Posts

व्यक्तीकडे जेव्हा अशी अंतर्दृष्टी असते, की जी आपल्या अस्तित्वाची आतली द्वारे उघडून देते आणि ज्यामुळे व्यक्ती वस्तुमागील सत्य काय आहे ते पाहायला सुरुवात करते तेव्हा, व्यक्तीला हे उमगू लागते की, अगदी या भौतिक विश्वामध्येसुद्धा अशा अनेक गोष्टी आहेत की, ज्या आपल्या सामान्य नजरेतून निसटून जातात. व्यक्तीने अगदी सूक्ष्मदर्शक यंत्राखाली किंवा अगदी दुर्बिणीतून पाहिले तरी, किंवा आधुनिक छायाचित्रणाच्या साधनांद्वारे त्याचे पुनरुत्पादन करण्यात व्यक्ती सक्षम ठरली तरी, या साऱ्या गोष्टी म्हणजे केवळ वर्गीकरण असते, ‘निसर्गा’ची रहस्यं शोधण्याच्या दिशेने टाकलेली ती पहिलीवहिली पावले असतात. ‘निसर्गा’च्या कार्यप्रणाली मागे काय दडलेले आहे, याचे वर्णन कोणतेही मानवनिर्मित यंत्र करू शकणार नाही. ती कार्यप्रणाली इतकी सुंदर, इतकी बहुविध, इतकी सूक्ष्म आणि तिच्या अचूकतेबाबतीत, तिच्या बारकाव्यानिशी केलेल्या कार्याच्या परिपूर्णतेबाबत इतकी उत्कृष्ट आहे, की या छोट्याशा मेंदूने त्याचे वर्णन कधीच करता येणे शक्य नाही. आणि मनुष्याला मात्र असे वाटत असते की, ‘निसर्गा’च्या या कार्यप्रणालीमध्ये यंत्रांच्या मदतीने आणि त्याने लावलेल्या शोधांच्या माध्यमातून तो सुधारणा घडवून आणू शकतो; भौतिक क्षेत्रात त्याने ज्या क्षमता संपादन केलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून ‘निसर्गा’च्या या कार्यप्रणाली तो शास्त्रीय पद्धतीने बदलवून टाकू शकतो, अशी त्याची समजूत असते. मनुष्य त्याच्या सूत्रांद्वारे, त्याच्या अनुभवाच्या पद्धतीद्वारे आणि ‘निसर्गा’च्या कार्यप्रणालीवर विजय मिळविण्याच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या शोधांच्या साहाय्याने ‘निसर्गा’वर प्रभुत्व मिळवू शकतो असा त्याचा उद्दाम विश्वास असतो. केवढी ही मूर्खता, केवढा हा वेडेपणा!… कसली ही तुलना !

अनंताला कवळणाऱ्या ‘निसर्गा’च्या क्षमतेच्या परिघालासुद्धा मनुष्य आजवर स्पर्श करू शकलेला नाही आणि तो ‘निसर्गा’वर सत्ता गाजविण्याचा दावा करत आहे. – हा मनुष्याचा फाजील गर्व आणि त्याचा अहंकार आहे; असाध्य रोगाच्या तावडीत सापडलेल्या आणि ज्याचे आयुष्य गिळंकृत केले जात आहे अशा एखाद्या प्राण्याने व्यर्थ फुशारक्या माराव्यात तसे हे आहे.

आणि तरीही, मनुष्य विजय मिळविण्याची इच्छा बाळगून आहे, त्यावर ठाम आहे, आणि तो अतिशय उत्सुक आहे. परंतु त्यासाठी ज्या मार्गाचा तो अवलंब करत आहे त्यामुळे त्याला प्रदीर्घ काळ लागू शकतो. आणि आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला बरीच वेडीवाकडी वळणं पार करावी लागू शकतात.

– श्रीमाताजी
(Blessings of the Grace : 77-78)

विचार शलाका – २१

आपण असे म्हणू शकतो की, मनुष्य हा त्याच्या प्रकृतीच्या अस्तित्वाच्या सर्व अवस्थांचा सर्वशक्तिशाली स्वामी आहे. पण ते तो विसरला आहे.

सर्वसामर्थ्यवान अशी ही त्याची स्वाभाविक अवस्था आहे पण त्याचे त्याला विस्मरण झाले आहे…

उत्क्रांतीच्या वळणावर, माणसाने त्याची सर्वशक्तिमानता विसरणेच आवश्यक होते, कारण या सर्वशक्तिमानतेमुळे त्याची छाती गर्व आणि अभिमान याने फुलली होती आणि तो पूर्णत: विकृत बनला होता. म्हणून त्यासाठी इतर कितीतरी गोष्टी त्याच्यापेक्षा अधिक बलवान आणि शक्तिशाली आहेत याची त्याला जाणीव करून देणे भागच होते; पण मूलत: ते तसे नव्हते. ती प्रगतीच्या वळणाची आवश्यकता होती इतकेच!

मनुष्य हा संभाव्यतेच्या दृष्टीने देव आहे. मात्र तो स्वत:ला प्रत्यक्षातच देव समजू लागला होता. पण एखाद्या किड्यामुंगीपेक्षा आपण अधिक सरस नाही हे त्याने शिकण्याची गरज होती. आणि त्यामुळे जीवनाने त्याला इतके आणि अशा तऱ्हेने पिळवटून काढले की, जेणेकरून त्याला ते उमगावे… अगदीच काहीनाही तर, त्याला निदान त्या गोष्टीची थोडी जाणीव तरी व्हावी. माणूस जेव्हा अगदी योग्य दृष्टिकोन स्वीकारतो तेव्हा त्याला लगेचच समजून येते की, संभाव्यतेच्या दृष्टीने तो देवच आहे. मात्र त्याने तसे बनले पाहिजे, म्हणजे, जे जे तसे (दैवी) नाही त्यावर त्याने मात केली पाहिजे.

देवांबरोबरचे हे नाते खूपच स्वारस्यपूर्ण असते… दिव्य जिवांच्या शक्तिमानतेमुळे, त्यांच्या सौंदर्यामुळे, दिव्य जिवांच्या कर्तृत्वामुळे, त्यांच्या सिद्धींमुळे जोवर मनुष्य स्तंभित होत असतो, जोवर तो त्यांच्या स्तुतीमध्ये हरवून जात असतो, तोवर तो त्यांचा गुलाम असतो. पण ते दिव्य जीव म्हणजे परमेश्वरी अस्तित्वाची विविध रूपं असल्याचे जेव्हा त्याला उमगते आणि तो स्वत:सुद्धा, त्या परमेश्वरी अस्तित्वाचेच आणखी एक वेगळे रूप आहे, हे त्याला जाणवते – जे रूप त्याने बनले मात्र पाहिजे – तेव्हा मग, दिव्य जीव आणि मनुष्य यांच्यातील नाते बदलते. तेव्हा तो त्यांचा गुलाम राहात नाही. – तो मग त्यांचा गुलाम असत नाही.

– श्रीमाताजी
(CWM 11 : 38-39)