Posts

साधना, योग आणि रूपांतरण – २२९

इच्छा, राजसिकता आणि अहंकार यांना दिलेल्या नकारामुळे व्यक्तीला अशी अचंचलता आणि शुद्धता प्राप्त होते की, ज्यामध्ये अनिर्वचनीय ‘शांती’ अवतरू शकते. व्यक्तीने स्वतःची इच्छा ‘ईश्वरा’प्रत अर्पण केली, तिने स्वतःची इच्छा ही ‘ईश्वरी ‘संकल्पा’मध्ये मेळविली (merging) तर व्यक्तीच्या अहंकाराचा अंत होतो आणि व्यक्तीला वैश्विक चेतनेमध्ये व्यापकता प्राप्त होते किंवा विश्वातीत असलेल्या गोष्टीमध्ये तिचे उन्नयन होते. व्यक्तीला ‘प्रकृती’पासून ‘पुरुषा’चे विलगीकरण अनुभवास येते आणि बाह्य प्रकृतीच्या बेड्यांपासून व्यक्तीची सुटका होते. व्यक्तीला तिच्या आंतरिक अस्तित्वाची जाणीव होते आणि बाह्यवर्ती अस्तित्व हे साधन असल्याचे जाणवते; ‘विश्वशक्ती’च व्यक्तीचे कार्य करत असल्याची आणि ‘आत्मा’ किंवा ‘पुरुष’ त्याकडे पाहात असल्याची किंवा तो साक्षी असून, मुक्त असल्याचे व्यक्तीला जाणवते. आपले कर्म हाती घेऊन, विश्व‘माता’ किंवा परम‘माता’च ते करत असल्याचे, किंवा हृदयापाठीमागून एक ‘दिव्य शक्ती’ त्या कर्माचे नियंत्रण करत आहे, किंवा ते कर्म करत आहे, असे व्यक्तीला जाणवते.

व्यक्तीने स्वतःची इच्छा आणि कर्म अशा रीतीने सतत ‘ईश्वरा’प्रत निवेदित केली तर, प्रेम आणि भक्ती वृद्धिंगत होते, चैत्य पुरुष पुढे येतो. ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ‘शक्ती’प्रत निवेदन केल्यामुळे, ती शक्ती आपल्या ऊर्ध्वस्थित असल्याचा अनुभव आपल्याला येऊ शकतो. आणि तिच्या अवतरणाची आणि उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या चेतनेप्रत व ज्ञानाप्रत आपण उन्मुख होत आहोत अशी जाणीव आपल्याला होऊ शकते.

सरतेशेवटी कर्म, भक्ती आणि ज्ञान एकत्रित येतात आणि आत्मपरिपूर्णत्व शक्य होते; त्यालाच आम्ही ‘प्रकृतीचे रूपांतरण’ असे संबोधतो. अर्थातच हे परिणाम काही एकाएकी होत नाहीत, व्यक्तीची परिस्थिती आणि तिचा विकास यांनुसार, ते कमीअधिक धीमेपणाने, कमीअधिक समग्रतेने दिसून येतात.

ईश्वरी साक्षात्कारासाठी कोणताही सोपा राजमार्ग नाही. सर्वंकष आध्यात्मिक जीवनासाठी ‘गीता’प्रणीत ‘कर्मयोग’ मी अशा रीतीने विकसित केला आहे. तो कोणत्याही अनुमानावर आणि तर्कावर आधारलेला नाही तर, तो अनुभूतीवर आधारलेला आहे. त्यामधून ध्यान वगळण्यात आलेले नाही आणि त्यातून भक्तीदेखील नक्कीच वगळण्यात आलेली नाही. कारण ‘ईश्वरा’प्रत आत्मार्पण, ‘ईश्वरा’प्रत स्वतःच्या सर्वस्वाचे निवेदन हा जो ‘कर्मयोगा’चा गाभा आहे, तोच मूलतः भक्तीचा देखील एक मार्ग आहे.

