Tag Archive for: समर्पण

मानसिक परिपूर्णत्व – ११

 

समर्पणाची प्रक्रिया म्हणजेच एक तपस्या आहे. इतकेच नव्हे तर, वास्तविक ती तपस्येची दुहेरी प्रक्रिया आहे; समर्पणाची प्रक्रिया आधीपासून चांगल्या रीतीने सुरु झालेली असतानाही, चढतेवाढते समर्पण दीर्घकाळपर्यंत टिकून राहते. नंतर मग एक वेळ अशी येते की, जेव्हा व्यक्तीला ईश्वरी अस्तित्व आणि ईश्वरी शक्ती सातत्याने आणि अधिकाधिक रीतीने जाणवू लागते; तीच सारे काही करत आहे असे अधिकाधिक जाणवू लागते आणि त्यामुळे अगदी अतिशय अवघड अडचणीसुद्धा ह्या जाणिवेला धक्का पोहोचवू शकत नाहीत. आणि वैयक्तिक प्रयत्नांची आता आवश्यकता उरत नाही आणि ते शक्यही होत नाहीत. प्रकृतीचे ईश्वराच्या हाती पूर्ण समर्पण झाल्याची ही खूण असते. काही जण असेही असतात की, जे हा अनुभव येण्याच्या आधीच श्रद्धेच्या आधारे ही भूमिका घेतात. आणि जर व्यक्तीची भक्ती आणि श्रद्धा खूप बळकट असेल तर, या गोष्टी त्या अनुभवाप्रत व्यक्तीला घेऊन जातात. परंतु सर्वच जण अगदी सुरुवातीपासून अशी भूमिका घेऊ शकत नाहीत आणि कधीकधी तर हे धोकादायकसुद्धा ठरू शकते; कारण ईश्वर आहे असे समजून, त्यांनी स्वतःला एखाद्या चुकीच्या शक्तीच्या हाती, सोपवून देण्याची शक्यता असते. पण बहुतेकांच्या बाबतीत तरी, त्यांनी तपस्येच्या माध्यमातूनच समर्पणामध्ये वृद्धिंगत होणे आवश्यक असते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 82)

मानसिक परिपूर्णत्व – १०

 

देवावर श्रद्धा, विश्वास, ईश्वरी शक्तीप्रत आत्मदान आणि समर्पण या आवश्यक आणि अनिवार्य गोष्टी आहेत. पण देवावरील विश्वास हा, कनिष्ठ प्रकृतीच्या आवेगांप्रत शरणागती, दुर्बलता, निरुत्साह यांचा बहाणा बनता कामा नये. दिव्य सत्याच्या मार्गामध्ये जे काही आड येईल त्या सर्वांना सातत्याने नकार दिला पाहिजे; तो नकार आणि अथक अभीप्सा यांच्या समवेत त्या विश्वासाने मार्गक्रमण केले पाहिजे. ईश्वराप्रत समर्पण हे, स्वतःच्या इच्छांना, कनिष्ठ हालचालींना शरण जाण्याचे, किंवा स्वतःच्या अहंकाराला शरण जाण्याचे किंवा ईश्वराचे मायावी रूप धारण केलेल्या, अज्ञान व अंधकाराच्या कोणत्यातरी शक्तींना शरण जाण्याचे एक कारण, एक बुरखा, एक निमित्त बनता उपयोगाचे नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 87)

मानसिक परिपूर्णत्व – ०८

 

दिव्य शक्तीने सर्वाचा स्वीकार करावा आणि त्यात परिवर्तन घडवून आणावे म्हणून, तुमचे म्हणून जे काही आहे ते सर्व आणि तुम्ही स्वतः यांना, ईश्वराला समर्पित करणे म्हणजे आत्मसमर्पण.

*

स्वतःच्या कल्पना, इच्छा, सवयी यांचा आग्रह न धरता, सर्वत्र त्यांची जागा ईश्वरी सत्याला त्याच्या ज्ञानाद्वारे, त्याच्या इच्छेद्वारे आणि त्याच्या कार्याद्वारे घेता यावी म्हणून सहमती देणे म्हणजे समर्पण. स्वतःमध्ये जे काही आहे ते ईश्वराप्रत निवेदित करणे, व्यक्तीने ती स्वतः जे आहे ते आणि तिच्यापाशी जे काही आहे ते ईश्वराप्रत अर्पण करणे, म्हणजे समर्पण !

