Posts

साधना, योग आणि रूपांतरण – २४२

नमस्कार वाचकहो,

मानवी प्रकृतीचे रूपांतरण हे पूर्णयोगाचे एक वैशिष्ट्य आहे.

‘रूपांतरण कोणत्या शक्तीद्वारे घडून येणार’ या निकषावर आधारित असलेले, आंतरात्मिक रूपांतरण, आध्यात्मिक रूपांतरण आणि अतिमानसिक रूपांतरण हे तीन प्रकार आपण आजवर पाहिले. अगदी सारांशरूपाने सांगायचे तर, चैत्य पुरुषाद्वारे होणारे रूपांतरण हे आंतरात्मिक रूपांतरण, उच्चतर चेतनेद्वारे होणारे रूपांतरण हे आध्यात्मिक रूपांतरण आणि अतिमानसिक शक्तीद्वारे होणारे रूपांतरण हे अतिमानसिक रूपांतरण असते हे आता आपल्याला ज्ञात झाले आहे.

आता ‘रूपांतरण कोणाचे’ या निकषावर आधारित असलेले मानसिक, प्राणिक व शारीरिक रूपांतरण हे तीन प्रकार आपल्याला समजावून घ्यायचे आहेत. या रूपांतरणामध्ये मन, प्राण आणि शरीर यांच्या रूपांतरणाचा समावेश होतो. तसेच पुढे जाऊन, आपल्यामधील अवचेतन, आणि अचेतनाचे रूपांतरणही पूर्णयोगामध्ये अभिप्रेत असते.

मनुष्य देहरूपात आला तेव्हा त्याला स्वत:च्या मूळ स्वरूपाचे, आणि स्वत:च्या अंतरीच्या दिव्यत्वाचे विस्मरण झाले. आणि त्याच्या मन, प्राण व शरीर या साधनांमध्ये विकार निर्माण झाले. आणि त्यामुळेच दिव्य जीवनाकडे चालणाऱ्या मार्गक्रमणामध्ये, साधनेमध्ये अडचणी निर्माण होतात. त्यामुळे त्यांच्यावर मात करून पुढे जाणे हे साधकासाठी आवश्यक ठरते. त्यावर मात करायची झाली तर त्याचे नेमके स्वरूप, त्याची लक्षणे, त्याची गुणवैशिष्ट्ये व मर्यादा माहीत असणे आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टींचा म्हणजे, मन, प्राण, शरीर यांचे स्वरूप काय आहे, त्यांची बलस्थानं कोणती व त्यांच्या मर्यादा कोणत्या याचा सारासार आणि सांगोपांग विचार श्रीअरविंद व श्रीमाताजी यांनी केला आहे. हा विचार इतका विस्तृत व सखोल आहे की, त्या सगळ्याचा येथे समावेश करायचा ठरवले तर एक स्वतंत्र ग्रंथच तयार होईल. त्यामुळे इतक्या तपशिलात न जाता, परंतु तरीही त्यातील गाभाभूत विचार वाचकांच्या हाती लागावा, असा आमचा प्रयत्न आहे. आता आपण क्रमशः मन, प्राण व शरीर यांच्या रूपांतरणासाठी साहाय्यक होतील असे विचार समजावून घेण्याचा प्रयत्न करू या. उद्यापासून ‘मानसिक रूपांतरण’ हा भाग सुरू करत आहोत.

धन्यवाद.
संपादक, अभीप्सा मराठी मासिक

साधना, योग आणि रूपांतरण – २४१

‘अंतरात्म्या’ची प्राप्ती किंवा ‘ईश्वर’ प्राप्ती हा पूर्णयोगाचा पाया असला आणि त्याविना रूपांतरण शक्य नसले तरी, पूर्णयोग म्हणजे केवळ ‘अंतरात्म्या’च्या प्राप्तीचा किंवा ‘ईश्वर’ प्राप्तीचा योग नाही. तर तो व्यक्तीच्या रूपांतरणाचा योग आहे.

