Posts

श्रीमाताजी आणि समीपता – २६

साधक : आज सकाळी ‘क्ष’च्या मार्फत मी श्रीमाताजींना पत्र पाठविले. परंतु मला त्यांच्याकडून अजूनपर्यंत उत्तर मिळाले नाही. माझ्या हातून काही चूक घडली का? त्यांचा एकेक शब्द ऐकण्यासाठी मी अगदी व्याकुळ झालो आहे.

श्रीअरविंद : अशा प्रकारच्या भावनांना नेहमी नकारच दिला पाहिजे. ईश्वराबरोबर असलेले नाते, श्रीमाताजींबरोबर असलेले नाते हे प्रेमाचे, श्रद्धेचे, विश्वासाचे, खात्रीचे, समर्पणाचे असले पाहिजे. या व्यतिरिक्त असणाऱ्या कोणत्याही अन्य प्राणिक सामान्य प्रकारच्या नात्यामुळे साधनेला विरोधी असणाऱ्या प्रतिक्रिया निर्माण होतात; इच्छावासना, अहंकारी अभिमान, अपेक्षा, बंडखोरीची भावना आणि तत्सम अज्ञानी राजसिक मानवी प्रकृतीच्या साऱ्या अस्वस्थता या गोष्टी निर्माण होतात आणि त्यांच्यापासून सुटका करून घेणे हे तर साधनेचे उद्दिष्ट असते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 450-451)

साधना, योग आणि रूपांतरण – २३०

चेतना ‘ईश्वरा’प्रत खुली करणे आणि प्रकृतीमध्ये परिवर्तन घडवून आणणे हे साधनेचे उद्दिष्ट आहे. ध्यान किंवा निदिध्यासन हा यांतील एक मार्ग आहे पण ते केवळ एक साधन आहे, भक्ती हे दुसरे साधन, तर कर्म हे आणखी एक साधन आहे.

साक्षात्काराच्या दिशेने पहिले साधन म्हणून योग्यांकडून चित्तशुद्धीची साधना केली जात असे आणि त्यातून त्यांना संतांच्या संतत्वाची आणि ऋषीमुनींच्या अचंचलतेची प्राप्ती होत असे. पण आम्ही प्रकृतीच्या ज्या रूपांतरणाविषयी बोलतो, ते यापेक्षा काहीतरी अधिक आहे; आणि हे रूपांतरण केवळ ध्यानसमाधीने होत नाही, त्यासाठी कर्म आवश्यक असते. कर्मातील ‘योग’ हा अनिवार्य असतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 208)

साधना, योग आणि रूपांतरण – २२९

इच्छा, राजसिकता आणि अहंकार यांना दिलेल्या नकारामुळे व्यक्तीला अशी अचंचलता आणि शुद्धता प्राप्त होते की, ज्यामध्ये अनिर्वचनीय ‘शांती’ अवतरू शकते. व्यक्तीने स्वतःची इच्छा ‘ईश्वरा’प्रत अर्पण केली, तिने स्वतःची इच्छा ही ‘ईश्वरी ‘संकल्पा’मध्ये मेळविली (merging) तर व्यक्तीच्या अहंकाराचा अंत होतो आणि व्यक्तीला वैश्विक चेतनेमध्ये व्यापकता प्राप्त होते किंवा विश्वातीत असलेल्या गोष्टीमध्ये तिचे उन्नयन होते. व्यक्तीला ‘प्रकृती’पासून ‘पुरुषा’चे विलगीकरण अनुभवास येते आणि बाह्य प्रकृतीच्या बेड्यांपासून व्यक्तीची सुटका होते. व्यक्तीला तिच्या आंतरिक अस्तित्वाची जाणीव होते आणि बाह्यवर्ती अस्तित्व हे साधन असल्याचे जाणवते; ‘विश्वशक्ती’च व्यक्तीचे कार्य करत असल्याची आणि ‘आत्मा’ किंवा ‘पुरुष’ त्याकडे पाहात असल्याची किंवा तो साक्षी असून, मुक्त असल्याचे व्यक्तीला जाणवते. आपले कर्म हाती घेऊन, विश्व‘माता’ किंवा परम‘माता’च ते करत असल्याचे, किंवा हृदयापाठीमागून एक ‘दिव्य शक्ती’ त्या कर्माचे नियंत्रण करत आहे, किंवा ते कर्म करत आहे, असे व्यक्तीला जाणवते.