एवढेच की, जीवनापासून पलायन करू पाहणाऱ्या एकांतिक अशा ध्यानाला तसेच, स्वतःच्याच आंतरिक स्वप्नामध्ये बंदिस्त होऊन राहणाऱ्या भावनाप्रधान भक्तीला मात्र पूर्णयोगाची समग्र प्रक्रिया म्हणून स्वीकारण्यात आलेले नाही. एखादी व्यक्ती तास न् तास ध्यानामध्ये पूर्णपणे गढून जात असेल किंवा आंतरिक अविचल आराधना आणि परमानंदामध्ये तास न् तास निमग्न होत असेल, तरीसुद्धा या गोष्टी म्हणजे समग्र पूर्णयोग नव्हे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 216-218)

साधना, योग आणि रूपांतरण – २१८

उत्तरार्ध

योगसाधना करताना पुष्कळजण मन, प्राण, शरीरात स्थित असतात, अधूनमधून अथवा काही प्रमाणात उच्च मनाने आणि प्रदीप्त मनाने उजळून जातात. पण ‘अतिमानसिक परिवर्तना’च्या (supramental change) तयारीसाठी, ‘अंतर्ज्ञान’ (Intuition) आणि ‘अधिमानस’ (Overmind) यांप्रत (शक्य तितक्या लवकर, व्यक्तिश: तशी वेळ येताच) उन्मुख होणे आवश्यक असते. कारण त्यामुळे समग्र अस्तित्व आणि समग्र प्रकृती अतिमानसिक परिवर्तनासाठी सुसज्ज बनवता येऊ शकेल. शांतपणे विकसित होण्यासाठी व विशाल होण्यासाठी चेतनेला मुभा द्या आणि मग हळूहळू या गोष्टींचे ज्ञान होत जाईल.

शांती, विवेक, अलिप्तता (पण उदासीनता किंवा अनुत्साह नव्हे) या बाबी फार महत्त्वाच्या आहेत, कारण त्यांच्या विरोधी असणाऱ्या गोष्टी रूपांतर-क्रियेत खूपच अडथळा निर्माण करतात. अभीप्सेची उत्कटता असली पाहिजे पण ती शांती, विवेक, अलिप्तता या सर्वांच्या बरोबरीने असायला हवी. घाई नको, आळस नको, राजसिक अति-उत्कंठा नको आणि तामसिक नाउमेदीचा हतोत्साहदेखील नको. तर स्थिर आणि सातत्यपूर्ण पण शांत आवाहन व कार्य हवे. साक्षात्कार झालाच पाहिजे असा अट्टाहास असता कामा नये, तर अंतरंगातून आणि वरून येण्यास त्याला मुभा दिली पाहिजे. त्याचे क्षेत्र, त्याचे स्वरूप, त्याच्या मर्यादा यांचे अचूक निरीक्षण केले पाहिजे. श्रीमाताजींची शक्ती तुमच्यात कार्य करू दे, मात्र त्यामध्ये कोणत्याही निम्न गोष्टींची मिसळण होऊ नये यासाठी सावध राहा. पुष्ट झालेल्या अहंभावाच्या कृती किंवा सत्याचा वेश धारण केलेली अज्ञानाची शक्ती या गोष्टी तर तिची जागा घेत नाही ना याची काळजी घ्या. विशेषत: प्रकृतीमधील सर्व अंधकार आणि अचेतनता यांचा निरास होवो अशी अभीप्सा बाळगा. अतिमानसिक परिवर्तनाच्या तयारीसाठी आवश्यक असणाऱ्या या मुख्य अटी आहेत; पण त्यांपैकी एकही गोष्ट सोपी नाही, आणि प्रकृती सज्ज झाली आहे असे म्हणण्यासाठी, त्यापूर्वी या अटींची परिपूर्ती होणे आवश्यक असते.

