Posts

साधना, योग आणि रूपांतरण – ६७

नाउमेद न होता किंवा निराशेच्या गर्तेत जाऊन न पडता अडचणींवर मात करण्यासाठी, (तुम्हाला तुमच्यामध्ये असणाऱ्या) सातत्यपूर्ण उत्कट अभीप्सेचे आणि ईश्वराभिमुख झालेल्या अविचल आणि अढळ इच्छेचे साहाय्य लाभते. परंतु अडीअडचणी येतच राहतात कारण त्या मानवी प्रकृतीमध्येच अंतर्भूत असतात. आंतरिक अस्तित्वामध्ये (ईश्वरविषयक) ओढीचा एक प्रकारे अभाव जाणवत आहे, (त्या दृष्टीने) कोणतीच पावले पडत नाहीयेत असे वाटत राहणे, अशा प्रकारचे साधनेमधील विरामाचे कालावधी अगदी उत्तम साधकांबाबत सुद्धा असतात.

(तुमच्यामधील) भौतिक प्रकृतीमध्ये काही अडचण उद्भवली असेल तर तिचे निराकरण करण्यासाठी किंवा पडद्यामागे काही तयारी चाललेली असेल तर त्यासाठी किंवा तशाच काही कारणासाठी अशा प्रकारचे विरामाचे कालावधी येत असतात.

मन आणि प्राण, जे अधिक घडणसुलभ असतात, त्यांच्यामध्ये जेव्हा साधनेचे कार्य चालू असते तेव्हा अशा प्रकारचे कालावधी वारंवार येतात आणि जेथे शरीराचा प्रश्न असतो (साधना जेव्हा शारीर स्तरावर चालू असते तेव्हा) ते अनिवार्यपणे येतातच. आणि तेव्हा ते सहसा कोणत्याही दृश्य संघर्षाद्वारे दिसून येत नाहीत तर, पूर्वी ज्या ऊर्जा कार्यरत असायच्या त्या आता अचल आणि जड झाल्याचे जाणवणे (यामधून त्या विरामाच्या कालावधीची जाणीव होते.) मनाला ही गोष्ट फार त्रासदायक वाटते कारण आता सारेकाही संपले आहे, प्रगतीसाठी आपण अक्षम झालो आहोत, अपात्र ठरलो आहोत असे काहीसे त्याला वाटू लागते. परंतु वस्तुतः ते तसे नसते.

तुम्ही अविचल राहिले पाहिजे आणि (ईश्वरी शक्तीच्या) कार्याप्रति स्वतःला खुले करत गेले पाहिजे किंवा (किमान) तसे करण्याची इच्छा बाळगत राहिली पाहिजे. तसे केल्यास नंतर अधिक प्रगती घडून येईल. अशा कालावधीमध्ये बरेच साधक नैराश्यवृत्तीमध्ये जातात आणि त्यांची भावी (काळा) वरील श्रद्धाच ढळल्यासारखे होते आणि त्यामुळे पुनरूज्जीवनासाठी विलंब होतो, मात्र हे टाळले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 67)

साधना, योग आणि रूपांतरण – ६६

निश्चल-नीरव (silence) स्थितीमध्ये प्रवेश करणे ही सोपी गोष्ट नाही. मानसिक आणि प्राणिक गतिविधींना बाहेर फेकून दिल्यानेच ते शक्य होते. (मात्र) त्या नीरवतेला, त्या शांतीला तुमच्यामध्ये प्रविष्ट होण्यासाठी वाव देणे अधिक सोपे असते. म्हणजे तुम्ही स्वतःला उन्मुख करा, खुले करा आणि तिचे अवतरण होण्यासाठी तिला वाव द्या, हे सोपे असते. हे करणे आणि उच्चतर शक्तींनी अवतरित व्हावे म्हणून त्यांना आवाहन करणे या दोन्हीचा मार्ग समानच असतो. तो मार्ग असा की, ध्यानाच्या वेळी अविचल (quiet) राहायचे, मनाशी झगडा करायचा नाही किंवा ‘शांती’ची शक्ती खाली खेचण्यासाठी कोणताही मानसिक खटाटोप करायचा नाही तर, त्यांच्यासाठी (शांतीसाठी किंवा उच्चतर शक्तींनी अवतीर्ण व्हावे म्हणून) केवळ एक शांत आस, अभीप्सा बाळगायची.

