Posts

(इसवी सन : १८९० ते १९०६)

आपल्यामध्ये प्रेमाची, उत्साहाची, ‘भक्ती’ची कमतरता आहे का? नाही, या गोष्टी तर भारतीय प्रकृतीमध्येच रुजलेल्या आहेत, पण ‘शक्ति’च्या अभावामुळे आपण लक्ष केंद्रित करू शकत नाही, त्यांना आपण दिशा देऊ शकत नाही, एवढेच काय पण आपण त्या टिकवून देखील ठेवू शकत नाही. ‘भक्ती’ ही धगधगती ज्वाळा आहे तर, ‘शक्ती’ हे तिचे इंधन आहे. जर इंधनच अपुरे असेल तर अग्नी किती काळ टिकून राहील? एखाद्या व्यक्तीकडे सुदृढ प्रकृती असून, ती व्यक्ती जर ज्ञानप्रदीप्त, शिस्तबद्ध असेल तसेच ‘कर्मा’मुळे तिला महाकाय सामर्थ्य प्रदान करण्यात आलेले असेल; आणि त्यातूनही जर अशी व्यक्ती ईश्वरविषयक प्रेमाने आणि भक्तीने स्वत:ला उन्नत करेल, तर अशी भक्ती टिकून राहील आणि अशा व्यक्तीचा आत्मा हा ‘ईश्वरा’बरोबर सदैव ऐक्य पावलेला असेल. पण दुर्बल प्रकृतीची व्यक्ती परिपूर्ण ‘भक्ती’सारख्या महान गोष्टीचा आवेग झेलू शकण्यास फारच कमकुवत ठरते; तो एक क्षणभरासाठीच उचलला जातो, मग ती ज्वाळा थेट ‘स्वर्गा’लाच जाऊन भिडते आणि ती व्यक्ती पूर्णपणे थकून जाते, पूर्वीपेक्षाही अधिक दुर्बल बनून जाते. ज्याद्वारे सर्व जीवनव्यवहार घडत असतात ते मानवी जडद्रव्य जोपर्यंत, कमजोर आणि अल्प असते तोपर्यंत, त्यातून निर्माण होणाऱ्या आणि उत्साह व भक्ती हाच ज्यांचा प्राण आहे अशी प्रत्येक गोष्ट असफल होणे आणि भाजून निघणे, क्रमप्राप्तच आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 06-07 : 82)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – १५

ईश्वराप्रत जाण्याचा ध्यान हा एक मार्ग आहे, तो महान मार्ग आहे; पण तो जवळचा मार्ग आहे, असे म्हणता येणार नाही. कारण तो खूप उच्च स्तरावर घेऊन जाणारा असला, तरीही तो बहुतेकांसाठी खूप लांबचा आणि अवघड मार्ग असतो. जर त्यामुळे (ईश्वराचे)अवतरण घडून आले नाही तर, तो जवळचा मार्ग आहे असे कदापिही म्हणता येणार नाही…

कर्म हा तुलनेने बराच साधासरळ मार्ग आहे. परंतु, त्यामध्ये व्यक्तीचे मन ईश्वराला वगळून, फक्त कर्मावरच खिळलेले असता कामा नये. ईश्वर हेच साध्य असले पाहिजे आणि कर्म हे केवळ एक साधन होऊ शकते.

…प्रेम आणि भक्ती ह्या गोष्टी जर अधिक प्राणप्रधान (Vital) असतील तर, हर्षभरित अपेक्षा आणि विरह, अभिमान आणि नैराश्य या गोष्टींमध्ये दोलायमान स्थिती होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे प्रेम आणि भक्तीचा मार्ग जवळचा न राहता, दूरवरचा, वळणावळणाचा होतो. ईश्वराकडे धाव घेण्याऐवजी, थेट झेपावण्याऐवजी, एखादा स्वतःच्या अहंकाराच्या भोवती भोवती घोटाळत राहण्याची शक्यता असते.

*

पूर्णयोगामध्ये ध्यान, कर्म, भक्ती या सर्व गोष्टींचाच समावेश होतो; परिपूर्तीच्या दिशेने जाण्यासाठी पूर्वतयारी म्हणून साहाय्यभूत होणारे हे प्रत्येक साधन आहे. जर व्यक्ती कर्माच्या माध्यमातून समर्पित होऊ शकत असेल तर आत्म-दानासाठी असलेल्या अत्यंत प्रभावी साधनांपैकी ते एक साधन असते; आणि स्वयमेव आत्म-दानदेखील साधनेचे एक अत्यंत शक्तिशाली आणि अपरिहार्य तत्त्व असते.