जर योग्य दृष्टिकोन प्रस्थापित करता आला (आत्मिक, निरहंकारी आणि केवळ दिव्य शक्तीलाच उन्मुख असणारी वृत्ती) प्रस्थापित करता आली तर ही प्रक्रिया पुष्कळ जलद गतीने होऊ शकते. योग्य वृत्ती स्वीकारणे आणि ती टिकवून ठेवणे, तसेच पुढे जाऊन स्वत:मध्ये बदल घडविणे अशा प्रकारचा हातभार तुम्ही लावू शकता. सर्वसाधारण बदल घडून येण्यासाठी साहाय्यकारी ठरेल अशी ही एक गोष्ट आहे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 333-334)

साधना, योग आणि रूपांतरण – १८९

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०५

ऊर्ध्वगामी उन्मुखता (upward opening) ही अपरिहार्यपणे फक्त शांती, नीरवता आणि ‘निर्वाणा’कडेच घेऊन जाते असे नाही. साधकाला आपल्या वरच्या दिशेस, जणूकाही आपल्या मस्तकाच्या वरच्या बाजूस असणाऱ्या व्यापकतेची आणि सर्व भौतिक व अतिभौतिक प्रदेश व्यापून टाकणाऱ्या एका महान, अंतिमत: एक प्रकारच्या अनंत शांतीची, नीरवतेचीच जाणीव होते असे नाही तर, त्याला इतर गोष्टींचीही जाणीव होते. सर्व ऊर्जा ज्यामध्ये सामावलेली असते अशा एका महान ‘शक्ती’ची, सर्व ज्ञान ज्यामध्ये सामावलेले असते अशा एका महा‘प्रकाशा’ची, सर्व आनंद आणि हर्ष ज्यामध्ये सामावलेला असतो अशा एका अपार ‘आनंदा’ची साधकाला जाणीव होते. सुरूवातीला या गोष्टी अनिवार्य आवश्यक, अनिश्चित, निरपवाद, साध्या, केवल अशा स्वरूपात त्याच्या समोर येतात. निर्वाणामध्ये उपरोक्त साऱ्या गोष्टी शक्य असल्याचे त्याला वाटते.

परंतु पुढे त्याला हेही आढळते की, या ‘दिव्य शक्ती’मध्ये अन्य शक्ती सामावलेल्या आहेत, या ‘दिव्य प्रकाशा’मध्ये अन्य सारे प्रकाश, या ‘दिव्य आनंदा’मध्ये शक्य असणारे सारे हर्ष आणि आनंद सामावलेले आहेत. आणि या साऱ्या गोष्टी आपल्यामध्येही अवतरित होऊ शकतात, हेही त्याला उमगू लागते. फक्त शांतीच नव्हे तर यांपैकी कोणतीही एक किंवा सर्व गोष्टी अवतरित होऊ शकतात. एवढेच की परिपूर्ण स्थिरता आणि शांती यांचे अवतरण घडवणे हे सर्वाधिक सुरक्षित असते कारण त्यामुळे इतर सर्व गोष्टींचे अवतरण हे अधिक निर्धोक होते. अन्यथा, बाह्य प्रकृतीला एवढी ‘शक्ती’, ‘प्रकाश’, ‘ज्ञान’ किंवा ‘आनंद’ धारण करणे किंवा तो पेलणे अवघड जाऊ शकते. आपण जिला ‘उच्चतर, आध्यात्मिक किंवा दिव्य चेतना’ असे म्हणतो, तिच्यामध्ये वरील सर्व गोष्टींचा अंतर्भाव होतो.

