Posts

साधना, योग आणि रूपांतरण – २४७

मनाचे रूपांतरण

शारीर-मन (physical mind) सर्व तऱ्हेचे प्रश्न उपस्थित करत राहते आणि त्याला योग्य उत्तर समजू शकत नाही किंवा ते योग्य उत्तर देऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या या छोट्याशा शारीर-मनाच्या आधारे शंका-कुशंका घेणे, प्रश्न उपस्थित करणे बंद केलेत आणि तुमच्या अंतरंगामध्ये असलेल्या सखोल व व्यापक चेतनेला बाहेर येण्यास आणि तिचा विकास करण्यास वाव दिलात तरच तुम्हाला खरे ज्ञान मिळू शकेल आणि योग्य आकलन होऊ शकेल. त्यानंतर तुम्हाला आपोआपच खरे उत्तर आणि खरे मार्गदर्शन मिळेल. या आंतरिक चेतनेच्या विकसनाकडे लक्ष पुरविण्याऐवजी तुम्ही तुमच्या बाह्यवर्ती मनाला आणि त्याच्या कल्पनांना, त्याच्या आकलनाला अवाजवी महत्त्व देत आहात, तुमच्याकडून ही चूक होत आहे.
*
शारीर-मनाचे स्वरूपच असे असते की ते अतिभौतिक (supraphysical) गोष्टींवर विश्वास ठेवत नाही किंवा तशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टींचा स्वीकार करत नाही. शारीर-मन जोपर्यंत (उच्चतर ज्ञान-प्रकाशाने) उजळून निघत नाही आणि तो प्रकाशच त्याला अतिभौतिक गोष्टींवर विश्वास ठेवण्यास भाग पाडत नाही तोपर्यंत ते विश्वास ठेवत नाही. या शारीर-मनाशी तुम्ही स्वतःला एकरूप करू नका किंवा हे शारीर-मन म्हणजेच तुम्ही आहात असेही समजू नका, तर ते मन म्हणजे ‘प्रकृती’च्या अंधकारमय कार्यप्रणालीचा एक भाग आहे असे समजा. आणि या मनाला त्या अतिभौतिक गोष्टींवर विश्वास ठेवणे भाग पाडले जात नाही तोपर्यंत शारीर-मनामध्ये प्रकाश अवतरित व्हावा यासाठी आवाहन करत राहा.
*
शारीर-मनाला अंतरात्म्याकडून (psychic) गोष्टींकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन व योग्य मार्ग मिळाल्यामुळे, शारीर-मनावर अंतरात्म्याचा प्रचंड प्रभाव पडू शकतो. आणि त्यामुळे शारीर-मन भावनिक अस्तित्वाला त्याच्या अभीप्सेमध्ये, प्रेमामध्ये आणि समर्पणामध्ये आधार पुरवते. गोष्टींच्या फक्त बाह्य पैलूंकडे बघण्याऐवजी, आणि त्यांच्या मिथ्या अनुमानांवर आणि वरकरणी दृश्यांवर विसंबून राहण्याऐवजी आता शारीर-मनाला स्वतःलाच गोष्टींच्या आंतरिक सत्यामध्ये स्वारस्य वाटू लागते, त्या आंतरिक सत्यामधून त्याला त्याविषयीची अंतर्दृष्टी प्राप्त होते आणि त्याची श्रद्धा वाढीस लागते. संकुचितपणा आणि शंका हे शारीर-मनाचे जे मुख्य दोष असतात, त्यांच्यापासून सोडवणूक करण्यासाठीसुद्धा शारीर-मनाला अंतरात्म्याचे साहाय्य लाभते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 52, 35, 38)

अमृतवर्षा २१

व्यक्तीमध्ये श्रद्धा नसेल तर तिला प्रार्थना करणे अवघड जाते. परंतु स्वत:ची श्रद्धा वाढविण्याचेच एक साधन म्हणून व्यक्ती प्रार्थना करू शकली तर…. किंवा श्रद्धा निर्माण व्हावी अशी अभीप्सा ती बाळगू शकली तर… यापैकी बहुतांशी सगळ्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता असते.