पूर्णयोग हा, समग्र अस्तित्वाचे त्याच्या सर्व घटकांनिशी आत्मार्पण करण्याचा, विचारी मनाचे आणि हृदयाचे, इच्छेचे आणि कृतींचे, आंतरिक व बाह्य साधनभूत घटकांचे अर्पण करण्याचा मार्ग आहे; ज्यामुळे व्यक्ती ईश्वराच्या अनुभूतीपर्यंत, आंतरिक उपस्थितीपर्यंत येऊन पोहोचते, आंतरात्मिक आणि आध्यात्मिक परिवर्तनापर्यंत येऊन पोहोचते. (उपरोक्त) सर्वच मार्गांनी व्यक्ती जितके आत्म-दान करेल तेवढे ते साधनेसाठी चांगलेच असते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 212), (CWSA 29 : 213-214)

मानसिक परिपूर्णत्व – १९

 

ईश्वराप्रत जाण्याचा ध्यान हा एक मार्ग आहे, तो महान मार्ग आहे; पण तो जवळचा मार्ग आहे, असे म्हणता येणार नाही. कारण तो खूप उच्च स्तरावर घेऊन जाणारा असला, तरीही तो बहुतेकांसाठी खूप लांबचा आणि अवघड मार्ग असतो. जर त्यामुळे अवतरण घडून आले नाही तर, तो जवळचा मार्ग आहे असे कदापिही म्हणता येणार नाही आणि तेव्हासुद्धा, म्हणजे अवतरण घडून येते तेव्हासुद्धा लवकर होते ती फक्त पायाभरणीच! नंतर त्या पायावर ध्यानाच्या आधारे, मोठ्या परिश्रमाने एक भली मोठी इमारत उभारावी लागते. हे अगदी अनिवार्य आहे, पण ह्याला जवळचा मार्ग असे म्हणता येईल, असे त्यात काही नाही.

कर्म हा तुलनेने बराच साधासरळ मार्ग आहे – परंतु, त्यामध्ये व्यक्तीचे मन ईश्वराला वगळून, फक्त कर्मावरच खिळलेले असता कामा नये. ईश्वर हे साध्य असले पाहिजे आणि कर्म हे केवळ एक साधन असले पाहिजे. काव्यादींचा उपयोग आपल्या आंतरिक अस्तित्वाच्या संपर्कात येण्यासाठी असतो आणि त्या संपर्काचा उपयोग आपल्या आंतरतम अस्तित्वाच्या थेट संपर्कात येण्यासाठी तयारी म्हणून होतो, पण व्यक्तीने तेथेच थांबता कामा नये, व्यक्तीने सद्वस्तुपर्यंत जाऊन पोहोचायला हवे. जर व्यक्ती स्वतःला साहित्यिक किंवा कवी, चित्रकार समजत असेल आणि साहित्य साहित्यासाठी, कला कलेसाठीच असे मानत असेल तर, ही काही योगिक वृत्ती नाही. आणि म्हणूनच मी कधीकधी असे म्हणत असतो की, आपले काम हे योगी बनणे आहे; केवळ कवी, चित्रकार बनणे हे नाही.

प्रेम, भक्ती, समर्पण, चैत्य खुलेपणा हे ईश्वराप्रत पोहोचण्याचे सर्वात जवळचे मार्ग आहेत किंवा असू शकतात. कारण प्रेम आणि भक्ती ह्या गोष्टी जर जास्त प्राणप्रधान असतील तर, हर्षभरित अपेक्षा आणि विरह, अभिमान आणि नैराश्य या गोष्टींमध्ये दोलायमान स्थिती होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे हा मार्ग जवळचा न राहता, दूरवरचा, वळणावळणाचा होतो. ईश्वराकडे धाव घेण्याऐवजी, थेट झेपावण्याऐवजी, एखादा स्वतःच्या अहंकाराच्या भोवती भोवती घोटाळत राहण्याची शक्यता असते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 212)

जो कोणी श्रीमाताजींप्रत वळलेला आहे तो माझा योग आचरत आहे. केवळ स्वबळावर, पूर्णयोग करता येईल वा पूर्णयोगाची सर्व अंगे पूर्णत्वाला नेता येतील असे समजणे ही फार मोठी चूक आहे. कोणताही मनुष्य असे करू शकत नाही. मग, व्यक्तीने काय करावयास हवे? तर स्वत:ला श्रीमाताजींच्या हाती सोपवून द्यावयास हवे आणि सेवा, भक्ती, अभीप्सा यांद्वारे त्यांच्याप्रत खुले व्हावयास हवे, म्हणजे मग श्रीमाताजी त्यांच्या प्रकाश व सामर्थ्यानिशी त्या व्यक्तीमध्ये कार्य करतील, जेणेकरून त्या व्यक्तीस साधना करता येईल. महान पूर्णयोगी बनण्याची, अतिमानसिक व्यक्ती बनण्याची आकांक्षा बाळगणे आणि त्या दिशेने स्वत:ची किती वाटचाल झाली आहे ह्याची स्वत:शीच विचारणा करणे हीदेखील एक चूकच आहे. श्रीमाताजींविषयी भक्ती बाळगणे आणि स्वत:ला त्यांच्याप्रत समर्पित करणे आणि तुम्ही जे बनावे अशी त्यांची इच्छा आहे तसे बनण्याची इच्छा बाळगणे हा योग्य दृष्टिकोन आहे. उरलेल्या सर्व गोष्टी ठरविणे आणि त्या तुमच्यामध्ये घडवून आणणे ह्या गोष्टी श्रीमाताजींनीच करावयाच्या आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 151-152)