या रूपांतरणामध्ये चार घटक असतात. आंतरात्मिक खुलेपणा, अज्ञेय प्रांत ओलांडून जाणे किंवा अज्ञेय प्रांतामधून संक्रमण करणे, आध्यात्मिक मुक्ती, आणि अतिमानसिक परिपूर्णत्व. या चार घटकांपैकी कोणताही एक घटक जरी साध्य झाला नाही तरी हा योग अपूर्ण राहतो.

– श्रीअरविंद (CWSA 12 : 367-368)

साधना, योग आणि रूपांतरण – २४०

दिव्य जीवनासाठी फक्त उच्चतर मानसिक चेतनेच्या संपर्कात येणे पुरेसे नसते. ती फक्त एक अनिवार्य अशी अवस्था असते. दिव्य जीवनासाठी अधिक उच्च आणि अधिक शक्तिशाली स्थानावरून ‘दिव्य शक्ती’चे अवतरण होणे आवश्यक असते.

पुढील सर्व गोष्टी सद्यस्थितीत अदृश्य असलेल्या शिखरावरून अवतरित होणाऱ्या ‘शक्ती’विना अशक्यप्राय आहेत :
१) उच्चतर चेतनेचे अतिमानसिक प्रकाश आणि शक्तीमध्ये रूपांतरण,
२) प्राण आणि त्याच्या जीवनशक्तीचे विशुद्ध, विस्तृत, स्थिरशांत, दिव्य ऊर्जेच्या शक्तिशाली आणि उत्कट साधनामध्ये रूपांतरण,
३) तसेच स्वयमेव शरीराचे दिव्य प्रकाश, दिव्य कृती, सामर्थ्य, सौंदर्य आणि हर्ष यांच्यामध्ये रूपांतरण

‘ईश्वरा’प्रत आरोहण या एका गोष्टीबाबत इतर योग आणि पूर्णयोग यांमध्ये साधर्म्य आढळते परंतु पूर्णयोगामध्ये केवळ आरोहण पुरेसे नसते तर मन, प्राण, शरीर यांच्या सर्व ऊर्जा रूपांतरित करण्यासाठी ‘ईश्वरा’चे अवतरण होणेदेखील आवश्यक असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 118-119)

साधना, योग आणि रूपांतरण – २३९

(आपल्या व्यक्तित्वामध्ये दोन प्रणाली कार्यरत असतात. एक अध-ऊर्ध्व म्हणजे जडभौतिकापासून ते सच्चिदानंदापर्यंत असणारी प्रणाली आणि दुसरी बाहेरून आत जाणारी म्हणजे बाह्य व्यक्तित्व ते चैत्य पुरुष अशी असणारी केंद्रानुगामी प्रणाली. या दोन्ही प्रणालींचा येथे संदर्भ आहे.)

रूपांतरणासाठी ‘संपूर्ण’ आणि ‘समग्र’ ईश्वराधीनतेची (consecration) आवश्य कता असते. सर्वच प्रामाणिक साधकांची तीच आस असते, नाही का?

‘संपूर्ण’ ईश्वराधीनता म्हणजे ऊर्ध्व-अधर (vertically) अशा पद्धतीने ईश्वराधीन होणे. येथे व्यक्ती सर्व अवस्थांमध्ये, म्हणजे अगदी जडभौतिक अवस्थांपासून ते अगदी सूक्ष्म अशा सर्व अवस्थांपर्यंत, सर्वत्र ईश्वराधीन असते.

आणि ‘समग्र’ ईश्वराधीनता म्हणजे क्षितिजसमांतर (horizontally) पद्धतीने ईश्वराधीन होणे. शरीर, प्राण, मन यांनी मिळून ज्या बाह्यवर्ती व्यक्तित्वाची घडण झालेली असते त्या व्यक्तित्वाच्या विभिन्न आणि बरेचदा परस्परविरोधी असणाऱ्या सर्व घटकांमध्ये ईश्वराधीनता असणे म्हणजे समग्र ईश्वराधीन असणे.