व्यक्तीकडे एखादी गोष्ट नसेल आणि ती व्यक्तीला हवी असेल, तर त्यासाठी अतिशय सातत्यपूर्ण प्रयत्नांची, सातत्याने आस बाळगण्याची, दृढ संकल्पाची आणि प्रत्येक क्षणी प्रामाणिक राहण्याची नितांत आवश्यकता असते. तेव्हा मग एक ना एक दिवस, ती गोष्ट घडून येईल अशी खात्री व्यक्तीला बाळगता येईल – कधीकधी ती गोष्ट अगदी क्षणार्धातदेखील घडून येऊ शकते.

अशी काही माणसं असतात की, त्यांच्यापाशी श्रद्धा असते पण अशा काही वेळा असतात की, जेव्हा त्यांच्यामध्ये असणारी विरोधी स्पंदनं (पृष्ठभागावर) येतात आणि त्यांच्यावर हल्ला करतात. (परंतु) जर त्यांची इच्छा प्रामाणिक असेल तर अशी माणसं या हल्ल्यांपासून त्यांच्या श्रद्धेचा बचाव करू शकतात, अशा हल्ल्यांना परतवून लावू शकतात.

काही जण असे असतात की, जे शंका जोपासतात कारण त्यामध्ये त्यांना एक प्रकारची मजा वाटते – परंतु त्याच्या इतके भयानक दुसरे काही नाही. असे करणे म्हणजे किटकाला फळामध्ये खुशाल राहू देण्यासारखे आहे, त्याची परिणती ते फळ संपून जाण्यात होणार. अशा प्रकारचे कोणतेही स्पंदन हे सहसा प्रथम मनात निर्माण होते – अशा वेळी व्यक्तीने पहिली कोणती गोष्ट केली पाहिजे तर, ती म्हणजे तिने ठाम राहिले पाहिजे आणि त्या शंकेला नकार दिला पाहिजे. आता काय घडते ते पाहू या, असे म्हणून त्याकडे पाहत राहणे टाळले पाहिजे कारण अशा प्रकारचे कुतूहल हे अतिशय घातक असते.

जे सरळ, साधे आहेत, प्रांजळ आहेत, सरळमार्गी आहेत, कोणतीही बौद्धिक जटिलता ज्यांच्यामध्ये नाही अशा माणसांपेक्षा बुद्धिवादी व्यक्तींना श्रद्धा बाळगणे हे कदाचित अधिक कठीण असते. परंतु मला वाटते, एखाद्या बुद्धिवादी माणसाकडे जर श्रद्धा असेल तर ती एक अतिशय शक्तिशाली गोष्ट ठरते, ज्यामधून चमत्कारदेखील घडून येऊ शकतात.

– श्रीमाताजी [CWM 06 : 121]

जर व्यक्ती विश्वासाने आणि खात्रीपूर्वक ईश्वराप्रत आत्मदान करेल तर ईश्वराकडून तिच्यासाठी सारे काही केले जाईल; पडदे हटवले जातील, आंतरिक चेतना जागृत केली जाईल, हृदय आणि प्रकृती शुद्ध केली जाईल.

हे व्यक्तीला अगदी एकदम पूर्णत्वाने जरी करता आले नाही तरी, व्यक्ती जेवढे ते अधिकाधिक करेल, तेवढ्या अधिकाधिक प्रमाणात तिला आंतरिक साहाय्य आणि मार्गदर्शन लाभत राहील आणि अंतरंगामध्ये ईश्वराचा संपर्क आणि त्याची अनुभूती चढती-वाढती राहील.

तुमच्यामधील शंका घेणारे मन कमी सक्रिय बनले आणि तुमच्या मध्ये विनम्रता व समर्पणाची इच्छा जर वाढीला लागली तर, हे घडून येणे निश्चितपणे शक्य आहे. त्यासाठी या व्यतिरिक्त, इतर कोणत्याच तपस्येची आणि सामर्थ्याची आवश्यकता नाही.

-श्रीअरविंद
(CWSA 29 : 69)