Tag Archive for: प्रार्थना

पूर्णयोगाचे अधिष्ठान – १०

ईश्वरी प्रभावाप्रत स्वत:ला खुले करणे हा पूर्णयोगाचा समग्र सिद्धान्त आहे. ईश्वरी प्रभाव तुमच्या ऊर्ध्वस्थित असतो आणि एकदा का तुम्ही त्याबाबत सचेत (conscious) होऊ शकलात तर मग, त्याने तुमच्यामध्ये प्रवेश करावा म्हणून तुम्ही केवळ त्याला आवाहन करायचे असते. तो ईश्वरी प्रभाव तुमच्या मनामध्ये, शरीरामध्ये शांतीच्या, प्रकाशाच्या, कार्यकारी शक्तीच्या रूपाने अवतरतो; आनंदरूपाने अवतरतो. ईश्वरी उपस्थिती म्हणून साकार किंवा निराकार रूपात तो अवतरतो. ही चेतना प्राप्त होण्यासाठी अगोदर व्यक्तीने श्रद्धा बाळगली पाहिजे आणि खुलेपणाची (opening) आस बाळगली पाहिजे.

अभीप्सा (aspiration), आवाहन (call), प्रार्थना (prayer) या सर्व गोष्टी म्हणजे एकाच गोष्टीची विविध रूपे असतात आणि या साऱ्याच गोष्टी सारख्याच प्रभावी असतात. यांपैकी, तुमच्यापाशी जी कोणती गोष्ट असते किंवा जी तुम्हाला अगदी सहजसोपी, स्वाभाविक वाटते त्या गोष्टीचा तुम्ही अवलंब करण्यास हरकत नाही.

दुसरा मार्ग एकाग्रतेचा. तुम्ही तुमची चेतना तुमच्या हृदयामध्ये एकाग्र करायची (काहीजण मस्तकामध्ये वा मस्तकाच्या वर एकाग्र करतात.) आणि अंत:करणामध्ये श्रीमाताजींचे ध्यान करायचे आणि तेथे त्यांना आवाहन करायचे.

व्यक्ती यांपैकी कोणत्याही गोष्टीचे अनुसरण करू शकते किंवा वेगवेगळ्या वेळी (आलटून-पालटून) या दोन्ही गोष्टी करू शकते. यापैकी जी गोष्ट तुम्हाला सहजस्वाभाविक वाटेल किंवा ज्या क्षणी तुम्ही जी गोष्ट करण्यासाठी प्रवृत्त व्हाल ती गोष्ट तुम्ही करावी.

विशेषत: सुरुवातीला एक गोष्ट आत्यंतिक निकडीची असते ती म्हणजे, मन निश्चल करायचे आणि ध्यानाच्या वेळी, साधनाबाह्य असे सारे विचार, स्पंदने हद्दपार करायची. अशा शांत मनामध्ये, अनुभूती येण्यासाठीची प्रगतिशील तयारी चालू होते.

परंतु हे सारे जरी एकदम जमले नाही तरी त्यामुळे तुम्ही अधीर, अस्वस्थ होता कामा नये. कारण मनामध्ये संपूर्ण निश्चलता येण्यासाठी बराच काळ लागतो; तुमच्या चेतनेची तयारी होईपर्यंत तुम्हाला वाटचाल करत राहावी लागते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 106)

अमृतवर्षा २५

उद्दिष्ट जरी समान असले तरी, विविध साधकांच्या वृत्तीप्रवृत्ती विभिन्न असतात आणि त्यामुळे प्रत्येकाचे मार्गदेखील भिन्नभिन्न असतात. प्रार्थना आणि स्तोत्र या गोष्टी हा सुद्धा ‘ईश्वरा’च्या साक्षात्काराचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. परंतु तो मार्ग प्रत्येकालाच भावतो असे नाही. जो साधक ज्ञानमार्गाचा अवलंब करतो तो ध्यान व एकाग्रतेचा अभ्यास करतो. कर्ममार्गी व्यक्तीसाठी कार्याचे समर्पण हा उत्तम मार्ग असतो.

