Posts

श्रीमाताजी : मी सतत तुमच्या सोबत असते आणि या आंतरिक ‘उपस्थिती’विषयी जागृत होणे हा साधनेमधील सर्वांत महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही ‘क्ष’ला विचारा, तो तुम्हाला सांगेल की ही ‘उपस्थिती’ हा काही केवळ श्रद्धेचा विषय किंवा केवळ मानसिक कल्पनेचा खेळ नाही, तर ती अतिशय सघन अशी वस्तुस्थिती आहे, आणि चेतनेसाठी ती अगदी एखाद्या जडभौतिक गोष्टीप्रमाणे खरीखुरी आणि इंद्रियगम्य असते.

*

साधक : ज्याच्यामुळे मला ईश्वरी ‘उपस्थिती’ची जाणीव सदासर्वदा आणि सर्वत्र होईल अशा प्रकारच्या ईश्वरी ‘प्रेमा’चा उगम मी कोठे व कसा शोधू?

श्रीमाताजी : त्यासाठी तुम्ही आधी ‘ईश्वरा’चा शोध घेतला पाहिजे, एकतर तो शोध तुम्ही आंतरिकीकरणाच्या (interiorisation) आणि एकाग्रतेच्या साहाय्याने तुमच्या स्वतःमध्ये घेतला पाहिजे, किंवा तो शोध तुम्ही प्रेमाच्या आणि आत्म-त्यागाच्या माध्यमातून माझ्यामध्ये किंवा श्रीअरविंदांमध्ये घेतला पाहिजे. एकदा का तुम्हाला ‘ईश्वरा’चा शोध लागला की मग अगदी स्वाभाविकपणे तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये, सर्वत्र त्याचेच दर्शन घडू लागेल.

*

‘ईश्वरा’शी ऐक्य पावण्याचे दोन मार्ग आहेत. एक मार्ग म्हणजे हृदयामध्ये चित्त एकाग्र करायचे आणि ‘त्या’च्या ‘अस्तित्वा’चा शोध लागेपर्यंत अंतरंगामध्ये, आत आत खोलवर जायचे. आणि दुसरा मार्ग म्हणजे ‘ईश्वरा’च्या हाती स्वतःला सोपवून द्यायचे, आणि आईच्या कुशीत जसे लहानगे मूल विसावते तसे त्याच्या कुशीमध्ये, संपूर्ण समर्पणाच्या भावनेने विसावायचे. आणि या दोन मार्गांपैकी दुसरा मार्ग मला स्वतःला अधिक सोपा वाटतो.

– श्रीमाताजी [CWM 16 : 160-161]

संपूर्ण समता प्रस्थापित व्हायला वेळ लागतो. आणि ही समता पुढील तीन गोष्टींवर आधारित असते. – आंतरिक समर्पणाच्या द्वारे जीवाने ‘ईश्वरा’प्रत केलेले आत्म-दान, वरून अवतरित होणारी आध्यात्मिक स्थिरता व शांती, आणि समतेला विरोध करणाऱ्या, अहंकारी आणि राजसिक अशा साऱ्या भावनांना दृढ, दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण नकार.

यासाठी पहिली आवश्यक गोष्ट आहे ती म्हणजे, हृदयामध्ये संपूर्ण समर्पण व अर्पण भाव. रजोगुणाचा, अहंकाराचा त्याग इ. गोष्टी प्रभावी होण्यासाठी आध्यात्मिक स्थिरतेमध्ये वृद्धी आणि समर्पण या अटी आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 131)

कर्म आराधना – ५३

कर्म हा योगसाधनेचा एक भाग आहे आणि प्राण व त्याच्या क्रियांमध्ये ‘ईश्वरी उपस्थिती’, ‘प्रकाश’ आणि ‘शक्ती’ अवतरित व्हाव्यात म्हणून त्यांना आवाहन करण्यासाठी कर्म ही एक उत्तम संधी प्रदान करते; कर्मामुळे समर्पणाचे क्षेत्रदेखील विस्तारित होते आणि समर्पणाची संधीही वाढीस लागते.
*
कर्माच्या माध्यमातून योगसाधना हा पूर्णयोगाच्या साधनेच्या प्रवाहामध्ये प्रवेश करण्याचा सर्वांत सोपा आणि सर्वांत अधिक प्रभावी मार्ग आहे.

