Posts

धम्मपद : दुष्कृत्य करणारा मनुष्य इहलोकामध्ये व परलोकामध्येही क्लेश भोगतो. तो त्याची दुष्कृत्ये आठवून विलाप करतो आणि दुःखभोग भोगतो.

श्रीमाताजी : आपण करत असलेले कृत्य वाईट, ओंगळ आहे हे दिसण्यासाठी, समजण्यासाठीसुद्धा मनुष्य एका उंचीवर पोहोचलेला असला पाहिजे. त्याला आत गाभ्यात कोठेतरी सौंदर्य, उदात्तता, उदारता या गोष्टींची पूर्वप्रचिती आलेली असावी लागते, तरच त्याला या गोष्टींच्या अभावामुळे सहन करावे लागणारे दुःख नेमके कसे असते याची कल्पना येऊ शकते.

मला वाटते, सुंदर काय, उदात्त काय हे माहीत असूनही जे लोक जाणूनबुजून, मुद्दाम वाईट वागतात, त्यांच्यासाठी जीवन हे खरोखरच वेदनामय ठरते. काय करू नये ते माहीत असतानासुद्धा, एकसारखे तीच गोष्ट करत राहायची तर त्याच्या मोबदल्यात, शांती, स्वास्थ्य याची किंमत मोजावी लागणारच. जो खोटे बोलतो तो त्याचे पितळ कधीतरी उघडे पडेल या भीतीखाली सतत वावरत असतो. जो चुकीचे वागला आहे तो सतत या चिंतेत असतो की त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा तर होणार नाही ना! जो दुसऱ्याला फसविण्याचा प्रयत्न करीत असतो, त्याला त्याची चोरी उघडकीला येईल की काय याची कायमच धास्ती वाटत असते. वास्तविक अगदी पूर्ण स्वार्थी दृष्टीने पाहिले तरीसुद्धा सत्कृत्य करणे, न्यायाने, सरळपणाने, प्रामाणिकपणाने वागणे हा शांत आणि समाधानी जीवन जगण्याचा आणि स्वत:च्या चिंता, काळज्या कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे.

आणि या उपर, एखादी व्यक्ती जर नि:स्वार्थी, निरपेक्ष असेल, कोणत्याही वैयक्तिक आशाआकांक्षा वा अहंकारापासून मुक्त असेल तर ती व्यक्ती खऱ्या अर्थाने सुखी होणे शक्य आहे.

तुमच्या कर्माने तयार झालेले वातावरण तुम्ही तुमच्याबरोबर, तुमच्याभोवती आणि तुमच्यामध्ये वागवीत असता; जर तुम्ही केलेली कर्मे ही सत्कर्मे असतील, ती सुंदर, हितकर आणि सुसंवादी असतील, तर तुमचे वातावरणही तसेच सुंदर, हितकर व सुसंवादी राहील. पण या उलट तुमचे जीवन क्षुद्र आपमतलबीपणाने, अविचारी स्वार्थीभावनेने आणि घोर दुष्ट इच्छेने भरलेले असेल तर तशाच वातावरणात तुम्हाला तुमचा प्रत्येक श्वास घ्यावा लागणार म्हणजेच सारखे दुःख, सततचा असंतोष तुमच्या वाट्यास येणार; म्हणजेच अंतिमत: निराशाच पदरी पडणार..

– श्रीमाताजी
(CWM 03 : 197-198)

धम्मपद : सदाचरणी मनुष्यास इहलोकामध्ये आनंद होतो व परलोकामध्येही आनंद होतो. आपले शुद्ध कर्म पाहून त्याला संतोष वाटतो.

श्रीमाताजी : यावरून असे वाटते की, बौद्ध धर्माने स्वर्ग व नरक या कल्पनांचा स्वीकार केला आहे, पण असे केल्याने केवळ वरवरचा अर्थ घेतल्यासारखे होईल, कारण अधिक खोल अर्थाने पाहिले असता, ही बुद्धांची विचारप्रणाली नव्हती. उलट, त्यांचा या कल्पनेवर भर असे की, तुम्ही ज्या जगात वावरणार आहात ते जग तुमच्या आचरणाने आणि तुमच्या चेतनेच्या स्थितीनुसार, तुम्हीच निर्माण करता. मनुष्य ज्या जगात जगत असतो, आणि देह सोडल्यानंतरदेखील ज्या जगात तो जगणार असतो, ते जग तो स्वत:मध्येच बाळगत असतो. कारण बुद्धांच्या शिकवणुकीनुसार देहात असतानाचे जीवन व देहोत्तर जीवन यामध्ये काही फरक नाही….