प्रार्थना आणि स्तोत्र हे भक्तीचे एक महत्त्वाचे अंग आहे. मात्र ते सर्वोच्च आहे असे नाही. शुद्ध प्रेम ही भक्तीची सर्वोच्च परिपूर्णता आहे. अशा प्रेमाला, प्रार्थना आणि स्तोत्र या माध्यमातून ईश्वरा’चा खरा आत्मा लाभू शकतो आणि त्यानंतर प्रार्थना आणि मंत्रादींच्या पलीकडे जात, हे शुद्ध प्रेम ‘ईश्वरा’च्या आत्म-भुक्तिमध्ये (self-enjoyment) विरघळून जाते. आणि असे असूनसुद्धा, प्रार्थना व स्तोत्राविना ज्याचे चालू शकते असा भक्तियोगी विरळाच आढळेल. जेव्हा कोणत्याही प्रक्रियांची आणि साधनेची आवश्यकता उरलेली नसते अशावेळीदेखील हृदयातून प्रार्थना आणि स्तोत्र स्फुटित होतात. फक्त एवढेच लक्षात ठेवले पाहिजे की, (योग) मार्ग हा व्यक्तीनिरपेक्ष मार्ग असत नाही; त्यामुळे एखाद्याचा मार्ग हाच दुसऱ्याचा मार्ग असेल असे नाही.

बऱ्याच भक्तिमार्गी लोकांची अशी समजूत असते की, जो प्रार्थना आणि स्तोत्र इत्यादी गोष्टी करत नाही, त्या गोष्टींमध्ये ज्याला आनंद लाभत नाही, तो माणूस आध्यात्मिक (सत्य धर्माचे पालन करणारा) नसतो. परंतु असे समजणे हे भ्रांतीचे आणि संकुचितपणाचे लक्षण आहे. (गौतम) बुद्ध हे कधीही प्रार्थना व स्तोत्र या गोष्टींमध्ये रममाण झाले नाहीत पण म्हणून ते आध्यात्मिक नव्हते असे कोण म्हणेल बरे? प्रार्थना आणि स्तोत्र इत्यादी गोष्टी भक्तिसाधनेसाठी विकसित झालेल्या आहेत.

– श्रीअरविंद [Writings in bengali : 186]

आध्यात्मिकता ३७

(श्रीमाताजींकृत प्रार्थना…)

बाह्य जीवन, दररोजची प्रत्येक कृती आणि प्रत्येक घटना, ही आपल्या तास न् तास केलेल्या चिंतनासाठी आणि ध्यानासाठी अनिवार्यपणे पूरकच नसते का?

…आपले दैनंदिन जीवन ही एक प्रकारची ऐरण आहे; आणि चिंतनामधून जी प्रदीप्तता येते ती स्वीकारण्यासाठी आणि धारण करण्यासाठी दैनंदिन जीवनातील सर्व घटनांचे शुद्धीकरण व्हावे, त्या परिशुद्ध व्हाव्यात, त्या अधिक लवचीक आणि परिपक्व व्हाव्यात, म्हणून या घटना त्या ऐरणीवरून सरकणेच आवश्यक असते. समग्र विकसनासाठी बाह्य कृती अनावश्यक ठरत नाही तोपर्यंत हे सर्व घटक एकापाठोपाठ एक मुशीमधून गेलेच पाहिजेत. नंतर, पात्र घडविणे आणि ते प्रकाशित करणे या दुहेरी कार्यासाठी चेतनेची इतर केंद्रसुद्धा जागृत व्हावीत म्हणून, हे ईश्वरा, या कृती तुला आविष्कृत करण्याची माध्यमं बनतात. आणि त्यामुळेच आत्मप्रौढी आणि आत्मसंतुष्टता या गोष्टी सर्व अडथळ्यांमधील सर्वाधिक वाईट असा अडथळा असतात.

अगणित घटकांपैकी काही घटकांचे तरी शुद्धीकरण करण्यासाठी आणि तिंबून, मळून त्यांना घडणयोग्य बनविण्यासाठी, त्यांना निर्व्यक्तिक बनविण्यासाठी, त्यांना ‘स्व’चे विस्मरण आणि परित्याग करण्यास शिकविण्यासाठी आणि भक्ती, उदारता आणि हळूवारपणा शिकविण्यासाठी, आपल्याला प्रदान करण्यात आलेल्या छोट्याछोट्या सर्व संधींचा आपण अतिशय विनम्रपणे लाभ घेतला पाहिजे. आणि अस्तित्वाच्या या सर्व पद्धती जेव्हा त्यांच्या अंगवळणी पडतील, तेव्हा ते सारे घटक या ‘निदिध्यासा’मध्ये सहभागी होण्यासाठी, परम ‘एकाग्रते’मध्ये तुझ्याबरोबर एकात्म पावण्यासाठी सिद्ध झालेले असतील.