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 67)

मानसिक परिपूर्णत्व – ०७

 

ईश्वराप्रत केलेले आत्मदान म्हणजे समर्पण. व्यक्ती जे काही आहे आणि तिच्यापाशी जे काही आहे ते सारे ईश्वराला देऊ करणे; काहीही स्वत:चे नाही असे समजणे; इतर कोणतीही आज्ञा न पाळता, केवळ ईश्वरी संकल्पाच्या आज्ञेचे पालन करणे; अहंकारासाठी नाही तर, ईश्वरासाठी जीवन व्यतीत करणे म्हणजे समर्पण.
*
जे हातचे काहीही राखून न ठेवता, स्वतःच्या सर्व अंगांनिशी ईश्वराप्रत स्वतःला देऊ करतात, त्यांना ईश्वर स्वतःलाच देऊन बसतो. आणि मग त्यांना स्थिरता, प्रकाश, शक्तिसामर्थ्य, आनंद, स्वातंत्र्य, विशालता, ज्ञानाची उत्तुंगता, आनंदसागर या गोष्टी प्राप्त होतात.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 67)

मानसिक परिपूर्णत्व – ०२

 

जर व्यक्ती विश्वासाने आणि खात्रीपूर्वक ईश्वराप्रत आत्मदान करेल तर ईश्वराकडून तिच्यासाठी सारे काही केले जाईल; पडदे हटवले जातील, आंतरिक चेतना जागृत केली जाईल, हृदय आणि प्रकृती शुद्ध केली जाईल. हे व्यक्तीला अगदी एकदम पूर्णत्वाने जरी करता आले नाही तरी, व्यक्ती जेवढे ते अधिकाधिक करेल, तेवढ्या अधिकाधिक प्रमाणात तिला आंतरिक साहाय्य आणि मार्गदर्शन लाभत राहील आणि अंतरंगामध्ये ईश्वराचा संपर्क आणि त्याची अनुभूती चढती-वाढती राहील. तुमच्यामधील शंका घेणारे मन कमी सक्रिय बनले आणि तुमच्या मध्ये विनम्रता व समर्पणाची इच्छा जर वाढीला लागली तर, हे घडून येणे निश्चितपणे शक्य आहे. त्यासाठी या व्यतिरिक्त, इतर कोणत्याच तपस्येची आणि सामर्थ्याची आवश्यकता नाही.

*

व्यक्तीला जर ईश्वर हवा असेल तर, व्यक्तीच्या हृदयाची शुद्धीकरण प्रक्रिया पण ईश्वरानेच हाती घ्यावी आणि त्यानेच साधना विकसित करावी आणि त्याला आवश्यक असे अनुभवही ईश्वरानेच त्याला देऊ करावेत, ही जी तुमची योगाविषयीची आधीची कल्पना होती, त्याला अनुलक्षून उत्तर देताना, मी तसे लिहिले होते. मला असे म्हणावयाचे होते की, असे होणे शक्य आहे आणि असे घडूनही येते.

पण त्यासाठी त्या व्यक्तीचा ईश्वरावर विश्वास असावयास हवा, भरवसा असावायास हवा आणि समर्पणाची इच्छा असावयास हवी. कारण, ईश्वराने सारे काही हाती घेण्यामध्ये, व्यक्तीने केवळ स्वतःच्या प्रयत्नांवर न विसंबता, स्वतःला ईश्वराच्या हाती सोपविणे अंतर्भूत आहे. यामध्ये व्यक्तीची सारी श्रद्धा आणि विश्वास ईश्वरावरच असणे आणि त्याने उत्तरोत्तर आत्मसमर्पण प्रगत करत राहणे अभिप्रेत आहे. खरंतर, हेच साधनेचे तत्त्व आहे आणि तेच मी स्वतःही अनुसरलेले आहे. माझ्या दृष्टीने तरी, योगसाधनेचा हा गाभा आहे. मला वाटते, रामकृष्णांनी मांजराच्या पिल्लाची जी प्रतिमा वापरली आहे, ती पद्धत हीच आहे. पण सगळ्यांना हा मार्ग एकदमच अनुसरता येत नाही. इथपर्यंत येऊन पोहोचण्यासाठी त्यांना वेळ लागतो. जेव्हा मन आणि प्राण शांत होतात तेव्हा मग हा मार्ग अधिक विकसित होतो.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 69 – 70)

पूर्णयोग आणि बौद्धमत – १९

(धम्मपदातील कालच्या वचनाचे विवेचन करताना, त्याची अकरणात्मक बाजू (Negative) आधी श्रीमाताजींनी सांगितली. ती आपण काल विचारात घेतली. आता त्या सकारात्मक बाजू (Positive) सांगत आहेत. वाचकांच्या सोयीसाठी धम्मपदातील ते वचन पुन्हा देत आहोत.)

धम्मपद : नैतिक नियमांचे पालन करून, किंवा बहुविध प्रकारच्या ज्ञानाने, किंवा ध्यानधारणेच्या सरावाने किंवा विजनवासातील जीवन जगण्याने किंवा “जे या संसारी जगात जगतात त्यांना अनभिज्ञ असलेला असा मुक्तीचा आनंद मला लाभला आहे” असा विचार करणाऱ्या व्यक्तीला भिक्षु म्हटले जात नाही. भिक्षुंनो, सावध असा, जोपर्यंत तुम्ही सर्व इच्छावासनांचा निरास करीत नाही तोपर्यंत सावध असा.

