर्ती चेतना ही मनामधून पूर्णतया अलग झालेली असेल तर त्याचा अर्थ असा होतो की, ती अशी पूर्ण समाधी अवस्था आहे, की ज्यामध्ये कोणत्याच अनुभवांची नोंद होत नाही.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 249-250)

साधना, योग आणि रूपांतरण – ४१

(ध्यानाची उद्दिष्टे काय असतात किंवा काय असावीत यासंबंधीचा विचार आपण येथे समजावून घेत आहोत. त्याचा हा उत्तरार्ध…)

‘योगा’मध्ये एकाग्रतेचा उपयोग अन्य उद्दिष्टासाठीदेखील केला जातो. उदा. आपल्या जाग्रत स्थितीपासून (waking state) म्हणजे चेतनेची जी सीमित आणि पृष्ठवर्ती अवस्था असते त्यापासून निवृत्त होऊन, आपल्या अस्तित्वाच्या अंतरंगामध्ये खोलवर जाण्यासाठीदेखील (‘समाधी’च्या विविध अवस्थांद्वारे ही खोली मोजली जाते) एकाग्रतेचा अवलंब केला जातो. या प्रक्रियेसाठी, विचारमालिकेवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा (ध्यानापेक्षा), कोणत्यातरी एकाच वस्तुवर, संकल्पनेवर किंवा नामावर लक्ष केंद्रित करणे (निदिध्यास) अधिक परिणामकारक असते.

असे असले तरी, ध्यानामुळे ‘पूर्णयोगां’तर्गत अभिप्रेत असलेल्या समाधीची पूर्वतयारी होते. असे ध्यान आपले आपल्या अस्तित्वाच्या खोलवर असणाऱ्या अवस्थांशी अप्रत्यक्षपणे पण जाग्रत सायुज्य (communion) निर्माण करते. काहीही असले तरी, जो विचार ‘पुरुषा’च्या नियंत्रणाखाली (सांख्य तत्त्वज्ञानातील पुरुष) आणला गेला आहे अशा रचनात्मक विचाराची तेजस्वी कृती हा ध्यानाचा वैशिष्ट्यपूर्ण उपयोग असतो. त्याद्वारे उर्वरित सर्व चेतना नियंत्रित केली जाते, ती उच्चतर आणि विशालतर संकल्पनांनी परिपोषित केली जाते आणि त्या संकल्पनांच्या साच्यामध्ये चेतनेचे त्वरेने परिवर्तन केले जाते आणि अशा प्रकारे चेतना पूर्णत्वाला नेली जाते.

ध्यानाचे इतर आणि महत्तर उपयोग याच्याही पलीकडचे असतात पण ते आत्मविकसनाच्या पुढील टप्प्यांशी संबंधित असतात. ‘भक्तियोगा’मध्ये, या दोन्ही प्रक्रिया (ध्यान आणि निदिध्यासन) समग्र अस्तित्व एकाग्र करण्यासाठी, समानतेने उपयोगात आणल्या जातात. किंवा भक्तीविषयाच्या (आराध्य देवतेच्या) चिंतनाने, त्याच्या रूपाने, त्याच्या सत्त्वाने, त्याच्या गुणवैशिष्ट्यांनी आणि त्याच्याबद्दलच्या भक्तिभावाच्या व ऐक्याच्या आनंदाने समग्र प्रकृती न्हाऊन निघावी यासाठी या दोन्ही प्रक्रिया समानतेने उपयोगात आणल्या जातात. तेव्हा विचार हा ‘दिव्य प्रेमा’चा सेवक, ‘कैवल्य-आनंदा’ची तयारी करून घेणारा असा घडविला जातो.

‘ज्ञानयोगा’मध्येदेखील ध्यानाचा उपयोग, वरकरणी दिसणारे रूप आणि सत्य यांमध्ये, तसेच आत्मा आणि त्याची विविध रूपे यांमध्ये सदसद्विवेक करण्यासाठी केला जातो. व्यक्तिगत चेतनेचा ‘ब्रह्मन्’मध्ये प्रवेश व्हावा आणि नंतर सायुज्य घडावे यासाठी एकाग्र निदिध्यासनाचा अवलंब केला जातो. ‘पूर्णयोगा’मध्ये या सर्वच उद्दिष्टांचा सुमेळ साधला जाईल.

– श्रीअरविंद (CWSA 13 : 446-447)

साधनेची मुळाक्षरे – २८

समाधी ही वर्ज्य करायला हवी अशी गोष्ट नाही – पण ती अधिकाधिक सजग करणे आवश्यक असते.

*

‘ईश्वरा’च्या संपर्कात असण्यासाठी समाधी अवस्थेमध्येच असले पाहिजे, असे काही आवश्यक नसते.

