Tag Archive for: शांती

(एका साधकाने विचारलेल्या प्रश्नावरील उत्तर श्रीअरविंदांनी त्यांच्या सचिवांना सांगितले आहे आणि सचिव श्रीअरविंदांच्या वतीने लिहीत आहेत.)

तुम्ही लिहिलेल्या पत्राच्या उत्तरादाखल श्रीअरविंद तुम्हाला असे सांगत आहेत की, तुम्ही हृदयकेंद्रामध्ये श्रीमाताजींचे ध्यान करू शकता आणि त्यांना साद घालू शकता. त्यांचे स्मरण करा आणि तुमचे सर्व विचार, तुमच्या सर्व कृती आणि तुमचे संपूर्ण जीवन श्रीमाताजींना अर्पण करा, समर्पित करा. तुम्हाला वाटले तर तुम्ही त्यांच्या नामाचा जप करू शकता. तुमचे अस्तित्व विशुद्ध करण्यासाठी आणि तुमच्या प्रकृतीमध्ये बदल घडवण्यासाठी तुम्ही त्यांना साद घालू शकता.

किंवा प्रथमतः श्रीमाताजींची स्थिरता, शांती आणि नंतर त्यांची शक्ती, त्यांचा प्रकाश आणि त्यांचा आनंद वरून खाली अवतरित व्हावेत म्हणून तुम्ही तुमच्या मस्तकाच्या वरदेखील ध्यान करू शकता. या गोष्टी नेहमीच मस्तकाच्या वर (above the head) असतात. त्या मानवी मनाच्या दृष्टीने अतिचेतन अशा असतात. अभीप्सा आणि एकाग्रतेच्या साहाय्याने मन त्याबाबत सचेत बनू शकते आणि आधार (मन, प्राण आणि शरीर) त्यांच्याप्रत खुला होऊ शकतो; परिणामी त्या गोष्टी खाली उतरून मन, प्राण आणि शरीर यांमध्ये प्रवेश करू शकतील.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 154-155)

(”ईश्वराकडून जे काही तुम्हाला प्राप्त झाले होते त्यावर लक्ष केंद्रित न करता, तुम्ही ते व्यर्थ जागी खर्च केलेत आणि त्यामुळे तुम्ही ते गमावून बसलात,” असे श्रीमाताजींनी एका साधकाला सांगितले. ते ऐकल्यावर तो साधक चिंतनमग्न झाला. तेव्हाचा त्याचा तो अनुभव तो साधक पुन्हा श्रीमाताजींना सांगत आहे…)

साधक : तुमचे उत्तर ऐकल्यावर मी गंभीर झालो आणि मला असे वाटले की, मी निदान आजतरी शांत, निश्चल-नीरव (silent) राहिले पाहिजे. पण निश्चल-नीरवतेचे काही क्षण गेल्यानंतर माझ्यामधीलच दुसरा एक भाग मला सांगू लागला की, “ही काही खरी निश्चल-नीरवता नाहीये, त्यामध्ये फारसा आनंद व उत्साह नाहीये. त्यामुळे ती निश्चल-नीरवता नसून, ते प्राणाचे असमाधान आहे.” आणि मग मला असे वाटले की, दुसरा भाग जे सांगत आहे ते बरोबर आहे.

श्रीमाताजी : दोन्ही गोष्टी काही अंशी बरोबर आणि काही अंशी चुकीच्या आहेत. अवतरित होणारी शक्ती निश्चल-नीरवतेमध्ये, एकाग्रतापूर्वक ग्रहण करणे कधीही योग्यच, परंतु प्राणाला त्याच्या लहरीप्रमाणे वागू न दिल्यामुळे त्याचा जो त्रागा होतो त्यातून, ती नीरवता किंवा एकाग्रता आलेली असता कामा नये. तसेच ही एकाग्रता आणि निश्चल-नीरवता फक्त शांतिमयच असणे पुरेसे नाही तर त्यामध्ये एक प्रकारचा अतिशय उत्कट आनंदही असला पाहिजे. असे असेल तर ती एकाग्रता, ती निश्चल-नीरवता ही खरी आणि विशुद्ध आहे, असे तुम्ही गृहीत धरायला हरकत नाही.