– श्रीमाताजी (CWM 15 : 88)

साधना, योग आणि रूपांतरण – २३७

तुम्ही जर मानवी प्रकृतीचे रूपांतरण (transformation) गतिमान दिव्य प्रकृतीमध्ये करू इच्छित असाल तर, कोणतीही कुरबूर न करता, किंवा कोणताही प्रतिकार न करता, स्वत:ला श्रीमाताजींच्या व त्यांच्या शक्तींच्या हाती सोपवा आणि त्यांना त्यांचे कार्य तुमच्यामध्ये कोणत्याही अडथळ्याविना करू द्या. चेतना, घडणसुलभता (plasticity) आणि नि:शेष समर्पण या तीन गोष्टी तुमच्याकडे असल्याच पाहिजेत.

श्रीमाताजी आणि त्यांच्या शक्ती व त्यांचे कार्य याविषयी तुमचे मन, आत्मा, हृदय, प्राण इतकेच काय पण, तुमच्या शरीरातील पेशीसुद्धा सजग असल्या पाहिजेत. कारण, श्रीमाताजी तुमच्यातील अंधकारामध्ये आणि तुमच्या अचेतन भागांमध्ये, अचेतन क्षणांमध्ये देखील कार्य करू शकतात आणि तशा त्या करतात देखील, परंतु जेव्हा तुम्ही जागृत असता आणि त्यांच्याशी चैतन्यमय संपर्क राखून असता तेव्हाची गोष्ट निराळी असते.

तुमची समग्र प्रकृतीच श्रीमाताजींच्या स्पर्शाला घडणसुलभ असली पाहिजे, म्हणजे –
१) स्वयंपर्याप्त (self-sufficient) अज्ञानी मन जसे प्रश्नह विचारत राहते, शंका घेत राहते, विवाद करत बसते आणि ते जसे प्रबोधनाचे व परिवर्तनाचे शत्रू असते, तशी तुमची प्रकृती असता कामा नये.
२) ज्याप्रमाणे माणसातील प्राण स्वत:च्याच वृत्तीप्रवृत्तींवर भर देत राहतो आणि तो जसा आपल्या हट्टाग्रही इच्छा व दुरिच्छेमुळे, प्रत्येक दिव्य प्रभावाला सातत्याने विरोध करत राहतो, तशी तुमची प्रकृती स्वत:च्याच वृत्तीप्रवृत्तींवर भर देणारी असता कामा नये.
३) माणसाची शारीरिक चेतना जशी अडथळा निर्माण करत राहते आणि ती जशी शरीराच्या अंधकारमय गोष्टींमधील किरकोळ सुखाला चिकटून राहते तशी तुमची प्रकृती ही अडथळा निर्माण करणारी असता कामा नये. तसेच शरीराच्या कंटाळवाण्या दिनचर्येला, आळसाला किंवा त्याच्या जड निद्रेला धक्का पोहोचविणाऱ्या कोणत्याही स्पर्शाच्या विरोधात शारीरिक चेतना जशी आकांडतांडव करते; तशी तुमची प्रकृती ही स्वत:च्या अक्षमतेला, जडतेला आणि तामसिकतेला हटवादीपणे चिकटून राहणारी असता कामा नये.

