Posts

साधक : श्रीअरविंद नेहमीच असे सांगतात की, श्रीमाताजी तुमच्या अंतरंगात आहेत.

श्रीमाताजी : हो, खरे आहे, अगदी पूर्णपणे बरोबर आहे. मी ‘शाश्वत ज्योती’ मध्ये एक ‘ईश्वरी अस्तित्व’ या नात्याने ‘उपस्थित’ आहे, संजीवन देणारी आणि कृतिप्रवण करणारी ‘शक्ती’ या नात्याने मी उपस्थित आहे, सर्व शांतीपूर्ण गोष्टी आणि माधुर्य प्रदान करणारी ‘शांती’ या नात्याने मी उपस्थित आहे, ओसंडून वाहणारा आणि उन्नयन करणारा ‘मोद’, शुद्धिकरण करणारा ‘प्रकाश’ आणि संमती प्रदान करणारे ‘स्पंदन’ या नात्याने मी तेथे उपस्थित आहे.

श्रीअरविंद तेथे एक चिरस्थायी ‘सत्त्व’ म्हणून उपस्थित आहेत आणि मी तेथे एक ‘मार्गदर्शक’ म्हणून उपस्थित आहे. वास्तविक, दोघांमध्ये एकच अस्तित्व आहे. एक, जो निरीक्षण करतो तो साक्षी आहे आणि दुसरी प्रत्यक्षात उतरविणारी शक्ती आहे. आणि जोपर्यंत व्यक्तीला याची जाणीव होत नाही तोपर्यंत तिला काहीच समजू शकत नाही…..

होय, श्री अरविंदांना आणि मला जो जाणतो, (वास्तविक, ही एकच गोष्ट आहे, एकच अस्तित्व आहे.) – त्याच्यासाठी सारे अडथळे, साऱ्या अडचणी, सर्व पाश, सत्याच्या मार्गावरील सारे तथाकथित अडथळे गळून पडतात आणि ते कायमसाठी काढून टाकले जातात. केवळ या जन्मातच असे नव्हे तर, मृत्युनंतरच्या जीवनातील आणि त्यानंतर येणाऱ्या सगळ्या जीवनांमधील सुद्धा – अगदी शाश्वतकाळपर्यंत काढून टाकले जातात. अशा व्यक्तीसाठी ‘परमेश्वर’ हा सर्व शक्तिमान असतो.

[The Supreme by Mona Sarkar]

स्वत:ला समजून घेतल्याने आणि स्वत:ला कसे जाणून घ्यायचे हे शिकल्यामुळे माणूस परमशोध लावू शकतो. जेव्हा भौतिकाच्या प्रत्येक कणाकणामध्ये माणसाला ‘ईश्वरा’च्या या अधिवासाची जाणीव होईल, प्रत्येक प्राणिमात्रामध्ये त्याला ‘ईश्वरा’च्या अस्तित्वाची काही झलक मिळू शकेल, जेव्हा प्रत्येक माणूस त्याच्या बांधवांमध्ये ‘ईश्वरा’ला पाहू शकेल तेव्हा अरुणोदय होईल, तेव्हा या समग्र प्रकृतीला भारभूत झालेले अज्ञान, मिथ्यत्व, दोष, दुःखभोग, अंधकार भेदले जातील. कारण “समग्र प्रकृती सहन करत आहे आणि शोक करत आहे, ती ‘ईश्वरपुत्रांना’ (मनुष्याला) साक्षात्कार कधी होणार याची वाट पाहत थांबली आहे.” हा एक असा मध्यवर्ती विचार आहे की जो इतर सर्व विचारांचे प्रतिनिधित्व करतो; सूर्य ज्याप्रमाणे सर्व जीवन उजळवून टाकतो तसा हा विचार कायम आपल्या स्मरणात असला पाहिजे. एखाद्या दुर्मिळ रत्नाप्रमाणे, खूप मौल्यवान खजिना असल्याप्रमाणे आपण आपल्या हृदयात या विचाराची जपणूक करून, त्यानुसार मार्गक्रमण केले आणि त्या मध्यवर्ती विचाराला त्याचे ज्योतिर्मय करण्याचे व रूपांतरण करण्याचे कार्य आपल्यामध्ये करू देण्याची मुभा दिली तर आपल्याला हे कळू शकेल की, सर्व वस्तुमात्रांच्या आणि प्राणिमात्रांच्या अंतर्यामी ‘तो’च राहतो आणि ‘त्या’च्या मध्येच या विश्वाचे अद्भुत एकत्व आपण अनुभवू शकतो. तेव्हा मग आपल्याला आपली मूर्ख भांडणे, आपल्या छोट्याछोट्या इच्छावासना, आपले अंध रोष, किरकोळ समाधानांमधील बालीशपणा आणि फोलपणा लक्षात येईल. आपल्यातील छोटेछोटे दोष विरघळून जात आहेत, आपल्या संकुचित व्यक्तिमत्त्वाची तटबंदी आणि आपला आडमुठा अहंकार कोसळून पडत आहे असे आपल्याला दिसेल. आपल्या संकुचित मर्यादा आणि बंध यांनी बांधलेल्या अस्तित्वापासून आपली सुटका करत, खऱ्याखुऱ्या आध्यात्मिकतेच्या या उदात्त प्रवाहामध्ये आपले अस्तित्व प्रवाहित होत आहे असे आपल्याला जाणवेल.