– श्रीमाताजी (CWM 17 : 54)

 

(मनुष्याने स्वत:ला उच्चतर चेतनेप्रत समर्पित करायचे हा माणसाच्या चिंताग्रस्ततेवरील एक उपाय आहे, असे श्रीमाताजींनी सांगितले. ते आपण आजवर विचारात घेतले. त्या विवेचनाचा हा संपादित केलेला अंतिम भाग आहे. विषय समजण्यास सोपा जावा या दृष्टीने मराठी भाषांतरामध्ये वाक्यांचा क्रम व मांडणी यामध्ये बदल केला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.)

सर्व आध्यात्मिक साधनापद्धतींचा प्रारंभ सर्व जबाबदाऱ्या उच्चतर तत्त्वावर सोपवून, त्याला समर्पित होण्याच्या आवश्यकतेपासून होते. अन्यथा शांती लाभणे अशक्य असते. ‘शांततावादी’ (quietist) पद्धत असे त्या साधनापद्धतींचे वर्णन करता येईल.

सर्व प्रकारच्या कृतींना नकार देत, अचल आंतरिक निश्चल-नीरवतेमध्ये बुडी घेण्यावर या शांततावादी पद्धती आधारलेल्या असतात. त्याचे अनुसरण करणाऱ्या व्यक्तींना अचानकपणे अशी जाणीव होते की, शांतीशिवाय कोणताच आंतरिक साक्षात्कार होणे शक्य नाही. आणि म्हणून अगदी स्वाभाविकपणे, त्यांच्या मनात असा विचार येतो की, कधीच न सुटणारे प्रश्न जोपर्यंत त्यांना भेडसावत आहेत आणि जोपर्यंत बाह्य अस्वस्थतेच्या परिस्थितीमध्ये त्यांना जीवन कंठावे लागत आहे, तोपर्यंत त्याना कधीच शांती लाभणे शक्य नाही.’ कारण ते प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक असणारे ज्ञानच त्यांच्यापाशी नाहीये. आणि म्हणून, शांती लाभावी यासाठी त्या शांततावादी साधनापद्धती सर्व प्रकारच्या जीवनाचा परित्याग करतात. (‘शांततावादी’ पद्धतीचे अनुसरण करणाऱ्या माणसांची विचारसरणी ही अशा प्रकारची असते.)

परंतु या अचल (immobile) व स्थिर शांतीपेक्षा (static peace) अधिक उच्च असणारी अशी आणखी एक स्थिती असते. मनुष्याला अशी एक चेतना प्रदान करण्यात आलेली आहे की, ज्यामुळे तो प्रगती करू शकतो, त्याला जे ज्ञात नाही ते तो शोधून काढू शकतो; तो जे अजूनपर्यंत होऊ शकलेला नाही त्यामध्ये तो विकसित होऊ शकतो. आणि हा जो विश्वास असतो तो, व्यक्तीने प्रगती करण्याची इच्छा कायम ठेवावी, सर्व प्रकारच्या चिंता व काळज्यांपासून मुक्त होऊन, फलिताची व परिणामांची कोणतीही काळजी न करता, प्रगतीसाठीचे प्रयत्न चालू ठेवावेत यासाठी पुरेसा असतो. शांततावादी पद्धतींपेक्षा एक पाऊल पुढे टाकणारी ही पद्धत आहे.

हे पुढचे पाऊल म्हणजे (जीवनाचा त्याग न करता, जीवनात राहून) प्रश्नांना सामोरे जाणे. ज्या परमशक्तीला सर्व काही ज्ञात आहे आणि जी तुम्हाला कार्यप्रवृत्त करू शकते, तिच्यावर संपूर्ण विश्वास ठेवून, त्या खात्रीनिशी आणि स्थिरचित्ताने प्रश्नांना सामोरे जायचे. आणि अशा वेळी व्यक्ती (शांततावादी पद्धतीप्रमाणे) कृती करण्याचे सोडून देत नाही तर ती आता, बलशाली आणि गतिशील असणाऱ्या उच्चतर शांतीमध्ये राहून कार्य करू शकते. ईश्वर आपल्याला जीवनामध्ये जो मदतीचा हात देतो त्याचा हा एक नवीन पैलू आहे; व्यक्तीमध्ये ईश्वरी शक्ती कार्यरत असल्याचे हे एक नवीन रूप आहे; किंबहुना आध्यात्मिक साक्षात्काराचा हा एक नवीनच आयाम आहे, असे म्हणता येईल.