व्यक्तीने स्वतःची इच्छा आणि कर्म अशा रीतीने सतत ‘ईश्वरा’प्रत निवेदित केली तर, प्रेम आणि भक्ती वृद्धिंगत होते, चैत्य पुरुष पुढे येतो. ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ‘शक्ती’प्रत निवेदन केल्यामुळे, ती शक्ती आपल्या ऊर्ध्वस्थित असल्याचा अनुभव आपल्याला येऊ शकतो. आणि तिच्या अवतरणाची आणि उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या चेतनेप्रत व ज्ञानाप्रत आपण उन्मुख होत आहोत अशी जाणीव आपल्याला होऊ शकते.

सरतेशेवटी कर्म, भक्ती आणि ज्ञान एकत्रित येतात आणि आत्मपरिपूर्णत्व शक्य होते; त्यालाच आम्ही ‘प्रकृतीचे रूपांतरण’ असे संबोधतो. अर्थातच हे परिणाम काही एकाएकी होत नाहीत, व्यक्तीची परिस्थिती आणि तिचा विकास यांनुसार, ते कमीअधिक धीमेपणाने, कमीअधिक समग्रतेने दिसून येतात.

ईश्वरी साक्षात्कारासाठी कोणताही सोपा राजमार्ग नाही. सर्वंकष आध्यात्मिक जीवनासाठी ‘गीता’प्रणीत ‘कर्मयोग’ मी अशा रीतीने विकसित केला आहे. तो कोणत्याही अनुमानावर आणि तर्कावर आधारलेला नाही तर, तो अनुभूतीवर आधारलेला आहे. त्यामधून ध्यान वगळण्यात आलेले नाही आणि त्यातून भक्तीदेखील नक्कीच वगळण्यात आलेली नाही. कारण ‘ईश्वरा’प्रत आत्मार्पण, ‘ईश्वरा’प्रत स्वतःच्या सर्वस्वाचे निवेदन हा जो ‘कर्मयोगा’चा गाभा आहे, तोच मूलतः भक्तीचा देखील एक मार्ग आहे.

एवढेच की, जीवनापासून पलायन करू पाहणाऱ्या एकांतिक अशा ध्यानाला तसेच, स्वतःच्याच आंतरिक स्वप्नामध्ये बंदिस्त होऊन राहणाऱ्या भावनाप्रधान भक्तीला मात्र पूर्णयोगाची समग्र प्रक्रिया म्हणून स्वीकारण्यात आलेले नाही. एखादी व्यक्ती तास न् तास ध्यानामध्ये पूर्णपणे गढून जात असेल किंवा आंतरिक अविचल आराधना आणि परमानंदामध्ये तास न् तास निमग्न होत असेल, तरीसुद्धा या गोष्टी म्हणजे समग्र पूर्णयोग नव्हे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 216-218)

साधना, योग आणि रूपांतरण – १४५

पूर्णयोगांतर्गत भक्ती

श्रीअरविंद : प्रेम आणि भक्ती ही चैत्य पुरुषाच्या खुले होण्यावर अवलंबून असते आणि त्यासाठी इच्छावासना नाहीशा होणे आवश्यकच असते. बऱ्याच जणांकडून श्रीमाताजींप्रति आंतरात्मिक प्रेमाऐवजी प्राणिक प्रेम अर्पण करण्यात येते; इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा या प्राणिक प्रेमामुळे अधिकच अडथळे निर्माण होतात कारण त्यामध्ये इच्छावासना मिसळलेल्या असतात.

साधक : श्रीमाताजींविषयीची आंतरात्मिक भक्ती, मानसिक भक्ती आणि प्राणिक भक्ती यांचे स्वरूप कसे असते? ते कसे ओळखावे?

