Posts

अमृतवर्षा २४

(प्राणतत्त्वाच्या असहकारामुळे, कित्येक वर्षांची मेहनत मातीमोल कशी ठरू शकते यासंबंधी धोक्याचा इशारा दिल्यानंतर श्रीमाताजी आता एक दिलासा देत आहेत.)

भाग ०३

स्वत:मध्ये असलेली अभीप्सेची ज्योत आणि ध्येयप्राप्तीसाठी लागणारी चेतना जीवित ठेवण्याइतपत ज्यांनी आपल्या चैत्यपुरुषाशी (Psychic being) पुरेसा संपर्क प्रस्थापित केलेला असतो त्या लोकांच्या बाबतीत (प्राणाच्या हटवादीपणामुळे येणारा) असा कसोटीचा काळ फार टिकत नाही. आणि त्यापासून त्यांना फारसा धोकाही पोहोचत नाही.

(चैत्यपुरुषाशी संपर्क प्रस्थापित झालेल्या) अशा व्यक्ती, एखाद्या बंडखोर मुलाला एखादी व्यक्ती जशी हाताळते त्याप्रमाणे, या चेतनेच्या साहाय्याने, धीराने व चिकाटीने सत्य व प्रकाश दाखवून देऊन, पटवून देण्याचा प्रयत्न करत, आपल्या प्राणाला हाताळू शकतात आणि क्षणभरासाठी झाकोळला गेलेला सद्भाव परत मिळवू शकतात.

आणि आता हा अखेरचा दिलासा : जे कोणी खरोखर प्रामाणिक आहेत, जे खरोखर सद्प्रवृत्त आहेत, त्यांच्याबाबतीत मात्र प्राणाचे हे उद्रेक, हे क्षोभ प्रगतीसाठीचे उपयुक्त असे साधन बनू शकतात. ज्या ज्या वेळी तुमच्यावर असा आघात होईल, असे एखादे वादळ तुमच्यामध्ये निर्माण होईल, त्या प्रत्येक वेळी, तुम्ही त्याचे स्वरूप बदलून, त्याचा नव्या प्रगतीसाठी उपयोग करून घेऊ शकाल; ध्येयप्राप्ती साध्य करून देणारे एक पुढचे पाऊल असे रूप तुम्ही त्याला देऊ शकाल.

अगदी नेमकेपणाने सांगायचे तर, तुमच्यामध्ये, या आघाताच्या मूळ कारणाकडे म्हणजे तुम्ही जे चुकीचे वागलात, तुम्ही जे चुकीचे विचार केलेत, तुमच्या ज्या चुकीच्या भावना होत्या – त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवून पाहण्यासाठी आवश्यक असणारी खरीखुरी प्रामाणिकता असेल; तुम्ही ती दुर्बलता, ती हिंसा, तुमचा तो पोकळ अभिमान जर तुम्ही पाहू शकाल; (मी एक गोष्ट तुम्हाला सांगायला विसरले की प्राणतत्त्वामध्ये मनापेक्षाही पुष्कळ अधिक मिथ्याभिमान असतो.) आणि या सर्व गोष्टींकडे जर तुम्ही अगदी रोखून बघितलेत, जणू डोळ्यात डोळे घालून रोखून पाहिलेत आणि अगदी प्रामाणिकपणे, मनापासून जर तुम्ही कबूल केलेत; आणि जर तुम्हाला पटले की, तुमच्या चुकीमुळे, तुमच्या दोषामुळे अमुक एक गोष्ट घडली आहे तर, त्या भागावर तुम्ही जणू जळजळीत निखारा ठेवू शकाल.

त्यामुळे तुमची दुर्बलता शुद्ध होईल आणि एका नवीन चेतनेमध्ये तिचे परिवर्तन होईल. मग तुम्हाला कळून येईल, वादळानंतर तुमच्यात बदल झालेला आहे, तुमचा थोडातरी विकास झालेला आहे, तुम्ही खरोखरीच काही प्रगती साधली आहे.

– श्रीमाताजी [CWM 04 : 51-52]

विचारशलाका २९

 

धम्मपद : ज्याप्रमाणे रणक्षेत्रातील हत्ती धनुष्यातून सुटलेले बाण सहन करतो त्याप्रमाणे मी अपमान सहन करेन कारण या जगात अनेक दुष्ट मनाची माणसे आहेत.