– श्रीअरविंद
[CWSA 32 : 247], [CWSA 32 : 256-257]

साधनेची मुळाक्षरे – १३

काम करत असताना ‘ईश्वरी उपस्थिती’ चे स्मरण ठेवणे हे सुरुवातीला सोपे नसते; परंतु काम संपल्यासंपल्या लगेचच जरी त्या उपस्थितीची जाणीव व्यक्तीला पुनरुज्जीवित करता आली तरी ठीक आहे. कालांतराने काम करत असतानाच त्या उपस्थितीची जाणीव आपोआपपणे होऊ लागेल.

*

समर्पणाचा नुसता दृष्टिकोन असून चालणार नाही तर, प्रत्येक कर्मच ‘श्रीमाताजीं’ना अर्पण केले पाहिजे म्हणजे मग तो दृष्टिकोन सदासर्वदा जीवित राहील. काम करत असताना त्या वेळामध्ये ध्यान करता कामा नये, कारण त्यामुळे कर्मामधून लक्ष निघून जाईल, परंतु ज्याच्याप्रत तुम्ही ते कर्म अर्पण करणार आहात त्या ‘एकमेवाद्वितीया’चे स्मरण तुमच्यामध्ये कायम असले पाहिजे. ही केवळ एक पहिली प्रक्रिया आहे; कारण, पृष्ठवर्ती मन कर्म करत असताना, ‘ईश्वरी उपस्थिती’च्या संवेदनेवर तुमच्या अंतरंगातील शांत अस्तित्व एकाग्र असल्याची सातत्यपूर्ण जाणीव जर तुम्हाला असू शकेल, किंवा ‘श्रीमाताजीं’ची शक्तीच कार्य करत आहे आणि तुम्ही केवळ एक माध्यम आहात किंवा एक साधन आहात अशी जाणीव जर तुम्हाला नेहमीच होऊ लागली तर मग, ईश-स्मरणाच्या जागी, ‘योगसाक्षात्कार’ स्वतःहूनच नित्य घडू लागेल तसेच कर्म करत असताना ईश्वराशी ऐक्य होण्यास सुरुवात होईल.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 258-259), (CWSA 32 : 247)

विचार शलाका – ३०

 

व्यक्ती जोपर्यंत सामान्य मानवी चेतनेमधून बाहेर पडून, तिच्या खऱ्या क्षेत्रामध्ये म्हणजे, जेथे सर्व बंध मुक्त होतात अशा उच्चतर आध्यात्मिक चेतनेच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करत नाही, तोपर्यंत ‘कर्मा’च्या परिणामांचे बंधन शिल्लक असते. शांतीबाबत सांगायचे तर, ‘ईश्वरा’वर पूर्ण भरवसा आणि ‘ईश्वरी संकल्पा’प्रत समर्पण यातून ती प्राप्त होऊ शकते.

 

– श्रीअरविंद

(CWSA 28 : 520)

विचार शलाका – २८

सांसरिक जीवन हे स्वभावत:च ‘अशांतीचे क्षेत्र’ आहे. त्यामधून जर योग्य रीतीने वाटचाल करायची असेल तर, व्यक्तीने आपली कर्मं आणि आपले जीवन ‘ईश्वरा’ला समर्पित केले पाहिजे आणि आपल्या अंतरंगातील ‘दिव्य’ शांतीसाठी त्या ‘ईश्वरा’ची प्रार्थना केली पाहिजे. मन जेव्हा शांत, स्थिर होते तेव्हा, ‘दिव्यमाता’च आपल्या जीवनाला आधार देत आहे असे व्यक्ती अनुभवू शकते आणि तेव्हा मग ती व्यक्ती सर्वकाही त्या ‘दिव्यमाते’च्या हाती सोपवून देते.

 

– श्रीअरविंद

(CWSA 31 : 345)

विचार शलाका – १५

…सर्व दुःखं ही समर्पण परिपूर्ण न झाल्याचे लक्षण असते. मग जेव्हा तुम्हाला तुमच्या आत असा एक ‘आघात’ जाणवतो तेव्हा ‘अरे, हे वाईट झाले किंवा परिस्थिती कठीण आहे’ असे म्हणण्याऐवजी तुम्ही म्हणता, “माझे समर्पण परिपूर्ण नाहीये.” तेव्हा ते म्हणणे योग्य ठरेल. आणि मग तुम्हाला ती ‘कृपा’ जाणवते, जी तुम्हाला मदत करते, मार्गदर्शन करते आणि तुम्ही पुढे मार्गक्रमण करता. आणि एक दिवस तुम्ही अशा शांतीमध्ये प्रवेश करता की जी कशानेही क्षुब्ध होऊ शकत नाही. सर्व विरोधी शक्तींना, विरोधी गतिविधींना, आक्रमणांना, गैरसमजुतींना, दुर्वासनांना अशा स्मितहास्याने उत्तर देता की, जे ईश्वरी कृपेवरील पूर्ण विश्वासामुळे येत असते आणि हाच दु:खांमधून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग असतो, दुसरा कोणताही मार्ग नाही.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 398-399)