श्रीअरविंद : कोणतीही अपेक्षा न बाळगता केलेले आत्मदान आणि प्रेम हे ‘आंतरात्मिक भक्ती’चे स्वरूप असते, तर श्रीमाताजींनी मला त्यांचे अंकित करावे आणि मी त्यांची सेवा करावी ही इच्छा हे ‘प्राणिक भक्ती’चे स्वरूप असते. आणि ‘श्रीमाताजी’ जशा आहेत, त्या जे सांगतात आणि त्या जे करतात त्याचा, कोणताही किंतुपरंतु न बाळगता केलेला स्वीकार आणि श्रद्धा हे ‘मानसिक भक्ती’ चे स्वरूप असते. वस्तुतः ही भक्तीची बाह्य लक्षणे आहेत. त्यांचे आंतरिक स्वरूप ओळखता येण्याइतके सुस्पष्ट असते पण त्यांतील भेद शब्दांत मांडायची आवश्यकता नाही.

साधक : ‘पूर्णयोगा’मध्ये मानसिक आणि प्राणिक भक्तीला काही स्थान नाहीये का?

श्रीअरविंद : ती जर खरी भक्ती असेल तर त्या प्रत्येक भक्तीला येथे स्थान आहे.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 475-477)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

साधना, योग आणि रूपांतरण – ४१

(ध्यानाची उद्दिष्टे काय असतात किंवा काय असावीत यासंबंधीचा विचार आपण येथे समजावून घेत आहोत. त्याचा हा उत्तरार्ध…)

‘योगा’मध्ये एकाग्रतेचा उपयोग अन्य उद्दिष्टासाठीदेखील केला जातो. उदा. आपल्या जाग्रत स्थितीपासून (waking state) म्हणजे चेतनेची जी सीमित आणि पृष्ठवर्ती अवस्था असते त्यापासून निवृत्त होऊन, आपल्या अस्तित्वाच्या अंतरंगामध्ये खोलवर जाण्यासाठीदेखील (‘समाधी’च्या विविध अवस्थांद्वारे ही खोली मोजली जाते) एकाग्रतेचा अवलंब केला जातो. या प्रक्रियेसाठी, विचारमालिकेवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा (ध्यानापेक्षा), कोणत्यातरी एकाच वस्तुवर, संकल्पनेवर किंवा नामावर लक्ष केंद्रित करणे (निदिध्यास) अधिक परिणामकारक असते.

असे असले तरी, ध्यानामुळे ‘पूर्णयोगां’तर्गत अभिप्रेत असलेल्या समाधीची पूर्वतयारी होते. असे ध्यान आपले आपल्या अस्तित्वाच्या खोलवर असणाऱ्या अवस्थांशी अप्रत्यक्षपणे पण जाग्रत सायुज्य (communion) निर्माण करते. काहीही असले तरी, जो विचार ‘पुरुषा’च्या नियंत्रणाखाली (सांख्य तत्त्वज्ञानातील पुरुष) आणला गेला आहे अशा रचनात्मक विचाराची तेजस्वी कृती हा ध्यानाचा वैशिष्ट्यपूर्ण उपयोग असतो. त्याद्वारे उर्वरित सर्व चेतना नियंत्रित केली जाते, ती उच्चतर आणि विशालतर संकल्पनांनी परिपोषित केली जाते आणि त्या संकल्पनांच्या साच्यामध्ये चेतनेचे त्वरेने परिवर्तन केले जाते आणि अशा प्रकारे चेतना पूर्णत्वाला नेली जाते.

ध्यानाचे इतर आणि महत्तर उपयोग याच्याही पलीकडचे असतात पण ते आत्मविकसनाच्या पुढील टप्प्यांशी संबंधित असतात. ‘भक्तियोगा’मध्ये, या दोन्ही प्रक्रिया (ध्यान आणि निदिध्यासन) समग्र अस्तित्व एकाग्र करण्यासाठी, समानतेने उपयोगात आणल्या जातात. किंवा भक्तीविषयाच्या (आराध्य देवतेच्या) चिंतनाने, त्याच्या रूपाने, त्याच्या सत्त्वाने, त्याच्या गुणवैशिष्ट्यांनी आणि त्याच्याबद्दलच्या भक्तिभावाच्या व ऐक्याच्या आनंदाने समग्र प्रकृती न्हाऊन निघावी यासाठी या दोन्ही प्रक्रिया समानतेने उपयोगात आणल्या जातात. तेव्हा विचार हा ‘दिव्य प्रेमा’चा सेवक, ‘कैवल्य-आनंदा’ची तयारी करून घेणारा असा घडविला जातो.