हृदय-चक्राच्या माध्यमातून येणारा आंतरात्मिक खुलेपणा (Psychic opening) आपल्याला मूलतः व्यक्तिगत ‘ईश्वरा’च्या, आपल्याशी असलेल्या ‘ईश्वरा’च्या आंतरिक नात्याच्या संपर्कात आणतो. हा विशेषतः प्रेम आणि भक्तीचा मूलस्रोत असतो. ऊर्ध्वमुखी उन्मुखता (Upward opening) थेटपणे आपले नाते समग्र ‘ईश्वरा’शी जोडून देते आणि ती उन्मुखता आपल्यामध्ये दिव्य चेतना निर्माण करू शकते, ती आपल्या आत्म्याचे एक किंवा अनेक नवजन्म घडवून आणू शकते. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 326-327)

साधना, योग आणि रूपांतरण – ७३

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)
चेतना अंतरंगामध्ये प्रविष्ट झाल्याचा तुम्हाला आलेला हा अनुभव म्हणजे ज्याला सामान्यत: ‘समाधी’ असे संबोधले जाते तो अनुभव होता. वास्तविक त्यातील सर्वाधिक महत्त्वाचा भाग म्हणजे मन आणि प्राणामध्ये (तुम्हाला) आलेला निश्चल-नीरवतेचा अनुभव, की जी नीरवता अगदी शरीरापर्यंत पूर्णपणे विस्तारित झाली होती.

निश्चल-नीरवतेची (silence) आणि शांतीची (peace) क्षमता प्राप्त होणे ही साधनेमधील सर्वाधिक महत्त्वाची पायरी असते. ती प्रथमतः ध्यानामध्ये प्राप्त होते आणि ती निश्चल-नीरवता चेतनेस अंतर्मुख करून, तिला समाधी-अवस्थेकडे नेण्याची शक्यता असते. परंतु नंतर ही क्षमता जाग्रतावस्थेमध्ये सुद्धा प्राप्त होणे आवश्यक असते आणि समग्र जीवन व कार्य यासाठी तिने एक स्थायी पाया म्हणून स्वतःला प्रस्थापित करणे आवश्यक असते. ही स्थिती ‘आत्म’साक्षात्कारासाठी आणि प्रकृतीच्या आध्यात्मिक रूपांतरणासाठी आवश्यक असते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 248)

साधना, योग आणि रूपांतरण – ५५

किरकोळ बारीकसारीक विचार मनामध्ये सातत्याने घोळत राहणे हे यांत्रिक मनाचे स्वरूप असते, मनाची संवेदनशीलता हे त्याचे कारण नसते. तुमच्या मनाचे इतर भाग हे अधिक शांत आणि नियंत्रणाखाली आले आहेत, आणि त्यामुळेच यांत्रिक मनाची ही खळबळ तुम्हाला अधिक ठळकपणे लक्षात येत आहे आणि ती मनाचा अधिकांश प्रदेशदेखील व्याप्त करत आहे. तुम्ही त्यांना सातत्याने नकार देत गेलात तर ते विचार सहसा आपोआप निघून जातात.

*

यांत्रिक मनाच्या मनोव्यापारापासून स्वतःला विलग करता येणे ही पहिली आवश्यक गोष्ट आहे. तसे करता आले तर यांत्रिक मनाचे ते किरकोळ विचार जणू रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या गोंगाटाप्रमाणे वाटू लागतील आणि मग तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू शकाल. आणि मग ते विचार पुन्हापुन्हा जरी मनात उद्भवत राहिले तरी आता मनाची अविचलता आणि शांती न ढळता तशीच कायम राहू शकेल. वरून शांती आणि निश्चल-नीरवता या गोष्टी अवतरित होत राहिल्या तर त्या बहुतेक वेळी इतक्या प्रबळ होतात की, कालांतराने त्या शारीर-मनावर नियंत्रण मिळवितात.

*

कदाचित तुम्ही या यंत्रवत विचारांकडे फारच लक्ष देत आहात. यंत्रवत चाललेल्या त्या कृतीकडे दुर्लक्ष करून तिला तशीच पुढे निघून जाऊ देणे आणि एकाग्रता साधणे हे सहज शक्य असते.