पाळीव हत्ती हा रणक्षेत्रामध्ये नेला जातो, त्यावर राजा आरुढ होतो. जो शांतपणे अपमान, निंदा सहन करतो तो माणसांमध्ये उत्तम मनुष्य होय.

श्रीमाताजी : येथे मोठा चांगला सल्ला दिला आहे : रणक्षेत्रातील हत्ती, ज्याला चांगले प्रशिक्षण देण्यात आले असते तो बाणांच्या भडिमाराने इतस्तत: पळायला सुरुवात करत नाही. तो वेदना सहन करतो, एखाद्या वीराने प्रतिकार करावा त्याप्रमाणे वृत्ती राखत तो पुढे पुढे चालतच राहतो. ज्याला योगमार्गाचे अनुसरण करायचे असते, साहजिकपणेच त्याला सर्व प्रकारच्या वाईट इच्छांच्या हल्ल्यांना सामोरे जावेच लागते. कारण इतर जण त्याला केवळ समजून घेऊ शकत नाहीत असे नाही, तर त्यांना जे समजत नाही त्याचा ते द्वेष करू लागतात.

सामान्य माणसे तुमच्याविषयी जे द्वेषपूर्ण उद्गार काढतात त्यामुळे, जर तुम्ही चिंताग्रस्त झालात, दुःखी झालात किंवा नाउमेद झालात तर तुम्ही मार्गावर फार पुढे जाऊ शकणार नाही. अशा गोष्टी तुमच्यापर्यंत येतात कारण तुम्ही दुर्दैवी आहात किंवा तुमच्या नशीबातच सुख नाही असे नसून, उलट दिव्य ‘चेतने’ने व दिव्य ‘कृपे’ने तुमचा संकल्प गांभीर्याने घेतला आहे आणि तुमचा निश्चय किती प्रामाणिक आहे, मार्गातील अडचणींना सामोरे जाण्यासाठी तुम्ही किती खंबीर आहात हे पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिस्थितीचा तिने एखाद्या (सोन्याचा) कस पाहणाऱ्या दगडाप्रमाणे (कसोटीचा दगड) म्हणून उपयोग केलेला असतो.

त्यामुळे जर का कोणी तुमचा उपहास केला किंवा कोणी तुमच्याविषयी निंदनीय शब्द उच्चारले तर पहिली गोष्ट तुम्ही ही केली पाहिजे की, अंतर्मुख होऊन, आपल्यातील कोणत्या दुर्बलतेमुळे वा कोणत्या अपूर्णतेमुळे असे घडले ते पाहिले पाहिजे. तसेच तुम्ही उदास, संतप्त किंवा उद्विग्न होता कामा नये, कारण तुमची खरी किंमत काय त्याची लोकांना कदर नसते. त्यापेक्षा तुमचा कोणता दोष, कोणती दुर्बलता वा कोणती विकृती दुरुस्त करायला हवी हे दाखवून दिल्याबद्दल तुम्ही दिव्य ‘कृपे’चे ऋणी असले पाहिजे.

आणि दुःखी होण्याऐवजी, तुम्ही पूर्णपणे संतुष्ट होऊ शकता आणि तुमच्या विरोधात, तुमचे अहित व्हावे म्हणून जो घाट घातला गेला होता त्याचा तुम्ही खूप फायदा करून घेऊ शकता.

तुम्हाला जर खरोखर या योगमार्गाचे अनुसरण करायचे असेल आणि योगसाधना करायची असेल, तर ती तुम्ही कोणत्याही कौतुकासाठी वा सन्मानासाठी करता कामा नये. ती तुमच्या जिवाची अनिवार्य अशी निकड असली पाहिजे, कारण तुम्ही त्याव्यतिरिक्त कोणत्याही इतर मार्गाने आनंदीच होऊ शकणार नाही, त्यासाठी तुम्ही ती केलीच पाहिजे. लोकांनी तुमची प्रशंसा केली काय किंवा नाही केली काय, ती गोष्ट अजिबात महत्त्वाची नाही. तुम्ही आधीच स्वत:ला हे समजावले पाहिजे की, तुम्ही सामान्य माणसांपेक्षा जेवढे अधिक प्रगत व्हाल, आणि जसजसे तुम्ही सामान्य जीवनपद्धतीला परके व्हाल, तेवढे लोकं तुमची प्रशंसा कमी करू लागतील; कारण साहजिकच आहे की, तुम्हाला ते नीट समजून घेऊ शकणार नाहीत. आणि मी पुन्हा एकवार सांगते की, हे अजिबात महत्त्वाचे नाही.