श्रीमाताजी : बुद्धाने असे म्हटले आहे वा त्याने म्हटल्याचे सांगितले गेले आहे की, जेव्हा व्यक्ती सर्व वासनाविकारांपासून मुक्त होते तेव्हा ती अनिवार्यपणे अनंत अशा आनंदामध्ये प्रवेश करते. पण हा आनंद कदाचित काहीसा कोरडा, रुक्ष असू शकतो आणि मला तरी तो काही सर्वात जवळचा मार्ग वाटत नाही.

या देहाने ही समस्या सोडवायची असेल तर धैर्य आणि निश्चय बाळगून झोकून द्या; वासनांच्या मागे धावण्याचा लांबचा, दुष्कर, कष्टदायक आणि निराशाजनक मार्ग सोडून, जर व्यक्तीने स्वत:ला साधेपणाने, पूर्णपणाने, विनाअट, नफ्यातोट्याची कोणतीही समीकरणे न मांडता, त्या परमोच्च सत्याप्रत, परमोच्च संकल्पशक्तिप्रत, परमोच्च अस्तित्वाप्रत समर्पित केले; स्वत:चे संपूर्ण अस्तित्व, अस्तित्वाच्या सर्व अंगांनिशी जर ‘त्या’च्या हातात संपूर्णतया सोपविले, तर तो अहंकारापासून सुटका करून घेण्याचा सर्वात वेगवान आणि क्रांतिकारी मार्ग आहे. लोकांना वाटेल की, तो आचरणात आणणे खूप अवघड आहे, परंतु तेथे एक प्रकारची ऊब आहे, उत्कटता आहे, उत्साह आहे, प्रकाश आहे, सौंदर्य आहे, उत्कट आणि सर्जशनशील जीवन आहे.

हे खरे आहे की, वासनांशिवाय अहंकार दीर्घकाळ अस्तित्वात राहू शकत नाही. व्यक्तीच्या जाणिवा इतक्या घट्ट झालेल्या असतात की, जेव्हा अहंकार धुळीला मिळतो तेव्हा व्यक्तीच्या अस्तित्वाचाच काही भाग जणूकाही धुळीला मिळतो आणि आपण निर्वाणामध्ये प्रविष्ट होण्यास सज्ज झालो आहोत, असे त्या व्यक्तीला वाटते.

त्या सर्वोच्च अस्तित्वाच्या वैभवामध्ये अहंकाराचा विलय असा आपण येथे खऱ्या निर्वाणाचा अर्थ घेत आहोत. संपूर्ण, समग्र, परिपूर्ण, नि:शेष आणि देवघेवीविना असे जे आत्मदान, त्यालाच मी सकरणात्मक मार्ग (Positive Side) म्हणते.

स्वत:चा कोणताही विचार न करणे, स्वत:साठी न जगणे, स्वत:शी काहीही निगडित न करणे, आणि सर्वाधिक सुंदर, तेजोमय, आनंदमय, शक्तिवान, करुणामय, अनंत असे जे आहे केवळ त्याचाच विचार करणे, त्या विचारांमध्ये निमग्न राहणे ह्यामध्ये इतका अगाध आनंद आहे की, त्याची तुलना दुसऱ्या कशाबरोबरच होऊ शकत नाही.

ही एकच गोष्ट अर्थपूर्ण आहे, प्रयत्न करून पाहण्याजोगी आहे. इतर सर्व गोष्टी म्हणजे निव्वळ कालापव्यय असतो.

वळणावळणाच्या रस्त्याने, धीम्या गतीने, कष्टपूर्वक, पायरीपायरीने वर्षानुवर्षे पर्वत चढत जाणे आणि अदृश्य पंख पसरवून, थेट शिखराकडे झेपावणे यामध्ये जो फरक आहे, तो येथे आहे.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 267-269)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

पूर्णयोग आणि बौद्धमत – १६

धम्मपद : स्नेह, प्रेम यामध्ये दुःखाचा उगम होतो, त्यातून भीती उदयाला येते. जो प्रेमापासून मुक्त झाला आहे, त्याला दुःख कशाचे आणि त्याला भीती तरी कशाची?

आसक्तीतून दुःखाचा उमग होतो, त्यातून भीती उदयाला येते. पण जो आसक्तीतून मुक्त झाला आहे, त्याला दुःख कशाचे आणि त्याने भ्यायचे तरी कशाला?

अभिलाषेमधून दुःखाचा उमग होतो, त्यातून भीती उदयाला येते. पण जो अभिलाषेपासून मुक्त झाला आहे, त्याला दुःख कशाचे आणि त्याने भ्यायचे तरी कशाला?