*

बाह्यवर्ती अस्तित्वामध्ये अंतरात्म्याचा प्रभाव जसजसा अधिकाधिक विस्तारत जाईल तसतशा अवचेतन मनाच्या यंत्रवत गतिविधी शांत होत जातील. हा सर्वोत्तम मार्ग आहे. मन शांत करण्यासाठी थेट प्रयत्न करणे ही काहीशी अवघड पद्धत आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 314), (CWSA 29 : 314-315), (CWSA 29 : 315), (CWSA 29 : 315)

साधना, योग आणि रूपांतरण – ४५

सुरुवाती सुरुवातीला एकाग्रता करण्यासाठी, ध्यानाला बसण्यासाठी स्थिरता आणि शांतीपूर्ण अवस्था असणेच आवश्यक असते हे अगदी स्वाभाविक आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही ध्यानाला बसता तेव्हा अशी अवस्था असणे आणि ध्यान करण्याची तुम्हाला आवश्यकता वाटणे ही गोष्ट महत्त्वाची असते. परंतु अन्य वेळी मात्र त्याचा परिणाम म्हणून सुरुवातीला फक्त एक प्रकारची मानसिक अविचलता आणि विचारांपासून मुक्तता अनुभवास येईल.

कालांतराने शांतीपूर्ण अवस्था ही आंतरिक अस्तित्वामध्ये काहीशी स्थिर झालेली असते (कारण तुम्ही एकाग्रता करता तेव्हा आंतरिक अस्तित्वामध्येच प्रवेश करत असता,) तेव्हा मग ती शांतीपूर्ण अवस्था तिथून बाह्य व्यक्तित्वामध्ये येऊ लागते आणि बाह्य व्यक्तित्वाचे नियंत्रण करू लागते. आणि त्यामुळे तुम्ही काम करत असताना, इतरांबरोबर मिळूनमिसळून वागत असताना, बोलत असताना किंवा इतर व्यवहार करत असतानासुद्धा ती शांती आणि स्थिरता कायम राहते. कारण तेव्हा बाह्यवर्ती चेतना काहीही करत असली तरी आंतरिक अस्तित्व अंतरंगामध्ये स्थिरशांत असल्याचे व्यक्तीला जाणवते. खरोखर आपले आंतरिक अस्तित्व हेच आपले खरे अस्तित्व आहे आणि बाह्यवर्ती अस्तित्व हे काहीसे पृष्ठवर्ती, वरवरचे अस्तित्व आहे आणि त्याच्या माध्यमातून आंतरिक अस्तित्वच या जीवनामध्ये कार्य करत आहे असे व्यक्तीला जाणवते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 313)

विचारशलाका १४

असे पाहा की, जगाच्या सध्याच्या अवस्थेमध्ये परिस्थिती नेहमीच कठीण असते. संपूर्ण जग संघर्ष व कलहाच्या स्थितीत आहे; प्रकट होऊ पाहणाऱ्या सत्य व प्रकाश यांच्या शक्ती आणि (दुसरीकडे) त्यांना विरोध करणाऱ्या अशा सर्व शक्ती की, ज्या बदलू इच्छित नाही, ज्या हटवादी झालेल्या आणि जाण्यास नकार देणाऱ्या भूतकाळातील भागाचे प्रतिनिधित्व करतात, यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे. स्वाभाविकपणेच, प्रत्येक व्यक्तीला तशाच प्रकारच्या अडथळ्यांना सामोरे जावे लागते आणि तिला स्वत:ला स्वत:च्या अडचणी जाणवत असतात.