तुम्ही प्रगती केल्याशिवाय राहूच शकत नाही म्हणून, मार्गावर प्रगत होत राहण्यामध्येच खरी प्रामाणिकता सामावलेली आहे. तुम्ही दिव्य जीवनासाठी स्वत:ला समर्पित करता कारण त्याशिवाय तुम्ही राहूच शकत नाही; तुम्ही स्वत:चे रूपांतरण करण्यासाठी धडपडता, प्रकाशाला उन्मुख होता कारण त्याविना तुम्ही राहूच शकत नाही, कारण तेच तुमच्या जीवनाचे प्रयोजन असते. जेव्हा हे असे असते तेव्हा खात्री बाळगा की, तुम्ही योग्य मार्गावर आहात.

– श्रीमाताजी [CWM 03 : 282-284]

कृतज्ञता – ०३

(‘ईश्वरी साक्षात्कारा’साठी जीवन समर्पित करण्याचा निश्चय) या निश्चयाशी निष्ठा राखायची असेल तर व्यक्तीने प्रामाणिक, एकनिष्ठ, विनम्र आणि आत्मनिवेदनाप्रत (consecration) कृतज्ञ असले पाहिजे, कारण हे गुण सर्व प्रकारच्या प्रगतीसाठी अनिवार्य आहेत आणि एक स्थिर आणि वेगवान प्रगती ही प्रकृतीच्या उत्क्रांतिमय प्रगतीच्या वेगाचे अनुसरण करण्यासाठी अनिवार्य असते. हे गुण नसतील तर कधीकधी व्यक्तीमध्ये प्रगतीचा आभास निर्माण होऊ शकेल पण तो केवळ बाह्य दिखावाच असेल, ते एक ढोंग असेल आणि पहिल्या वेळीच तो डोलारा कोलमडून पडेल.

‘प्रामाणिक’ असण्यासाठी, अस्तित्वाचे सारे भाग हे ईश्वराविषयीच्या अभीप्सेमध्ये (Aspiration) संघटित झाले पाहिजेत – एक भाग आस बाळगत आहे आणि इतर भाग नकार देत आहेत किंवा अभीप्सेशी प्रामाणिक राहण्याबाबत बंडखोरी करत आहेत, असे असता कामा नये – ईश्वर हा प्रसिद्धीसाठी किंवा नावलौकिकासाठी किंवा प्रतिष्ठेसाठी किंवा सत्तेसाठी, शक्तीसाठी किंवा बढाईच्या समाधानासाठी नव्हे तर, ईश्वर हा ‘ईश्वरा’साठीच हवा असला पाहिजे, आत्मनिवेदनाबाबत अस्तित्वाच्या साऱ्या घटकांनी एकनिष्ठ आणि स्थिर असले पाहिजे म्हणजे एक दिवस श्रद्धा बाळगली आणि दुसऱ्या दिवशी, आपल्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत त्यामुळे श्रद्धा गमावली आणि सर्व प्रकारच्या शंकाकुशंकांनी मनात घर केले, असे होता कामा नये. शंका म्हणजे व्यक्तीने ज्यामध्ये रममाण व्हावे असा एखादा खेळ नाही; तर ते एक असे विष आहे की, जे आत्म्याला कणाकणाने क्षीण करत नेते.

आपण कोण आहोत याचे व्यक्तीला अचूक भान असणे आणि आपल्याला कितीही गोष्टी साध्य झालेल्या असल्या तरीही ‘आपण काय असले पाहिजे’ अशी ईश्वराची आपल्याकडून अपेक्षा आहे, तिच्या परिपूर्तीच्या तुलनेत, आपल्याला साध्य झालेल्या गोष्टी व्यवहारतः अगदी नगण्य आहेत, हे कधीही न विसरणे तसेच, ईश्वराचे व त्याच्या मार्गांचे मूल्यमापन करण्यासाठी आपण अक्षम असतो, याची पुरेपूर खात्री असणे म्हणजे ‘विनम्र’ असणे होय.

एखादी व्यक्ती जशी आहे तशी, म्हणजे तिचे अज्ञान, तिचे समज-गैरसमज, तिचा अहंकार, त्या व्यक्तीचा विरोध, त्या व्यक्तीची बंडखोरी अशा गोष्टी असूनदेखील, परमेश्वराची अद्भुत कृपा त्या व्यक्तीला तिच्या ईश्वरी उद्दिष्टाप्रत अगदी जवळच्या मार्गाने घेऊन जात असते. या अद्भुत कृपेचे कधीही विस्मरण होऊ न देणे म्हणजे ‘कृतज्ञ’ असणे होय.