मन जर सक्रिय असेल तर तुम्ही मागे सरून फक्त त्याच्याकडे पाहायला आणि त्याला अंतरंगामधून कोणतीही अनुमती न देण्यास शिकले पाहिजे. मनाच्या सवयीच्या किंवा यांत्रिक गतिविधींना अंतरंगामधून कोणताही आधार न मिळाल्यामुळे त्या हळूहळू गळून पडत नाहीत तोपर्यंत असे करत राहायचे. परंतु मनाच्या गतिविधी तरीही सुरूच राहिल्या तर कोणत्याही तणावाविना किंवा संघर्षाविना त्याला सातत्याने नकार देत राहणे ही एकच गोष्ट करत राहिली पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 36 : 300)

 

साधना, योग आणि रूपांतरण – ६५

मन निश्चल-नीरव करण्यासाठी, येणारा प्रत्येक विचार परतवून लावणे पुरेसे नसते, ती केवळ एक दुय्यम क्रिया असू शकते. तुम्ही सर्व विचारांपासून दोन पावले मागे सरले पाहिजे आणि विचार आलेच तर नीरव चेतना या भूमिकेतून त्यांचे निरीक्षण केले पाहिजे, मात्र स्वतःहून विचार करायचे नाहीत किंवा विचारांबरोबर एकरूप व्हायचे नाही अशा रीतीने त्या विचारांपासून स्वतःला अलग केले पाहिजे. विचार म्हणजे पूर्णपणे बाहेरच्या गोष्टी आहेत, असे तुम्हाला वाटले पाहिजे. तसे झाले तर मग, विचारांना नकार देणे किंवा मनाची अविचलता बिघडवू न देता त्यांना तसेच निघून जाऊ देणे, या गोष्टी सहजसोप्या होतील.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 335)

साधना, योग आणि रूपांतरण – ५६

ध्यानाला बसल्यावर मनामध्ये सर्व प्रकारचे विचार येऊन गर्दी करतात, ही जर तुमची अडचण असेल तर ती अडचण विरोधी शक्तींमुळे येत नाही, तर मानवी मनाच्या सर्वसाधारण प्रकृतीमुळे ती अडचण येते. सर्वच साधकांना ही अडचण येते आणि काहींच्या बाबतीत तर ती खूप दीर्घ काळपर्यंत टिकून राहते. त्यापासून सुटका करून घेण्याचे अनेक मार्ग आहेत. मनात जे विचार येतात त्यांच्याकडे पाहायचे, ते मानवी मनाच्या प्रकृतीचे जे दर्शन घडवीत असतात ते काय आहे याचे निरीक्षण करायचे पण त्या विचारांना कोणतीही अनुमती द्यायची नाही आणि ते अगदी निःस्तब्ध होत नाहीत तोवर त्यांना तसेच प्रवाहित होत राहू द्यायचे, हा एक मार्ग आहे. विवेकानंदांनी त्यांच्या ‘राजयोगा’मध्ये याच मार्गाची शिफारस केली आहे.

दुसरा मार्ग असा की, विचारांकडे ते आपले विचार आहेत असे समजून पाहायचे नाही, तर साक्षी पुरुषाप्रमाणे त्यांच्याकडे अलिप्त राहून पाहायचे आणि त्यांना अनुमती द्यायची नाही. हे विचार म्हणजे जणू काही बाहेरून, प्रकृतीकडून येणाऱ्या गोष्टी आहेत असे समजून त्यांच्याकडे पाहायचे. मनाचा प्रदेश ओलांडून पलीकडे जाणाऱ्या वाटसरूंप्रमाणे ते विचार आहेत अशी जाणीव मात्र तुम्हाला अवश्य झाली पाहिजे. ज्यांच्याशी तुमचा कोणताही संबंध असत नाही आणि ज्यांच्यामध्ये तुम्ही स्वारस्यही दाखवीत नाही अशा वाटसरुंप्रमाणे ते आहेत अशा रीतीने तुम्ही त्यांच्याकडे पाहिले पाहिजे.