विचार शलाका – २३

समर्पण हे संपूर्ण असले पाहिजे आणि त्याने अस्तित्वाच्या प्रत्येक घटकाचा ताबा घेतला पाहिजे. चैत्य (The psychic) प्रतिसाद देत आहे आणि उच्चतर मानसिक अंग स्वीकार करत आहे किंवा अगदी आंतरिक प्राणिक अंग शरणागत होत आहे आणि आंतरिक शारीरिक चेतनेला प्रभाव जाणवत आहे, फक्त एवढेच पुरेसे नाही. अस्तित्वाचा कोणताही घटक असा असता कामा नये, अगदी अत्यंत बाह्यवर्ती भागसुद्धा असा असता कामा नये की जो स्वतःला अलग राखत आहे, शंका, गोंधळ आणि डावपेच यांच्या मागे काहीतरी दडवून ठेवत आहे, किंवा एखादा भाग बंड करत आहे किंवा नकार देत आहे, असे असता कामा नये.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 03)

विचार शलाका – २२

….खालून ऊर्ध्व दिशेप्रत असणारी उन्मुखता आणि वरून अवतरित होणारी सर्वोच्च अतिमानसिक ‘शक्ती’ या दोन गोष्टीच भौतिक प्रकृती आणि तिच्या अडीअडचणी यांना विजयपूर्वक हाताळू शकतील आणि त्यांचा निरास करू शकतील.

समर्पण हे संपूर्ण आणि प्रामाणिक असले पाहिजे; एकमेव दिव्य ‘शक्ती’प्रतच आत्म-उन्मुखता असली पाहिजे; अवतरित होणाऱ्या ‘सत्या’ची सातत्यपूर्ण आणि संपूर्ण निवड केली पाहिजे, मानसिक, प्राणिक आणि शारीरिक ‘शक्ती’ आणि त्यांची ‘रूपे’, जी अजूनही या ‘पृथ्वी-प्रकृती’वर शासन करत आहेत त्यांच्या मिथ्यत्वाला सातत्याने आणि पूर्णतया नकार दिला पाहिजे…

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 03)

विचार शलाका – १९

‘ईश्वराला समर्पण’ या भावाने केलेल्या कार्यामधून चेतनेचा सर्वोत्तम विकास घडून येतो.

*

आळस आणि निष्क्रियता ह्या बाबींचा परिणाम म्हणजे तमस. त्यातून व्यक्ती अचेतनतेमध्ये जाऊन पडते आणि ती गोष्ट प्रगती व प्रकाशाच्या पूर्णपणे विरोधी असते. अहंकारावर मात करणे आणि केवळ ‘ईश्वर’सेवेमध्ये जीवन व्यतीत करणे, हा ‘सत्यचेतना’ प्राप्त करून घेण्याचा निकटतम व आदर्श असा मार्ग आहे.

*

तुमच्यामध्ये जोपर्यंत दुसऱ्यांविषयी आपपर भाव शिल्लक असतो तोवर निश्चितपणे तुम्ही ‘सत्या’च्या परिघाबाहेर असता. तुम्ही तुमच्या हृदयात नित्य सद्भाव आणि प्रेमभाव जतन केला पाहिजे. आणि त्यांचा प्रगाढ शांतीने आणि समतेने सर्वांवर वर्षाव होऊ द्यावा.

*

जोपर्यंत जुन्या सवयी आणि पूर्व-समजुती यांना छेद दिला जात नाही, तोपर्यंत भविष्याप्रत वेगाने पुढे सरसावण्याची फारशी आशा बाळगता येणार नाही.

*

समाधान हे बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसून आंतरिक अवस्थेवर अवलंबून असते.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 211), (CWM 13 : 212), (CWM 13 : 191), (CWM 15 : 197), (CWM 14 : 215)