– श्रीमाताजी (CWM 09 : 304-305)

 

जो मनुष्य सत्याच्या शोधासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि सातत्याने परिपूर्ण सत्याच्या अधिकाधिक निकट जावे या हेतुने, म्हणजेच हे समग्र विश्व अनंतकाळ प्रगत होत आहे, याचे उत्तरोत्तर वाढते ज्ञान प्राप्त व्हावे या हेतुने जो प्रयत्नशील असतो आणि गरज भासल्यास, आजवर त्याला जे ‘सत्य‌’ म्हणून वाटत होते त्या विचारांचा परित्याग करण्यासाठी जो तयार असतो, तो मनुष्य हळूहळू अधिक गहन, अधिक परिपूर्ण आणि अधिक तेजोमय अशा महान विचारांच्या संपर्कात येतो.

मग दीर्घकाळ केलेल्या ध्यानाभ्यासानंतर, मननानंतर, तो विशुद्ध बौद्धिक शक्तीच्या महान वैश्विक प्रवाहाच्या थेट संपर्कात येतो आणि त्यानंतर त्या मनुष्यापासून कोणतेही ज्ञान लपून राहू शकत नाही. त्या क्षणापासून धीरगंभीरपणा – मानसिक शांती – ही गोष्ट त्याच्या व्यक्तित्वाचा जणू एक भागच होऊन जाते. सर्व प्रकारच्या समजुती, सर्व मानवी ज्ञान, सर्व धार्मिक शिकवणुकी, जे सारे एके काळी त्याला खूपच विरोधाभासी वाटत असे, त्या साऱ्या पाठीमागे असलेले गहन सत्य आता त्याला जाणवते; त्याच्या दृष्टीपासून काहीच लपून राहू शकत नाही.

– श्रीमाताजी (CWM 02 : 28)

 

 

तुमचा भावी काळ जेव्हा तुम्हाला जणू अनंत शक्यतांनी उजळलेल्या आकर्षक सूर्यासारखा वाटत असतो; आणि त्या शक्यता जेव्हा तुम्हाला खुणावत असतात तेव्हा तुम्ही तरुण असता. मग या पृथ्वीतलावर तुम्ही किती वर्षे व्यतीत केली आहेत याला महत्त्व नसते, तुम्ही तरुण असता आणि भावी काळात प्रत्यक्षात येऊ शकतील अशा शक्यतांची संपदा तुमच्यापाशी असल्यामुळे तुम्ही समृद्ध असता.

परंतु (त्या शक्यता प्रत्यक्षात उतरविण्याच्या प्रयत्नांत) तुमच्या शरीराने तुम्हाला साथ देत राहावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर, तुम्ही तुमच्या ऊर्जा निरर्थक क्षोभामध्ये, अस्वस्थतेमध्ये व्यर्थ खर्च करू नका. तुम्ही जे काही करता ते अगदी शांतपणाने आणि स्थिरचित्ताने करा. शांती आणि निश्चल-नीरवतेमध्ये महत्तर सामर्थ्य सामावलेले असते.

*

चिरविश्रांतीसाठी असो किंवा अगदी निर्वाणाच्या परमानंदासाठी असो, व्यक्तीने इहलोकाचा निरोप घेण्याची कोणतीही घाई करू नये किंवा त्वराही करू नये. जोपर्यंत आपण देहामध्ये आहोत तोपर्यंत आपल्याला करण्यासारखे किंवा शिकण्यासारखे निःसंशयपणे काहीतरी असते.

– श्रीमाताजी (CWM 12 : 123), (CWM 15 : 119)

सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये अंतरंगामध्ये अविचल राहणे म्हणजे समत्व (equality).

