Posts

विचार शलाका – ०४

भारतीय धर्माने व्यक्तीला सुप्रस्थापित, सुसंशोधित, बहुशाखीय आणि नित्य विस्तीर्ण होत जाणारा असा ज्ञानाचा तसेच आध्यात्मिक वा धार्मिक साधनेचा मार्ग दाखवून दिला.

त्या उच्च पायऱ्यांवर जाण्याची ज्यांची तयारी झालेली नाही त्यांच्याकरिता, भारतीय धर्माने व्यक्तीजीवन व समाजगत जीवन यासंबंधातील व्यवस्था घालून दिली, व्यक्तिगत शिस्त व सामाजिक शिस्त, व्यक्तिगत वर्तन व समाजगत वर्तन या संबंधात एक आराखडा पुरवला; मानसिक, नैतिक व प्राणिक संवर्धनाची चौकट पुरवली. ही व्यवस्था, आराखडा, चौकट मान्य करून कोणीही आपल्या मर्यादेत, आपल्या प्रकृतीला धरून असे वागू शकतो की, अंतत: श्रेष्ठ अस्तित्वात व जीवनात प्रविष्ट होण्याची त्याची तयारी होते.

हिंदूधर्माने…जीवनाचा कोणताही भाग धार्मिक व आध्यात्मिक जीवनाला परका मानला नाही व ठेवला नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 20 : 181)

विचार शलाका – ०३

प्राचीन भारतीय सभ्यता चार मानवी हितसंबंधाच्या पायावर स्पष्टपणे उभी केलेली होती – १) वासना आणि भोग २) मन व शरीर यांची भौतिक व आर्थिक उद्दिष्टे व गरजा ३) नैतिक वर्तन व वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाचा योग्य नियम ४) आध्यात्मिक मुक्ती; म्हणजेच काम, अर्थ, धर्म, मोक्ष.

संस्कृतीचे व समाजसंघटनेचे हे कार्य होते की, त्यांनी नेतृत्व करून, मानवाच्या या हितसंबंधांना आधार देऊन, मानवाचे समाधान करावे आणि या हितसंबंधांची रूपे व हेतु यांचा शक्यतो समन्वय करावा. क्वचित काही अपवाद सोडता, मानवाच्या वरील तीन ऐहिक हेतूंचे समाधान अगोदर, आणि इतर हेतूचा विचार नंतर, अशी व्यवस्था अभिप्रेत होती; अगोदर जीवनाची पूर्णता आणि नंतर जीवनाला मागे टाकून पलीकडे जाणे, अशी व्यवस्था अभिप्रेत होती.

कुटुंबाचे ऋण, समाजाचे ऋण व देवांचे ऋण ही तीन ऋणे फेडण्यात कसूर न व्हावी असा संस्कृतीचा आदेश होता. पृथ्वीचे देणे पृथ्वीला दिले पाहिजे, सापेक्ष जीवनाला त्याची लीला करू दिली पाहिजे. या जीवनाच्या पलीकडे निरपेक्ष केवलाची शांती आहे, पृथ्वीच्या पलीकडे स्वर्गाचे वैभव आहे, म्हणून पृथ्वी व सापेक्ष जीवन यांजकडे दुर्लक्ष होता कामा नये, असा संस्कृतीचा आदेश होता. सर्वांनी गुहेत, मठात जावे असा प्रचार या संस्कृतीत मुळीच नव्हता.

– श्रीअरविंद
(CWSA 20 : 125)

हिंदुधर्माने स्वत:ला कोणतेही नाव देऊ केले नाही कारण त्याने स्वत:वर कोणत्याही पंथाच्या मर्यादा घालून घेतल्या नाहीत; त्याने कोणत्याही एकाच एक गोष्टीला वैश्विक समर्थन दिलेले नाही; त्याने कोणत्याच मतप्रणालीला बिनचूक म्हणून घोषित केलेले नाही; मुक्तीचा कोणताच एकच एक मार्ग वा प्रवेशद्वार असे सांगितलेले नाही; हिंदुधर्म म्हणजे कोणता एकच एक असा पंथ वा संप्रदाय नसून, मानवी आत्म्याने ईश्वराभिमुख राहत, सातत्याने केलेल्या विस्तारित प्रयत्नांची ती परंपरा आहे. आध्यात्मिक आत्मरचना आणि आत्मशोधासाठी, अनेकांगी, आणि अनेक पातळ्यांवरील व्यवस्था यामध्ये आहे; या साऱ्यामुळेच ज्या नावाने हा धर्म ओळखला जातो, शाश्वत धर्म हेच नाव स्वत:ला लावण्याचा त्याला पुरेपूर अधिकार आहे. या धर्माच्या अर्थाची आणि त्याच्या आत्म्याची न्याय्य आणि योग्य समज आपल्याला असेल तर आणि तरच भारतीय संस्कृतीचा खरा अर्थ आणि तिचा आत्मा यांचे आपल्याला आकलन होऊ शकेल.

– श्रीअरविंद
(CWSA 20 : 178-179)