आणि म्हणूनच मला असे वाटते की, आकस्मिकपणे झालेला बदल हा सर्वांगीण नसतो आणि म्हणूनच हे कार्य अगदी उत्तमात उत्तम साधकांसाठीसुद्धा दीर्घकालीन आणि धीम्या गतीने होणेच आवश्यक असते. आकस्मिक बदल हे व्यक्तीचा दृष्टिकोन बदलवून टाकतात, ते बदल व्यक्तीला निश्चितपणे सुयोग्य मार्गावर आणतात; परंतु खऱ्या अर्थाने उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, सर्व प्रकारच्या आणि सर्व घटकांच्या अगणित अनुभवांची आवश्यकता असते, त्यापासून कोणाचीच सुटका होऊ शकत नाही.

…माझ्यामध्ये आणि प्रत्येक वस्तुमात्रामध्ये तेजोमयतेने प्रभासित होणाऱ्या हे ‘परम प्रभू’, तुझा ‘दिव्य प्रकाश’ आविष्कृत होऊ दे आणि तुझ्या ‘दिव्य शांती’चे साम्राज्य सर्वांवर पसरू दे. – श्रीमाताजी [CWM 01 : 06-07]

बालकसदृश विश्वास ही सर्वात महत्त्वाची अट असते. बालकाला असा प्रांजळ विश्वास असतो की, त्याला हवी असलेली गोष्ट त्याला मिळेलच, ते बालक त्या गोष्टीची स्वतःहून मागणीसुद्धा करत नाही; त्याला खात्री असते की, जेव्हा त्याला एखाद्या गोष्टीची आवश्यकता असेल तेव्हा ती त्याला मिळेलच. असा अगदी बालकसदृश विश्वास, हीच खरोखर सर्वात महत्त्वाची अट असते. मात्र त्यासाठी आस बाळगणे अत्यंत आवश्यक असते. पण काही माणसांच्या अंतरंगातच श्रद्धा आणि अश्रद्धा, विश्वास आणि अविश्वास यांच्यामध्ये एक प्रकारचा संघर्ष चालू असतो; विजयाची खात्री असलेला आशावाद आणि मोठी आपत्ती आली तर काय होईल असा विचार करणारा निराशावाद यांच्यामध्ये संघर्ष चालू असतो….

मुले स्वाभाविकपणे जशी असतात तशीच असतील म्हणजे मोठ्या माणसांनी मुलांना बिघडवले नसेल तर, त्यांना ‘सारे काही चांगलेच घडेल’ असा दुर्दम्य विश्वास असतो. उदाहरणार्थ, जेव्हा जेव्हा त्यांच्याबाबतीत एखादी छोटीशी दुर्घटना घडते तेव्हा याचे पुढे जाऊन काही गंभीर परिणाम होतील का, असला विचार त्यांच्या मनाला कधी शिवतही नाही. सारे काही लवकरच सुरळीत होईल अशी त्यांना अगदी स्वाभाविकपणे खात्री असते आणि ही खात्री इतकी जबरदस्त असते की त्यामुळे तो दुष्परिणामच नाहीसा झालेला असतो.