*

समत्वाशिवाय साधनेचा भरभक्कम पाया रचला जाऊ शकत नाही. परिस्थिती कितीही त्रासदायक असू दे, इतरांची वागणूक भलेही तुम्हाला न पटणारी असू दे, तुम्ही त्या साऱ्या गोष्टी एका सुयोग्य स्थिरतेने आणि कोणत्याही अस्वस्थ प्रतिक्रियांविना स्वीकारण्यास शिकले पाहिजे. या गोष्टी हीच समत्वाची कसोटी असते. सर्व गोष्टी सुरळीत असताना, माणसं आणि परिस्थिती सुखकारक असताना समत्व बाळगणे आणि स्थिरता राखणे सहजसोपे असते; पण जेव्हा परिस्थिती विपरित असते तेव्हाच स्थिरता, शांती, समत्व यांच्या परिपूर्णत्वाचा कस लागतो आणि अशा परिस्थितीमध्येच त्या अधिक दृढ, अधिक परिपूर्ण केल्या जाऊ शकतात.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 130, 129)

(श्रीअरविंद लिखित एका पत्रामधून…)

तुम्ही आत्ता जशी व्यापकता आणि स्थिरता बाळगली आहे तशी ती नेहमी टिकवून ठेवलीत आणि हृदयामध्ये देखील जर श्रीमाताजींबद्दल सदोदित प्रेम असेल तर मग सारे काही निर्धोक असते. कारण येथे योगाचा दुहेरी पाया रचण्यात आलेला आहे, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे येथे उच्चतर चेतना ही तिची ऊर्ध्वस्थित शांती, स्वातंत्र्य आणि सुरक्षितता यांसहित अवतरित होते आणि ज्या चैत्य अस्तित्वामुळे सर्व प्रयत्न आणि सर्व उत्स्फूर्त गतिविधी खऱ्या ध्येयाप्रत वळलेल्या राहतात, ते चैत्य अस्तित्व खुले होते. (हा असतो तो दुहेरी पाया.)

श्रीअरविंद (CWSA 30 : 466)

(कामात गुंतलेले असताना, शांती, स्थिरता टिकून राहत नाही याबाबतची खंत एका साधकाने श्रीअरविंद यांच्यापाशी व्यक्त केली आहे, असे दिसते. त्याला श्रीअरविंद यांनी दिलेले हे उत्तर…)

ज्ञान, सामर्थ्य आणि आनंद या गोष्टी येण्यासाठी स्थिरतेचे, शांतीचे आणि समर्पणाचे पोषक वातावरण आवश्य क असते. तुम्ही कामामध्ये गुंतलेले असताना ते वातावरण टिकून राहत नाही कारण तुमच्या मनाला ही निश्चल-निरवतेची (silence) देणगी अलीकडेच प्राप्त झाली आहे; आणि ती देणगी अजूनपर्यंत तरी फक्त मनापुरतीच सीमित आहे. (आत्ता तुमच्या प्राणाला त्या निश्चल-निरवतेचा फक्त स्पर्श झाला आहे किंवा तिचा प्रभाव जाणवू लागला आहे पण त्या निरवतेने प्राणाचा अजूनपर्यंत ताबा घेतलेला नाही.) जेव्हा नवीन चेतना पूर्णतः तयार झालेली असेल आणि ती जेव्हा तुमच्या प्राणिक प्रकृतीचा आणि शारीरिक अस्तित्वाचा संपूर्ण ताबा घेईल तेव्हा (तुम्ही म्हणत आहात) तो दोष निघून जाईल.

तुमच्या मनाला लाभलेली ही शांतीची अविचल चेतना केवळ स्थिर होणे पुरेसे नाही, तर ती व्यापकही झाली पाहिजे. तुम्हाला ती सर्वत्र जाणवली पाहिजे. म्हणजे, तुम्ही स्वतः आणि इतर सर्वकाही त्या चेतनेमध्येच आहे, असे तुम्हाला जाणवले पाहिजे. तुमच्या कर्मामध्ये स्थिरतेचा पाया निर्माण करण्यासाठीसुद्धा तुम्हाला त्या चेतनेची मदत होईल. तुमची चेतना जेवढी अधिक व्यापक होईल तेवढ्या अधिक प्रमाणात तुम्ही वरून येणाऱ्या गोष्टी (ज्ञान, प्रकाश, प्रेम इ.) ग्रहण करू शकाल. (आणि तसे झाल्यावर मग) दिव्य शक्ती तुमच्या अस्तित्वामध्ये अवतरू शकेल आणि ती त्यामध्ये सामर्थ्य, प्रकाश आणि शांती ओतू शकेल.