श्रीमाताजी : मला नेहमीच असे वाटत आले आहे की, ‘जाणते बना’ असे सांगण्यासाठी जी कारणे सर्वसाधारपणे दिली जातात ती नेहमीच अगदी किरकोळ असतात. : “असे करू नका, नाहीतर तुम्हाला दुःख सहन करावे लागेल, तसे करू नका, नाहीतर त्यातून तुमच्या मनात भीती निर्माण होईल.” ….परंतु ह्यामुळे जाणीव अधिकाधिक निबर बनत जाते, कठीण बनत जाते कारण ती दुःख-वेदना यांना घाबरत असते.

मला वाटते असे सांगितले गेले पाहिजे की, जाणिवेची एक अशी स्थिती असते की, ज्या स्थितीमध्ये आनंद निर्भेळ असतो, प्रकाश छायेविरहित असतो, जेथे भीतीच्या सर्व शक्यताच नाहीशा होतात; अशी स्थिती अभीप्सेने आणि आंतरिक सातत्यपूर्ण प्रयत्नांनी साध्य करून घेता येते. ही अशी अवस्था असते की, ज्या अवस्थेमध्ये व्यक्ती स्वत:साठी जगत नाही, व्यक्ती जे काही करते, जे काही तिला वाटते, तिच्या सर्व कृती ह्या परमेश्वराला अर्पण या भावातून, परिपूर्ण विश्वासातून, स्वत:विषयीच्या चिंता, काळजी यांपासून विनिर्मुक्त होऊन केल्या जातात; स्वत:वरील सर्व प्रकारचे ओझे की, जे आता ओझे वाटतच नाही, ते सारे त्या परमेश्वराला सोपविलेले असते.

स्वत:विषयी कोणतीही काळजी नसणे, स्वत:विषयीचा कोणताही विचार मनात नसणे, हा एक असा आनंद आहे, की जो शब्दांत व्यक्त करताच येणार नाही. स्वत:बद्दल विचार करीत राहणे, काय करावे आणि काय करू नये याची चिंता बाळगणे, तुमच्यासाठी काय चांगले काय वाईट, कशाला मुरड घालावयाची आणि कशाचा ध्यास घ्यावयाचा, ह्यासारखे विचार सतत करीत बसणे – बापरे ! किती थकविणारे आहे, किती कंटाळवाणे, रटाळ, किती अळणी आहे हे !

त्यापेक्षा सूर्यप्रकाशात उमलणाऱ्या एखाद्या फुलाप्रमाणे जर व्यक्ती त्या परम चेतनेसमोर, परम प्रज्ञेसमोर, परम प्रकाश, परम प्रेमासमोर, स्वत:ला अगदी खुली करू शकली; ज्याला सर्वकाही ज्ञात आहे, जो सारे काही करू शकतो, जो तुमच्या जीवनाचा ताबा घेऊ शकतो अशा परमेश्वरासमोर स्वत:ला अगदी खुली करू शकली, तर मग अशा व्यक्तीला कोणत्याही चिंता, काळज्या भेडसावणार नाहीत, ही आदर्श स्थिती आहे.

पण मग हे असे का केले जात नाही?

कारण व्यक्ती त्याचा विचारच करत नाही, व्यक्ती ते करावयाचे विसरून जाते, जुन्या सवयी परत येतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अचेतनामध्ये किंवा अबोध मनामध्ये आत खोलवर कोठेतरी, एक घातक शंका नकळतपणे घर करून असते, ती कानात कुजबुजते : “बघ हं ! तू जर काळजी घेतली नाहीस तर तुझ्याबाबतीत काहीतरी दुर्घटना घडेल. जर तू स्वत:कडे लक्ष पुरविले नाहीस तर काय घडेल काही सांगता येत नाही.” – आणि तुम्ही एवढे खुळे असता, इतके अंध झालेले असता की, तुम्ही तेच ऐकता आणि तुम्ही स्वत:कडे लक्ष पुरवायला सुरुवात करता आणि मग सगळेच बिघडून जाते.

मग तुम्हाला पुन्हा पहिल्यापासून तुमच्या पेशींना थोडेसे शहाणपण, थोडेसे सामान्य ज्ञान पुरवावे लागते आणि काळजी करू नका, हे शिकवावे लागते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 255-257)

जर तुम्ही मानवी प्रकृतीचे रूपांतरण गतिमान दिव्य प्रकृतीमध्ये करू इच्छित असाल तर, कोणतीही उणीव न ठेवता, किंवा कोणताही प्रतिकार, विरोध न करता, स्वत:ला माताजींच्या व त्यांच्या शक्तींच्या हाती सोपवा आणि त्यांना तुमच्यामध्ये त्यांचे कार्य, कोणत्याही अडथळ्याविना करू द्या. जाणीव, लवचीकता आणि हातचे काहीही राखून न ठेवता केलेले समर्पण ह्या तीन गोष्टी तुमच्याकडे असणेच आवश्यक आहे.

