Posts

साधनेची मुळाक्षरे – १५

प्रश्न : मनामध्ये चालणाऱ्या चर्चा कशा थांबवाव्यात?

श्रीमाताजी : पहिली अट म्हणजे शक्य तितके कमी बोला.

दुसरी अट अशी की, तुम्ही आधी काय केले आहे किंवा काय करायचे आहे याचा विचार न करता, तुम्ही ज्या क्षणाला जे करत आहात केवळ त्याच गोष्टीचा विचार करा. भूतकाळाबद्दल खेद करत बसू नका किंवा भविष्य काय असेल याची कल्पना करत बसू नका.

तुम्ही तुमच्या विचारांमधील निराशावादाला आळा घालण्याचा शक्य होईल तेवढा प्रयत्न करा आणि स्वेच्छापूर्वक आशावादी बना.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 141)

धम्मपद : नीट शाकारणी न केलेल्या छपरातून जसे पावसाचे पाणी आत घुसते, तसेच असंतुलित मनामध्ये वासनाविकार, भावनावेग आत शिरतात.

श्रीमाताजी : चीनमध्ये, जपानमध्ये, ब्रह्मदेशात बौद्ध धर्माचे निरनिराळे पंथ अस्तित्वात आहेत आणि प्रत्येक पंथ आपापल्या साधनापद्धतींचे अनुसरण करीत असतो. पण मन शांत करणे हीच ज्यांची एकमेव साधनापद्धती आहे, अशा लोकांचा पंथ हा त्यांपैकी सर्वात जास्त दूरवर पसरलेला आहे.

ते दिवसा काही तास आणि रात्रीदेखील ध्यानास बसतात आणि मन शांत करतात. – न भटकणारे, तास न् तास शांत राहू शकणारे अविचल मन ही त्यांच्यासाठी सर्व साक्षात्काराची गुरुकिल्ली असते. ही साधी सोपी गोष्ट असते असे मात्र तुम्ही समजू नका. त्यांच्यापुढे दुसरे कोणतेच उद्दिष्ट नसते. ते कोणत्या एखाद्या विचारावर मन एकाग्र करीत नाहीत, आकलन अधिक उत्तम असावे, अधिक ज्ञान मिळवावे असा कोणताच प्रयत्न ते करीत नाहीत. त्यांच्या दृष्टीने एकच मार्ग असतो आणि तो म्हणजे मन निश्चल-नीरव करावयाचे. मन शांत करावयाचे, ते पूर्णतया शांत आणि नि:स्तब्ध करावयाचे; या परिणामाप्रत पोहोचण्यासाठी त्यांना कधीकधी तर वर्षेच्या वर्षे खर्ची घालावी लागतात. धम्मपदात येथे सांगितल्याप्रमाणे, जर मन असंतुलित असेल, तर कल्पना एकापाठोपाठ एक या पद्धतीने सतत उसळत राहतात, कधीकधी त्यामध्ये कोणताही विशिष्ट क्रम नसतो, त्या परस्परांना विसंगत वा विरोधी असतात. घटनांविषयी त्यांच्या काही विशिष्ट धारणा असतात, आणि त्यांचा डोक्यात धिंगाणा चाललेला असतो, आणि त्यामुळे जणूकाही छपराला भोकं पडतात. आणि गळक्या छपरातून जसे घरात पाणी आत शिरते त्याप्रमाणे सर्व प्रकारच्या अनिष्ट लहरी, जाणिवेमध्ये आत शिरतात.

काहीही असले तरी, मन शांत करणे, स्तब्ध, निस्तरंग करणे ह्यासाठी प्रत्येकाने दिवसातील थोडा वेळ राखून ठेवला पाहिजे, प्रत्येकालाच सुचवावी अशी ही साधनापद्धती आहे असे मला वाटते. जो मानसिकदृष्ट्या अधिक विकसित असेल, प्रगत असेल त्याला ही गोष्ट पटकन साध्य होते आणि मन अगदी प्राथमिक अवस्थेत असेल तर, ती गोष्ट अधिक अवघड असते, हे कोणालाही पटेल.
– श्रीमाताजी
(CWM 03 : 195)

सद्यकालीन विश्वात, सामान्य मानवी जीवन हे मनाच्या सत्तेने चालते; त्यामुळे मनावर ताबा मिळविणे, संयम मिळविणे ही सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट आहे; म्हणून आपले मन विकसित करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आपण पुढील साधनामार्गाचे क्रमश: अनुसरण करू.

एका पाठीमागून एक येणाऱ्या अशा चार प्रक्रिया आहेत, परंतु शेवटी त्या एकाच वेळीही घडून येऊ शकतात. स्वत:च्या विचारांचे निरीक्षण करणे ही पहिली, त्या विचारांवर बारकाईने लक्ष ठेवून राहणे ही दुसरी, विचार नियंत्रित करणे ही तिसरी आणि विचारांवर प्रभुत्व मिळविणे ही चौथी प्रक्रिया होय. निरीक्षण, पाळत, नियंत्रण व प्रभुत्व ह्या त्या चार प्रक्रिया आहेत. दुष्प्रवृत्त मनापासून सुटका करून घेण्यासाठी हे सारे करावयाचे असते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 183)

या जगताच्या दृश्यमानतेच्या पाठीमागे अस्तित्वाची आणि चेतनेची एक वास्तविकता आहे; सर्व गोष्टींमागे एकच शाश्वत आत्मा आहे, अशी शिकवण ज्या प्राचीन ऋषीमुनींची आहे, त्या ऋषीमुनींच्या शिकवणुकीपासून श्रीअरविंदांच्या शिकवणुकीचा प्रारंभ होतो. सर्व अस्तित्वं वस्तुतः त्या ‘एका’ आत्म्यात, चैतन्यात संघटित आहेत पण चेतनेच्या विशिष्ट विलगीकरणामुळे तसेच स्वत:च्या खऱ्याखुऱ्या आत्म्याविषयी आणि मन, प्राण, देह यांतील वास्तविकतेविषयी असलेल्या अज्ञानामुळे ती अस्तित्वं विभागली गेली आहेत. एका विशिष्ट अशा मानसिक शिस्तीद्वारे हा विभक्त जाणिवेचा पडदा दूर करणे आणि खऱ्याखुऱ्या आत्म्याची, स्वत:मधील व सर्वांमधील दिव्यत्वाची जाणीव होणे शक्य आहे. Read more