कोणी एखादा जेव्हा ‘शक्ती’ची आस बाळगतो, ‘ईश्वरा’कडे मदतीची याचना करतो, आणि ती मिळेलच असा ज्याचा अढळ विश्वास असतो तेव्हा, ती मदत मिळणार नाही असे शक्यच नाही, ती खात्रीने मिळणारच. हा विश्वास, हेच खरेखुरे ‘आंतरिक खुलेपण’ (inner opening) असते. काही माणसं सतत याच स्थितीमध्ये असतात. स्वीकारण्याजोगे असे जेव्हा काहीतरी असते तेव्हा, ते स्वीकारण्यास अशी माणसं नेहमी तत्पर असतात. पण असेही काही जण असतात की, जेव्हा काही मिळण्याची वेळ येते, जेव्हा शक्ती अवतरते तेव्हा, ते नेहमीच अनुपस्थित असतात, ते त्या घडीला मिटलेले असतात (ग्रहणशील नसतात.) त्याउलट ज्यांच्यापाशी बालकसदृश विश्वास असतो ते मात्र योग्य वेळी तेथे उपस्थित असतात. आणि आश्चर्य म्हणजे, बाह्यत: दोघांमध्ये कोणताही फरक नसतो. त्या दोघांकडेही समान सदिच्छा असते, समान अभीप्सा असते, काहीतरी कल्याणकारी करण्याची समान इच्छा असते, परंतु ज्यांच्या अंत:करणात सुहास्य विश्वास असतो, ते प्रश्न उपस्थित करत बसत नाहीत, ते आपल्याला काही प्राप्त होईल किंवा नाही, ‘ईश्वर’ आपल्याला प्रतिसाद देईल की नाही अशा शंकाकुशंका मनात आणत नाहीत; त्यांच्या मनात तसा प्रश्नच निर्माण होत नाही… “जे माझ्यासाठी गरजेचे आहे ते मला दिले जाईल; मी जर प्रार्थना केली तर मला प्रतिसाद मिळेल; जेव्हा मी अडचणीत असेन आणि मदतीची याचना करेन तेव्हा मला मदत मिळेल आणि केवळ मदत मिळेल इतकेच नाही तर सर्व गोष्टींची योग्य ती व्यवस्था लावली जाईल.” असा त्यांना विश्वास असतो. असा जर हा उत्स्फूर्त, विनम्र, निःशंक विश्वास असेल तर, त्यामुळे इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा कार्य अधिक चांगल्या रीतीने घडून येते आणि त्याचे परिणामदेखील अद्भुत असतात. मनाच्या शंका आणि विरोधाभास यामुळेच व्यक्ती सर्व गोष्टी बिघडवून टाकते. अशी व्यक्ती जेव्हा संकटामध्ये असते तेव्हा तिची, एक प्रकारे अशी धारणा तयार होते की, “हे अशक्य आहे! मला हे जमणार नाही. मी आत्ता ज्या परिस्थितीमध्ये आहे, जी मला नको आहे, ती जर का अजून खालावली, आणि जर तसेच घडले तर, सारे काही अधिकच बिघडून जाईल. मी अशा रीतीने अधिकाधिकच खालावत गेलो तर…” अशा विचारांमुळे, व्यक्ती स्वतःमध्ये आणि जी शक्ती तिने स्वीकारायला हवी त्या शक्तीमध्ये एक प्रकारची भिंत निर्माण करते.

चैत्य पुरुषाकडे मात्र कोणताही विरोधाभास नसलेला, कोणताही तर्कवितर्क नसलेला, कोणतीही छाया नसलेला अद्भुत विश्वास असतो. आणि जेव्हा हा विश्वास असतो तेव्हा, जिला प्रतिसाद मिळणार नाही अशी कोणतीच प्रार्थना असत नाही, आणि प्रत्यक्षात साकार होणार नाही अशी कोणतीच ‘अभीप्सा’ असत नाही.

– श्रीमाताजी [CWM 06 : 403-404]

हे परमेश्वरा, अस्तित्वाच्या प्रत्येक अवस्थेमध्ये, सर्व कृतींमध्ये, सर्व वस्तुंमध्ये, सर्व जगतांमध्ये व्यक्ती तुला (ईश्वराला) भेटू शकते, तुझ्याशी एकत्व पावू शकते कारण, तू सर्वत्र, सदोदित विद्यमान आहेस. एखादी व्यक्ती तिच्या अस्तित्वाच्या एखाद्या कृतीद्वारे तुझ्याप्रत पोहोचलेली असते किंवा या ब्रह्मांडातील एखाद्या जगतामध्ये तुला भेटलेली असते आणि ती व्यक्ती म्हणते, “मला तो परमेश्वर गवसला.” आणि मग अशी व्यक्ती अधिक शोध घ्यायचा थांबवते; त्या व्यक्तीला असे वाटते की, जणू ती मानवी संभाव्यतांच्या शिखरावरच जाऊन पोहोचली आहे. पण असे समजणे ही केवढी मोठी चूक आहे.