तुमच्याकरता केवळ एकच मार्ग आहे. तो म्हणजे समग्र, संपूर्ण विनाशर्त समर्पण. म्हणजे तुमच्या कृती, तुमची कर्मे, तुमच्या आशा-आकांक्षा यांचे समर्पण तर करायचेच, पण त्याचबरोबर तुमच्या भावभावनांचेसुद्धा समर्पण करायचे, म्हणजे तुम्ही जे काही करता, तुम्ही जे काही आहात ते ते सारे केवळ ‘ईश्वरा’साठीच असले पाहिजे, असे मला म्हणायचे आहे. आणि असे केल्यामुळे, तुमच्या सभोवती असणाऱ्या मानवी प्रतिक्रियांच्या तुम्ही अतीत झाला असल्याचे तुम्हाला जाणवते – केवळ अतीत झाल्याचेच जाणवते असे नव्हे तर, ‘ईश्वरी कृपे’च्या तटबंदीमुळे त्या मानवी प्रतिक्रियांपासून तुमचे संरक्षण होत असल्याचेही तुम्हाला जाणवते.

एकदा का तुमच्यामधील इच्छा नाहीशा झाल्या, आसक्ती उरली नाही, मनुष्यमात्रांकडून – मग ते कोणीही असोत – कोणत्याही प्रकारचे बक्षीस मिळावे ही अपेक्षा तुम्ही सोडून दिलीत आणि ‘ईश्वरा’कडून मिळणारी व कधीही व्यर्थ न जाणारी बक्षिसी हीच एकमेव मिळविण्यासारखी गोष्ट आहे हे तुम्हाला समजले – एकदा का तुम्ही सर्व बाह्य व्यक्ती व वस्तू यांविषयीची आसक्ती सोडून दिलीत की मग ‘ईश्वरा’ची ‘उपस्थिती’, त्याची ‘शक्ती’, तुमच्या सोबत सदैव असणारी त्याची ‘कृपा’ तुम्हाला तुमच्या हृदयात लगेचच जाणवू लागते.

आणि दुसरा काहीच उपाय नाही. प्रत्येकासाठी अगदी निरपवादपणे हाच एकमेव उपाय आहे. जे जे कोणी दु:ख भोगतात त्यांना एकच गोष्ट सांगितली पाहिजे की, दु:ख असणे हे ‘समर्पण’ परिपूर्ण नसल्याचे चिन्ह आहे. त्यानंतर पुढे जेव्हा कधी तुम्हाला तुमच्यामध्ये एखादा ‘आघात’ जाणवतो तेव्हा त्यावेळी मग “छे! किती वाईट आहे हे” किंवा परिस्थिती किती कठीण आहे” असे तुम्ही म्हणत नाही. तर आता तुम्ही म्हणता, “माझेच समर्पण अजून परिपूर्ण झालेले नसेल.” आणि मग तुम्हाला ती ‘ईश्वरी कृपा’ जाणवते, जी तुम्हाला मदत करते, मार्गदर्शन करते आणि तुम्ही प्रगत होऊ लागता. आणि एक दिवस तुम्ही अशा शांतीमध्ये प्रवेश करता जी कशानेही क्षुब्ध होऊ शकणार नाही. सर्व विरोधी शक्तींना, विरोधी क्रियांना, आक्रमणांना, गैरसमजुतींना, दुर्वासनांना तुम्ही अशा स्मितहास्याने उत्तर देता जे ‘ईश्वरी कृपे’वरील पूर्ण विश्वासाने येत असते आणि तोच एक बाहेर पडण्याचा मार्ग आहे, दुसरा मार्गच नाही.

हे जग संघर्ष, दु:खभोग, अडचणी, ताणतणाव यांनी बनलेले आहे. ते अजूनही बदललेले नाही, ते बदलण्यासाठी काही काळ लागेल. पण प्रत्येकामध्ये या सगळ्यातून बाहेर पडण्याची क्षमता असते. तुम्ही जर ‘परमोच्च कृपे’च्या अस्तित्वावर विसंबून राहिलात, तर तोच केवळ एकमेव मार्ग आहे.