नि:शेष समर्पण आणि तुमच्या आंतरिक व बाह्य अस्तित्वाचे समर्पण हे तुमच्या प्रकृतीच्या सर्व भागांमध्ये ही घडणसुलभता घडवून आणेल. वरून प्रवाहित होणाऱ्या प्रज्ञा आणि प्रकाश, शक्ती, सुसंवाद आणि सौंदर्य, पूर्णता या साऱ्या गोष्टींप्रत तुम्ही सातत्याने खुले राहिलात तर, तुमच्यामधील सर्व घटकांमध्ये चेतना जागृत होईल. इतकेच काय पण तुमचे शरीरसुद्धा जागृत होईल आणि सरतेशेवटी, त्याची चेतना ही त्यानंतर अर्धचेतन चेतनेशी एकत्व न पावता, अतिमानसिक अतिचेतन शक्तीशी एकत्व पावेल; आणि तिची ऊर्जा ही वरून, खालून, चोहोबाजूंनी शरीराला अनुभवास येईल आणि एका परमप्रेमाने व आनंदाने ते शरीर पुलकित होऊन जाईल.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 24-25)

साधना, योग आणि रूपांतरण – २३६

फक्त उच्चतर चेतनेचे अनुभव आल्यामुळे, प्रकृतीमध्ये परिवर्तन होणार नाही. ज्यांद्वारे हे परिवर्तन घडून येऊ शकते असे पुढील चार मार्ग असतात :
१) एकतर, उच्चतर चेतनेने समग्र अस्तित्वामध्ये गतिशील अवतरण करून, त्या अस्तित्वाचे परिवर्तन केले पाहिजे.
२) किंवा मग, उच्चतर चेतनेने आंतरिक शरीरापर्यंत खाली उतरून, स्वतःला आंतरिक अस्तित्वामध्ये प्रस्थापित केले पाहिजे त्यामुळे आपण बाह्य (स्थूल) शरीरापासून विलग आहोत असा अनुभव आंतरिक शरीराला येऊ शकेल आणि ते बाह्य शरीरावर मुक्तपणे कार्य करू शकेल.
३) किंवा अंतरात्मा अग्रस्थानी आला पाहिजे आणि त्याने प्रकृतीचे परिवर्तन घडविले पाहिजे;
४) किंवा मग, आंतरिक इच्छा जागृत होऊन तिने प्रकृतीस परिवर्तन करण्यास भाग पाडले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 23)

साधना, योग आणि रूपांतरण – २३२

साधक : ‘अपरिवर्तनीय रूपांतरण’ म्हणजे काय?

श्रीमाताजी : तुम्ही तुमच्या आधीच्या स्थितीमध्ये परत जाऊ शकत नाही असे रूपांतरण जेव्हा तुमच्या चेतनेमध्ये घडते, तेव्हा त्या रूपांतरणास ‘अपरिवर्तनीय रूपांतरण’ असे म्हटले जाते. एक क्षण असा येतो की हे परिवर्तन इतके परिपूर्ण झालेले असते की अशा वेळी मग तुम्ही पूर्वी जसे होतात तसे पुन्हा होणे अशक्यप्राय होऊन जाते.

साधक : परंतु रूपांतरण या शब्दातच अपरिवर्तनीय हा अर्थ सूचित होत नाही का?

श्रीमाताजी : रूपांतरण आंशिकसुद्धा असू शकते. श्रीअरविंद ज्या रूपांतरणाबद्दल सांगत आहेत ते आहे चेतनेचे प्रत्युत्क्रमण (reversal). म्हणजे येथे व्यक्ती स्वतःच्या वैयक्तिक सुखसमाधानांकडे वळलेली असण्याऐवजी आणि अहंकारी असण्याऐवजी, तिची चेतना समर्पित होऊन ‘ईश्वरा’भिमुख झालेली असते. आणि त्यांनी इथे हे स्पष्टपणे सांगितले आहे की सुरुवातीला समर्पण हे आंशिक असू शकते, म्हणजे (अस्तित्वाचे) काही भाग समर्पित आहेत आणि काही भाग समर्पित नाहीत, असे असू शकते. आणि म्हणून जेव्हा समग्र अस्तित्वाने, समग्रपणे, त्याच्या सर्व गतिविधींनिशी, स्वतःचे समर्पण केलेले असते तेव्हा ते समर्पण अपरिवर्तनीय असे असते. तेव्हा ते ‘दृष्टिकोनाचे अपरिवर्तनीय रूपांतरण’ असते.

