Posts

सद्भावना – १६

आश्रमात येणाऱ्या दर्शनार्थींचे स्वागत करण्याची जबाबदारी ज्या व्यक्तींकडे असते त्या व्यक्तींचे आचरण नेहमीच अतिशय विनम्र आणि मृदु असले पाहिजे, अशी श्रीमाताजींची अपेक्षा असते. कोणी उच्च असू दे वा कनिष्ठ, कोणी तरुण असू देत वा वयस्कर, त्यांनी उत्तमोत्तम पोषाख परिधान केलेला असू दे वा अगदी फाटक्या कपड्यातील असू देत, साऱ्यांचे स्वागत सारख्याच सद्भावनेने आणि सदाचाराने झाले पाहिजे. चांगल्या पोषाखातील व्यक्ती आश्रमातील स्वागतासाठी जास्त सुयोग्य आहेत असे मानण्याची काहीच गरज नाही. एखाद्या भिकाऱ्यासारख्या दिसणाऱ्या सामान्य माणसापेक्षा मोटार गाडीतून आलेल्या माणसांची आपण अधिक काळजी घेत आहोत, असे कदापिही घडता कामा नये. आपल्यासारखीच ती देखील माणसं आहेत हे आपण कदापिही विसरता कामा नये आणि आपण श्रेणीच्या सर्वोच्च स्थानी आहोत, असे समजण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही.
आणि आपली विनम्रता ही केवळ बाह्य स्वरूपाची असता कामा नये, येथे खरीखुरी विनम्रता, अभिप्रेत आहे. जी आतून आलेली असली पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 167)