– श्रीमाताजी [CWM 02 : 40-41]

(पौर्वात्य देशांचा पाश्चिमात्य आणि पाश्चिमात्य देशांचा पौर्वात्य देशांवर प्रभाव पडत आहे, आणि या साऱ्या घडामोडींच्या माध्यमातून नवीनच काही आकाराला येऊ घातले आहे, ‘प्रकृती’ हे सारे काही घडवून आणत आहे, या विषयी श्रीमाताजी पुढे सांगतात -)

‘प्रकृती’चे मार्ग संथ, अंधकारमय आणि जटिल असतात. आत्म्याच्या माध्यमातून जी गोष्ट अगदी त्वरेने, सुकरतेने आणि काहीही व्यर्थ जाऊ न देता झाली असती, तीच गोष्ट करण्यास ‘प्रकृती’ला मात्र खूप दीर्घ कालावधी लागतो. सध्या या जगामध्ये प्रचंड अपव्यय होताना दिसतो. परंतु या गोष्टी अशाच घडत आहेत. लोकांना परस्परांमध्ये मिसळविण्याचे ‘प्रकृती’चे तिचे तिचे स्वतःचे असे काही मार्ग आहेत.

साधक : हे सारे हेतुपूर्वक केले जात आहे का?

श्रीमाताजी : माणसं ज्याला ‘हेतुपूर्वक’ असे समजतात, तशा तऱ्हेने नाही. परंतु त्या पाठीमागे निश्चितपणे काही ‘प्रयोजन’ आहे, एक ‘उद्दिष्ट’ आहे की ज्या दिशेने ही वाटचाल चालू आहे. इतकेच, की सारे काही चेतनेच्या प्रमाणावर अवलंबून असते. एखाद्या माणसाला हे सारे काही गोंधळाचे वाटू शकते, कारण तो फक्त तपशीलाचा भाग पाहू शकतो, आणि मग त्याला तो काळाचा प्रचंड अपव्यय आहे असे वाटते, कारण त्याची काळाची संकल्पना ही त्याच्या स्वतःच्या व्यक्ती म्हणून असलेल्या कालावधीइतकीच मर्यादित असते.

