Tag Archive for: समर्पण

पूर्णयोगाचे अधिष्ठान – १७

स्वतःला ईश्वराच्या हाती सोपवणे म्हणजे समर्पण. व्यक्तीने तिचे सर्व-स्व ईश्वरास अर्पण करणे; कोणतीही गोष्ट स्वत:ची आहे असे न समजणे; अन्य कोणाच्याही नव्हे तर, फक्त ‘ईश्वरी’ इच्छेचे अनुसरण करणे; अहंकारासाठी नव्हे तर, ईश्वरासाठी जीवन व्यतीत करणे म्हणजे समर्पण.

*

समर्पण हे परिपूर्तीचे साधन असते हाच पूर्णयोगाच्या साधनेचा पहिला सिद्धांत आहे. मात्र जोपर्यंत अहंकार किंवा प्राणिक मागण्या आणि इच्छावासना यांना खतपाणी घातले जाते तोपर्यंत संपूर्ण समर्पण अशक्य असते आणि तोवर आत्मदानदेखील अपूर्ण असते… समर्पण अवघड असू शकते, ते तसे असतेही परंतु तोच तर साधनेचा खरा सिद्धांत आहे. समर्पण अवघड असल्यामुळेच, (रूपांतरणाचे) कार्य पूर्ण होईपर्यंत ते स्थिरपणे आणि धीराने करत राहिले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 67,75-76)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – १६

साधकाची योगमार्गावर जी वाटचाल चालू असते त्या वाटचालीमध्ये अशी एक अवस्था येते की, ज्या अवस्थेमध्ये साधक त्याच्या अंतरंगामध्ये कार्यरत असणाऱ्या दिव्य शक्तीविषयी सचेत असतो किंवा किमानपक्षी, तो त्या कार्याच्या परिणामाविषयी तरी नक्कीच सचेत असतो. (आणि अशा रितीने सचेत झाल्यामुळे) तो आता तिच्या अवतरणामध्ये किंवा तिच्या कार्यामध्ये, स्वतःच्या मानसिक गतिविधींमुळे किंवा स्वतःच्या प्राणिक अस्वस्थतेमुळे किंवा शारीरिक जडतेमुळे व तमोमयतेमुळे अडथळे निर्माण करत नाही. यालाच ‘ईश्वराप्रति खुले असणे’ (openness to the Divine) असे म्हणतात.

ईश्वराप्रति खुले होण्याचा समर्पण (Surrender) हा सवोत्तम मार्ग आहे. पण साधकामध्ये जोपर्यंत समर्पण भाव निर्माण होत नाही तोपर्यंत, अभीप्सा आणि अविचलतेच्या साहाय्याने एका विशिष्ट मर्यादेपर्यंत हे खुलेपण येऊ शकते.

स्वतःकडे असलेले सर्वकाही ईश्वराच्या स्वाधीन करणे; तसेच स्वतःकडे जे आहे ते सर्व आणि एवढेच नव्हे तर, स्वत:ला सुद्धा ईश्वराप्रति अर्पण करणे म्हणजे ‘समर्पण’. समर्पण करणाऱ्या व्यक्तीने स्वत:च्या कल्पना, इच्छा, सवयी यांचा आग्रह धरता कामा नये तर, त्या प्रत्येकाची जागा दिव्य सत्याच्या ज्ञानाने, संकल्पाने आणि कार्याने घ्यावी यासाठी, त्या दिव्य सत्याला मोकळीक देणे म्हणजे ‘समर्पण’.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 67)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – १५

उत्तरार्ध

पूर्णयोगामध्ये साधकाने प्रत्येक आदर्शवादी मानसिक संस्कारांच्या अतीत जाणे अभिप्रेत असते. संकल्पना आणि आदर्श हे मनाशी संबंधित असतात आणि या गोष्टी केवळ अर्धसत्य असतात; कोणतातरी एखादा आदर्श मी मानतो यामध्येच मन बरेचदा संतुष्ट असते; आदर्शवादाच्या आनंदामध्ये ते संतुष्ट असते आणि तेव्हा जीवनामध्ये मात्र कोणताही बदल न होता ते आहे तसेच राहते किंवा बदल झालाच तर तो बदल अगदी आंशिक आणि बरेचदा वरकरणी असतो.