‘ज्ञानयोगा’मध्येदेखील ध्यानाचा उपयोग, वरकरणी दिसणारे रूप आणि सत्य यांमध्ये, तसेच आत्मा आणि त्याची विविध रूपे यांमध्ये सदसद्विवेक करण्यासाठी केला जातो. व्यक्तिगत चेतनेचा ‘ब्रह्मन्’मध्ये प्रवेश व्हावा आणि नंतर सायुज्य घडावे यासाठी एकाग्र निदिध्यासनाचा अवलंब केला जातो. ‘पूर्णयोगा’मध्ये या सर्वच उद्दिष्टांचा सुमेळ साधला जाईल.

– श्रीअरविंद (CWSA 13 : 446-447)

साधना, योग आणि रूपांतरण – ०७

‘ईश्वरा’कडे जाण्याचा ‘ध्यान’ हा एक मार्ग आहे, तो महान मार्ग आहे; पण तो जवळचा मार्ग आहे, असे म्हणता येणार नाही. कारण, तो खूप उच्च स्तरावर घेऊन जाणारा असला, तरीही तो बहुतेकांसाठी खूप लांबचा आणि अवघड मार्ग असतो. ध्यानामुळे जर (‘ईश्वर शक्ती’चे) अवरोहण (descent) घडून आले नाही तर, तो जवळचा मार्ग आहे असे कदापिही म्हणता येणार नाही…

‘कर्म’ हा तुलनेने बराच साधासरळ मार्ग आहे. परंतु, त्यामध्ये व्यक्तीचे मन ‘ईश्वरा’ऐवजी, फक्त कर्मावरच खिळलेले असता कामा नये. ‘ईश्वर’ हेच साध्य असले पाहिजे आणि कर्म हे केवळ एक साधन होऊ शकते.

प्रेम, भक्ती, …या गोष्टी ‘ईश्वरा’कडे पोहोचण्याचे जवळचे मार्ग असतात किंवा असू शकतात. (असू शकतात असे म्हणण्याचे कारण की) प्रेम आणि भक्ती या गोष्टी जर अधिक प्राणप्रधान (Vital) असतील तर, हर्षभरित अपेक्षा आणि विरह, अभिमान, नैराश्य या गोष्टींमध्ये (सी-सॉ सारखी) दोलायमान स्थिती होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे प्रेम व भक्तीचा मार्ग जवळचा न राहता, दूरवरचा, वळणावळणाचा होतो. ‘ईश्वरा’कडे धाव घेण्याऐवजी, थेट झेपावण्याऐवजी, व्यक्ती स्वतःच्या अहंकाराच्या भोवती भोवतीच घोटाळत राहण्याची शक्यता असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 212)

(इसवी सन : १८९० ते १९०६)

आपल्यामध्ये प्रेमाची, उत्साहाची, ‘भक्ती’ची कमतरता आहे का? नाही, या गोष्टी तर भारतीय प्रकृतीमध्येच रुजलेल्या आहेत, पण ‘शक्ति’च्या अभावामुळे आपण लक्ष केंद्रित करू शकत नाही, त्यांना आपण दिशा देऊ शकत नाही, एवढेच काय पण आपण त्या टिकवून देखील ठेवू शकत नाही. ‘भक्ती’ ही धगधगती ज्वाळा आहे तर, ‘शक्ती’ हे तिचे इंधन आहे. जर इंधनच अपुरे असेल तर अग्नी किती काळ टिकून राहील? एखाद्या व्यक्तीकडे सुदृढ प्रकृती असून, ती व्यक्ती जर ज्ञानप्रदीप्त, शिस्तबद्ध असेल तसेच ‘कर्मा’मुळे तिला महाकाय सामर्थ्य प्रदान करण्यात आलेले असेल; आणि त्यातूनही जर अशी व्यक्ती ईश्वरविषयक प्रेमाने आणि भक्तीने स्वत:ला उन्नत करेल, तर अशी भक्ती टिकून राहील आणि अशा व्यक्तीचा आत्मा हा ‘ईश्वरा’बरोबर सदैव ऐक्य पावलेला असेल. पण दुर्बल प्रकृतीची व्यक्ती परिपूर्ण ‘भक्ती’सारख्या महान गोष्टीचा आवेग झेलू शकण्यास फारच कमकुवत ठरते; तो एक क्षणभरासाठीच उचलला जातो, मग ती ज्वाळा थेट ‘स्वर्गा’लाच जाऊन भिडते आणि ती व्यक्ती पूर्णपणे थकून जाते, पूर्वीपेक्षाही अधिक दुर्बल बनून जाते. ज्याद्वारे सर्व जीवनव्यवहार घडत असतात ते मानवी जडद्रव्य जोपर्यंत, कमजोर आणि अल्प असते तोपर्यंत, त्यातून निर्माण होणाऱ्या आणि उत्साह व भक्ती हाच ज्यांचा प्राण आहे अशी प्रत्येक गोष्ट असफल होणे आणि भाजून निघणे, क्रमप्राप्तच आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 06-07 : 82)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – १५