– श्रीमाताजी (CWM 04 : 356)

साधना, योग आणि रूपांतरण – २२६

व्यक्ती (योगसाधना करून देखील) जर स्वतःच्या प्रकृतीमध्ये कोणतेही परिवर्तन घडवू शकत नसेल तर, तिने योगसाधना करण्याचे कष्ट घेणे उपयुक्त ठरणार नाही; कारण प्रकृतीमध्ये परिवर्तन घडविण्यासाठीच तर योगसाधना केली जाते, अन्यथा त्याला काही अर्थ नाही, असे श्रीअरविंद आपल्याला सांगतात.
*
‘शांती’चे अवतरण, ‘शक्ती’चे अवतरण, ‘प्रकाशा’चे अवतरण आणि ‘आनंदा’चे अवतरण, या चार गोष्टी ‘प्रकृतीचे रूपांतरण’ घडवून आणतात.

– श्रीमाताजी (CWM 04 : 332), – श्रीअरविंद (CWSA 30 : 449)

साधना, योग आणि रूपांतरण – २२३

(‘रूपांतरणा’बाबत श्रीमाताजींनी अगोदर केलेल्या विवेचनातील काही भाग वाचून दाखविला गेला आहे. आणि आता श्रीमाताजी त्यावर भाष्य करत आहेत.)

समग्र रूपांतरण आणि ज्या चेतनेच्या रूपांतरणाचा मी आधी उल्लेख केला होता त्या दोन्हीमध्ये मी फरक का करते? चेतना आणि व्यक्तीच्या इतर भागांमध्ये काय संबंध असतो? हे इतर भाग कोणते? जे जे कोणी योगसाधना करतात त्यांच्याबाबतीत हे चेतनेचे रूपांतरण घडून येते आणि ते ‘ईश्वरी उपस्थिती’विषयी किंवा स्वतःच्या अस्तित्वाच्या ‘सत्या’विषयी जागरूक होऊ लागतात. बऱ्याच जणांना याचा अनुभव आहे, असे मी म्हणत नाहीये पण किमान काही जणांना तरी हा अनुभव आलेला असतो. मग हा अनुभव आणि समग्र रूपांतरण यामध्ये काय फरक असतो?

साधक : समग्र रूपांतरणामध्ये बाह्यवर्ती प्रकृती आणि आंतरिक चेतना या दोन्ही रूपांतरित होतात. व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, तिच्या सवयी इत्यादी पूर्णपणे बदलून जातात, तसेच तिचे विचार आणि गोष्टींकडे पाहण्याचा तिचा मानसिक दृष्टिकोनही बदलून जातो.

श्रीमाताजी : हो, बरोबर आहे पण तुम्ही जर पुरेशी काळजी घेतली नाहीत आणि तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवले नाहीत तर, तुमच्यामध्ये असेही काही असते की ज्यामध्ये कोणतेही परिवर्तन न होता ते तसेच राहिलेले असते. ते नेमके काय असते? तर ती शारीर-चेतना (body consciousness) असते. आता ही शारीर-चेतना म्हणजे काय? त्यामध्ये अर्थातच प्राणिक चेतनेचाही समावेश असतो, म्हणजे येथे शारीर-चेतना ही समग्रत्वाने अभिप्रेत आहे. आणि मग या समग्र शारीर-चेतनेमध्ये शारीरिक मनाचाही (physical mind) समावेश होतो. हे असे मन असते की जे तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्या सर्वसामान्य गोष्टींनी व्याप्त असते आणि त्याला प्रतिसाद देत असते. एक प्राणिक चेतनाही (vital consciousness) असते. संवेदना, आवेग, उत्साह आणि इच्छावासना यांबाबतची जाणीव म्हणजे ही चेतना असते. आणि सरतेशेवटी स्वयमेव एक शारीर-चेतना असते, ही भौतिक चेतना असते, ती शरीराची चेतना असते आणि ही चेतना आजवर पूर्णतः कधीच रूपांतरित झालेली नाही.