आध्यात्मिक साधक हा केवळ आदर्शवादामध्ये रममाण होऊन, साक्षात्काराच्या दिशेने चाललेल्या प्रयत्नांकडे पाठ फिरवीत नाही; ‘दिव्य सत्या’चा केवळ आदर्श ठेवणे नव्हे तर, ते सत्य प्रत्यक्षात उतरविणे – मग ते परलोकामध्ये असो किंवा इहलोकामध्ये असो – हे त्याचे ध्येय असते. आणि तो हे ध्येय जर इहलोकामध्ये प्रत्यक्षात उतरवू इच्छित असेल तर, मन आणि प्राण यांच्यात रूपांतरण घडविणे आवश्यक असते आणि (तुमच्यामध्ये चालू असणाऱ्या) श्रीमाताजींच्या, ‘दिव्य शक्ती’च्या कार्याला समर्पित झाल्याशिवाय हे रूपांतरण घडू शकत नाही.

‘निर्गुण-निराकार’ ईश्वराचा (Impersonal) शोध घेण्यासाठी धडपडणे हा अशा लोकांचा मार्ग असतो की, जे या जीवनापासून दूर जाऊ पाहतात; आणि ते सहसा ही गोष्ट त्यांच्या स्व-प्रयत्नाच्या बळावर करू पाहतात; परंतु उच्चतर ‘शक्ती’प्रत स्वतःला खुले करून अथवा समर्पणाच्या मार्गाने ते ही गोष्ट करत नाहीत; पण निर्गुण-निराकार ईश्वर हा काही कोणी साहाय्य करणारा किंवा मार्गदर्शन करणारा नसतो; तर तो प्राप्त करून घ्यायचा असतो आणि प्रत्येक मनुष्याला त्याच्या त्याच्या मार्गाने आणि त्याच्या प्रकृतीच्या क्षमतेनुसार तो प्राप्त करून घेण्यासाठी ईश्वर मोकळीक देतो. तर दुसरीकडे, श्रीमाताजींप्रत खुले राहिले आणि समर्पण केले तर निर्गुण-निराकार ईश्वराबरोबरच ‘सत्या’च्या अन्य प्रत्येक पैलूचा देखील व्यक्ती साक्षात्कार करून घेऊ शकते.

समर्पण हे अगदी अनिवार्यपणे प्रगमनशीलच (progressive) असले पाहिजे. कोणतीही व्यक्ती अगदी प्रारंभापासूनच संपूर्ण समर्पण करू शकत नाही, त्यामुळे व्यक्ती जेव्हा स्वतःच्या अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न करते तेव्हा व्यक्तीला तेथे समर्पणाचा अभावच आढळतो, परंतु हे अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळे, समर्पणाचे तत्त्वच न स्वीकारण्याचे आणि एकेक पायरी, एकेक क्षेत्र ओलांडत स्थिरपणे, प्रकृतीच्या सर्व भागांमध्ये क्रमाक्रमाने समर्पणचा अवलंब करत करत वाटचाल न करण्याचे कोणतेच कारण दिसत नाही.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 141)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – १४

पूर्वार्ध

एकीकडे तुम्ही असे म्हणत असाल की, मी स्वतःला ‘श्रीमाताजीं’प्रति खुले ठेवले आहे आणि त्याच वेळी तुम्ही समर्पण मात्र हातचे राखून ठेवत असाल तर, तुमच्या त्या म्हणण्याला फारसा आध्यात्मिक अर्थ नाही. जे पूर्णयोगाची साधना करतात त्यांनी आत्मदान करावे किंवा समर्पण करावे असे अभिप्रेत असते. कारण, व्यक्तीच्या अशा प्रकारच्या प्रगमनशील (progressive) समर्पणाखेरीज, ध्येयाच्या जवळपास पोहोचणे देखील अशक्यप्राय असते.

स्वतःला खुले ठेवणे म्हणजे तुमच्यामध्ये कार्य करावे यासाठी श्रीमाताजींच्या ‘शक्ती’स आवाहन करणे. पण तुम्ही जर त्या शक्तीला समर्पित झाला नाहीत तर, त्याचा परिणाम असा होतो की, एकतर तुम्ही तुमच्यामध्ये त्या शक्तीला कार्य करण्यास संमती देत नाही किंवा तुम्हाला ते कार्य ज्या पद्धतीने व्हावे असे वाटते त्या पद्धतीने होणार असेल तरच, तुम्ही त्या शक्तीला कार्य करण्यास संमती देता. म्हणजेच, त्या शक्तीला तुम्ही तिच्या पद्धतीने म्हणजे दिव्य सत्याच्या पद्धतीने कार्य करू देत नाही.