परंतु ‘प्रकृती’ समोर मात्र शाश्वतता पसरलेली असते. आणि तिच्या दृष्टीने हे वाया घालविणे नसते, कारण ती म्हणजे जणू काही अशा एखाद्या व्यक्तीसारखी आहे की, जिच्यापाशी एक भली मोठी कढई आहे, त्यामध्ये ती साऱ्या गोष्टी ओतत असते, त्याचे मिश्रण बनवीत असते आणि जर ते मिश्रण यशस्वी झाले नाही तर ती ते सारे मिश्रण बाहेर काढून टाकते कारण तिला हे माहीत असते की, त्याच गोष्टींचा वापर करून ती पुन्हा एक नवीन मिश्रण तयार करणार आहे. असे असते हे सारे. येथे काहीही व्यर्थ जात नाही, कारण ते पुन्हा केव्हातरी उपयोगात येणार असते. आकार नष्ट होतात आणि त्यातील द्रव्य पुन्हा हाती घेतले जाते आणि हे सारे असेच सातत्याने चालू राहते. काही घडविले जाते, काही बिघडविले जाते, होत्याचे नव्हते केले जाते – ‘प्रकृती’ला वाटले तर ती हे सारे शेकडो, हजारो वेळा करू शकते, त्याचे तिला काहीच वाटत नाही. कारण यामध्ये काहीच वाया जात नाही, कारण ते सारे तिचेच कार्य असते. कार्य हेच तिचे सुख असते, कार्याशिवाय ती अस्तित्वातच राहू शकली नसती.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 342-343)

‘प्रकृती’ने ही सृष्टी हाती धरलेली आहे, ती पूर्णतः अचेतन असल्यासारखी वाटते परंतु तिच्यामध्ये ‘परम चेतना’ आणि एकमेव ‘सद्वस्तु’ सामावलेली आहे आणि हे सर्व विकसित व्हावे, आत्म-जागृत व्हावे, आणि त्यांनी स्वतःला पूर्ण जाणून घ्यावे यासाठी ती कार्य करत असते. परंतु या गोष्टी ती अगदी सुरुवातीलाच प्रकट करत नाही. ती त्या हळूहळू विकसित करत नेते आणि म्हणूनच प्रारंभी गुप्त असलेली ही बाब शेवटाकडे येता-येता प्रकट होत जाते. आणि मनुष्य आता उत्क्रांतीच्या एका उच्च बिंदूपर्यंत येऊन पोहोचला आहे. त्यामुळे त्याच्यासमोर प्रकृतीचे हे उपरोक्त रहस्य प्रकट केले जाऊ शकते आणि आजवर जे वरकरणी अचेतनेमध्ये घडले होते तेच आता सचेतनतेने, स्वेच्छेने आणि म्हणूनच कितीतरी अधिक वेगाने आणि साक्षात्काराच्या आनंदामध्ये घडू शकते.

आध्यात्मिक वास्तविकता (Spiritual Reality) मनुष्यामध्ये विकसित केली जात आहे आणि ती आता स्वतःला समग्रपणे आणि मुक्तपणे अभिव्यक्त करणार आहे, हे मनुष्यामध्ये घडताना एखादी व्यक्ती आता आधीच पाहू शकते. यापूर्वी, प्राण्यांमध्ये व वनस्पतींमध्ये, (अशाच प्रकारचे काहीतरी घडत होते) ते दिसण्यासाठी अतिंद्रिय दृष्टी (clairvoyant) असणे आवश्यक होते, मात्र मनुष्य हा त्याच्या स्वतःच्या ठायी असणाऱ्या या आध्यात्मिक वास्तविकतेविषयी जागरूक आहे; किमान मानवी अस्तित्वाच्या उच्चतर भागामध्ये तरी ही जाणीव असते. ‘परमस्रोता’ला आपल्याकडून कशाची अपेक्षा आहे हे मनुष्याला आता कळू लागले आहे आणि ते प्रत्यक्षात उतरावे म्हणून तो आता सहकार्य करू लागला आहे.