– श्रीमाताजी
(The Aims And Ideals of The Sri Aurobindo Ashram : 16-17)

ईश्वरी कृपा – ३२

तुम्ही जर अगदी प्रामाणिक अभीप्सेने आध्यात्मिक जीवनाकडे वळला असाल तर, कधीकधी असुखद गोष्टींचा तुमच्यावर जणू भडिमार होतो. उदाहरणार्थ, तुमच्या अगदी जवळच्या मित्रांशी तुमचे भांडण होते, तुमचे कुटुंबीय तुम्हाला घराबाहेर हाकलून देतात, तुम्ही जे प्राप्त करून घेतले आहे असे तुम्हाला वाटत असते ते तुम्ही गमावून बसता इ. इ.

मला असा एक माणूस माहीत आहे की, जो फार मोठी अभीप्सा बाळगून भारतामध्ये आला होता. ज्ञानप्राप्तीसाठीचे आणि योगसाधनेबाबतचे खूप काळ प्रयत्न करून झाल्यावर मग तो भारतात आला होता.

ही खूप पूर्वीची गोष्ट आहे. त्या काळी लोक साखळी असलेले घड्याळ वापरत असत. तर, ह्या सद्गृहस्थाला त्याच्या आजीने एक सोन्याची पेन्सिल दिलेली होती, त्याच्या दृष्टीने ती जगातील सर्वात मौल्यवान वस्तू होती. ती पेन्सिल त्या साखळीला अडकविलेली होती. जेव्हा तो बंदरावर – पाँडिचेरी किंवा भारतात कोणत्यातरी बंदरावर किंवा मला वाटते, कोलंबोला उतरला – त्या काळी प्रवाशांना, जहाजातून छोट्या बोटींमध्ये आणि मग त्या बोटींद्वारे किनाऱ्यावर आणून सोडत असत. त्यामुळे ह्या सद्गृहस्थाला जहाजाच्या मार्गिकेवरून बोटीमध्ये उडी मारावी लागली. त्याची पायरी चुकली, त्याने कसाबसा तोल सांभाळला, पण त्या धावपळीमध्ये ती सोन्याची पेन्सिल सरळ खाली समुद्रात पडली आणि पार तळाशीच गेली. प्रथम तो काहीसा उद्विग्न झाला, पण नंतर त्याने स्वत:लाच समजावले, “ठीक आहे, हा तर भारताचा प्रभाव दिसतो आहे – मी माझ्या आसक्तीपासून मुक्त झालो आहे.”…

जे खूप प्रामाणिक आहेत त्यांच्याबाबतीत अशा घटना घडून येतात. मूलत: अडचणी, संकटांचे पर्वत हे प्रामाणिक लोकांसाठीच असतात. जे प्रामाणिक नसतात त्यांना खूप सुंदर, विलोभनीय रंगांच्या गोष्टी भुरळ पाडण्यासाठी मिळत जातात, परंतु, सरतेशेवटी त्यांना कळून चुकते की ते चुकले आहेत. पण ज्या कोणाला खूप अडीअडचणी, संकटे येतात त्यांवरून हे सिद्ध होते की, ते प्रामाणिकपणाच्या एका विशिष्ट पातळीपर्यंत येऊन पोहोचले आहेत.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 157)

समर्पण – ०५

दिव्य शक्तीने सर्वाचा स्वीकार करावा आणि त्यात परिवर्तन घडवून आणावे म्हणून, तुमचे म्हणून जे काही आहे ते सर्व आणि तुम्ही स्वतः यांना, ईश्वराला समर्पित करणे म्हणजे आत्मसमर्पण.
*
जेव्हा समग्र अस्तित्वच ईश्वराच्या प्रकाशाकडे आणि प्रभावाकडे वळते आणि हातचे काहीही राखून न ठेवता, सारे काही त्या ईश्वरावर सोपविते, तेव्हा त्याला खरेखुरे समर्पण आणि प्रामाणिकता म्हणतात.
*
समर्पण, म्हणजे आपल्याला अज्ञात असलेल्या ईश्वरी इच्छेचा संपूर्ण आणि उत्फूर्त स्वीकार.