जाणीव :
श्रीमाताजी आणि त्यांच्या शक्ती व त्यांचे कार्य याविषयी तुमचे मन, आत्मा, हृदय, प्राण इतकेच काय पण, तुमच्या शरीरातील पेशीसुद्धा सजग असल्या पाहिजेत. कारण, जरी श्रीमाताजी तुमच्या अंधकारात आणि तुमच्या अचेतन भागांमध्ये, अचेतन क्षणांमध्ये देखील कार्य करू शकतात आणि तशा त्या करतात देखील, परंतु जेव्हा तुम्ही जागृत असता आणि त्यांच्याशी जिवंत संपर्क राखून असता तेव्हाची गोष्ट वेगळी असते.

लवचीकता :
तुमची समग्र प्रकृतीच श्रीमाताजींच्या स्पर्शाला घडणसुलभ लवचीक (Plastic) असली पाहिजे – स्वसंतुष्ट अज्ञानी मन जसे प्रश्न विचारत राहते, शंका घेत राहते, विवाद करत बसते आणि ते जसे प्रबोधनाचे व परिवर्तनाचे शत्रू असते, तशी तुमची प्रकृती असता कामा नये. ज्याप्रमाणे माणसातील प्राण स्वत:च्याच हालचालींवर भर देत राहतो आणि तो जसा आपल्या हट्टाग्रही इच्छा व दुरिच्छेमुळे, प्रत्येक ईश्वरी प्रभावाला सातत्याने विरोध करत राहतो, तशी तुमची प्रकृती स्वत:च्याच हालचालींवर भर देणारी असता कामा नये. माणसाची शारीरिक जाणीव जशी अडथळा निर्माण करते आणि त्याच्या किरकोळ आणि काळोख्या गोष्टींमधील सुखाला ती जशी चिकटून राहते; शरीराची आत्माविहिन दिनचर्या, आळस किंवा त्याची जी जड निद्रा असते त्याला धक्का पोहोचविणाऱ्या कोणत्याही स्पर्शाने जशी शारीरिक जाणीव आरडाओरडा करते; तशी तुमची प्रकृती ही अडथळा निर्माण करणारी, स्वत:ची अक्षमता, जडता आणि तामसिकता ह्यांना हटवादीपणे चिकटून राहिलेली अशी असता कामा नये.

समर्पण :
हातचे काहीही राखून न ठेवता केलेले, तुमच्या आंतरिक व बाह्य अस्तित्वाचे समर्पण तुमच्या प्रकृतीच्या सर्व भागांमध्ये ही घडणसुलभ लवचीकपणा (Plasticity) आणेल; वरून प्रवाहित होणाऱ्या प्रज्ञा आणि प्रकाश, शक्ती, सुसंवाद आणि सौंदर्य, पूर्णता ह्या साऱ्या गोष्टींसाठीसातत्यपूर्ण खुलेपणा राखलात तर, तुमच्यामधील सर्व अंगांमध्ये जाणीव जागृत होईल. इतकेच काय पण तुमचे शरीरसुद्धा जागृत होईल आणि सरतेशेवटी, त्याची जाणीव ही त्यानंतर अर्धचेतन जाणिवेशी संबद्ध न राहता, अतिमानसिक अतिचेतन शक्तीशी एकत्व पावेल; आणि तिची ऊर्जा ही वरून, खालून, चोहोबाजूंनी शरीराला अनुभवास येईल आणि एका परम प्रेमाने व आनंदाने ते शरीर पुलकित होऊन जाईल.

पण सावध असा आणि तुमच्या क्षुल्लक अशा पार्थिव मनाने, की ज्याला त्याच्या पलीकडे असणाऱ्या गोष्टींनादेखील स्वत:च्या निकषांच्या, स्वत:च्या मोजमापांच्या अंकित करायला आवडते, स्वत:च्या संकुचित तर्काच्या आणि प्रमादशील समजुतींच्या, बिनबुडाच्या आक्रमक अज्ञानाच्या आणि स्वत:च्या क्षुद्र आत्म-विश्वासपूर्ण अज्ञानाच्या अंकित करायला आवडते, अशा पार्थिव मनाद्वारे, दिव्य मातेला समजून घेण्याचा किंवा त्यांची पारख करण्याचा यत्न करू नका.