सृष्टी म्हणजे वस्तुनिष्ठीकरण (objectivisation) झालेला खुद्द ‘निर्माणकर्ता’च आहे, याविषयी सृष्टीने स्वत:ने जागरूक व्हावे अशी तिच्याकडून ‘प्रकृती’ची अपेक्षा आहे. म्हणजे असे की, ‘निर्माणकर्ता’ आणि ‘निर्मिती’ (The Creator and the Creation) यांच्यामध्ये भेद नाहीच मुळी, आणि त्यामुळे सजग व प्रत्यक्षीभूत झालेले ऐक्य हे उद्दिष्ट आहे. हेच ‘प्रकृती’चे गुपित आहे.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 321-322)

साधक : माताजी, “उत्क्रांत होणाऱ्या ‘प्रकृती’च्या सुरुवातीच्या टप्प्यांवर आपली गाठ तिच्या अचेतनेच्या मुग्ध गोपनीयतेशी (dumb secrecy) पडते.” मला (श्रीअरविंदांच्या ‘दिव्य जीवन’मधील) या विधानाचा अर्थ समजला नाही. ही गोपनीयता म्हणजे काय ते सांगाल का?

श्रीमाताजी : …श्रीअरविंद अगदी सुरुवातीपासून हेच सांगत आहेत की, जडभौतिकाच्या अगदी गाभ्यामध्ये, आतमध्ये खोलवर ‘ईश्वरी उपस्थिती’ (Divine Presence) दडलेली असते. आणि सर्व वस्तुमात्रांच्याच केंद्रस्थानी असलेल्या या ‘ईश्वरी उपस्थिती’कडे म्हणजे तिच्या उगमाकडे सृष्टी परत वळावी, यासाठी तिची तयारी करणे हे समग्र पार्थिव उत्क्रांतीकडून अपेक्षित आहे. आणि हाच ‘प्रकृती’चा मनोदय आहे.

हे विश्व म्हणजे त्या ‘परमेश्वरा’चे वस्तुनिष्ठीकरण (objectivisation) आहे, जणू त्याने स्वतःच स्वतःला न्याहाळता यावे, स्वतःला स्वतःचे जीवन जगता यावे, स्वतःच स्वतःला जाणून घ्यावे या हेतुने, स्वतःला स्वतःपासून वेगळे काढून, वस्तुनिष्ठ रूपात आणले असावे. आणि म्हणून तेथे असे एक अस्तित्व असेल, अशी एक चेतना असेल की जी त्या ‘परमेश्वरा’ला स्वतःचा उगमस्रोत म्हणून ओळखू शकेल आणि संभूतीमध्ये (Becoming) त्याचे आविष्करण घडून यावे म्हणून त्याच्याशी सचेतनपणे एकत्व पावेल. याव्यतिरिक्त या विश्वाचे अन्य कोणतेच प्रयोजन नाही. ही पृथ्वी म्हणजे या वैश्विक जीवनाचे स्फटिकीभवन (crystallization) झालेले एक प्रातिनिधिक रूप आहे, एककेंद्रीकरण झालेली, ती एक छोटी प्रतिकृती आहे; ज्यामुळे, उत्क्रांतीचे कार्य करणे आणि त्याचे अनुसरण करणे सोपे जाण्याची शक्यता आहे. आपण पृथ्वीचा इतिहास समजावून घेतला की, या विश्वाची निर्मिती का झाली असावी, हे आपल्या लक्षात येते. शाश्वत ‘संभूती’मध्ये (eternal Becoming) ‘परमेश्वर’ स्वतःविषयीच अधिकाधिक जागृत होत आहे आणि निर्मितीचे ‘निर्माणकर्त्या’शी ऐक्य व्हावे हे त्यामधील उद्दिष्ट आहे; ‘आविष्करणा’मध्ये घडून येणारे हे ऐक्य सजग, ऐच्छिक आणि मुक्त असणार आहे.

