Posts

साधना, योग आणि रूपांतरण – १८८

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०४

सर्वोच्च आध्यात्मिक ‘आत्मा’ हा आपल्या व्यक्तित्वाच्या आणि शारीर-अस्तित्वाच्या मागे नसतो, तर तो सर्वस्वी त्याच्या पलीकडे, ऊर्ध्वस्थित असतो. आंतरिक चक्रांपैकी सर्वोच्च चक्र हे मस्तकामध्ये असते, तर सर्वात गहनतम चक्र हे हृदयामध्ये असते; परंतु जे चक्र थेटपणे ‘आत्म्या’प्रत खुले होते ते मस्तकाच्याही वर, शरीराच्या पूर्णपणे बाहेर म्हणजे ज्याला ‘सूक्ष्म शरीर’ असे संबोधले जाते, त्यामध्ये असते.

या (सर्वोच्च) आत्म्याला दोन पैलू असतात आणि त्यांच्या साक्षात्काराचे परिणाम हे या दोन पैलूंशी संबंधित असतात. एक पैलू हा अक्रिय, स्थितीमान (static) असतो. ही स्थिती व्यापक शांतीची, मुक्तीची व नीरवतेची असते. या शांत ‘आत्म्या’वर कोणत्याही कृतीचा वा अनुभवाचा काही परिणाम होत नाही. तो त्यांना निःपक्षपातीपणे आधार पुरवत असतो पण तो त्यांची निर्मिती करत असावा असे दिसत नाही, किंबहुना तो या साऱ्यापासून अलिप्तपणे, उदासीनपणे दूर उभा राहतो.

या आत्म्याचा दुसरा पैलू हा गतिशील असतो आणि विश्वात्मा म्हणून तो अनुभवास येतो, तो संपूर्ण वैश्विक कृतीला केवळ आधारच पुरवितो असे नाही तर तो ती कृती निर्माण करतो, आणि ती कृती स्वतःमध्ये सामावूनही घेतो. या वैश्विक कृतीमध्ये आपल्या शारीरिक अस्तित्वांशी संबंधित असलेल्या घटकांचाच नव्हे तर त्यांच्या अतीत असणाऱ्या सर्व घटकांचा, इहलोक आणि सर्व अन्य लोक, या विश्वाच्या भौतिक तसेच अतिभौतिक श्रेण्यांचा समावेशदेखील त्यामध्ये होतो. तसेच, सर्वांमध्ये वसत असलेला आत्मा एकच आहे याची आपल्याला जाणीव होते. इतकेच नाही तर, तो सर्वाच्या अतीत, परात्पर, सर्व व्यक्तिगत जन्माला किंवा वैश्विक अस्तित्वालाही ओलांडून जाणारा म्हणून संवेदित होतो.

सर्वांमध्ये वसत असलेल्या त्या एकामध्ये म्हणजे विश्वव्यापक आत्म्यामध्ये प्रविष्ट होणे म्हणजे अहंभावापासून मुक्त होणे. अशा वेळी, हा अहंभाव एकतर चेतनेमधील एक छोटीशी साधनभूत परिस्थिती बनून शिल्लक राहतो किंवा मग आपल्या चेतनेमधून तो पूर्णपणे नाहीसा होतो. यालाच ‘अहंभावाचे निर्वाण’ असे म्हणतात. सर्वांच्या अतीत असणाऱ्या परात्पर आत्म्यामध्ये प्रविष्ट होण्यामधून आपण वैश्विक चेतना आणि कृतीच्या पूर्णपणे अतीत होण्यास सक्षम होतो. विश्व-अस्तित्वामधून पूर्ण मुक्ती मिळविण्याचा तो एक मार्ग असू शकतो, यालाच ‘लय, मोक्ष, किंवा निर्वाण’ असे संबोधले जाते. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 325-326)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (०९)

‘ईश्वरी उपस्थिती’ आणि ‘दिव्य चेतने’मध्ये प्रवेश करणे आणि त्याने परिव्याप्त होणे हे या योगाचे (पूर्णयोगाचे) उद्दिष्ट आहे; ‘ईश्वरा’वर केवळ ‘ईश्वरा’साठीच प्रेम करणे, आपली प्रकृती ही ‘ईश्वरा’च्या प्रकृतीशी मिळतीजुळती करणे, मेळविणे आणि आपली इच्छा, आपली कर्मे, आपले जीवन हे सारे ‘ईश्वरा’चे साधन बनवणे हे या योगाचे उद्दिष्ट आहे. महान योगी बनणे किंवा अतिमानव (Superman) बनणे (काळाच्या ओघात तसे घडेलही) किंवा अहंकाराच्या शक्तीसाठी, अभिमानासाठी किंवा सुखासाठी ‘ईश्वरा’ला आपलेसे करणे, हे काही या योगाचे उद्दिष्ट नाही. या योगाद्वारे मुक्ती मिळत असली तरीही हा योग ‘मोक्षा’साठी नाही, किंवा यामधून इतरही साऱ्या गोष्टी साध्य होत असल्या तरीपण, त्या गोष्टी हे आपले उद्दिष्ट असता कामा नये. एकमेव ‘ईश्वर’ हेच आपले उद्दिष्ट आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 21)

विचार शलाका – ०६

निर्व्यक्तिक, ‘केवल’, ‘अनंत’ अशी ईश्वराची कल्पना करून, त्याचा अनुभव घ्यावयाचा की विश्वातीत, विश्वात्मक नित्य पुरुषाचा वेध घेऊन, त्याला जाणून घ्यावयाचे, त्याचा अनुभव घ्यावयाचा; हे ठरवण्याची आपल्याला मोकळीक आहे; आपला त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग कोणताही असू देत, परंतु आध्यात्मिक अनुभूतीचे एक महत्त्वाचे सत्य हे आहे की, तो ईश्वर आपल्या हृदयांतच आहे; तो सर्व जीवनाच्या केंद्रस्थानी आहे आणि सर्व जीवन त्याच्यामध्ये सामावलेले आहे आणि त्याचा शोध घेणे म्हणजेच महान आत्मशोध होय.