आजवर सार्वत्रिक, म्हणजे शरीराची एकंदर चेतना रूपांतरित करण्यात आली आहे म्हणजे, व्यक्तीला ज्या गोष्टी अपरिहार्य वाटत नाहीत अशा गोष्टी म्हणजे विचारांची, सवयींची बंधने व्यक्ती झुगारून देऊ शकते. या गोष्टीमध्ये परिवर्तन होऊ शकते, हे परिवर्तन झालेले आहे. परंतु पेशींची जी चेतना आहे त्यामध्ये आजवर कोणतेही परिवर्तन झालेले नाही. पेशींमध्ये एक चेतना असते. त्यालाच आम्ही ‘शारीरिक चेतना’ असे संबोधतो आणि ती चेतना संपूर्णपणे शरीराशी संबद्ध असते.

या चेतनेमध्ये परिवर्तन होणे अतिशय कठीण असते कारण ही चेतना सामूहिक सूचनेच्या प्रभावाखाली असते आणि ही सामूहिक सूचना रूपांतरणाच्या पूर्णपणे विरोधी असते. आणि त्यामुळे व्यक्तीला या सामूहिक सूचनेच्या विरोधात संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष फक्त वर्तमानकालीन सामूहिक सूचनांच्या बाबतीतच करावा लागतो असे नाही तर, संपूर्ण पृथ्वी-चेतनेशी संबंधित असणाऱ्या सामूहिक सूचनेच्या विरोधातही हा संघर्ष करावा लागतो. आणि या पार्थिव मानवी चेतनेचे मूळ मनुष्याची जेव्हा सर्वप्रथम निर्मिती झाली, घडण झाली तेथपर्यंत जाऊन पोहोचते. पेशींना ‘सत्या’ची, जडद्रव्याच्या ‘शाश्वतते’ची उत्स्फूर्तपणे जाणीव होण्यापूर्वी उपरोक्त सामूहिक सूचनांवर मात करावी लागते. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 15 : 292-293)

साधना, योग आणि रूपांतरण – २२२

आपल्याला समग्र रूपांतरण हवे आहे; शरीराचे आणि त्याच्या सर्व क्रियांचे रूपांतरण हवे आहे. पूर्वी जेव्हा ‘रूपांतरणा’विषयी बोलले जात असे तेव्हा तेथे केवळ आंतरिक चेतनेचे रूपांतरणच अभिप्रेत असे. ही सखोल चेतना स्वत:मध्ये शोधण्याचा व्यक्ती प्रयत्न करत असे; हे करत असताना, आंतरिक गतिविधींवरच लक्ष केंद्रित करायचे असल्याने, शरीराला आणि त्याच्या क्रियाकलापांना, ती व्यक्ती एक लोढणं समजत असे; आणि निरुपयोगी गोष्ट म्हणून त्यास ती धुडकावून देत असे.

परंतु, हे पुरेसे नसल्याचे श्रीअरविंदांनी स्पष्ट केले. जडभौतिक जगताने देखील या रूपांतरणामध्ये सहभागी व्हावे आणि त्यानेही या गहनतर ‘सत्या’ची अभिव्यक्ती करावी, अशी त्या ‘सत्या’कडून मागणी होत आहे, हे त्यांनी स्पष्ट केले आहे. परंतु लोकांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना असे वाटले की, अंतरंगामध्ये काय घडत आहे याची अजिबात काळजी न करतादेखील शरीर आणि त्याच्या क्रिया यांचे रूपांतरण घडविणे शक्य आहे, अर्थात हे खरे नाही.