हे ‘प्रकृती’चे गुपित आहे. ‘प्रकृती’ ही कार्यकारी शक्ती आहे, तीच हे सारे कार्य करत असते.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 321)

एखादा भूकंप होतो, किंवा एखाद्या ज्वालामुखीचा उद्रेक होतो, तेव्हा जर त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशात माणसं राहत असतील तर या घटनांमुळे त्यांचा मृत्यू होतो, आणि अर्थातच त्यांच्यासाठी ती एक आपत्ती ठरते, ‘निसर्गा’साठी मात्र ती एक गंमत असते. आपण म्हणतो, “काय भयंकर वारा सुटला आहे?” साहजिकच आहे, माणसांसाठी तो “भयंकर” असतो, पण ‘निसर्गा’साठी मात्र तो तसा नसतो. हा प्रमाणाचा प्रश्न असतो, नाही का? एखादी उच्चतर शक्ती आविष्कृत होण्याची इच्छा बाळगत आहे आणि ‘प्रकृती’कडून तिला प्रतिरोध होत आहे, असे घडणे शक्य आहे, पण हे आवश्यक मात्र नाही.

ही गोष्ट अगदी सहज समजण्यासारखी आहे की, महाकाय शक्तींबरोबर ‘प्रकृती’चा चाललेला हा खेळ असतो आणि तिच्यासाठी ती केवळ एक लीला असते; तिच्या दृष्टीने त्यात कोणत्याही प्रकारे आपत्तीजनक असे काहीही नसते. ‘प्रकृती’-चेतनेच्या किंवा जडभौतिक चेतनेच्या दृष्टीने, पृथ्वीवरील भौतिक आकार आणि मानवजात या गोष्टी म्हणजे जणू काही मुंग्यांसारख्याच असतात. तुम्ही स्वतःदेखील जेव्हा चालत असता तेव्हा, तुम्ही तुमच्या पायाखाली मुंग्या चिरडू नयेत म्हणून तुमचा मार्ग बदलणे आवश्यक समजत नाही. (अर्थात तुम्ही कट्टर ‘अहिंसक’ असलात तर बाब निराळी!) तुम्ही चालत असता आणि तुमच्या पायांखाली शेकडो मुंग्या आल्या तरी काही इलाज नसतो. ‘प्रकृती’चेही अगदी असेच असते. ती वाटचाल करत असते आणि तिच्या त्या वाटचालीत तिच्या पायदळी तिने हजारो माणसं जरी नष्ट केली तरी ती बाब तिच्यासाठी इतकी महत्त्वाची नसते कारण ती अशी लाखो माणसे पुन्हा निर्माण करू शकते. तिच्यासाठी ते अवघड नसते.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 175)

व्यक्तीला जर ‘प्रकृती’शी संवाद साधता आला, तर व्यक्ती जीवनातील थोडीफार रहस्ये शिकू शकते, ती रहस्ये तिला खूप उपयोगी ठरू शकतात. व्यक्तीला त्यामुळे केवळ आजारपणाची पूर्वसूचनाच मिळते असे नाही तर, व्यक्ती त्यावर नियंत्रणसुद्धा मिळवू शकते, किंवा येणारी आपत्ती टाळू शकते आणि ‘प्रकृती’चा विनाश टाळू शकते. अशा प्रकारे, त्याचे अनेक फायदे आहेत. संवाद साधायचा म्हणजे काय? तर सर्व अस्तित्वाला व्यापून असणाऱ्या ‘सुसंवादाच्या आनंदा’तील ज्ञान शोधून काढणे आणि त्याच्या चेतनेने स्पंदित होणे. ही गोष्ट खरोखरच शोध घेण्यायोग्य आहे. हे आयुष्यभर करण्याचे कार्य आहे. या चेतनेचा शोध घ्या आणि या सूक्ष्म जगताशी सुसंवाद साधण्याचा आनंद प्राप्त करून घ्या. व्यक्ती शांततेमध्येच सुसंवाद साधू शकते आणि एक प्रकारच्या सूक्ष्म देवाणघेवाणीने स्वतःला अभिव्यक्त करते. ती अगदी पूर्णतया स्वतंत्र अशी भाषा आहे की जी शब्दांमध्ये व्यक्त करता येणे शक्य नाही, कारण आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण शब्दांचा वापर करत असतो. तर ती स्वतंत्र भाषा म्हणजे एक लघु आणि अचूक अभिव्यक्ती असते आणि आपल्या भाषेपेक्षा ती कितीतरी अधिक प्रमाणात आकलन होण्यायोग्य असते.