अशा प्रकारे या मार्गाचा अवलंब केला असता, सहसा असे घडते की, कालांतराने मन दोन गोष्टींमध्ये विभागले जाते. मनाचा एक भाग म्हणजे प्रकृतीचा जो भाग असतो आणि जो निरीक्षणाचा विषय असतो, त्यामध्ये विचार इतस्ततः ये-जा करत असतात, भरकटत असतात. आणि दुसरा भाग, मनोमय साक्षी होऊन पाहत राहतो आणि तो पूर्णपणे अविचल व शांत असतो. कालांतराने मग तुम्ही निश्चल-नीरवतेकडे (silence) प्रगत होऊ शकता किंवा प्रकृतीच्या त्या भागालासुद्धा अविचल (quiet) करू शकता.

आणखी एक तिसरी पद्धतदेखील आहे. ती सक्रिय पद्धत आहे. यामध्ये विचार कोठून येत आहेत ते तुम्ही पाहायला सुरुवात करता आणि तुम्हाला असे आढळते की, ते विचार तुमच्यामधून येत नाहीयेत तर, ते विचार बाहेरून तुमच्या मस्तकामध्ये प्रवेश करत आहेत. अशा वेळी, म्हणजे तुम्हाला ते विचार आत येत असल्याचे लक्षात आले तर, त्यांनी आत प्रवेश करण्यापूर्वीच त्यांना पूर्णपणे बाजूला फेकून दिले पाहिजे.

कदाचित हा सर्वात कठीण मार्ग आहे आणि सर्वच त्याचा अवलंब करू शकतील असे नाही. पण जर या मार्गाचा अवलंब करता आला तर निश्चल-नीरवतेकडे घेऊन जाणारा तो सर्वात नजीकचा आणि परिणामकारक मार्ग आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 301-302)

विचारशलाका ३८

 

(श्रीमाताजी येथे ‘विचार’ व्यापक करण्याच्या एका मार्गाबद्दल सांगत आहेत.)

 

समजा, तुमच्याबरोबर कोणी दुसरी एखादी व्यक्ती आहे.  ती व्यक्ती तुम्हाला काहीतरी सांगते, तेव्हा तुम्ही त्याच्या अगदी विरुद्ध असे काहीतरी त्या व्यक्तीला सांगता (विरोध करण्याच्या हिरिरीतून हे बहुधा नेहमीच घडते) आणि तुम्ही वादविवाद करायला सुरुवात करता. साहजिकच आहे की, तुम्ही कोणत्याच मुद्यापाशी येऊन पोहोचणार नाही; हो, तुम्ही जर भांडकुदळ असाल तर त्यातून भांडणं मात्र होतील.

पण तसे करण्याऐवजी, म्हणजे स्वत:च्या शब्दांमध्येच किंवा स्वत:च्या कल्पनांमध्येच बंदिस्त होऊन राहण्याऐवजी तुम्ही जर स्वत:ला सांगितलेत, “एक मिनिट थांब, मी प्रयत्न करून पाहातो आणि तो मला असे का म्हणाला ते समजावून घेतो. हो, तो मला तसे का बरे म्हणाला असेल?” तुम्ही चिंतन करता, “का? का? का?” तुम्ही प्रयत्न करत तिथेच थांबून राहता.

दुसरा माणूस मात्र बोलतच असतो, नाही का? – परंतु आता तो खूष होतो कारण तुम्ही आता त्याला विरोध करत नसता. तो तावातावाने बोलत राहतो; त्याला वाटते की, त्याने तुम्हाला त्याचे म्हणणे पटवून दिले आहे.