अशा प्रकारच्या अटी घालणे हे सहसा कोणत्यातरी विरोधी शक्तीकडून केले जाते किंवा मनाच्या किंवा प्राणाच्या एखाद्या अहंभावात्मक घटकाकडून केले जाते. त्याला ईश्वरी ‘कृपा’ किंवा ‘शक्ती’ हवी असते पण ती त्याला स्वतःच्या हेतुसाठी वापरायची असते; त्याला ईश्वरी उद्दिष्टासाठी जीवन जगण्याची इच्छा नसते. त्याला ईश्वराकडून जे जे मिळविणे शक्य असते ते सर्व हवे असते पण तो स्वतःला मात्र ईश्वराप्रति अर्पण करू इच्छित नसतो. उलटपक्षी, सत्-अस्तित्व (true being), आत्मा हा ईश्वराभिमुख होतो आणि त्याला ईश्वराप्रति समर्पण करण्याची केवळ इच्छाच असते असे नाही तर, तो आनंदाने समर्पण करण्यासाठी तत्पर असतो. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 32 : 140-141)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – १२

योगसाधनेचे दोन मार्ग आहेत. एक मार्ग असतो ज्ञानाचा व व्यक्तीच्या स्वत:च्या प्रयत्नांचा आणि दुसरा मार्ग असतो श्रीमाताजींवर भिस्त ठेवण्याचा. या दुसऱ्या मार्गामध्ये, श्रीमाताजींच्या शक्तीने आपल्यावर कार्य करावे म्हणून, व्यक्तीने आपले मन व हृदय आणि सर्वकाही श्रीमाताजींना अर्पण करणे अभिप्रेत असते तसेच सर्व अडीअडचणींच्या वेळी त्यांना आवाहन करणे आणि त्यांच्यावर श्रद्धा व भक्ती ठेवणे अभिप्रेत असते.

चेतनेची ही अशी तयारी होण्यासाठी सुरुवातीला वेळ लागतो, बरेचदा खूप काळ लागतो आणि त्या दरम्यान पुष्कळ अडचणी येऊ शकतात. परंतु व्यक्तीने प्रयत्नसातत्य ठेवले तर एक वेळ अशी येते की, जेव्हा सर्व तयारी झालेली असते, अशा वेळी ‘श्रीमाताजींची शक्ती‌’ व्यक्तीच्या चेतनेला पूर्णत: ईश्वराभिमुख करते. अशा वेळी, जे जे काही विकसित होणे आवश्यक असते ते ते सारे व्यक्तीच्या अंतरंगामध्ये विकसित होते, आध्यात्मिक अनुभूती येतात आणि त्यासोबतच ज्ञान येते आणि ईश्वराशी ऐक्य घडून येते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 200)

जीवन जगण्याचे शास्त्र – ३६

साधकासमोर ‘कर्माधिपती’ (Master of the work) स्वतःला अचानक प्रकट करत नाही. त्याची ‘शक्ती’ नेहमीच पडद्याआडून कार्य करत असते, आणि आपण जेव्हा कार्य-कर्ते असल्याचा अहंकार सोडून देतो तेव्हाच तो कर्माधिपती आविष्कृत होतो. आणि हा अहंकार-त्याग जितका अधिकाधिक परिपूर्ण होत जातो तेवढ्या प्रमाणात त्या कर्माधिपतीचे प्रत्यक्ष कार्य वाढीस लागते. जेव्हा त्याच्या ‘ईश्वरी शक्ती’प्रति असलेले आपले समर्पण हे निरपवाद, निःशेष होईल तेव्हाच त्याच्या असीम उपस्थितीमध्ये जीवन जगण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होईल.

– श्रीअरविंद (CWSA 23-24 : 243)

जीवन जगण्याचे शास्त्र – २९

विश्वामध्ये जे जे काही केले जाते, त्या सर्व कृतींमागे ईश्वरच त्याच्या शक्तिद्वारे विद्यमान असतो; पण तो त्याच्या योगमायेने झाकला गेलेला असतो आणि कनिष्ठ प्रकृतीमध्ये तो जिवाच्या अहंकाराद्वारे कार्य करत असतो. योगामध्ये ईश्वर हाच साधक आणि तोच साधनाही असतो; त्याचीच शक्ती ही तिच्या प्रकाश, सामर्थ्य, ज्ञान, चेतना आणि आनंद यांच्या साहाय्याने आधारावर (मन, प्राण, शरीर यांवर) कार्य करत असते आणि जेव्हा तो आधार त्या शक्तिप्रत उन्मुख होतो, तेव्हा त्या सर्व दिव्य शक्ती त्या आधारामध्ये झिरपवल्या जातात आणि त्यामुळे साधना शक्य होते.

परंतु जोपर्यंत साधकाची कनिष्ठ प्रकृती सक्रिय असते, तोपर्यंत त्याच्या व्यक्तिगत प्रयत्नांची आवश्यकता असतेच. हा आवश्यक असलेला व्यक्तिगत प्रयत्न म्हणजे अभीप्सा (aspiration), नकार (rejection) आणि समर्पण (surrender) अशी त्रिविध तपस्या होय.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 06)

जीवन जगण्याचे शास्त्र – २८

तुम्ही जे कोणते कर्म कराल ते शक्य तेवढे परिपूर्णपणे करण्याचा प्रयत्न करा. मनुष्याच्या अंतर्यामी असणाऱ्या ईश्वराची ही सर्वोत्तम सेवा असते.