सर्व स्थितीमध्ये, सर्व प्रकारांमध्ये, सर्व वस्तुमात्रांमध्ये, सर्व जगतांमध्ये, सर्व घटकांमध्ये आम्ही तुझा शोध घेतला पाहिजे आणि तुझ्याशी एकत्व पावले पाहिजे आणि त्यामधून, एखादाही घटक जरी बाजूला राहून गेला, मग भले तो कितीका लहान असेना, तर मग ते सायुज्य पूर्ण होऊ शकणार नाही, मग तो साक्षात्कार परिपूर्ण होणार नाही. आणि म्हणून तुझा शोध लागणे ही अनंत अशा शिडीवरील केवळ एक सुरुवातीची पायरी आहे.

हे मधुर स्वामी, सार्वभौम रूप-परिवर्तनकारा, सर्व प्रकारच्या दुर्लक्षाची, निष्काळजीपणाची, सर्व आळशी निरुत्साहाची परिसमाप्ती कर, आमच्या सर्व ऊर्जा तू एकत्रित कर, आणि त्यांचे दुर्दम्य, अजय अशा संकल्पशक्तीमध्ये परिवर्तन कर.

हे प्रकाशा, प्रेमा, अनिर्वचनीय शक्तिरूपा, तू त्यांच्यामध्ये शिरून त्यांचे रूपांतर करावेस म्हणून, सर्व अणुरेणू तुझ्याप्रत आकांत करत आहेत.

सर्वांना सायुज्यतेचा परम आनंद प्रदान कर.

– श्रीमाताजी
(CWM 01 : 200)

हे ‘दिव्य’ प्रेमा, ‘परमप्रज्ञे’, परिपूर्ण ‘एकत्वा’, मी अन्य कोणी नाही तर, मी केवळ ‘तू’च व्हावे यासाठी दिवसातील प्रत्येक क्षणाला मी ‘तुला’ आवाहन करते.

या देहाद्वारे ‘तुझी’ सेवा घडू दे, ते तुझे साधन (Instrument) असल्याची जाणीव त्याला होऊ दे आणि माझी सर्व चेतना ‘तुझ्या’ चेतनेमध्ये विलीन होऊ दे. आणि त्या चेतनेद्वारे, ‘तुझ्या’ दिव्य दृष्टीने मला सर्व वस्तुमात्रांचे चिंतन करता येऊ दे.

हे ‘प्रभू’, हे ईश्वरा, ‘तुझी’ सार्वभौम ‘शक्ती’ आविष्कृत होईल असे वरदान दे; ‘तुझे’ कार्य सिद्धीस जाईल असे वरदान दे; आणि ‘तुझी’ सेविका निःशेषतया ‘तुझ्या’ सेवेमध्ये स्वतःला झोकून देऊ शकेल, असे वरदान दे.

माझ्यातील ‘मी’ कायमचा नाहीसा होऊ दे आणि केवळ साधन तेवढे शिल्लक राहू दे.

– श्रीमाताजी
(CWM 01 : 134)

कर्म आराधना – ०९

प्रार्थना केल्याप्रमाणे आपण कर्म करूया, कारण खरोखरच, कर्म ही शरीराने केलेली ‘ईश्वरा’ची सर्वोत्तम प्रार्थनाच असते.
*
‘ईश्वरा’साठी कर्म करणे ही, देहाद्वारे केलेली प्रार्थनाच असते.
*
व्यक्ती ध्यानाच्या माध्यमातून प्रगत होऊ शकते, परंतु व्यक्तीला सोपविण्यात आलेले कर्म, तिने योग्य वृत्तीने केले तर त्याद्वारे व्यक्ती दसपटीने अधिक प्रगत होऊ शकते.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 299)