तो काय म्हणतो आहे त्यावर तुम्ही अधिकाधिक लक्ष एकवटू लागता; हळूहळू त्याच्या भावनेच्या आणि शब्दांच्या माध्यमातून जणू काही तुम्ही त्याच्या मनात प्रवेश करता. जेव्हा तुम्ही त्याच्या डोक्यात प्रवेश करता, तेव्हा एकदम तुम्ही त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये प्रवेश करता. आणि मग, तुमच्याशी तो तसा का बोलत आहे, याचे तुम्हाला आकलन होते.

आणि जर तुमच्याकडे पुरेसे बुद्धिचापल्य असेल आणि जर तुम्ही, तुम्हाला आधी जे माहीत होते ते आणि आत्ता जे समजले ते या दोन्ही गोष्टी जर शेजारी शेजारी ठेवल्यात तर आता तुमच्याकडे एकत्रितपणे दोन विचारसरणी असतील आणि त्या दोन्हींचा समेट घडविणारे असे सत्य तुम्ही शोधून काढू शकाल. आणि इथेच तुम्ही खरीखुरी प्रगती केलेली असेल.

स्वत:चे विचार व्यापक करण्याचा हा एक सर्वोत्तम मार्ग आहे.

तुम्ही जर एखाद्या युक्तिवादाला सुरुवात करणार असाल, तर ताबडतोब शांत व्हा. तुम्ही शांत राहिले पाहिजे, काहीही बोलू नका आणि ती दुसरी व्यक्ती गोष्टींकडे ज्या पद्धतीने पाहत आहे त्या पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे, तुम्ही तुमची पाहण्याची पद्धतच विसरून जाल, असे होणार नाही. त्याउलट, तुम्ही त्या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे ठेवू शकाल. तेव्हा तुम्ही खरंच प्रगती केलेली असेल, एक खरीखुरी प्रगती!

– श्रीमाताजी [CWM 05 : 218-220]

विचारशलाका ३०

 

चेतना आणि ज्या माध्यमांमधून चेतना व्यक्त होते ती साधने या दोन गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत.

त्या साधनांचा विचार करुया : मानसिक अस्तित्वामधून ‘विचार’ निर्माण होतात, भावनिक अस्तित्वामधून ‘भावना’ निर्माण होतात, प्राणिक अस्तित्वामधून ‘कार्यकारी शक्ती’ निर्माण होते आणि शारीरिक अस्तित्व ‘प्रत्यक्ष कृती’ करते.

प्रतिभावान माणसाला काहीही दिले तरी, त्यापासून तो काहीतरी सुंदर असे बनवून दाखवेल कारण तो प्रतिभाशाली असतो. पण त्याच प्रतिभावंताला तुम्ही एक परिपूर्ण असे साधन द्या, तो त्यापासून काहीतरी अद्भुत असे करून दाखवेल. एखादा महान पियानोवादक अगदी खराब झालेल्या पियानोमधूनसुद्धा काहीतरी उत्तम संगीत निर्माण करेल पण त्याला जुळवलेला, उत्तम असा पियानो द्या, तो त्यापासून अधिकच सुंदर असे काही संगीत निर्माण करेल. या दोन्ही बाबतीत चेतना एकसारखीच असते पण तिच्या अभिव्यक्तीसाठी चांगल्या साधनाची आवश्यकता असते. – अगदी त्याचप्रमाणे मानसिक, प्राणिक, आंतरात्मिक आणि शारीरिक क्षमता असलेल्या देहाची साधन म्हणून आवश्यकता असते.