– श्रीमाताजी
(Throb of Nature : 04)

‘परिपूर्णता’ ही अजूनही एक विकसनशील संकल्पना आहे. निर्मिती जेव्हा तिच्या सर्वोच्च शक्यतांप्रत पोहोचते, तेव्हा ती परिपूर्णता असते, असे नेहमीच म्हटले जाते; पण हे असे नसते. आणि नेमक्या याच संकल्पनेला माझा विरोध आहे. या गोष्टी म्हणजे प्रगतीची केवळ एक पायरी असते. म्हणजे असे की, ‘प्रकृती’ तिच्या शक्यतांच्या अगदी अंतिम मर्यादेपर्यंत जाते आणि जेव्हा तिच्या असे लक्षात येते की, आता पुढे जाता येत नाहीये, मार्ग खुंटला आहे, तेव्हा ती सारेकाही नष्ट करून टाकते आणि पुन्हा नव्याने प्रारंभ करते. याला काही परिपूर्णता म्हणता येणार नाही, कारण परिपूर्णता असेल तर गोष्टी नष्ट कराव्या लागता कामा नयेत. ‘प्रकृती’ने जे काही घडवायला सुरुवात केली होती, ते तिला नष्टवत करावे लागता कामा नये, तेव्हाच परिपूर्णता येईल. ‘प्रकृती’ने जे घडवायला सुरुवात केली होती ते पुरेसे नाहीये किंवा तिला स्वतःला जे घडवायचे होते ते काहीतरी वेगळेच होते, असे जाणवल्यावर तिने ते नष्ट केले नाही, असे आत्ताच्या घडीला तरी एकही उदाहरण दिसत नाही. त्यामुळे ‘प्रकृती’ने आपल्या निर्मितीमध्ये परिपूर्णता संपादन केली आहे, असे म्हणता येणार नाही.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 15)

‘प्रकृती’पाशी पुरेसे द्रष्टेपण असते; ती प्रत्येक वातावरणामध्ये त्या वातावरणाला अनुसरून सुयोग्य अशी गोष्ट निर्माण करत असते. अर्थातच, एखाद्याने माणसाला केंद्रस्थानी ठेवता कामा नये, त्याने असे म्हणता कामा नये की, अमुक अमुक गोष्ट ‘निसर्गा’ने माणसाच्या भल्यासाठी केली आहे. परंतु असे असेल असे काही मला वाटत नाही, कारण या पृथ्वीवर माणसाचा उदय होण्यापूर्वी कितीतरी आधीपासूनच ‘प्रकृती’ने या साऱ्या गोष्टींची निर्मिती केलेली होती.

एखाद्या देशाची पर्यावरणीय परिस्थिती आणि त्या देशामध्ये तयार होणारे उत्पादन यांच्यामध्ये एक प्रकारची सुसंवादिता विकसित झालेली आढळते; जसे की, प्राण्यांचा अधिवास ज्या देशांमध्ये असतो त्या देशाची विशालता आणि तेथील प्राण्यांचा आकार या दोहोंमध्ये एक प्रकारची सुसंवादिता आढळते. उदाहरणार्थ, भारतातील हत्ती हे आफ्रिकेमधील हत्तींपेक्षा आकाराने कितीतरी लहान असतात. आणि असे म्हटले जाते की, आफ्रिकेमध्ये प्रचंड मोकळी जागा आहे आणि त्यामुळे तेथील प्राणीदेखील आकाराने मोठे असतात.