(CWSA 29 : 67), (Mother You Said So), (Conversation with a Disciple)

“पूर्णत्वप्राप्तीसाठी पहिली पायरी म्हणजे स्वत:विषयी जागृत होणे. आपल्या अस्तित्वाचे भिन्न भिन्न भाग व त्या प्रत्येकाची निरनिराळी कार्ये यांविषयी जागृत होणे. हे भाग एकमेकांपासून अलगपणे पाहण्यास तुम्ही शिकले पाहिजे; तेव्हाच तुम्हाला तुमच्या ठिकाणी घडणाऱ्या क्रिया व तुम्हाला कृतिप्रवण करणारे अनेक आवेग, प्रतिक्रिया आणि परस्परविरोधी इच्छा यांचा उगम कोठे आहे हे स्पष्टपणे सापडू शकेल… या क्रियांचे विशेष काळजीपूर्वक निरीक्षण करून, त्यांना उच्चतम ध्येय-न्यायासनासमोर आणून, आपण त्याने दिलेला निर्णय मानण्याची मनापासून खरी इच्छा बाळगली असेल, तरच आपल्यामधील अप्रमादशील विवेकशक्ती जागृत होण्याची आशा आपण बाळगू शकू.” श्रीमाताजींनी ‘जीवनाचे शास्त्र’ या लेखमालिकेमध्ये वरील विचार मांडले होते.

त्यावर भाष्य करताना त्या म्हणतात – आपल्यामधील ह्या आंतरिक हालचालींचा कोठे, कसा उगम होतो यासंबंधी आपल्याला स्पष्ट कल्पना आली पाहिजे. कारण आपल्या अस्तित्वामध्ये परस्परविरोधी प्रवृत्ती असतात. काही प्रवृत्ती तुम्हाला एका बाजूस खेचतात, दुसऱ्या प्रवृत्ती तुम्हाला दुसऱ्या बाजूस खेचतात आणि त्यामुळे जीवनामध्ये सगळा गोंधळ माजतो.

तुम्ही स्वत:चे नीट निरीक्षण केलेत तर असे दिसून येईल की, अस्वस्थ होण्याजोगे तुमच्याकडून काही घडले तर, लगेचच तुमच्या त्या कृतीचे समर्थन करण्यासाठी मन अनुकूल कारणे देऊ लागते. हे मन कोणत्याही गोष्टीला मुलामा देण्यासाठी तयारच असते. आणि त्यामुळेच अशा परिस्थितीमध्ये स्वत:ला जाणणे कठीण होऊन बसते. मनोमय अस्तित्वाच्या या छोट्या छोट्या खोटेपणाकडे स्पष्टपणे पाहण्यासाठी आणि स्वत:ला खऱ्या अर्थाने जाणण्यासाठी व्यक्ती पूर्ण प्रामाणिकच असावी लागते.

सबंध दिवसातील तुमच्या हालचाली, क्रियाप्रतिक्रिया तुम्ही एकामागून एक यंत्रवत अखंडपणे नुसत्या न्याहाळत बसलात, तर त्याने तुमची प्रगती होऊ शकणार नाही. या निरीक्षणातून तुम्हाला प्रगती करून घ्यावयाची असेल, तर तुमच्या अंतरंगांतील असे काहीतरी, असा एखादा उत्तम भाग तुम्ही शोधून काढला पाहिजे की, जो प्रकाशयुक्त असेल, सदिच्छायुक्त असेल आणि प्रगतीसाठी अत्यंत उत्सुक असेल; आणि त्यामुळे त्याच्या प्रकाशात तुम्ही स्वत:ला तपासू शकाल. तो प्रकाशयुक्त भाग समोर ठेवून, चित्रपटात जशी एकामागून एक चित्रे सरकतात, त्याप्रमाणे दिवसभरातील तुमच्या सर्व कृती, सर्व भावना, सर्व आवेग, उर्मी, विचार त्याच्या समोरून सरकत जाऊ देत. त्यानंतर त्यामध्ये सुसंगती लावण्याचा प्रयत्न करा; म्हणजेच असे पाहा की, अमुक एका गोष्टीनंतरच दुसरी गोष्ट का घडली?

तुमच्यासमोरील प्रकाशमय पडद्याकडे निरखून पाहा. काही गोष्टी त्याच्या समोरून जातात, सहज सरळ जातात. दुसऱ्या काही गोष्टींची थोडीशी छाया पडते आणि काही गोष्टी अशा असतात की, त्यांची अतिशय काळीकुट्ट आणि आपल्याला आवडणार नाही अशी छाया पडते. तुम्ही या बाबतीत अत्यंत प्रामाणिक, प्रांजळ असले पाहिजे. एखादा खेळ खेळत असल्याप्रमाणे अगदी प्रामाणिकपणे हे काम करा.