दिव्य शक्तीच्या विविध स्तरांवरील बहुमुखी स्वातंत्र्याचे आकलन, अर्धवट उजळलेल्या अशा अंधकारमय तुरुंगात बंदिस्त झालेल्या मानवी मनाला होऊ शकणार नाही. दिव्य शक्तीच्या दृष्टीची आणि कृतीची गतिमानता आणि तिची जटिलता ही मनाच्या अडखळणाऱ्या आकलनाला ओलांडून कितीतरी पलीकडे जाते; तिच्या गतिविधींची परिमाणे ही मनाची परिमाणेच नव्हेत. हे मन दिव्य शक्तीच्या विविध व्यक्तिमत्त्वांमधील जलद बदलाने भयचकित होऊन जाते. तिचे लयताल निर्माण करणे आणि ते मोडूनही टाकणे, तिचे वेगामध्ये वाढ करणे आणि वेग मंद करणे, एकाची समस्या हाताळण्याची तिची एक पद्धत तर दुसऱ्याची समस्या हाताळताना तिची दुसरीच पद्धत, अशा तिच्या अनेकविध पद्धती, तिने आत्ता एक दिशा पकडणे आणि नंतर ती सोडूनही देणे व दुसरीच दिशा पकडणे आणि मग त्या सर्वच दिशा एकत्रित करणे या सगळ्या प्रकाराने मन भयचकित होते. आणि अशा मनाला, परमशक्ती जेव्हा अज्ञानाच्या जंजाळामधून वळणावळणाने वरवर ढकलत दिव्य प्रकाशाकडे घेऊन जात असते, तेव्हाच्या त्या परमशक्तीच्या पद्धतीचे आकलन होऊ शकत नाही.

त्यापेक्षा तुमचा आत्मा श्रीमाताजींप्रत खुला करा आणि तुमच्या चैत्य प्रकृतीने तरी तुम्ही श्रीमाताजींना जाणून घेऊ शकता, ह्याबाबत समाधानी राहा आणि त्यांच्याकडे चैत्य दृष्टीने पाहा, तीच एकमेव गोष्ट तुम्हाला सत्याप्रत थेटपणे घेऊन जाणारी असेल. आणि श्रीमाताजी स्वत:च त्यांच्या चैत्य घटकांद्वारे तुमचे मन, हृदय, प्राण आणि तुमची शारीरिक चेतना उजळून टाकतील आणि त्यांना त्या परमशक्तीच्या कार्यपद्धती, परमशक्तीची प्रकृती उघड करून दाखवतील. सर्वज्ञतेच्या व सर्वशक्तिमानतेच्या आपल्या ज्या अगदीच बाळबोध वरवरच्या संकल्पना असतात, त्या नुसारच ईश्वरी शक्तीने कायम वागावे, अशी आपल्या अज्ञानी मनाची जी सदोष मागणी असते, ती सुद्धा टाळा. प्रत्येक वळणावर सहजसुलभ यश, डोळे दिपवणारे वैभव आणि चमत्कारपूर्ण शक्ती अनुभवास यावी, ह्यासाठी आपल्या मनाचा गोंगाट चालू असतो. असे डोळे दिपवणारे, प्रभावित करणारे काही अनुभवास आले नाही तर, तेथे ईश्वर आहे ह्यावर त्याचा विश्वासच बसू शकत नाही. श्रीमाताजी अज्ञानाशी मुकाबला करण्यासाठी, अज्ञानाच्या क्षेत्रामध्ये उतरल्या आहेत. अज्ञानक्षेत्राच्या पलीकडे, उच्च स्थानी कोठेतरी राहून नव्हे तर, श्रीमाताजी प्रत्यक्ष अज्ञानाच्या क्षेत्रामध्ये उतरून, अज्ञानाशी दोन हात करत आहेत.

श्रीमाताजी त्यांचे ज्ञान आणि त्यांची शक्ती झाकून ठेवतात, अंशत:च प्रकट करतात. बऱ्याचदा त्यांचे साधन झालेल्यांपासून आणि व्यक्तींपासून त्या ते ज्ञान व शक्ती रोखून ठेवतात आणि शोधक मनाच्या पद्धतीनुसार, अभीप्सा बाळगणाऱ्या चैत्य पुरुषाच्या पद्धतीनुसार, संघर्ष करणाऱ्या प्राणाच्या पद्धतीनुसार, बंदिवान होऊन दुःख भोगणाऱ्या शारीरिक प्रकृतीच्या पद्धतीनुसार, त्या साधनभूत झालेल्या व्यक्तींमध्ये रूपांतर घडून यावे असा त्यांचा प्रयत्न असतो.