श्रीअरविंदांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रांमधून –

दिव्य माता भेटावी म्हणून डोळ्यांत अश्रू येणे हे एक प्रकारचे चैत्य दुःख आहे; परंतु चैत्य अश्रू हे दुःखपूर्ण असण्याची आवश्यकता नाही, भावुकता आणि आनंदाचेदेखील अश्रू असू शकतात.

शांतीच्या आणि स्थिरचित्ततेच्या या स्थितीमध्ये हृदयाच्या मागे असणाऱ्या आंतरिक चैत्य पुरुषाचा स्पर्श झाल्याने कदाचित अश्रू आले असतील. जो आत्मा पृष्ठस्तरावर येऊ पाहत आहे त्या आत्म्याच्या अभीप्सेची आणि भक्तीची ही खूण असते. जर चैत्य पुरुष पृष्ठभागावर येऊ शकला, आणि सर्व प्रकृतीमध्ये सुसंवाद प्रस्थापित होऊ शकला, सर्व अस्तित्व ईश्वराभिमुख होऊ शकले तर असे अश्रू येणे कालांतराने नाहीसे होईल.

*

तुम्ही ज्याविषयी बोलत आहात त्या भावनेसहित रडू येणे ही चैत्य दुःखाची खूण आहे; त्यामधून चैत्य पुरुषाची अभीप्साच अभिव्यक्त होते. परंतु त्याबरोबर निराशा किंवा हताशपणा येता कामा नये. उलट, तुम्ही श्रद्धेला अधिकच चिकटून राहिले पाहिजे कारण तुमच्यामध्ये खरीखुरी अभीप्सा आहे – आणि त्याविषयी तीळमात्र शंका असू शकत नाही, बाह्य प्रकृतीमध्ये कितीही अडचणी असल्या तरीही एक ना एक दिवस त्याची परिपूर्ती होणारच. आंतरिक शांती व स्थिरचित्तता या गोष्टी ज्या श्रद्धेमध्ये आहेत ती श्रद्धा तुम्ही पुन्हा प्राप्त करून घेतली पाहिजे. आणि त्याबरोबरच, काय करावयास हवे यासंबंधी स्पष्ट जाणीव कायम राखत, आंतरिक व बाह्य परिवर्तनासाठी एक स्थिर अशी अभीप्सा बाळगली पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 375-376)

तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती अशी की, अंधारा काळ हा अपरिहार्य आहे. जेव्हा तुमच्यातील चैत्य सक्रिय असतो तेव्हा कोणत्याही स्पष्ट कारणाविना तुम्हाला एक प्रकारचा आनंद जाणवतो. तो काही काळ तसाच टिकून राहतो आणि परत कोणत्यातरी मानसिक किंवा प्राणिक प्रतिक्रिया उमटतात आणि परत मग तुम्ही त्याच त्या अंधारात जाऊन पडता. हे काही काळ चालत राहणार.

हळूहळू प्रकाशमान दिवस हे अधिकाधिक काळ टिकून राहू शकतील आणि बऱ्याच कालावधीनंतर कधीतरी मग अंधारा काळ येईल आणि तो सुद्धा कमी काळासाठी येईल. अंतिमत: जोवर तो अंधारा काळ पूर्णपणे नाहीसा होत नाही, तोपर्यंत हे असे चालत राहील. तोपर्यंत तुम्ही हे लक्षात ठेवावयास हवे की, ढगांमागे सूर्य दडलेला असतोच, तेव्हा तुम्ही काळजी करण्याचे काही कारण नाही.

तुमच्याकडे एखाद्या बालकाप्रमाणे विश्वास असावयास हवा – हा विश्वास की, कोणीतरी तुमची काळजी घेणारे आहे आणि त्यामुळे तुम्ही त्याच्यावर पूर्णपणे विसंबून राहू शकता.