”अमुक परिस्थितीमध्ये मी अशी एक कृती केली, माझ्या मनात अशा अशा भावना होत्या, मी अमुक एका रीतीने त्यावेळी विचार केला. खरेतर, माझे ध्येय आहे आत्मज्ञान आणि आत्मप्रभुत्व! पण आत्ता माझी कृती या ध्येयाला धरून होती की नाही?” असा विचार करा. जर ती कृती तुमच्या ध्येयाला धरून घडली असेल, तर त्या प्रकाशमय पडद्यावर तिची काळी छाया पडणार नाही; ती कृती पारदर्शक असेल. मग त्या कृतीविषयी चिंता करण्याचे तुम्हाला कारण नाही.

ती कृती तुमच्या ध्येयाशी सुसंगत नसेल तर मात्र तिची छाया पडेल. मग तुम्ही विचार करा – “का बरे ही अशी छाया पडली? आत्मज्ञान आणि आत्मप्रभुत्व यांविषयीच्या माझ्या संकल्पाच्या विरोधी असे या कृतीमध्ये काय होते?” बहुतेक वेळा तिचा संबंध अचेतनेशी, बेसावधपणाशी असल्याचे तुम्हाला आढळून येईल. तेव्हा मग आपण केलेल्या बेसावध गोष्टींमध्ये तिची नोंद करा आणि ठरवा की, पुढच्या वेळेस अशी एखादी गोष्ट करण्यापूर्वीच मी सावध राहण्याचा प्रयत्न करीन.

इतर काही बाबतीत तुम्हाला असे आढळून येईल की, ज्याची छाया पडली ती गोष्ट म्हणजे तुमचा क्षुद्र घृणास्पद अहंकार होता, अगदी काळा; आणि तुमची कृती, तुमचे विचार विकृत करावयास तो आला होता. नंतर हा अहंकार तुम्ही तुमच्या प्रकाशकेंद्रासमोर ठेवा आणि स्वत:ला विचारा, ‘मला अशी कृती, असे विचार करावयास लावण्यास, ह्या अहंकाराला काय बरे अधिकार आहे?’

त्यासंबंधीचे कोणतेही विसंगत असे समर्थन ग्राह्य न मानता, तुम्ही शोध घेतला पाहिजे आणि मग तुम्हाला तुमच्या अस्तित्वाचा एक असा भाग एका कोपऱ्यामध्ये दिसेल की, जो विचार करत असतो, म्हणत असतो, “नाही, नाही, मला इतर काहीही चालेल पण हे मात्र नाही.”

तुम्हाला असे स्पष्ट दिसेल की, तो भाग म्हणजे क्षुद्र अभिमान, आत्मप्रीती असते. कुठेतरी दडून असलेली अहंकाराची एक छुपी भावना असते, अशा शेकडो गोष्टी असतात.

या सर्व गोष्टी तुमच्या ध्येयप्रकाशात बघा. ”ह्या अमुक एका वृत्तीची जोपासना करणे हे माझ्या आत्मशोधाशी, ध्येयप्राप्तीशी मिळतेजुळते आहे का? मी हा काळा कोपरा प्रकाशासमोर ठेवीत आहे. प्रकाश त्यामध्ये शिरून तो काळा भाग नाहीसा होईपर्यंत मी हे करणार आहे.” तुम्ही हे केल्यानंतर खरोखरी हे नाटक संपते. मात्र तुमच्या सबंध दिवसाचे नाटक एवढ्याने संपत नाही, हे तर स्पष्टच आहे. कारण त्या प्रकाशासमोरून तुम्हाला आणखी कित्येक गोष्टी न्यावयाच्या राहिलेल्या असतात.

मात्र हा खेळ, तुम्ही पुढे चालू ठेवलात आणि अत्यंत मनःपूर्वकतेने तुम्ही हा खेळ पुन्हा पुन्हा खेळत राहिलात तर मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगते की, त्यानंतर सहा महिन्यांनी तुम्ही तुम्हालाच ओळखू शकणार नाही. तुम्ही स्वत:शीच म्हणाल, ”काय? मी अशी होते? अवघडच होते माझे सारे.”

– श्रीमाताजी
(CWM 04 : 38-39)