परमशक्तीच्या संकल्पाद्वारे अशा काही अटी घालून देण्यातआलेल्या आहेत, बऱ्याचशा गुंतागुंतीच्या गाठी आहेत, ज्या आधी सैल करणे आवश्यक आहे; कारण त्या अचानकपणे कापून टाकता येत नाहीत.आजवर दीर्घकाळ ज्या जहागिऱ्यांवर व प्रांतांवर ज्यांनी अधिराज्य केले होते त्या असुरांनी व राक्षसांनी, ह्या विकसनगामी पार्थिव प्रकृतीवर ताबा मिळविलेला आहे. त्यांना त्यांच्या त्यांच्या प्रांतांमध्ये जाऊन, त्यांच्या अटींनुसार, त्यांच्याशी दोन हात करण्याची आणि त्यांच्यावर विजय प्राप्त करून घेण्याची आवश्यकता आहे. आपल्यातील मानवाला त्याच्या मर्यादांच्या अतीत जाण्यासाठी तयार केले पाहिजे, त्याला त्या दिशेने घेऊन गेले पाहिजे पण आत्तातरी मानव या मर्यादांच्या खूप पलीकडे असणाऱ्या अशा रूपांकडे अचानकपणे उचलले जाण्याच्या दृष्टीने खूपच दुर्बल आणि अंधकारपूर्ण आहे.

ईश्वरी चेतना व शक्ती अस्तित्वात आहेत आणि प्रत्येक क्षणी, जी गोष्ट करणे गरजेची आहे ती गोष्ट, त्या परिश्रमपूर्वक करत असतात. जो आदेश देण्यात आला आहे त्यानुसार त्या नेहमीच पावले उचलत असतात आणि जे पूर्णत्व अस्तित्वात यावयाचे आहे त्याला ती ईश्वरी चेतना ह्या अपूर्णतेमध्येच आकारास आणत असते.

…जर तुम्ही मनालाच अनुसरत राहिलात तर, श्रीमाताजी अगदी तुमच्या समोर प्रत्यक्षपणे जरी प्रकट झाल्या तरीही ते मन श्रीमाताजींना ओळखू शकणार नाही. आत्म्याचे अनुसरण करा, तुमच्या मनाला अनुसरू नका. जे मन बाह्य रूपांकडे धाव घेते त्या मनाला न अनुसरता, सत्याला प्रतिसाद देणाऱ्या आत्म्याचे अनुसरण करा. ईश्वरी शक्तीवर विश्वास ठेवा; ती तुमच्यातील देवसदृश घटकांना मुक्त करेल आणि त्यांना दिव्य प्रकृतीच्या अभिव्यक्तीचा आकार देईल.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 24-26)

साधनेची दुसरी बाजू ही प्रकृती, मन, प्राण आणि शारीरिक जीवनाशी व त्यांच्या गतिविधींशी संबंधित आहे.

येथे तत्त्व हे आहे की, प्रकृती ही आंतरिक साक्षात्काराशी मिळतीजुळती असली पाहिजे म्हणजे, व्यक्तीचे दोन विसंगत भागात विभाजन व्हायला नको. आणि यासाठी, अनेक साधना किंवा प्रक्रिया आहेत.

समर्पण साधना :
त्यातील एक साधना म्हणजे, स्वतःच्या सर्व गतिविधी ह्या ईश्वरार्पण करायच्या आणि आंतरिक मार्गदर्शनासाठी व स्वतःची प्रकृती, उच्चतर शक्तीने हाती घ्यावी म्हणून तिला साद घालायची. जर का आंतरिक आत्म-उन्मीलन झाले असेल, जर का चैत्य पुरुष पुढे आलेला असेल तर मग, फार काही अडचण येत नाही – कारण त्याबरोबरच चैत्य विवेकसुद्धा येतो. सातत्याने सूचना मिळत राहतात, आणि अंततः त्याचे शासन सुरु होते, हे शासन सर्व अपूर्णता दाखवून देते आणि शांतपणे, धीराने त्या काढूनही टाकते; त्यामुळे योग्य मानसिक व प्राणिक हालचाली घडून येतात आणि त्यातून शारीरिक जाणिवेला सुद्धा एक आकार पुनर्प्राप्त होतो.

साक्षी भावाची साधना :
दुसरी पद्धत म्हणजे मन, प्राण आणि शारीरिक अस्तित्वाच्या साऱ्या हालचालींपासून अलिप्त होऊन मागे उभे राहवयाचे आणि त्यांच्या सर्व गतिविधी म्हणजे आपल्या सद्अस्तित्वाचा एक भाग आहेत असे न मानता; भूतकाळातील कर्मामुळे आपल्यावर लादल्या गेलेल्या, व्यक्तीमधील सामान्य प्रकृतीच्या नित्य रचना आहेत असे समजायचे.