सृष्टीनिर्मितीमध्येच ही एक प्रकारची सुसंवादिता प्रस्थापित झालेली आहे आणि पुढे देश जसजसे आकाराने लहान होत गेले, प्रांत जसजसे आकुंचित होत गेले तसतसे, त्या प्रांतामध्ये राहणारे प्राणीदेखील आकाराने लहानलहान होत गेले. आणि मोकळी जागा आणि त्या प्राण्यांचे आकारमान यांच्यामध्ये सुयोग्य प्रमाण उरले नाही तेव्हा ते प्राणी नष्ट झाले. तुम्ही जर बेसुमार घरं बांधलीत, तर मग तेथे अस्वलं, लांडगे यांसारखे प्राणी शिल्लक राहणार नाहीत, साहजिकच, सर्वात आधी वाघ आणि सिंह नामशेष होतील; आणि मला वाटते यामध्ये माणसांचा हात आहे…

भीती माणसांना अत्यंत विघातक बनवते. पण जसजसे माणसांचे जथेच्या जथे संख्येने वाढत जातील आणि रिकाम्या जागा कमी कमी होत जातील तसतसे प्राणिमात्रांचे आकार कमीकमी होत जातील. मग आपण या सगळ्यांसाठी नियम तरी कसे बनवणार?

– श्रीमाताजी
(CWM 07 : 53-54)

‘निसर्गा’मध्ये वनस्पती ज्याप्रमाणे वाढतात त्याप्रमाणे, व्यक्तीने गोष्टींना सहजस्वाभाविकपणे विकसित होऊ द्यावे. त्यांच्या त्यांच्या वेळेपूर्वीच आपण जर त्यांच्यावर अत्यंत काटेकोर आकार किंवा मर्यादा लादण्याचा प्रयत्न केला तर, त्या गोष्टी त्यांचा नैसर्गिक विकास गमावून बसतील आणि आज ना उद्या त्या नष्ट कराव्याच लागतील.

‘निसर्गां’तर्गत ‘ईश्वर’ अंतिम असे काहीच निर्माण करत नाही, प्रत्येक गोष्टच तात्पुरती असते आणि त्याच वेळी ती त्या कालमान-परिस्थितीला अनुसरून जितकी शक्य आहे तितकी परिपूर्ण देखील असते.

*

आपल्या कार्यप्रणालीमध्ये आपण ‘प्रकृती’चे गुलाम असता कामा नये : प्रयत्न करण्याच्या, बदलण्याच्या, काहीतरी करण्याच्या, नाहीसे करण्याच्या, पुन्हापुन्हा करत राहण्याच्या सवयी तसेच, ऊर्जा, श्रम, साधनसंपदा आणि संपत्तीचा अपव्यय करण्याच्या साऱ्या सवयी हा ‘प्रकृती’च्या कार्याचा मार्ग आहे, हा ‘ईश्वरा’चा मार्ग नव्हे. ‘दिव्य-चेतना’ आधी त्या कार्याचे सत्य काय आहे हे पाहते, दिलेल्या परिस्थितीत ते कार्य करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता तेही ती ‘चेतना’ पाहते. आणि जेव्हा ती कार्य करते तेव्हा ते अंतिम असते; एकदा केलेल्या गोष्टीकडे ती कधीच पुन्हा परतून येत नाही, ती पुढे पुढे वाटचाल करते, यश असो की अपयश त्यास ती आपल्या ध्येयाप्रत जाण्याच्या दिशेने प्रगत होण्याचे एक पाऊल म्हणून उपयोगात आणते.

‘प्रकृती’ प्रगती करण्यासाठी विनाश घडविते, तर ‘दिव्य-चेतना’ विकासाला उत्तेजन देते आणि सरतेशेवटी रूपांतरण घडविते.

*

तुम्हाला तुमची जबाबदारी उमगली नाही आणि तुम्ही सदैव सतर्क आणि उद्यमी राहिला नाहीत तर, ‘प्रकृती’ तुमची थट्टा करेल. तुम्हाला ‘प्रकृती’ करते ती थट्टा थांबवायची असेल तर, तुम्ही अगदी अचूकतेने आणि जबाबदारीने तुमचे कर्म केले पाहिजे. काहीतरी करायचेच राहून गेले आहे, असे होता कामा नये. तुम्ही नेहमीच सावधानता बाळगली पाहिजे, सतर्क राहिला पाहिजेत म्हणजे मग तुम्ही सुरक्षित असाल.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 12)