– श्रीमाताजी (CWM 14 : 306)

*

कर्म हा योगसाधनेचा एक भाग आहे. प्राण व त्याच्या क्रियांमध्ये ईश्वरी ‘उपस्थिती’, ‘प्रकाश’ आणि ‘शक्ती’ अवतरित व्हाव्यात म्हणून त्यांना आवाहन करण्यासाठी कर्म एक उत्तम संधी प्राप्त करून देते; कर्मामुळे समर्पणाचे क्षेत्रदेखील विस्तारित होते आणि समर्पणाची संधीही वाढीस लागते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 247)

आत्मसाक्षात्कार – १३

(मनाच्या पृथगात्मतेविषयी (individualised) श्रीमाताजींनी काय सांगितले होते ते आपण काल पाहिले. अहंची आवश्यकता काय असते, हे त्या आता समजावून सांगत आहेत.)

मला तुम्हाला एवढेच सांगायचे आहे की, ईश्वरामध्ये आपला अहंकार विलीन करण्यापूर्वी आपण काय आहोत, हे आधी व्यक्तीने थोडेतरी जाणून घेतले पाहिजे. व्यक्तीमध्ये अहंकार असतो. तुम्ही जागृत, स्वतंत्र, पृथगात्म (individual) व्यक्ती म्हणून तयार होण्यासाठी अहं आवश्यक असतो. म्हणजे पृथगात्मकतेची जाणीव आवश्यक असते, असे मला म्हणायचे आहे. म्हणजे जिथे सर्व गोष्टी एकमेकांवर येऊन आदळतात असा एखादा चव्हाटा तुम्ही असता कामा नये. तुमचे स्वतःचे असे स्वतंत्र अस्तित्व असले पाहिजे आणि त्यासाठी अहं आवश्यक असतो.

…नंतर, व्यक्ती हे सारे काही ईश्वराला अर्पण करते. पण त्यापूर्वी अनेक वर्षं प्रयत्न करावे लागतात. म्हणजे तुम्ही केवळ, स्वतःविषयी, अगदी प्रत्येक तपशिलामध्ये शिरून सचेत होणे एवढेच पुरेसे नसते, तर तुम्ही ज्याला ‘अहं, मी’ असे संबोधता त्याचे तुमच्या चैत्य केंद्राभोवती (psychic centre), म्हणजे तुमच्या अस्तित्वाच्या दिव्य केंद्राभोवती संघटन करावे लागते, जेणेकरून, तुमचे एकच एक, एकसंध असे, सुसंगत, पूर्णपणे जागृत असे व्यक्तित्व तयार होईल.

आणि हे दिव्य केंद्र आधीपासून ईश्वराशी पूर्णतया समर्पित असल्याने, (श्रीमाताजी अर्पण केल्याप्रमाणे हातांची ओंजळ करून दाखवितात.) त्याभोवती जर प्रत्येक गोष्टीची सुव्यवस्थित बांधणी झाली असेल तर, आपोआपच ती प्रत्येक गोष्ट ईश्वराप्रत समर्पित होते. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 06 : 260)

अस्वस्थतेपासून सुटका करून घेण्यासाठी श्रीमाताजींकडे प्रत्यक्ष येण्याची आवश्यकता नाही आणि ते उपयोगाचे देखील नाही. तुम्ही आंतरिकरित्या त्यांच्या आश्रयाला गेले पाहिजे आणि चुकीची वृत्ती टाकून दिली पाहिजे.

त्यांना प्रत्यक्ष भेटायला येण्यामुळे, तुम्ही चूक करायची आणि ती दुरूस्त करण्यासाठी श्रीमाताजींकडे यायचे अशी सवयच तुम्हाला लागण्याची शक्यता असते. आणि त्यातून आणखी एक चुकीची गोष्ट घडण्याची शक्यता असते; ती म्हणजे, अंतरंगातून, मुळातून ती चुकीची गोष्ट सोडून देण्याऐवजी आणि ती त्यांना समर्पित करण्याऐवजी, तुम्ही ती चुकीची गोष्ट त्यांच्यावर सोपवून मोकळे होण्याची शक्यता असते. येथे एका सर्वसमावेशक समर्पणाची आवश्यकता असते. असे समर्पण करता आले तर, किरकोळ गोष्टींवरून अस्वस्थता, अहंकार, स्वतःच्या दृष्टिकोनावर अतिरिक्त भर, राग या गोष्टींना आळा बसतो.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 499-500)