*

वाचत असताना किंवा विचार करत असताना, मस्तकाच्या शीर्षस्थानी किंवा मस्तकाच्या वर असणारे स्थान, ‘योगिक’ एकाग्रता करण्यासाठी योग्य आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 250), (CWSA 30 : 250), (CWSA 29: 311)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – २७

सर्वसाधारणपणे आजवरचा योग हा आध्यात्मिक मनाच्या पलीकडे जात नाही – अनेकांना मस्तकाच्या शिखरावर ब्रह्माशी ऐक्य जाणवते, पण त्यांना मस्तकाच्याही वर असलेल्या चेतनेची जाणीव नसते. त्याच प्रमाणे सामान्य योगामध्ये व्यक्तीला ब्रह्मरंध्राप्रत होणार्याह जागृत आंतरिक चेतनेच्या (कुंडलिनी) आरोहणाची संवेदना असते; (या ब्रह्मरंधामध्ये प्रकृती ब्रह्म- चेतनेशी युक्त होते.) मात्र त्यांना ‘अवतरणा’चा (descent) अनुभव येत नाही. काही जणांना अशा गोष्टी अनुभवासही आल्या असतील पण, त्यांचे स्वरूप, त्यांचे तत्त्व किंवा समग्र साधनेमधील त्यांचे स्थान त्यांना उमगले होते की नाही, हे मला माहीत नाही. मला स्वतःला जोपर्यंत असा अनुभव आला नव्हता तोपर्यंत, मी तरी हे इतर कोणाकडून कधी ऐकले नव्हते. याचे कारण पूर्वीचे योगी जेव्हा आध्यात्मिक मनाच्या अतीत जात असत, तेव्हा ते समाधीमध्ये निघून जात असत; याचा अर्थ असा की, (आध्यात्मिक मनाच्या वर, ब्रह्मरंध्राच्या वर असणार्याा) या उच्चतर पातळ्यांविषयी सजग राहण्याचा त्यांनी प्रयत्न केला नव्हता – अतिचेतनेमध्ये (Superconscient) ‘निघून जाणे’ हे त्यांचे उद्दिष्ट असे, जागृत चेतनेमध्ये अतिचेतन ‘उतरविणे’ हे त्यांचे उद्दिष्ट नसे, परंतु हे माझ्या योगाचे उद्दिष्ट आहे.

*

’चित्’ (Chit) म्हणजे विशुद्ध चेतना – सत् चित् आनंद यामध्ये असते तशी. तर ’चित्त’ (Chitta) म्हणजे मानसिक-प्राणिक-शारीरिक चेतना यांचे संमिश्रण असलेले द्रव्य आहे; त्यातून विचार, भावना, संवेदना, आवेग इ. वृत्ती निर्माण होतात. पातंजल योगानुसार, या वृत्तीच पूर्णतः शांत करायच्या असतात, ज्यामुळे चेतना निश्चल होऊन, समाधीमध्ये प्रविष्ट होऊ शकेल. ‘चित्तवृत्तीनिरोधा’चे या (पूर्ण)योगात मात्र निराळे कार्य आहे. सामान्य चेतनेच्या वृत्ती येथे निश्चल करायच्या असतात आणि त्या निश्चलतेमध्ये उच्चतर चेतना आणि तिच्या शक्ती खाली उतरवायच्या असतात; जेणेकरून ही चेतना आणि तिच्या शक्ती प्रकृतीमध्ये रूपांतर घडवतील.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 377-378 and 438)

*

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – १८

आपण हे समजावून घेतले की हठयोग, प्राण आणि शरीराच्या साहाय्याने, शारीरिक जीवन आणि त्याच्या क्षमता यांच्या अलौकिक पूर्णत्वाचे लक्ष्य करतो. त्याचप्रमाणे राजयोग हा मनाच्या साहाय्याने, मानसिक जीवनाच्या क्षमतांच्या विस्ताराचे आणि त्याच्या असाधारण अशा पूर्णत्वाचे लक्ष्य बाळगतो. असे करत असताना तो आध्यात्मिक अस्तित्वाच्या प्रांतामध्ये प्रवेश करतो. पण या प्रणालीचा दोष हा आहे की, त्यामध्ये समाधीच्या असामान्य स्थितीवर अतिरिक्त भर दिला जातो. हा दोष प्रथमतः भौतिक जीवनापासून एक प्रकारच्या दूरस्थपणाकडे घेऊन जाणारा ठरतो. वास्तविक हे भौतिक जीवन म्हणजे आपला आधार आहे आणि हे असे क्षेत्र आहे की, ज्यामध्ये आपल्याला आपले मानसिक आणि आध्यात्मिक लाभ उतरवायचे असतात. विशेषतः या प्रणालीमध्ये आध्यात्मिक जीवन हे समाधी-अवस्थेशी खूपच संबद्ध केले जाते. आध्यात्मिक जीवन आणि त्याचे अनुभव हे जागृत अवस्थेमध्ये आणि अगदी कार्याच्या सामान्य वापरामध्ये देखील पूर्णतः सक्रिय आणि पूर्णतः उपयोगात आणता येतील असे करावयाचे, हे आपले उद्दिष्ट आहे. आपल्या समग्र अस्तित्वाचा ताबा घेण्याऐवजी आणि त्यामध्ये अवतरित होण्याऐवजी, आपल्या सामान्य अनुभवाच्या मागे असणाऱ्या सुप्त प्रदेशामध्ये निवृत्त होण्याकडेच राजयोगाचा कल असतो.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 37)