– श्रीमाताजी [CWM 15 : 398-399]

आंतरिक आधार शोधण्यासाठी व्यक्तीने, आपल्या आंतरिक अस्तित्वाच्या अत्यंत सखोल गुहेमध्ये बुडी मारली पाहिजे; व्यक्तीने आत अधिक आत, खोल, अधिक खोल उतरले पाहिजे. मनावर उमटलेले सारे ठसे बाजूला सारून, अक्षुब्ध, अविचल शांतीच्या शोधात, एका स्तरानंतर दुसऱ्या स्तरावर, एका चेतनेनंतर दुसऱ्या चेतनेकडे, असे अगदी खोल गाभ्यातच प्रविष्ट झाले पाहिजे. अस्तित्वाच्या या अतीव अचंचलतेमध्ये (quietude), साऱ्या बाह्य गोंगाटापासून दूर, साऱ्या दुःखयातनांपासून दूर, विचार, कल्पनांपासून दूर, साऱ्या संवेदनांपासून अगदी दूर जात, जिथे अहंकार अस्तित्वातच नसतो अशा स्थानी, ईश्वराचे ‘अस्तित्व’ अनुभवण्यासाठी व्यक्तीने अगदी काळजीपूर्वकपणे अंतरंगामध्ये प्रविष्ट झालेच पाहिजे.

तेथूनही अजून पुढे जावे लागते, शोध घेण्यासारखे बरेच काही शिल्लक असते, जेथे सर्व-शक्तिमान, सर्व-सिद्धिदायिनी ईश्वरी ‘शक्ती’ स्पंदित होत असते, त्या शक्तीकडे चेतना अभिमुख करणे आवश्यक असते. जिथे कोणतीही कृती शिल्लक राहात नाही, कोणताही ठसा उमटलेला नाही, अहंकार नाही, स्वतंत्र अस्तित्व शिल्लक नाही, अन्य काहीही नाही तर फक्त आनंदलहरी आहेत, आणि ज्या ठायी एक परिपूर्ण समत्व असते असे एक स्पंदन; असे एक स्पंदन की जे साऱ्याचे उगमस्थान असते, तिथपर्यंत व्यक्तीने खोल खोल गेले पाहिजे. या परिपूर्ण आणि अक्षर, अविकारी शांतीमध्ये एकात्म पावले पाहिजे, ते ऐक्य अनुभवले पाहिजे…

-श्रीमाताजी [The Supreme by Mona Sarkar]

आंतरिक शांतीचा आधार असतो समता. बाह्य गोष्टींचे हल्ले आणि बाह्य गोष्टींची विविध रूपे, मग ती सुखद असोत वा दुःखद, दुर्भाग्यपूर्ण असोत किंवा सौभाग्यपूर्ण, आनंददायी असोत वा वेदनादायी, मानसन्मानाचे असोत किंवा अपकीर्तीचे, स्तुती असो वा निंदा, मैत्री असो वा शत्रुत्व, पापी असो वा संत, आणि भौतिकदृष्ट्या उष्ण असोत वा शीत असोत इत्यादी सर्व गोष्टींना स्थिर आणि समतायुक्त मनाने स्वीकारण्याची क्षमता म्हणजे समता.

– श्रीअरविंद
(CWSA 10-11 : 03)

कर्म आराधना – ११

प्रश्न : साधना आणि मनाच्या शांतीसाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

श्रीमाताजी : १) कर्म हे साधना म्हणून करा. तुमच्या सर्वोच्च क्षमतेनिशी तुम्ही जे कर्म केले असेल, ते ‘ईश्वरा’ला अर्पण करा आणि कर्मफल ‘ईश्वरा’वर सोपवा.

२) तुमचा मेंदू शक्य तेवढा शांत ठेवून, तुमच्या मस्तकाच्या ऊर्ध्वदिशेस सचेत होण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर यामध्ये यशस्वी झालात आणि त्याच अवस्थेमध्ये कर्म केलेत तर, ते कर्म परिपूर्ण होईल.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 301)