– श्रीमाताजी [CWM 04 : 40]

विचारशलाका २१

संक्रमणकाळात ‘विचारा’ची आत्यंतिक आवश्यकता असते. क्रांतिकारी कालखंड हा अविचारी, कोणतेही आकलन नसलेल्या, कोणताही विचारविमर्श न केलेल्या दोन प्रकारच्या मनांना जन्म देतो; एक असे मन की जे जुन्या गोष्टींना, केवळ ते जुने आहे म्हणून कडवेपणाने चिकटून राहते आणि दुसरे मन अमुक एक गोष्ट केवळ नवीन आहे म्हणून त्याच्या पाठीमागे वेड्यासारखे धावत सुटते. या दोहोंमध्ये स्वयंघोषित मध्यममार्गी माणूस (moderate man) उभा राहतो. तो म्हणतो, जुन्यामधले काहीतरी आणि नव्यामधलेही काहीतरी असे दोन्ही घेऊया. उपरोक्त दोन टोकाच्या माणसांपेक्षा हा मध्यममार्गी, नेमस्त माणूसदेखील काही कमी अविचारी नसतो. तो मध्यममार्गाला एक सूत्र आणि दैवी प्रतिमा मानून, मध्यममार्गाच्या आणाभाका घेतो आणि अशक्य असा ताळमेळ घालू पाहतो. ‘जुन्या बाटल्यांमध्ये नवीन वाईन भरता येत नाही’ असे जेव्हा येशू ख्रिस्त म्हणतात तेव्हा त्यांच्या दृष्टीपुढे अशाच प्रकारचा विचार होता.

‘विचार’ केव्हाही एखादे सूत्र ठरवत नाही, आधीच अंदाज बांधत नाही, तर तो प्रत्येक गोष्टीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करतो, प्रत्येक गोष्टीचे मोजमाप करतो. एखादा माणूस जर असे म्हणेल की, प्रबुद्ध (enlightened) युरोपाच्या मार्गानुसार तुमच्या सर्व सवयी, संकल्पना बदला तर विचार त्याला उत्तर देईल, ”मला आधी विचार करू दे. युरोप हा प्रबुद्ध आहे आणि भारत अडाणी आहे असे मी का गृहीत धरू? कदाचित असेही असू शकेल की, युरोपियन लोक हेच खरे अडाणी असू शकतील आणि भारतीय ज्ञानामध्ये खरेखुरे तथ्य असेल. मला शोधले पाहिजे.” आणि दुसऱ्या बाजूने जर एखादा माणूस त्याला म्हणेल, ”भारतीय बन आणि भारतीयांप्रमाणे वाग,” तर विचार म्हणेल, ”भारतीय बनण्यासाठी मला भारतीयांप्रमाणेच वागावे लागेल का, याबाबत मी साशंक आहे. कदाचित असेही असू शकेल की, भारतीयांना जे अपेक्षित नव्हते, नेमकी तशीच सध्याच्या काळात या देशातील माणसे झाली असतील. आपल्या भारतीय सभ्यतेच्या (civilization) वेगवेगळ्या कालखंडांमध्ये भारतीय कसे होते हे मला शोधलेच पाहिजे आणि त्या सभ्यतेमध्ये नित्य, शाश्वत काय आणि अनित्य, तात्पुरते काय याचा शोध मला घेतलाच पाहिजे. असेही शक्य आहे की, आपण गमावलेल्या काही खऱ्याखुऱ्या भारतीय गोष्टी युरोपयिन लोकांकडे असू शकतील.”

भारतीय असणे चांगलेच आहे, पण भारतीय असणे म्हणजे ‘ज्ञानाने’ भारतीय असणे होय, केवळ ‘पूर्वग्रहाने’ नव्हे. मानवी समाजाच्या रक्षणासाठी, तसेच व्यक्तीच्या आणि त्याच्याशी संबंधित असणाऱ्या पुरुषार्थासाठी तसेच, मानवी समूहाच्या परिपूर्णतेसाठी नेमका कोणता आचार उत्तम आहे हे विचार, विवेक आणि ज्ञान यांच्या साहाय्याने ठरविणे यावरच हिंदुधर्माची उभारणी करण्यात आलेली आहे.