हे शारीरिक रूपांतरणाचे कार्य हाती घेण्यापूर्वी, म्हणजे जे सर्वात अवघड असे कार्य आहे ते हाती घेण्यापूर्वी, तुमची आंतरिक चेतना ही सत्यामध्ये दृढपणे प्रस्थापित झालेली असली पाहिजे; म्हणजे मग हे रूपांतरण म्हणजे त्या ‘सत्या’चा चरम आविष्कार असेल, किमान आत्ताच्या घडीपुरता तरी तो चरम असेल.

या रूपांतरणाचा प्रारंभबिंदू असतो ग्रहणशीलता! रूपांतरण प्राप्त करून घेण्यासाठीची ही अत्यावश्यक अट आहे. त्यानंतर चेतनेमध्ये परिवर्तन घडून येते. चेतनेचे हे परिवर्तन आणि त्याची पूर्वतयारी यांची तुलना नेहमी अंड्यातील कोंबडीच्या पिलाच्या घडणीशी केली जाते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अंडे जसेच्या तसे दिसत असते, त्यामध्ये काहीही बदल दिसत नाही आणि जेव्हा ते पिल्लू आत पूर्ण विकसित झालेले असते, पूर्णपणे सजीव झालेले असते, तेव्हा ते त्याच्या छोट्याशा चोचीने त्या कवचाला टोचे मारते आणि त्यातून बाहेर पडते. चेतनेच्या परिवर्तनाच्या क्षणीसुद्धा असेच काहीसे घडून येते.

दीर्घ काळपर्यंत काहीच घडत नाही असेच तुम्हाला वाटत असते; तुमची चेतना नेहमीप्रमाणेच आहे, त्यात काहीच बदल झालेला नाही असेच तुम्हाला वाटत असते. तुमच्यापाशी जर का उत्कट अभीप्सा असेल तर तुम्हाला कधीकधी विरोधदेखील जाणवतो; जणूकाही तुम्ही एखाद्या भिंतीवर धडका मारत आहात पण ती काही ढासळत नाही. मात्र जेव्हा तुमची अंतरंगातून तयारी झालेली असते तेव्हा एक शेवटचा प्रयत्न – तुमच्या अस्तित्वाच्या कवचाला धडका मारण्याचा एक प्रयत्न पुरेसा ठरतो आणि मग सर्वकाही खुले होते – आणि तुम्ही एका अन्य चेतनेमध्ये उन्नत झालेले असता.

मी असे म्हटले होते की ही मूलभूत समतोलाची क्रांती आहे. म्हणजे त्यामध्ये चेतनेचे संपूर्णतः प्रत्युत्क्रमण होते. लोलकामधून प्रकाश जेव्हा बाहेर पडतो तेव्हा जसे होते तसेच येथे होते. किंवा असे म्हणता येईल की, जणूकाही तुम्ही एखादा चेंडू आतून बाहेर वळवता (म्हणजे येथे चेंडूची आतली बाजू बाहेर आणि बाहेरची बाजू आतमध्ये जाते.) आणि ही गोष्ट चतुर्थ मितीशिवाय (fourth dimension) शक्य नसते. व्यक्ती येथे सामान्य त्रिमिती चेतनेमधून बाहेर पडून, अधिक उच्च अशा चतुर्थ मितीच्या चेतनेमध्ये प्रवेश करते. व्यक्ती अगणित मिती असलेल्या चेतनेमध्ये प्रवेश करते. हा अनिवार्य असा आरंभबिंदू असतो. जोपर्यंत तुमच्या चेतनेची ही मितीच बदलत नाही तोपर्यंत तुम्हाला वस्तुमात्रांविषयीची जी वरकरणी दृष्टी असते त्याच स्थितीमध्ये तुम्ही कायम राहता आणि त्यामुळे तुम्ही त्यांची अगाधता, गहनता गमावून बसलेले असता.

– श्रीमाताजी (CWM 04 : 18-19)