साधनेची मुळाक्षरे – १२

‘ईश्वरी’ प्रभावाप्रत स्वत:ला खुले करणे हे या (पूर्ण)योगाचे संपूर्ण तत्त्व आहे. ईश्वर तुमच्या उर्ध्वदिशेस विद्यमान असतो आणि जर तुम्हाला त्याची जाणीव झाली तर, त्याने तुमच्यामध्ये प्रवेश करावा म्हणून तुम्ही केवळ त्यास आवाहन करायचे असते. ते ईश्वरीतत्त्व तुमच्या मनामध्ये, शरीरामध्ये ‘शांती’च्या, ‘प्रकाशा’च्या, कार्यकारी ‘शक्ती’च्या रूपाने अवतरते; ‘आनंद’रूपाने अवतरते; साकार किंवा निराकार रूपात ते ‘दिव्य अस्तित्व’ अवतरते. व्यक्तीला जोपर्यंत याची जाणीव होत नाही तोपर्यंत, तिने श्रद्धा बाळगली पाहिजे आणि खुलेपणासाठी आस बाळगली पाहिजे. अभीप्सा, धावा, प्रार्थना ह्या सगळ्या गोष्टी एकाच गोष्टीची विविध रूपे आहेत आणि या साऱ्याच गोष्टी सारख्याच प्रभावी आहेत. यांपैकी, तुमच्यापाशी जी कोणती गोष्ट येते वा जी तुम्हाला अगदी सहजसोपी, स्वाभाविक वाटते ती गोष्ट तुम्ही अवलंबावी.

दुसरा मार्ग एकाग्रतेचा. तुम्ही तुमची चेतना तुमच्या हृदयामध्ये एकाग्र करायची (काहीजण डोक्यामध्ये वा डोक्याच्या वर एकाग्र करतात.) आणि अंत:करणामध्ये श्रीमाताजींचे ध्यान करायचे आणि तेथे त्यांना आवाहन करायचे. व्यक्ती यांपैकी कोणतीही गोष्ट करू शकते किंवा वेगवेगळ्या वेळी दोन्ही गोष्टी करू शकते – जे तुम्हाला सहजस्वाभाविक वाटेल किंवा ज्या क्षणी तुम्ही जे करण्यासाठी प्रवृत्त व्हाल ते करावे. विशेषत: सुरुवातीला एक गोष्ट आत्यंतिक निकडीची असते ती म्हणजे, मन निश्चल करायचे आणि ध्यानाच्या वेळी, साधनाबाह्य असे सारे विचार, मनाच्या हालचाली हद्दपार करायच्या. अशा शांत मनामध्ये, अनुभूती येण्यासाठीची प्रगतिशील तयारी सुरू होते. परंतु लगेचच कोणती अनुभूती आली नाही तरी तुम्ही उतावीळ होता कामा नये. कारण मनामध्ये संपूर्ण निश्चलता येण्यासाठी बराच वेळ लागतो; तुमची चेतना सज्ज होईपर्यंत तुम्हाला वाटचाल करत राहावी लागते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 106)

ईश्वरी कृपा – १७

प्रश्न : तुम्ही असे सांगितले आहे की, “आपण कर्मबंधनाने बांधले गेलेलो असतो”, पण जेव्हा ईश्वरी कृपा कार्य करते तेव्हा ती कर्माचा निरास करते…

श्रीमाताजी : हो अगदी पूर्णपणे, ‘ईश्वरी कृपा’ कर्माचा पूर्ण निरास करते. सूर्यासमोर लोणी ठेवले तर ते जसे वितळून जाईल, तसे होते.

…तुमच्याकडे जर पुरेशी प्रामाणिक अभीप्सा असेल किंवा पुरेशी तीव्र प्रार्थना असेल, तर तुम्ही तुमच्यामध्ये असे काहीतरी खाली उतरवू शकता की, ज्यामुळे प्रत्येक गोष्टच, अगदी प्रत्येक गोष्ट बदलून जाईल. खरोखर, प्रत्येक गोष्ट बदलून जाते. एक अगदी मर्यादित असे छोटेसे उदाहरण देता येईल की, ज्यामुळे तुम्हाला सर्व गोष्टी नीट समजून येतील. दगड अगदी यांत्रिकपणे खाली पडतो; समजा एखादी फरशी सैल झालेली आहे तर ती खाली पडेल, हो ना? पण जर समजा, प्राणिक वा मानसिक निर्धार असणारी एखादी व्यक्ती तिथून जात असेल; आणि तिला असे वाटले की, ती फरशी खाली पडू नये, आणि त्या व्यक्तिने जर हात पसरले तर ती फरशी त्या व्यक्तिच्या हातावर पडेल; पण ती खाली जमिनीवर पडणार नाही. तेव्हा, त्या दगडाची वा फरशीची नियती त्या व्यक्तिने बदललेली असते. येथे वेगळ्या प्रकारच्या नियतिवादाचा प्रवेश झालेला आहे. तो दगड आता कोणाच्यातरी डोक्यात पडण्याऐवजी, तो त्या व्यक्तिच्या हातावर पडतो आणि त्यामुळे कोणी दगावत नाही. येथे कमीअधिक अचेतन अशा यंत्रणेमध्ये एका वेगळ्या प्रतलावरील सचेतन इच्छाशक्तिचा हस्तक्षेप घडून आलेला असतो.