– श्रीअरविंद [CWSA 01 : 499-500]

विचार शलाका – ०१

विचारांना आकार, रूप (form) असते आणि त्यांचे स्वतःचे असे एक व्यक्तिगत जीवन असते. ते त्यांच्या रचयित्यापासून स्वतंत्र असते. ते विचार त्या रचयित्याकडूनच या विश्वामध्ये प्रवाहित करण्यात आलेले असतात आणि त्यांच्या अस्तित्वाच्या प्रयोजनाची परिपूर्ती करण्यासाठी म्हणून ते विचार या विश्वामध्ये फिरत राहतात. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीचा विचार करत असता, तेव्हा तुमचा तो विचार आकाररूप धारण करतो आणि त्या व्यक्तीला शोधण्यासाठी बाहेर पडतो आणि जेव्हा तुमच्या विचारासोबत एखादी इच्छा जोडलेली असते तेव्हा, तो विचाररूपी आकार (thought-form) तुमच्यामधून बाहेर पडून, ती इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहतो.

उदाहरणार्थ, समजा तुम्हाला एखादी व्यक्ती तुमच्याकडे यावी असे वाटत असते, तशी तुमची तीव्र इच्छा असते आणि त्यासोबत, म्हणजे तुम्ही हे जे काही मानसिक रूप तयार केलेले असते त्याच्या सोबत एक प्राणिक आवेगयुक्त अशी इच्छा असते; मग तुम्ही अशी कल्पना करता की, “जर ती व्यक्ती आली तर असे असे घडेल किंवा तसे घडेल.” मात्र कालांतराने तुम्ही ती कल्पना करणे सोडून देता. परंतु तुम्हाला हे माहीत नसते की, तुम्ही जरी विसरून गेलात तरीही त्या विचाराचे अस्तित्व तसेच कायम शिल्लक राहिलेले असते. कारण तो विचार-आकार अजूनही तसाच कायम असतो, तो तसाच कार्यरत असतो, तुमच्यापासून तो स्वतंत्र झालेला असतो आणि त्याला त्याच्या कार्यापासून परावृत्त करण्यासाठी फार मोठी शक्ती असावी लागते. आता तो त्या व्यक्तीच्या वातावरणात त्या व्यक्तीला स्पर्श करतो आणि त्या व्यक्तीमध्ये तुमच्याकडे येण्याची इच्छा निर्माण करतो. आणि जर का तुमच्या विचार-आकारामध्ये पुरेशी इच्छाशक्ती असेल, जर तुम्ही त्याची सुव्यवस्थित रचना केलेली असेल तर, तो विचार स्वतः प्रत्यक्षीभूत होतोच होतो. परंतु रचनेचा काळ आणि ती प्रत्यक्षात येण्याचा काळ यामध्ये काही विशिष्ट अंतर असते. आणि जर दरम्यानच्या काळात तुमचे मन इतर गोष्टींनी व्याप्त झाले तर, असे घडते की तुमच्या या विस्मृत विचारांची परिपूर्ती झालेली असते, तुम्हाला स्वतःलाच आता त्याची आठवण नसते की एकेकाळी तुम्हीच त्या विचाराला खतपाणी दिले होते आणि तुम्हालाच आता जाण नसते की तुम्हीच या कृतीला उद्युक्त केले होते आणि तीच कृती आता तुमच्या समोर उभी ठाकली आहे. आणि असे बरेचदा घडते की, जेव्हा प्रत्यक्ष परिणाम दिसून येतो तेव्हा तुमची ती इच्छा नाहीशी झालेली असते किंवा तुम्हाला त्याची पर्वा नसते.

