Posts

समर्पण – ४६

व्यक्तिगत प्रयत्न हे उत्तरोत्तर ‘दिव्य शक्ती’च्या क्रियेमध्ये रूपांतरित केले पाहिजेत. जर तुम्हाला दिव्य शक्तीची जाणीव होत असेल तर, तुमच्या प्रयत्नांना त्या दिव्य शक्तीने अधिकाधिक संचालित करावे, तिने ते प्रयत्न हाती घ्यावेत आणि (तिने ते प्रयत्न हाती घेतल्यानंतर,) ते प्रयत्न तुमचे न राहता, ते श्रीमाताजींचे व्हावेत यासाठी, त्या दिव्य शक्तीने त्या प्रयत्नांचे रूपांतर करावे म्हणून तिला आवाहन करा. तेव्हा तिथे एक प्रकारचे रूपांतरण घडेल, तुमच्या व्यक्तिगत आधारामध्ये (मन, प्राण, शरीर यांमध्ये) कार्यरत असणाऱ्या शक्ती हाती घेतल्या जातील; हे रूपांतरण एकाएकी पूर्णत्वाला जाणार नाही तर ते उत्तरोत्तर होत राहील. पण यासाठी आंतरात्मिक संतुलनाची आवश्यकता असते : दिव्य शक्ती म्हणजे काय, व्यक्तिगत प्रयत्नांचे घटक कोणते आणि कनिष्ठ वैश्विक शक्तींकडून त्यात कशी सरमिसळ होत गेली आहे, या गोष्टी अगदी अचूकपणाने पाहणारा विवेक विकसित झाला पाहिजे. आणि जोपर्यंत हे रूपांतरण पूर्णत्वाला पोहोचत नाही, – ज्याला नेहमीच दीर्घकाळ लागतो, – तोपर्यंत त्यासाठी नेहमीच व्यक्तिगत योगदान असणे आवश्यक असते; खऱ्या शक्तीला सातत्यपूर्ण अनुमती, आणि कोणत्याही कनिष्ठ सरमिसळीला सातत्यपूर्ण नकार या गोष्टी अत्यंत आवश्यक असतात.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 84-85)

समर्पण – २१

संयम सोडून देणे म्हणजे प्राणाच्या मुक्त क्रीडेला वाव देणे आणि त्याचाच अर्थ असा की, सर्व प्रकारच्या शक्तींना आत शिरकाव करण्यास मुभा देणे. जोपर्यंत अतिमानस चेतना ही अधिमानसापासून त्या खाली असणाऱ्या सर्व जीवांमधील सर्व गोष्टींचे नियंत्रण व भेदन करत नाही, तोवर शक्तींचा दुटप्पी खेळ सुरूच राहणार आणि प्रत्येक शक्ती, मूलतः कितीही दिव्य असली तरी, ती प्रकाशाच्या शक्तींकडूनही वापरली जाऊ शकते किंवा ती शक्ती मन आणि प्राणांच्या माध्यमातून जात असल्याने, तिच्यामध्ये अंधकाराच्या शक्तींकडूनही विक्षेप आणला जाऊ शकतो. जोपर्यंत संपूर्ण विजय प्राप्त केला जात नाही आणि जोपर्यंत चेतना रूपांतरित होत नाही तोपर्यंत दक्षता, विवेक, नियंत्रण या गोष्टी सोडून देता येऊ शकत नाहीत.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 119)

ज्ञानमार्ग हा, परमश्रेष्ठ एकमेवाद्वितीय असणाऱ्या आत्म्याचा साक्षात्कार हे आपले साध्य मानतो. साधक या मार्गात बुद्धीचा उपयोग करून ‘विचारा’च्या द्वारा ‘विवेका’कडे, वाटचाल करतो, सारासारविवेकाकडे वाटचाल करतो. ज्ञानमार्ग आमच्या नामरूपात्मक प्रकट अस्तित्वाचे वेगवेगळे घटक बारकाईने पाहून अलग करतो. ज्ञानमार्गी साधक या घटकांपैकी प्रत्येक घटक घेऊन, अमुक एक घटक म्हणजे आत्मा नव्हे, तमुक एक घटक म्हणजे आत्मा नव्हे, (नेति, नेति) याप्रमाणे प्रत्येक घटकाची आत्म्याशी एकरूपता नाकारतो व त्या सर्वांना आत्म्यापासून दूर करून, हे घटक प्रकृतीचे घटक आहेत, नामरूपात्मक प्रकृतीचे घटक आहेत, मायेची – नामरूपात्मक जाणिवेची निर्मिती आहे असे म्हणतो; त्यांना आत्म्यापासून निराळे करून एका सर्वसामान्य वर्गात घालतो; प्रकृति, माया असे सर्वसामान्य नाव देतो.

याप्रमाणे ज्ञानमार्गी साधक शुद्ध एकमेव परमश्रेष्ठ आत्म्याशी आपले एकत्व योग्य प्रकारे प्रस्थापित करू शकतो. हा आत्मा अविकारी, अविनाशी असून त्याच्या लक्षणांत कसलेही रूप, कसलीही घटना येत नाही. ज्ञानमार्गी साधक येथपर्यंत आल्यावर, सामान्यतः नामरूपात्मक जगाला आपल्या जाणिवेतून भ्रम समजून काढून टाकतो आणि सर्वश्रेष्ठ आत्म्यांत आपला वैयक्तिक आत्मा विलीन करून टाकतो, तो परत जगाच्या संसारात येत नाही.

तथापि, हें कैवल्य, केवल पूर्णत्व हा ज्ञानमार्गाचा एकमेव अथवा अटळ परिणाम नाही. साधक वैयक्तिक ध्येयाकडे कमी लक्ष देऊन मानवतेच्या हिताकडे, सर्वभूतांच्या हिताकडे अधिक लक्ष देत असेल, तर ज्ञानमार्गानें तो विश्वातीत तत्त्वात विलीन होऊ शकत असला तरी, आपल्या पराक्रमानें तो विश्वाचा संसार ईश्वराकरतां जिंकून घेईल. परमात्मा केवळ आपल्या स्वत:च्या अस्तित्वातच नव्हे, तर सर्व जीवाजीवांत आहे, तसेच जगाच्या नामरूपात्मक घटना ईश्वरी जाणिवेच्याच लीला आहेत, त्या या जाणिवेच्या खऱ्या स्वरूपाला सर्वस्वी परकीय नाहीत ही अनुभूति मात्र साधकाला मिळाली असली पाहिजे.

या अनुभूतीच्या बळावर ज्ञानाचे सर्व प्रकार, मग ते कितीहि लौकिक असोत, ते हातांत घेऊन त्यांना ईश्वरी जाणिवेच्या व्यापारांचे रूप देता येईल; आणि ज्ञानाचा एकमेव अद्वितीय विषय स्व-रूपाने कसा आहे व त्याच्या आकारांच्या व प्रतीकांच्या लीलेत कसा दिसतो हीहि अनुभूती येईल. ज्ञानमार्गाची या प्रकारची वाटचाल मानवी बुद्धीचे व प्रतीतीचे सर्व क्षेत्र उंचावून दिव्य करू शकेल, आध्यात्मिकता-संपन्न करू शकेल; आणि मानवता ज्ञानासाठी विश्वभर जो अतीव परिश्रम घेत आहे तो योग्यच आहे असे त्यायोगे ठरेल.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 38)