– श्रीमाताजी

*

जेव्हा अहं-केंद्रितता ही मोठ्या प्रमाणात नाहीशी झालेली असते, तसेच श्रीमाताजींप्रत उत्कट भक्ती असते तेव्हा, चैत्य केंद्र थेट खुले होणे हे अधिक सहजसोपे असते. एक प्रकारची आध्यात्मिक विनम्रता आणि समर्पणाची, विसंबून असल्याची भावना ही आवश्यक असते.

– श्रीअरविंद

*

इच्छावासनांचा परित्याग केल्यामुळे, जेव्हा त्या इच्छावासना व्यक्तीचे विचार, भावभावना, कृती यांचे शासन करेनाशा होतात तेव्हा, आणि पूर्ण प्रामाणिकतेनिशी आत्मार्पण करण्याविषयीची एक स्थिर अशी अभीप्सा व्यक्तीमध्ये उदित होते तेव्हा, कालांतराने चैत्य पुरुष सहसा आपणहूनच खुला होतो.

– श्रीअरविंद
(CWM 14 : 247), (CWSA 32 : 163), (CWSA 30 : 349)

भक्ती आणि ज्ञान यांचे परस्परांविषयीचे गैरसमज हे अज्ञानमूलक आहेत; त्याचप्रमाणे कर्ममार्ग कमी दर्जाचा आहे ही या दोन्ही मार्गांची असणारी समजूतही तितकीच अज्ञानमूलक आहे. ज्ञानमार्गी व भक्तिमार्गी म्हणतात की, आध्यात्मिक संपत्ती ही कर्ममार्गापेक्षा श्रेष्ठ दर्जाची आहे; परंतु त्यांचे हे म्हणणेही अज्ञानमूलकच आहे.

अशी एक तीव्र भक्ती, असे एक तीव्र ज्ञान असते की ज्यांना ‘कर्म’ हे बहिर्मुख व विक्षेप उत्पन्न करणारे वाटते परंतु जोवर ईश्वराच्या जाणिवेशी आमची जाणीव एकत्व पावत नाही, ईश्वराच्या कर्मसंकल्प-शक्तीशी आमची कर्मसंकल्प-शक्ती एकत्व पावत नाही; तोवरच ‘कर्म’ हे बहिर्मुख व विक्षेप करणारे आहे असे वाटते. परंतु एकदा का हे एकत्व साधले की, कर्म हीच ज्ञानाची शक्ती बनते आणि कर्म हाच प्रेमाच्या अभिव्यक्तीचा मार्ग बनतो.

ईश्वराशी एकत्वाची अवस्था म्हणजे ज्ञान असेल आणि या एकत्वाचा आनंद म्हणजे भक्ती असेल तर, त्या एकत्वाचा प्रकाश व माधुर्य यांचे जिवंत सामर्थ्य म्हणजे दिव्य कर्म असे म्हणता येईल. कोणत्याही मानवी प्रेमामध्ये जी एक आस असते, ती तशीच आस व प्रेमाची तीच स्पंदने ईश्वराबद्दलच्या प्रेमातही असतात. प्रियकर आणि प्रेयसी दोघेही जगापासून आणि इतर सर्वांपासून दूर कोठेतरी, हृदयाच्या गुह्यतम कोपऱ्यामध्ये दडून, ऐक्याच्या निरपवाद आनंदामध्ये निमग्न राहू इच्छितात. तीच कदाचित भक्तिमार्गावरीलही एक अपरिहार्य अशी मनोवस्था असू शकते.

पण ज्या विशाल अशा प्रेमाची परिपूर्ती ज्ञानामध्ये झालेली असते ते प्रेम हे, हृदयाच्या अंतरगृहातील आनंद आणि बाह्य जग यांच्यात कोणताही भेद किंवा विरोध आहे असे मानत नाही. तर उलट, बाह्य जग हे त्या प्रियकराचे, ईश्वराचे धाम आहे, सर्व प्राणिमात्र हे ईश्वराचेच अस्तित्व आहे असे ही व्यापक भक्ती मानते; आणि व्यापक भक्तीची ही जी दिव्य दृष्टी आहे त्या दिव्य दृष्टीत दिव्य कर्माचा आनंद आहे आणि दिव्य कर्माचे समर्थन आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 24 : 551)

ईश्वर आणि आपले नाते निर्माण होण्याच्या प्रक्रियेत सुरुवातीला म्हणजे आपण कनिष्ठ पातळीवर असताना, प्रार्थना आपली तयारी करून घेत असते. त्यावेळी ती प्रार्थना, आपल्या अहंवादी आणि आत्मभ्रांत अवस्थेशी जरी मिळतीजुळती असली तरीसुद्धा, ती त्या नात्याची पूर्वतयारी करून घेत असते; आणि कालांतराने प्रार्थनेमागे असलेल्या आध्यात्मिक सत्याकडे आपले लक्ष वळवले जाऊ शकते. Read more