…जेव्हा तुम्ही सदाचारी असता, उदार, उदात्त, नि:स्वार्थी, दयाळू असता, त्यावेळी तुम्ही तुमच्यामध्ये व तुमच्याभोवती एक विशिष्ट वातावरण निर्माण करीत असता. हे वातावरण म्हणजे एक प्रकारची प्रकाशमय अशी मुक्ती असते. सूर्यप्रकाशात बहरून येणाऱ्या एखाद्या फुलाप्रमाणे तुम्ही खुलून येता, त्याच प्रकाशमयतेमध्ये श्वासोच्छ्वास करता. त्यामुळे जीवनात कोणतीही कटुता, विद्रोह, क्लेश, दुःखद प्रतिघात तुमच्यावर होत नाहीत. अगदी सहज स्वाभाविकपणे तुमच्या भोवतालचे वातावरण प्रकाशमय होते आणि ज्या हवेत तुम्ही श्वासोच्छ्वास करता ते वातावरण आनंदमय होऊन जाते. देहामध्ये असताना किंवा देहातून बाहेर गेल्यावरही, जागृती किंवा निद्रेमध्ये, जीवनामध्ये किंवा मरणोत्तर नवीन जन्म मिळेपर्यंतच्या जीवनातही तुम्ही त्याच वातावरणात जगता.

छिन्नविछिन्न करून टाकणाऱ्या वाऱ्याप्रमाणे, गोठवून टाकणाऱ्या थंडीप्रमाणे, किंवा भस्मसात करून टाकणाऱ्या अग्निज्वालेप्रमाणे, दुष्कृत्ये ही मनुष्याच्या जाणिवेवर प्रतिकूल परिणाम घडवून आणतात.

सर्व सत्कृत्ये, शुभ कर्मे ही जीवनात प्रकाश, स्वास्थ्य, आनंद आणि पुष्पविकासी सूर्यप्रकाश भरत असतात.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 199-200)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

(आश्रमीय जीवनाच्या सुरुवातीच्या काळात, श्रीमाताजींनी धम्मपदातील वचनांचे विवेचन केले होते, त्यातील हे एक वचन.)

धम्मपद : सत्कृत्य करण्याची त्वरा करा. सारे दुष्ट, अनिष्ट विचार मागे सारा. कारण सत्कृत्य करण्यामागे उत्साह नसेल तर, ते मन अनिष्ट गोष्टींमध्ये रममाण होऊ लागते.

श्रीमाताजी : तुम्हाला असे वाटते की, तुम्ही खूप चांगले आहात, दयाळू आहात, विरक्त आहात आणि नेहमीच सद्भावना बाळगता – असे तुम्ही स्वत:लाच आत्मसंतुष्टीने सांगत असता. पण जर तुम्ही विचार करत असताना, स्वत:कडे प्रामाणिकपणे बघितलेत तर, तुमच्या असे लक्षात येईल की, तुमच्या डोक्यामध्ये असंख्य विचारांचा कल्लोळ असतो आणि कधीकधी त्यामध्ये अत्यंत भयावह असे विचारही असतात आणि त्याची तुम्हाला अजिबात जाणीवदेखील नसते.

उदाहरणार्थ, काहीतरी तुमच्या मनासारखे जेव्हा घडत नाही, तेव्हाच्या तुमच्या प्रतिक्रिया पाहा : तुम्ही तुमचे मित्र, नातेवाईक, परिचित, कोणालाही सैतानाकडे पाठविण्यासाठी किती उतावीळ झालेले असता पाहा. तुम्ही त्यांच्याबद्दल किती नको नको ते विचार करता ते आठवून पाहा, आणि त्याची तुम्हाला जाणीवदेखील नसते. तेव्हा तुम्ही म्हणता, “त्यामुळे त्याला चांगलाच धडा मिळेल.” आणि जेव्हा तुम्ही टिका करता तेव्हा तुम्ही म्हणता, ”त्याला त्याच्या चुकांची जाणीव व्हायलाच हवी.” आणि जेव्हा कोणी तुमच्या कल्पनेनुसार वागत नाही तेव्हा तुम्ही म्हणता, ”त्याला त्याची फळे भोगावीच लागतील.” आणि असे बरेच काही….

तुम्हाला हे कळत नाही, कारण विचार चालू असताना, तुम्ही स्वत:कडे पाहत नाही. जेव्हा तो विचार खूप प्रबळ झालेला असतो तेव्हा तुम्हाला त्याची कधीतरी जाणीव होतेही. पण जेव्हा ती गोष्ट निघून जाते, तेव्हा तुम्ही तिची क्वचितच दखल घेता. – तो विचार येतो, तुमच्यामध्ये प्रवेश करतो आणि निघून जातो. तेव्हा तुमच्या लक्षात येते की, जर तुम्हाला खरोखर शुद्ध आणि सत्याच्या पूर्ण बाजूचे बनायचे असेल तर, त्यासाठी सावधानता, प्रामाणिकता, आत्मनिरीक्षण, आणि स्वयंनियंत्रण या गोष्टी आवश्यक असतात, की ज्या सर्वसाधारणपणे आढळत नाहीत. तुम्हाला मग तेव्हा समजायला लागते की, खरोखरीच प्रामाणिक असणे ही अत्यंत अवघड गोष्ट आहे.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 231)