व्यक्ती यामध्ये जितक्या प्रमाणात यशस्वी होते, म्हणजे जितक्या प्रमाणात ती निर्लिप्त होते, आणि मन व त्याच्या गतिविधी ह्या म्हणजेच आपण आहोत असे मानत नाही ; प्राण व त्याच्या गतिविधी म्हणजेच आपण आहोत असे मानत नाही; शरीर व त्याच्या हालचाली म्हणजेच आपण आहोत असे मानत नाही, तेव्हा व्यक्ती शांत, स्थिर, अमर्याद, अलिप्त अशा आणि ज्यामध्ये ऊर्ध्वस्थित असणाऱ्या सद्अस्तित्वाचे प्रतिबिंब दिसत असते आणि जे त्याचे थेट प्रतिनिधी असू शकते अशा, अंतरंगात असणाऱ्या आपल्या आंतरिक अस्तित्वाविषयी म्हणजे आंतरिक मन, आंतरिक प्राण, आंतरिक शरीर यांविषयी जागृत व्हायला लागते. आणि अशा या शांत आंतरिक अस्तित्वातूनच मग, जे त्याज्य आहे त्याचा अस्वीकार व्हायला सुरुवात होते; जे राखावयास हवे आणि ज्याचे परिवर्तन करावयास हवे त्याचा स्वीकार सुरु होतो. परिपूर्णत्वाविषयीची अगदी आंतरतम अशी इच्छा उदयास येते किंवा प्रकृतीच्या परिवर्तनासाठी जे आवश्यक आहे तेच प्रत्येक पावलागणिक करता यावे म्हणून दिव्य शक्तीचा धावा करणे सुरु होते.

त्यातूनच मग आंतरतम अशा चैत्य अस्तित्वाप्रत आणि त्याच्या मार्गदर्शक प्रभावाप्रत किंवा त्याच्या थेट मार्गदर्शनाप्रत मन, प्राण व शरीर खुले होण्याची शक्यता असते. बऱ्याच व्यक्तींमध्ये, ह्या दोन्ही पद्धती एकदमच उदयास येतात आणि एकत्रितपणे कार्य करतात आणि शेवटी एकमेकींमध्ये मिसळून जातात. पण व्यक्ती यातील कोणत्याही एका पद्धतीपासूनही सुरुवात करू शकते. जी पद्धत अनुसरण्यास सोपी आहे आणि जी व्यक्तीला अगदी स्वाभाविक वाटते त्या पद्धतीने तिने सुरुवात करावी. अंततः, सर्व प्रकारच्या अडचणींमध्ये जेथे वैयक्तिक प्रयत्न खुंटतात, तेव्हा गुरुच्या मदतीचा हस्तक्षेप होऊ शकतो आणि साक्षात्कारासाठी जे आवश्यक आहे ते किंवा लगेचची जी कोणती पायरी आवश्यक आहे ती गोष्ट त्यांच्याद्वारे घडून येऊ शकते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 06-08)

वैयक्तिक प्रयत्नांवर भर :
योगसाधना करण्याच्या नेहमीच दोन पद्धती असतात – पैकी एक पद्धत म्हणजे जागरुक मनाने व प्राणाने कृती करणे. पाहणे, निरीक्षण करणे, विचार करणे आणि अमुक एक गोष्ट करावयाची किंवा नाही ते ठरविणे, ह्या गोष्टींचा यामध्ये समावेश होतो. अर्थात, त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या ईश्वरी शक्तीच्या साहाय्यानेच त्या कृती केल्या जातात, त्या शक्तीला आवाहन केले जाते किंवा ती शक्ती ग्रहण केली जाते – अन्यथा फारसे काही घडू शकत नाही. परंतु तरीसुद्धा येथे वैयक्तिक प्रयत्नांवरच भर असतो आणि त्याद्वारेच ओझ्याचा बराचसा भाग उचलला जातो.

चैत्य पुरुषाचा मार्ग :
दुसरा मार्ग हा ‘चैत्य पुरुषाचा मार्ग’ आहे. यामध्ये चेतना ही ईश्वराप्रत उन्मुख होते आणि केवळ चेतना वा चैत्य पुरुषच उन्मुख होतो व तो पुढे आणण्यात येतो असे नाही तर, मन, प्राण आणि शरीर देखील ईश्वराप्रत खुले होतात आणि ते प्रकाश ग्रहण करू लागतात, त्याचा परिणाम म्हणून, काय केले पाहिजे ह्याचे आकलन होऊ लागते. जे काही करणे आवश्यक आहे, ते स्वत: ईश्वरी शक्तीच करत आहे ह्याची जाणीव होऊ लागते, ते दिसू लागते. आणि तेव्हा मग, जे दिव्य कार्य चालू आहे त्यासाठी, स्वत:च्या दक्ष व जागरुक आरोहणाच्या द्वारे त्याला आवाहन करणे; हा तो दुसरा मार्ग होय.

जोपर्यंत सर्व कृतींच्या ईश्वरी उगमाशी व्यक्ती पूर्णत: समर्पित होत नाही तोवर सहसा, या दोन पद्धतींचे संमिश्रण आढळून येते. तसे समर्पण झाल्यावर मग मात्र सर्व जबाबदारी नाहीशी होते आणि मग साधकाच्या खांद्यावर कोणतेही वैयक्तिक ओझे शिल्लक राहत नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 82-83)