Posts

तीन गोष्टींपासून माणसाने स्वतःला जपले पाहिजे.

एक म्हणजे रोगाची सामूहिक सूचना. रोग हा निःसंशयपणे अस्तित्वात असणारी गोष्ट आहे, म्हणजे कार्यामध्ये विलंब करण्याचा, कार्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही विरोधी शक्ती असतातच, ह्या अर्थाने म्हणावयाचे आहे.

बाह्यतः ते रोग काही कल्पनांवर आधारलेले असतात; रोगजंतुंविषयीच्या, जीवजंतुंविषयीच्या आणि तत्सम गोष्टींविषयीच्या ज्ञानावर ते आधारलेले असतात. (त्याला लोक ‘ज्ञान’ असे म्हणतात.) पण रोगजंतुंमुळे रोग होतात असे म्हणणे म्हणजे गोष्टी उलट्यापालट्या करण्यासारखे आहे, खाली डोकं वर पाय करण्यासारखे आहे कारण हे रोगजंतू, जीवजंतू आणि तत्सम गोष्टी ह्या कारण नसून परिणाम असतात.

तीन गोष्टींच्या एकत्रिकरणाचा त्या परिणाम असतात.

दुरिच्छा, कमीअधिक प्रमाणातील पूर्णपणे वाईट अशी इच्छा; नियम व त्याचे परिणाम यांविषयीचे अज्ञान म्हणजे कारण व त्याचा परिणाम यांविषयीचे घोर अज्ञान; आणि अर्थातच, एक प्रकारचे जडत्व – या सगळ्याच गोष्टी जडत्वाचीच रूपं आहेत पण जडत्वाचे सर्वात मोठे रूप म्हणजे स्वीकारण्याची आणि प्रतिसाद देण्याची अक्षमता. या तिन्ही गोष्टींच्या एकत्रीकरणातून रोग निर्माण होतात आणि मग अंतिम परिणाम म्हणजे मृत्यु. म्हणजे तयार झालेल्या सुमेळाचे विघटन.

– श्रीमाताजी
(Conversation with a disciple : March 02, 1968)

अगदी भौतिक वातावरणामध्येदेखील, या पृथ्वीच्या वातावरणामध्ये, असंख्य छोटेछोटे जीव असतात, जे तुम्हाला दिसत नाहीत, कारण तुमची दृष्टी ही खूपच मर्यादित असते, पण ते मात्र तुमच्या वातावरणात इतस्ततः फिरत असतात. त्यातील काहीकाही चांगलेसुद्धा असतात, इतर दुष्ट असतात. सामान्यतः प्राणिक अस्तित्वाच्या विघटनामधून हे छोटे छोटे जीव तयार होतात – त्यांची पैदास होत राहते – आणि त्यांचा एक असुखद असा पुंजकाच तयार होतो. त्यातील काही जण काही चांगल्या गोष्टीही करतात.

या छोट्याछोट्या क्षुद्र जीवांचे गट असतात आणि मग त्यांच्यात एकमेकांमध्ये झगडे होतात. कारण त्यांच्या त्यांच्यामध्ये सुद्धा ते शांततामय जीवन जगत नसतात, तर त्यांच्या परस्परांमध्ये मारामाऱ्या, लढाईझगडे, भांडणतंटे चालू असतात. ते एकमेकांना मारु पाहत असतात, विनाश घडवून आणू पहात असतात आणि हेच रोगजंतुंचे उगमस्थान असते. त्या शक्ती विघटनकारी असतात. आणि अशा त्या दुभंगलेल्या, छिन्नविछिन्न झालेल्या रूपातसुद्धा ते जिवंत राहतात आणि तेच सूक्ष्म जीवजंतु आणि रोगजंतुंचे मूळ असते. म्हणूनच बऱ्याचशा रोगजंतूंच्या मागे ही दुरिच्छा असते आणि त्यामुळे ते एवढे भयानक बनतात. आणि या रोगजंतुंचा दर्जा, त्यांच्या दुरिच्छेचे स्वरूप समजल्याशिवाय आणि त्यांच्यावर कार्य करण्याची क्षमता असल्याशिवाय, नव्याण्णव टक्के वेळा पूर्ण खात्रीशीर इलाज सापडणे शक्य नसते.

सूक्ष्म भौतिक विश्वात जिवंत असणाऱ्या अशा कोणत्यातरी गोष्टीचे एक अगदी जडभौतिक रूप म्हणजे हे रोगजंतू असतात. आणि ते तुमच्या अवतीभोवती वावरत असतात, तुमच्यामध्ये वावरत असतात, अनेक वर्षे ते तुम्हाला काहीही इजा पोहोचवीत नाहीत. नंतर कधीतरी अचानकपणे तुम्हाला ते आजारी पाडतात आणि इथेच दुसरे कारण महत्त्वाचे ठरते.

रोगजंतुंचे मूळ आणि त्यांना साहाय्य लाभते ते विसंवादामध्ये आणि विरोधी शक्तींविषयीची व्यक्तीची जी ग्रहणशीलता असते त्यामध्ये ! त्यासंबंधी एक गोष्ट मी तुम्हाला सांगते.
(क्रमश:)

– श्रीमाताजी
(CWM 05 : 171-181)