ईश्वराप्रत जाण्याचा ध्यान हा एक मार्ग आहे, तो महान मार्ग आहे; पण तो जवळचा मार्ग आहे, असे म्हणता येणार नाही. कारण तो खूप उच्च स्तरावर घेऊन जाणारा असला, तरीही तो बहुतेकांसाठी खूप लांबचा आणि अवघड मार्ग असतो. जर त्यामुळे (ईश्वराचे)अवतरण घडून आले नाही तर, तो जवळचा मार्ग आहे असे कदापिही म्हणता येणार नाही…

कर्म हा तुलनेने बराच साधासरळ मार्ग आहे. परंतु, त्यामध्ये व्यक्तीचे मन ईश्वराला वगळून, फक्त कर्मावरच खिळलेले असता कामा नये. ईश्वर हेच साध्य असले पाहिजे आणि कर्म हे केवळ एक साधन होऊ शकते.

…प्रेम आणि भक्ती ह्या गोष्टी जर अधिक प्राणप्रधान (Vital) असतील तर, हर्षभरित अपेक्षा आणि विरह, अभिमान आणि नैराश्य या गोष्टींमध्ये दोलायमान स्थिती होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे प्रेम आणि भक्तीचा मार्ग जवळचा न राहता, दूरवरचा, वळणावळणाचा होतो. ईश्वराकडे धाव घेण्याऐवजी, थेट झेपावण्याऐवजी, एखादा स्वतःच्या अहंकाराच्या भोवती भोवती घोटाळत राहण्याची शक्यता असते.

*

पूर्णयोगामध्ये ध्यान, कर्म, भक्ती या सर्व गोष्टींचाच समावेश होतो; परिपूर्तीच्या दिशेने जाण्यासाठी पूर्वतयारी म्हणून साहाय्यभूत होणारे हे प्रत्येक साधन आहे. जर व्यक्ती कर्माच्या माध्यमातून समर्पित होऊ शकत असेल तर आत्म-दानासाठी असलेल्या अत्यंत प्रभावी साधनांपैकी ते एक साधन असते; आणि स्वयमेव आत्म-दानदेखील साधनेचे एक अत्यंत शक्तिशाली आणि अपरिहार्य तत्त्व असते.

पूर्णयोग हा, समग्र अस्तित्वाचे त्याच्या सर्व घटकांनिशी आत्मार्पण करण्याचा, विचारी मनाचे आणि हृदयाचे, इच्छेचे आणि कृतींचे, आंतरिक व बाह्य साधनभूत घटकांचे अर्पण करण्याचा मार्ग आहे; ज्यामुळे व्यक्ती ईश्वराच्या अनुभूतीपर्यंत, आंतरिक उपस्थितीपर्यंत येऊन पोहोचते, आंतरात्मिक आणि आध्यात्मिक परिवर्तनापर्यंत येऊन पोहोचते. (उपरोक्त) सर्वच मार्गांनी व्यक्ती जितके आत्म-दान करेल तेवढे ते साधनेसाठी चांगलेच असते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 212), (CWSA 29 : 213-214)

मानसिक परिपूर्णत्व – १९

 

ईश्वराप्रत जाण्याचा ध्यान हा एक मार्ग आहे, तो महान मार्ग आहे; पण तो जवळचा मार्ग आहे, असे म्हणता येणार नाही. कारण तो खूप उच्च स्तरावर घेऊन जाणारा असला, तरीही तो बहुतेकांसाठी खूप लांबचा आणि अवघड मार्ग असतो. जर त्यामुळे अवतरण घडून आले नाही तर, तो जवळचा मार्ग आहे असे कदापिही म्हणता येणार नाही आणि तेव्हासुद्धा, म्हणजे अवतरण घडून येते तेव्हासुद्धा लवकर होते ती फक्त पायाभरणीच! नंतर त्या पायावर ध्यानाच्या आधारे, मोठ्या परिश्रमाने एक भली मोठी इमारत उभारावी लागते. हे अगदी अनिवार्य आहे, पण ह्याला जवळचा मार्ग असे म्हणता येईल, असे त्यात काही नाही.