तुम्हाला कोंडल्यासारखे, मर्यादित असे जे काही जाणवत आहे ते तुमचे शारीरिक मन (physical mind) आहे; उपरोक्त व्यापक चेतना आणि हा प्रकाश खाली अवतरला आणि त्याने तुमच्या प्रकृतीचा ताबा घेतला तरच, हे मन व्यापक होऊ शकते. तुमच्या देहप्रणालीमध्ये जेव्हा वरून सामर्थ्य अवतरेल तेव्हाच, तुम्हाला ज्याचा त्रास होत आहे ते शारीरिक जडत्व कमी होऊन नाहीसे होण्याची शक्यता आहे.

अविचल राहा, स्वतःला खुले करा आणि स्थिरता व शांती दृढ करण्यासाठी, चेतना व्यापक करण्यासाठी दिव्य शक्तीला आवाहन करा. सद्यस्थितीत जेवढे ग्रहण करण्याची तसेच आत्मसात करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे तेवढा प्रकाश व तेवढी शक्ती लाभावी यासाठी दिव्य शक्तीला आवाहन करा. तुम्ही उतावीळ होणार नाही याची काळजी घ्या, कारण त्यामुळे, तुमच्या प्राणिक प्रकृतीमध्ये अगोदरच प्रस्थापित झालेल्या अविचलता आणि समतोल या गोष्टींना पुन्हा धक्का लागण्याची शक्यता आहे. अंतिम परिणामाबाबत विश्वातस बाळगा आणि त्या दिव्य शक्तीला तिचे कार्य करू देण्यास पुरेसा अवधी द्या.

श्रीअरविंद (CWSA 29 : 124-125)

सर्व परिस्थितीमध्ये, अस्तित्वाच्या सर्व भागांमध्ये समता आणि शांती असणे हा योगस्थितीचा पहिला मुख्य आधार आहे. (तो दृढ झाला की मग) व्यक्तीचा कल जसा असेल त्यानुसार मग एकतर (ज्ञानासहित) प्रकाश येईल किंवा (सामर्थ्य आणि अनेक प्रकारची गतिमानता घेऊन) शक्ती अवतरेल किंवा (प्रेम आणि अस्तित्वाचा मोद घेऊन) आनंद येईल. परंतु पहिली आवश्यक स्थिती म्हणजे शांती! तिच्याविना (उपरोक्त) कोणतीच गोष्ट स्थिर होऊ शकत नाही.

श्रीअरविंद (CWSA 29 : 123)

अविचलता (quietude) कायम ठेवा आणि ती काही काळासाठी रिक्त असली तरी काळजी करू नका. चेतना ही बरेचदा एखाद्या पात्रासारखी असते, त्यामधील मिश्रित आणि अनिष्ट गोष्टी काढून ते पात्र रिकामे करावे लागते; योग्य आणि विशुद्ध गोष्टींनी ते पात्र भरले जाईपर्यंत, काही काळासाठी ते पात्र तसेच रिकामे ठेवावे लागते. ते पात्र जुन्याच गढूळ गोष्टींमुळे पुन्हा भरले जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

त्या दरम्यानच्या कालावधीत थोडे थांबा, वाट पाहा, ऊर्ध्व दिशेस स्वतःला खुले करा. शांती (peace) ही निश्चल-निरवतेमध्ये (silence) परिणत व्हावी म्हणून, अतिशय अविचलपणे आणि स्थिरपणे आवाहन करा, त्यामध्ये अस्वस्थ आतुरता असता कामा नये. आणि शांती निश्चल-निरवतेमध्ये परिणत झाली की मग, आनंद आणि ईश्वरी उपस्थितीसाठी आवाहन करा.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 145)