…मी आत्ता म्हणाले त्याप्रमाणे, पुरेशी प्रामाणिक अभीप्सा किंवा पुरेशी तीव्र प्रार्थना हा तो उपाय होय. मी “किंवा’’ असे म्हटले आहे, परंतु मला “किंवा” असे अभिप्रेत नाही. …दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. कर्मामध्ये बदल घडवून आणण्यासाठी फार मोठी विनम्रता आणि प्रचंड इच्छाशक्ती हवी.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 90-91)

ईश्वरी कृपा – ०६

(गूढविद्येचे कोणतेही ज्ञान नसतानादेखील, दूर अंतरावरील एखाद्या गरजू व्यक्तिला मदत किंवा संरक्षण पोहोचविणे शक्य आहे का, असा प्रश्न विचारला असता, श्रीमाताजींनी त्याचा एक मार्ग सांगितला, तो असा…)

व्यक्तिकडे जर (गूढविद्येचे) कोणतेही ज्ञान नसेल; पण तिचा ईश्वरी ‘कृपे’वर विश्वास असेल, – ईश्वरी ‘कृपा’ नावाची काहीतरी एक गोष्ट या विश्वामध्ये आहे, तीच आपल्या प्रार्थनेला, आपल्या अभीप्सेला, आपल्या हाकेला प्रतिसाद देते, अशी त्या व्यक्तिची श्रद्धा असेल आणि त्यावेळी व्यक्तिने मनोमय रचना करून, जर ती त्या ईश्वरी ‘कृपे’ला अर्पण केली आणि त्यावर विश्वास ठेवला, ईश्वरी ‘कृपे’ने हस्तक्षेप करावा म्हणून याचना केली आणि ईश्वरी ‘कृपा’ हस्तक्षेप करेलच अशी श्रद्धा बाळगली तर, ती यशस्वी होण्याची दाट शक्यता असते.

प्रयत्न करून पाहा, तुम्हाला खात्रीने त्याचे परिणाम दिसून येतील.

प्रश्न : ईश्वरी ‘कृपे’ने हस्तक्षेप करावा अशी मनापासून प्रार्थना जेव्हा एखादी व्यक्ती करते तेव्हा, तिला एखादा विशिष्ट असा परिणाम अपेक्षित असतो ना?

श्रीमाताजी : ते प्रार्थनेच्या भावार्थावर अवलंबून असते. जर एखाद्या व्यक्तिने ईश्वराला किंवा ईश्वरी ‘कृपे’ला केवळ साद घातली आणि स्वत:ला त्याच्या हाती सोपवून दिले तर, ती व्यक्ती कोणत्याही विशिष्ट अशा फळाची अपेक्षा करत नसते. जर विशिष्ट परिणाम हवा असेल तर, व्यक्तिने स्वत:ची प्रार्थना स्वत:च शब्दबद्ध केली पाहिजे; व्यक्तिने त्यासाठी मागणी केली पाहिजे. तुम्ही जर ईश्वरी ‘कृपे’विषयी तीव्र आस बाळगत असाल, तिला आवाहन करत असाल, तिची विनवणी करत असाल आणि जर कोणतीही ठरावीक अशी तुमची मागणी नसेल तर, तुमच्या बाबतीत काय करायचे, हे ती ईश्वरी ‘कृपा’च ठरवेल, तुम्ही नाही.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 253-254)