सांप्रदायिक श्रद्धांचे भिन्न भिन्न प्रकार हे, भारतीय मनाला, सर्वत्र असलेल्या एकमेव ‘परमात्म्या’च्या व ‘ईश्वरा’च्या दर्शनाचे भिन्न प्रकार म्हणून प्रतीत होतात. ‘आत्मसाक्षात्कार’ ही एकच आवश्यक गोष्ट आहे. ‘अंतरात्म्या’प्रत खुले होणे, ‘अनंता’त वसति, ‘शाश्वता’ची साधना व सिद्धी, ‘ईश्वरा’शी ऐक्य, हे भारतीय धर्माचे एकमेव साध्य आहे. आध्यात्मिक मोक्षाचा अर्थ हाच आहे, हेच ते जिवंत ‘सत्य’ आहे, जे मानवाला पूर्णत्व देते व मुक्त करते.

सर्वोच्च आध्यात्मिक सत्याचे केलेले गतिमान अनुसरण आणि सर्वोच्च आध्यात्मिक ध्येय हे भारतीय धर्माला एकत्र आणणारे बंध आहेत; त्याच्या हजारो रूपांच्या पाठीमागे, जर कोणते सामाईक सार असेल तर ते हेच होय.

– श्रीअरविंद
(CWSA 20 : 183-184)

विचार शलाका – ०५

पूर्वीच्या योगांच्या तुलनेत ‘पूर्णयोग’ नवीन आहे : व्यक्तीने केवळ स्वतःसाठी, स्वतःपुरता ईश्वराचा साक्षात्कार करून व्यक्तिगत सिद्धी प्राप्त करून घ्यावी हे येथे उद्दिष्ट नाही. व्यक्तीने केवळ अति-वैश्विक उपलब्धीच नव्हे तर येथील पृथ्वीचेतनेसाठी, वैश्विक अशी काही प्राप्ती करून घ्यावी हेही येथे अपेक्षित आहे. आजवर या पृथ्वी-चेतनेमध्ये, अगदी आध्यात्मिक जीवनामध्येसुद्धा सक्रिय नसलेली किंवा सुसंघटित नसलेली अतिमानसिक (supramental) चेतनेची शक्ती आणणे आणि ती शक्ती सुसंघटित करणे आणि ती थेटपणे सक्रिय होईल हे पाहणे, ही गोष्टसुद्धा साध्य करून घ्यायची आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 400)

व्यक्तिगत मोक्षाच्या इछेचे स्वरूप कितीही उदात्त असले तरी, ती एक प्रकारची वासनाच असते आणि ती अहंभावातून निर्माण झालेली असते. आपल्या व्यक्तित्वाची कल्पना प्रामुख्याने आपल्या समोर असते; आपल्याला व्यक्ती म्हणून वैयक्तिक हिताची, वैयक्तिक कल्याणाची इच्छा असते; दुःखापासून सुटका व्हावी अशी एक व्यक्ती म्हणून आपली तळमळ असते; जन्म-मृत्युच्या फेऱ्यातून सुटका व्हावी अशी आपल्या मनात तीव्र इच्छा उत्पन्न होते; आणि यातूनच मोक्षाची कल्पना निर्माण होते; अर्थात ही कल्पना हे अहंभावाचे अपत्य आहे.

अहंभावाचा पाया पूर्णपणे नष्ट करण्यासाठी, व्यक्तिगत मोक्षाच्या इच्छेच्या वर उठणे आवश्यक असते. आपण जर ईश्वर-प्राप्तीसाठी धडपडत असू, तर ती धडपड केवळ ईश्वरासाठीच असली पाहिजे, अन्य कोणत्याही कारणासाठी नव्हे; कारण आपल्या जीवाला आलेली ती परमोच्च हाक असते, आपल्या चैतन्याचे ते सर्वात गहन असे सत्य असते.

*

वैयक्तिक आत्म्याने सर्व जगताच्या अतीत जाऊन, विश्वात्मक ईश्वराचा साक्षात्कार करून घेणे एवढ्यापुरताच ‘पूर्णयोग’ मर्यादित नाही; तर तो ‘सर्व आत्म्यांची एकत्रित बेरीज’, म्हणजे विश्वात्मक साक्षात्कार देखील आपल्या कवेत घेतो; असा हा ‘पूर्णयोग’ व्यक्तिगत मोक्ष किंवा सुटका एवढ्यापुरता मर्यादित राहूच शकत नाही. पूर्णयोगाचा साधक विश्वात्मक मर्यादांच्या अतीत झालेला असूनही, तो सर्वात्मक ईश्वराशी देखील एकात्म असतो. या विश्वातील त्याचे दिव्य कर्म अजूनही शिल्लक असते.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 269-70)