श्रीमाताजी आणि समीपता – २६
साधक : आज सकाळी ‘क्ष’च्या मार्फत मी श्रीमाताजींना पत्र पाठविले. परंतु मला त्यांच्याकडून अजूनपर्यंत उत्तर मिळाले नाही. माझ्या हातून काही चूक घडली का? त्यांचा एकेक शब्द ऐकण्यासाठी मी अगदी व्याकुळ झालो आहे.
श्रीअरविंद : अशा प्रकारच्या भावनांना नेहमी नकारच दिला पाहिजे. ईश्वराबरोबर असलेले नाते, श्रीमाताजींबरोबर असलेले नाते हे प्रेमाचे, श्रद्धेचे, विश्वासाचे, खात्रीचे, समर्पणाचे असले पाहिजे. या व्यतिरिक्त असणाऱ्या कोणत्याही अन्य प्राणिक सामान्य प्रकारच्या नात्यामुळे साधनेला विरोधी असणाऱ्या प्रतिक्रिया निर्माण होतात; इच्छावासना, अहंकारी अभिमान, अपेक्षा, बंडखोरीची भावना आणि तत्सम अज्ञानी राजसिक मानवी प्रकृतीच्या साऱ्या अस्वस्थता या गोष्टी निर्माण होतात आणि त्यांच्यापासून सुटका करून घेणे हे तर साधनेचे उद्दिष्ट असते.
– श्रीअरविंद (CWSA 32 : 450-451)