अशी बरीच माणसं असतात की ज्यांच्याकडे अशी रचना करण्याची खूप प्रबळ शक्ती असते आणि नेहमीच त्यांच्या रचना वास्तवात आलेल्या त्यांना पाहावयास मिळतात. पण त्यांच्याकडे एक शिस्तबद्ध असे मानसिक आणि प्राणिक अस्तित्व नसल्याने, आत्ता त्यांना एक गोष्ट हवीशी वाटते तर नंतर दुसरीच एखादी गोष्ट हवीशी वाटते आणि मग अशा या विविध किंवा विरोधी रचना आणि त्यांचे परिणाम एकमेकांवर आदळतात, त्यांचा परस्परांशी झगडा होतो. आणि मग अशा लोकांना आश्चर्य वाटू लागते की ते एवढे गोंधळाने आणि विसंवादाने भरलेले जीवन का जगत आहेत! परंतु त्यांना हे समजत नसते की, ते त्यांचे स्वतःचेच विचार होते. त्यांच्या विचारांनी आणि त्यांच्या इच्छांनीच त्यांच्याभोवती तशी परिस्थिती घडवली आहे आणि ती परिस्थिती आता त्यांना विसंगत, परस्परविरोधी वाटत आहे आणि त्यामुळे त्यांचे जीवन हे असह्य कोटीचे झालेले आहे.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 50-51)

एकत्व – ०८

 

भगवान बुद्ध त्यांच्या शिष्यांना सांगत असत की, जेव्हा जेव्हा तुम्ही एखादे स्पंदन वातावरणामध्ये सोडता, उदाहरणार्थ एखादी इच्छा, एखाद्या विशिष्ट गोष्टीविषयीची इच्छा, तेव्हा ती इच्छा एका व्यक्तिकडून दुसऱ्या व्यक्तिकडे, दुसऱ्या व्यक्तिकडून तिसऱ्या व्यक्तिकडे अशी जगभर संक्रमित होत जाते आणि नंतर ती फिरून परत तुमच्यापाशीच येते. आणि वातावरणात सोडलेली ती काही एकमेव अशी गोष्ट नसते, तर गोष्टींचे एक आख्खे विश्वच असते आणि पुन्हा असे की, तुम्ही या विश्वातील प्रक्षेपण करणारे एकमेव केंद्र नसता तर, प्रत्येक व्यक्ती म्हणजे प्रक्षेपणाचे एक केंद्र असते – तेव्हा हा एवढा गोंधळ असतो की, तुम्ही तुमची भूमिकाच तेथे गमावून बसता. परंतु ही सर्व स्पंदनं अगदी एकाच, अगदी एकसारख्या क्षेत्रातूनच संक्रमित होत असतात. केवळ त्या स्पंदनांचे एकमेकांवर धडकणे, त्यांची व्यामिश्रता, यामुळे काहीतरी वेगळे, स्वतंत्र असल्याची भावना तुम्हाला होते.

स्वतंत्र, अलग असे काहीच नसते. एकच एक मूलद्रव्य आहे, एकच शक्ती आहे, एकच चेतना आहे, एकच संकल्प आहे जो अगणित अशा व्यक्तिमत्त्वांमधून संचार करत असतो. हे इतके गुंतागुंतीचे आहे की, व्यक्तिला त्याची जाणच नसते, परंतु जर व्यक्ती थोडी मागे सरकेल आणि त्या विचारप्रवाहाचा मागोवा घेत जाईल, मग तो विचारप्रवाह कोणता का असेना, तेव्हा व्यक्तिच्या लक्षात येईल की, ही विचारस्पंदनेच स्वतः एकातून दुसरे या पद्धतीने फैलावत जातात. वस्तुतः प्रत्यक्षात तेथे एकमेव एकत्व असते – मूलद्रव्याचे एकत्व, चेतनेचे एकत्व, संकल्पाचे एकत्व. येथे एकच एक सत्यता आहे. बाह्यतः एक प्रकारचा आभास असतो. अलगपणाचा, वेगळेपणाचा आभास असतो.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 52-53)

