Posts

जगाच्या डोळ्यांसमोर भारतामध्ये ‘राष्ट्र’उभारणीचे कार्य अत्यंत वेगाने, अगदी स्पष्टपणे, घडू लागले आहे त्यामुळे सर्वांनाच ही प्रक्रिया दिसू शकत आहे आणि ज्यांच्यापाशी थोडी सहानुभूती आहे, अंतर्दृष्टी आहे ते या दैवी रचनेची दिशा, त्यामध्ये कार्यकारी असणाऱ्या शक्ती, आणि त्यामध्ये उपयोगात आणली गेलेली सामग्री यांमधील वेगळेपण पाहू शकत आहेत. हे राष्ट्र म्हणजे ‘प्रकृती’च्या कार्यशाळेतील कच्च्या मालापासून तयार झालेला नवीन वंश नाही किंवा हे राष्ट्र आधुनिक परिस्थितीमुळे निर्माण झाले आहे, असेही नव्हे. तर येथील संस्कृती ही, या पृथ्वीवरील महान संस्कृतींपैकी, प्राचीन वंशांपैकी एक आहे; दुर्दम्य प्राणशक्ती, महानतेची, सखोलतेची जणू खाणच, अद्भुत क्षमता असणारी, अशी ही संस्कृती; मानवी संस्कृतीच्या इतर प्रकारांपासून तसेच परकीय वंशप्रकारांपासून सामर्थ्याचे अगणित उगमस्त्रोत स्वत:मध्ये सामावून घेत, आता ती कायमसाठी एका सुसंघटित अशा राष्ट्रीय एकात्मतेमध्ये स्वत:चे उन्नयन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. …आमच्या पुरातन कालापासून जो प्रयत्न आजवर आमचा वंश करत होता, तो प्रयत्न आता संपूर्णत: नवीन परिस्थितीमध्ये तो करेल. एखादा जाणकार निरीक्षक त्याच्या यशस्वितेचे भाकीत करू शकेल; कारण जे काही महत्त्वाचे अडथळे होते ते दूर करण्यात आले आहेत किंवा ते दूर होण्याच्या प्रक्रियेत आहेत. परंतु आम्ही याही पुढे जातो आणि असा विश्वास बाळगतो की, यश मिळण्याची खात्री आहेच कारण भारताची महानता, भारताची एकात्मता, आणि भारताचे स्वातंत्र्य ही आता संपूर्ण जगाचीच आवश्यकता बनली आहे. ….कितीही प्रचंड आणि वरवर पाहता कितीही दुस्तर संकटे का येईनात, आम्ही त्यामुळे नाउमेद होणार नाही आणि त्या कार्यामध्ये चिकाटीने प्रयत्नशील राहू. ईश्वर आमच्या सोबत आहे आणि या श्रद्धेमुळेच आमचा विजय होईल असा आमचा विश्वास आहे.. आमचा असा विश्वास आहे की, ‘ईश्वर’ आमच्या सोबत आहे आणि त्या श्रद्धेमुळे आम्ही जिंकू. आमचा असा विश्वास आहे की, मानवतेला आमची गरज आहे आणि मानवतेविषयीचे, आपल्या देशाविषयीचे, वंशाविषयीचे, आमच्या धर्माविषयीचे आमचे प्रेम आणि तिची सेवा, आमची अंत:करणे शुद्ध करेल आणि या लढ्यातील कृतीसाठी ती आम्हाला प्रेरित करेल.

– श्रीअरविंद [CWSA 08 : 23-24]

विचार शलाका – १८

मानवता आज ज्या भयानक गर्तेत बुडाली आहे, त्यापासून तिला वाचविण्यासाठी चेतनेचे आमूलाग्र परिवर्तन होणेच आवश्यक आहे, दुसरे काहीही तिला त्यापासून वाचवू शकणार नाही.

सर्व तथाकथित ‘व्यावहारिक’ साधने म्हणून जी सांगितली जातात ती साधने म्हणजे माणसांनी डोळ्यांवर पट्टी बांधून स्वत:लाच आंधळे बनविण्यासारखा बालीशपणा आहे, की ज्यामुळे ते खऱ्या आवश्यकतेकडे व रामबाण उपायाकडे दुर्लक्ष करतात.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 61)

(दिनांक : १९ जून १९०९)

मानवतेसाठी भारताच्या उभारणीमध्ये साहाय्यभूत होणे हे आमचे ध्येय आहे. हाच आमच्या राष्ट्रीयतेचा आत्मा असून, त्याला आम्ही मानतो आणि त्याचे अनुसरण करतो. आमचे मानवतेला असे सांगणे आहे की, “आता अशी वेळ आली आहे जेव्हा तुम्ही एक मोठे पाऊल उचलले पाहिजे आणि या भौतिक अस्तित्वाच्या वर उठून, ज्याकडे आता मानवता वळत आहे अशा अधिक उच्च, अधिक खोल व अधिक विशाल अशा जीवनाकडे वाटचाल केली पाहिजे. मानवजातीला भेडसावणाऱ्या समस्या ह्या आंतरिक साम्राज्यावर विजय प्राप्त करून घेऊनच सोडविता येतील; केवळ निसर्गाच्या शक्ती आरामदायक अशा सुखसोयींच्या सेवेत जुंपून ह्या समस्या सुटणार नाहीत; तर बाह्य प्रकृतीवर आंतरिक रीतीने विजय मिळवीत, माणसाचे बाह्य व आंतरिक स्वातंत्र्य सिद्ध करत, बुद्धी व आत्म्याच्या शक्तींवर प्रभुत्व मिळवूनच ह्या समस्या सोडविता येतील. या कार्यासाठी आशिया खंडाचे पुनरुत्थान गरजेचे असल्यामुळेच आशिया खंडाचा उत्कर्ष होत आहे. या कार्यासाठी भारताचे स्वातंत्र्य व त्याची महानता यांची आवश्यकता आहे आणि म्हणूनच भारत त्याच्या नियत अशा स्वातंत्र्याचा व महानतेचा दावा करीत आहे. आणि हा दावा मानवतेच्या भल्यासाठी आहे, यात इंग्लडला सुद्धा वगळलेले नाही, अशा या मानवतेच्या भल्यासाठी भारताने हा दावा प्रस्थापित केलाच पाहिजे.”

– श्रीअरविंद
(CWSA 08 : 27)

जगाच्या डोळ्यांसमोर अगदी वेगाने, अगदी स्पष्टपणे, भारतामध्ये राष्ट्रउभारणीचे कार्य घडू लागले आहे त्यामुळे सर्वांनाच ही प्रक्रिया दिसू शकत आहे आणि ज्यांच्यापाशी थोडी सहानुभूती आहे, अंतर्दृष्टी आहे ते ह्या दैवी रचनेची दिशा, त्यामध्ये कार्यकारी असणाऱ्या शक्ती, आणि त्यामध्ये उपयोगात आणले गेलेले साहित्य हयांतील वेगळेपण पाहू शकत आहेत. Read more