कर्म हा तुलनेने बराच साधासरळ मार्ग आहे – परंतु, त्यामध्ये व्यक्तीचे मन ईश्वराला वगळून, फक्त कर्मावरच खिळलेले असता कामा नये. ईश्वर हे साध्य असले पाहिजे आणि कर्म हे केवळ एक साधन असले पाहिजे. काव्यादींचा उपयोग आपल्या आंतरिक अस्तित्वाच्या संपर्कात येण्यासाठी असतो आणि त्या संपर्काचा उपयोग आपल्या आंतरतम अस्तित्वाच्या थेट संपर्कात येण्यासाठी तयारी म्हणून होतो, पण व्यक्तीने तेथेच थांबता कामा नये, व्यक्तीने सद्वस्तुपर्यंत जाऊन पोहोचायला हवे. जर व्यक्ती स्वतःला साहित्यिक किंवा कवी, चित्रकार समजत असेल आणि साहित्य साहित्यासाठी, कला कलेसाठीच असे मानत असेल तर, ही काही योगिक वृत्ती नाही. आणि म्हणूनच मी कधीकधी असे म्हणत असतो की, आपले काम हे योगी बनणे आहे; केवळ कवी, चित्रकार बनणे हे नाही.

प्रेम, भक्ती, समर्पण, चैत्य खुलेपणा हे ईश्वराप्रत पोहोचण्याचे सर्वात जवळचे मार्ग आहेत किंवा असू शकतात. कारण प्रेम आणि भक्ती ह्या गोष्टी जर जास्त प्राणप्रधान असतील तर, हर्षभरित अपेक्षा आणि विरह, अभिमान आणि नैराश्य या गोष्टींमध्ये दोलायमान स्थिती होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे हा मार्ग जवळचा न राहता, दूरवरचा, वळणावळणाचा होतो. ईश्वराकडे धाव घेण्याऐवजी, थेट झेपावण्याऐवजी, एखादा स्वतःच्या अहंकाराच्या भोवती भोवती घोटाळत राहण्याची शक्यता असते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 212)

जो कोणी श्रीमाताजींप्रत वळलेला आहे तो माझा योग आचरत आहे. केवळ स्वबळावर, पूर्णयोग करता येईल वा पूर्णयोगाची सर्व अंगे पूर्णत्वाला नेता येतील असे समजणे ही फार मोठी चूक आहे. कोणताही मनुष्य असे करू शकत नाही. मग, व्यक्तीने काय करावयास हवे? तर स्वत:ला श्रीमाताजींच्या हाती सोपवून द्यावयास हवे आणि सेवा, भक्ती, अभीप्सा यांद्वारे त्यांच्याप्रत खुले व्हावयास हवे, म्हणजे मग श्रीमाताजी त्यांच्या प्रकाश व सामर्थ्यानिशी त्या व्यक्तीमध्ये कार्य करतील, जेणेकरून त्या व्यक्तीस साधना करता येईल. महान पूर्णयोगी बनण्याची, अतिमानसिक व्यक्ती बनण्याची आकांक्षा बाळगणे आणि त्या दिशेने स्वत:ची किती वाटचाल झाली आहे ह्याची स्वत:शीच विचारणा करणे हीदेखील एक चूकच आहे. श्रीमाताजींविषयी भक्ती बाळगणे आणि स्वत:ला त्यांच्याप्रत समर्पित करणे आणि तुम्ही जे बनावे अशी त्यांची इच्छा आहे तसे बनण्याची इच्छा बाळगणे हा योग्य दृष्टिकोन आहे. उरलेल्या सर्व गोष्टी ठरविणे आणि त्या तुमच्यामध्ये घडवून आणणे ह्या गोष्टी श्रीमाताजींनीच करावयाच्या आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 151-152)