एकत्व – ०७

जर तुम्ही काळजीपूर्वक विश्लेषण केलेत तर, तुमच्या असे लक्षात येईल की, तुम्ही जे काही विचार करत असता, ते इतरांनी केलेले विचार असतात. त्यांचे ते विचार फिरत असतात आणि तुमच्या मधून जात असतात, परंतु ते विचार तुम्ही निर्माण केलेले नसतात, तुम्ही त्या विचारांचे निर्माणकर्ते नसता. तुमच्या सर्व प्रतिक्रिया या अनुवंशिकतेतून येतात, ज्यांनी तुम्हाला जन्म दिलेला असतो, ज्या परिसरात तुम्ही जीवन जगत असता, आजवर ज्या गोष्टी तुमच्या मनावर कोरल्या गेलेल्या असतात, त्यातून तुमची घडण झालेली असते. आणि तुम्हाला वाटत असते की, त्या साऱ्या गोष्टी म्हणजेच तुम्ही आहात. असे असूनसुद्धा ते विचार तुम्ही निर्माण केलेले नसतात, तर तुम्हाला ते जाणवलेले असतात, तुमच्या अनुभवास आलेले असतात. ते विचार जेव्हा तुमच्यामधून जात असतात, तेव्हा तुम्हाला त्यांची जाणीव होते, पण तुम्ही त्यांचे निर्माणकर्ते नसता, म्हणजे तुम्ही त्या विचारांना जन्म दिलेला नसतो.

उदाहरण द्यायचे झाले तर, असे म्हणता येईल की, ते विचार ध्वनींसारखे असतात. कोणत्याही प्रकारचे ध्वनी घ्या – शब्द, संगीत, कोणतेही ध्वनी – जे एका उपकरणाने ध्वनिमुद्रित केलेले असतात आणि ग्रामोफोनसारख्या दुसऱ्या एका उपकरणाच्या माध्यमातून ते परत वाजविण्यात आलेले असतात, त्याप्रमाणे हे असते. तुम्ही जो ध्वनी ऐकत आहात तो ग्रामोफोनने निर्माण केला आहे, असे तुम्ही म्हणाल का? नाही, असा विचारही तुमच्या मनाला शिवणार नाही. परंतु तुम्हाला तुमच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा भास होत असल्याने, तुमच्या मनाच्या माध्यमातून जे विचार दुसरीकडे जातात, ते विचार अभिव्यक्त होतात, तुमच्या प्राणिक अस्तित्वातून ज्या संवेदना जात असतात, त्यांना अभिव्यक्ती मिळते आणि तुम्हाला असे वाटते की, ते विचार, त्या संवेदना तुमच्याकडून आल्या आहेत, परंतु तुमच्याकडून काहीही येत नाही. निर्माण करण्यासाठी मुळात ‘तुम्ही’च असता कुठे ?

तुमच्या अस्तित्वातील सर्जक वास्तवेची तुम्हाला जाण येण्यासाठी आधी तुम्हाला तुमच्या अस्तित्वाचा जो शाश्वत गाभा आहे, तो शोधावयास हवा, त्यासाठी तुम्ही खूप आत, आत, अंतरंगात गेले पाहिजे.

आणि एकदा का तुम्हाला त्या शाश्वत गाभ्याचा शोध लागला की, तुम्हाला जाणीव होईल की, ती एकच एक अशी एकमेव सद्वस्तु आहे, इतर सर्वांमध्येही तीच सद्वस्तु आहे आणि मग असे असेल तर, तुमचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व शिल्लक रहातेच कोठे? काहीच शिल्लक रहात नाही.

हो, ती केवळ ध्वनिमुद्रण करणारी आणि पुन्हा ध्वनी वाजवणारी उपकरणे असतात आणि त्यामध्ये नेहमीच विकार निर्माण होत राहतात. काही विकार चांगल्यासाठी असतात, काही विकार वाईटासाठी असतात, मुळातील विचारांमध्ये फार मोठे बदल घडण्याचीही शक्यता असते. एका व्यक्तिमधून दुसऱ्यामध्ये ते विचार संक्रमित होत असताना, ते जसेच्या तसे संक्रमित होत नाहीत कारण आंतरिक रचनाच तशा असतात, ते उपकरण अतिशय जटिल असे असते.

परंतु ती एकच आणि समान अशी गोष्ट असते की, जी जागृत संकल्पाद्वारे संचालित होत असते, ती सर्व वैयक्तिक इच्छांपासून स्वतंत्र अशी असते.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 51-52)