Posts

प्रकृतीमध्ये पाषाणातून वनस्पतीकडे, वनस्पतीकडून प्राण्याकडे, प्राण्याकडून मानवाकडे, अशाप्रकारे आरोहण करणारा क्रमविकास आहे. आजवर ज्ञात असलेल्या या विकासक्रमानुसार, सध्यातरी मानव हा सर्वात वरच्या पायरीवर आहे असे दिसून येते. अर्थातच, त्यामुळे आपण या विश्वातील विकासाचा अंतिम टप्पा असून, आपल्यापेक्षा उच्चतर असे या पृथ्वीतलावर काहीही असणे शक्य नाही, असा मनुष्याचा समज झाला आहे. आणि हाच त्याचा फार मोठा गैरसमज आहे. त्याच्या शारीरिक प्रकृतीच्या (physical nature) दृष्टीने तो आजही जवळजवळ पूर्णपणे प्राणीच आहे; विचार करणारा आणि बोलणारा प्राणी आहे इतकेच. मात्र त्याच्या शारीरिक सवयी आणि सहज स्वाभाविक प्रवृत्ती पाहता तो अजूनही प्राणिदशेतच आहे. अर्थातच अशा अपूर्ण निर्मितीत प्रकृती संतुष्ट असू शकत नाही हे निश्चित.

प्रकृती एक नवीन प्रजाती बनविण्याच्या प्रयत्नांत आहे. प्राण्याच्या दृष्टीने जसा मानव, त्याप्रमाणे मानवाच्या दृष्टीने ती प्रजाती असेल. ती प्रजाती बाह्य आकाराने मानवसदृशच असेल; तरीपण तिची चेतना मनाहून कितीतरी उच्च स्तरावरची असेल आणि ती प्रजाती अज्ञानाच्या दास्यत्वातून पूर्णपणे मुक्त झालेली असेल. मनुष्याला हे सत्य अवगत करून देण्यासाठी श्रीअरविंद या पृथ्वीतलावर आले. मानसिक चेतनेमध्ये जगणारा मनुष्य हा केवळ एक संक्रमणशील जीव आहे; परंतु एक नवी चेतना, ‘सत्य-चेतना’ प्राप्त करून घेण्याची क्षमता असणारा आणि एक पूर्णतया सुसंवादपूर्ण, कल्याणकारी, सुंदर, आनंदी आणि पूर्ण जाणीवयुक्त जीवन जगण्याची क्षमता असणारा असा तो जीव आहे, असे त्यांनी सांगितले आहे. ही चेतना, जिला त्यांनी ‘अतिमानस’ (Supermind) असे संबोधले आहे, ती चेतना स्वत:मध्ये (पृथ्वीकरिता) प्रस्थापित करण्यासाठी, आणि त्यांच्या भोवती जमलेल्या साधकांना देखील त्या चेतनेची अनुभूती यावी म्हणून साहाय्य करण्यासाठी, श्रीअरविंदांनी या पृथ्वीतलावर त्यांचा संपूर्ण आयुष्यभराचा वेळ देऊ केला.

– श्रीमाताजी [CWM 12 : 116]

कनिष्ठ प्रतीच्या मानवप्रजातीमध्ये मनाकडून प्राणाकडे व शरीराकडे असे अधोमुखी गुरुत्वाकर्षण असते.

साधारण प्रतीच्या मानवप्रजातीचा मुक्काम हा, प्राण व शरीराने मर्यादित केलेल्या आणि त्यांच्याकडेच लक्ष ठेवून असणाऱ्या अशा मनामध्ये असतो.

सरस अशी मानवप्रजाती ही आदर्शवत् मनोवस्थेकडे, किंवा एखाद्या विशुद्ध संकल्पनेकडे, ज्ञानाच्या साक्षात् सत्याकडे आणि अस्तित्वाच्या उत्स्फूर्त सत्याप्रत उत्थापित होते.

परमोच्च मानवप्रजाती ही दिव्य परमानंदाप्रत उन्नत होते आणि तेथून ती त्याहून वर असलेल्या केवल सत् अणि परब्रह्माकडे ऊर्ध्वगामी होते अन्यथा, तिच्या कनिष्ठ सदस्यांना हा परमानंद लाभावा; तसेच स्वत:ला आणि मानवी जीवनातील इतरांना हे दिव्यत्व लाभावे म्हणून कार्यरत राहते.

ज्याने कनिष्ठ आणि वरिष्ठ गोलार्धामध्ये असलेला पडदा भेदला आहे; जो मानव त्याच्यामध्ये सद्यस्थितीत गुप्त असलेल्या उच्चतर वा दिव्य गोलार्धात वसती करतो, तो खरा अतिमानव आहे आणि तो या विश्वामधील क्रमश: होणाऱ्या ईश्वराच्या आत्माविष्करणाची शेवटची उत्पत्ती असेल; जडामधून चेतनेचा उदय होण्याची, ज्याला आज उत्क्रांतितत्त्व म्हणून संबोधले जाते त्याची ही शेवटची उत्पत्ती असेल.

या दिव्य अस्तित्वामध्ये, शक्तीमध्ये, प्रकाशामध्ये, आनंदामध्ये उन्नत होणे आणि त्याच्या साच्यामध्ये सर्व सांसारिक (mundane) अस्तित्व पुन्हा ओतणे, ही धर्माची सर्वोच्च अशी आकांक्षा आहे आणि हेच योगाचे व्यावहारिक ध्येय आहे. विश्वामध्ये ईश्वराचा साक्षात्कार घडविणे हे उद्दिष्ट आहे पण विश्वातीत असलेल्या ईश्वराचा साक्षात्कार झाल्याशिवाय, ते साध्य होऊ शकत नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 102)

मानवाची महानता तो काय आहे ह्यामध्ये नसून, तो काय करू शकतो ह्यामध्ये सामावलेली आहे. मानव ही बंदिस्त अशी एक जागा आहे आणि जिवंत परिश्रमांची ती अशी एक गुप्त कार्यशाळा आहे की, ज्यामध्ये त्या दिव्य कारागीराकडून अतिमानवता घडवली जात आहे आणि हेच मानवाचे खरेखुरे वैभव आहे.

पण यापेक्षाही एका अधिक महानतेमध्ये त्याचा प्रवेश झाला आहे. ती महानता अशी की, कोणत्याही कनिष्ठ प्रजातींना मिळाली नाही अशी एक संधी त्याला मिळालेली आहे. मानवामध्ये होणाऱ्या दिव्य परिवर्तनाचा जाणीवसंपन्न कारागीर बनण्याची, त्या परिवर्तनामध्ये थोड्याफार प्रमाणात सहभागी होण्याची परवानगी त्याला मिळालेली आहे.

मात्र त्याच्या देहामध्ये ही महानता प्रत्यक्षात उतरावी याकरिता, म्हणजेच मानवी देहाचे अतिमानवामध्ये रूपांतर शक्य व्हावे याकरिता, मानवाची स्वेच्छापूर्वक संमती, त्याची एकदिश झालेली इच्छाशक्ती आणि त्याचा सहभाग यांची आवश्यकता आहे. त्याची ‘अभीप्सा’ ही पृथ्वीने त्या अतिमानसिक निर्मिकाला दिलेली हाक आहे.

जर पृथ्वी आवाहन करेल आणि परमश्रेष्ठ त्यास प्रतिसाद देईल तर, त्या भव्य आणि गौरवशाली रूपांतरणाची घटिका अगदी आत्तादेखील असू शकते.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 160)