Tag Archive for: प्रकाश

साधना, योग आणि रूपांतरण – ८८

(ध्यानावस्थेत प्रकाश दिसल्याचे एका साधकाने श्रीअरविंद यांना कळविले तेव्हा त्यांनी दिलेले हे उत्तर….)

प्रकाश अनेक प्रकारचे असतात. अतिमानसिक, मानसिक, प्राणिक, शारीरिक, दिव्य किंवा असुरी असे सर्व प्रकारचे प्रकाश असतात. त्यांच्याकडे तुम्ही लक्षपूर्वक पाहिले पाहिजे, अनुभवांच्या आधारे प्रगल्भ होत गेले पाहिजे आणि त्या प्रत्येकामधील फरक ओळखायला शिकले पाहिजे. खऱ्या प्रकाशांच्या ठायी स्पष्टता आणि सौंदर्य असते आणि त्यामुळे ते ओळखणे हे तितकेसे कठीण नसते.

*

(ध्यानावस्थेमध्ये एका साधकाला काही ध्वनी ऐकू येत असल्याचे त्याने श्रीअरविंदांना पत्राने लिहून कळविले असावे, तेव्हा त्या साधकाला श्रीअरविंदांनी दिलेले हे उत्तर… )

शारीरिक दृष्टीशिवाय जशी आणखी एक वेगळी अंतर्दृष्टी असते, त्याप्रमाणेच बाह्य श्रवणाप्रमाणेच आंतरिक श्रवणही (inner hearing) असते. आणि ते आंतरिक श्रवण इतर जगतांमधील, इतर स्थळकाळातील किंवा अतिभौतिक जिवांकडून येणारे आवाज, ध्वनी आणि शब्द ऐकू शकते. पण इथे तुम्ही काळजी घेतली पाहिजे.

काय करावे आणि काय करू नये, यासंबंधी परस्परविरोधी आवाजात जर तुम्हाला कोणी काही सांगायचा प्रयत्न करत असेल, तर तुम्ही त्यांचे म्हणणे ऐकता कामा नये किंवा त्यांना प्रत्युत्तरदेखील देता कामा नये. तुम्ही काय करावे किंवा काय करू नये यासंबंधी केवळ मी आणि श्रीमाताजीच तुम्हाला सांगू शकतो किंवा मार्गदर्शन करू शकतो किंवा तुम्हाला सल्ला देऊ शकतो.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 304-305, 112)

प्रेमाची स्पंदने ही फक्त मनुष्यप्राण्यापुरतीच मर्यादित नसतात; मनुष्यप्राण्याच्या तुलनेत इतर जगतांमध्ये ही स्पंदने कमी दूषित असतात. झाडांकडे व फुलांकडे पाहा. जेव्हा सूर्य मावळतो आणि सारे काही शांत होते, अशावेळी थोडा वेळ शांत बसा आणि ‘निसर्गा’शी एकत्व पावण्याचा प्रयत्न करा. या पृथ्वीपासून, झाडांच्या अगदी मुळापासून, त्याच्या तंतूतंतूंमधून वरवर जाणारी, अगदी सर्वाधिक उंच अशा बाहू फैलावलेल्या शाखांपर्यंत पोहोचलेल्या उत्कट प्रेमाची, उत्कट इच्छेची अभीप्सा तुम्हाला संवेदित होईल. प्रकाश आणि आनंद घेऊन येणाऱ्या अशा कशाची तरी ती आस असते, कारण तेव्हा प्रकाश मावळलेला असतो आणि त्यांना तो पुन्हा हवा असतो. ही आस, ही उत्कंठा इतकी शुद्ध आणि तीव्र असते की, झाडांमधील ही स्पंदने जर तुम्हाला जाणवू शकली तर तुमच्यामध्ये देखील, येथे आजवर अभिव्यक्त न झालेल्या शांती, प्रकाश, प्रेम यांविषयीची उत्कट प्रार्थना उदयाला येत आहे आणि वर वर जात आहे असे तुम्हाला जाणवेल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 72)

ईश्वरी कृपा – ०८

एक अशी ‘सत्ता’ आहे, जिच्यावर कोणताही सत्ताधीश हुकमत गाजवू शकणार नाही; असा एक ‘आनंद’ आहे की, जो कोणत्याही लौकिक यशातून प्राप्त होणार नाही; असा एक ‘प्रकाश’ आहे, जो कोणत्याही प्रज्ञेच्या ताब्यात असणार नाही; असे एक ‘ज्ञान’ आहे की, ज्यावर कोणतेही तत्त्वज्ञान किंवा कोणतेही विज्ञान प्रभुत्व मिळवू शकणार नाही; एक असा ‘परमानंद’ आहे की, कोणत्याही इच्छापूर्तीच्या समाधानातून तसा आनंद मिळू शकणार नाही; अशी एक ‘प्रेमा’ची तृष्णा आहे, जिची तृप्ती कोणत्याही मानवी नातेसंबंधातून होऊ शकत नाही; अशी एक ‘शांती’ आहे, जी व्यक्तिला कोठेच प्राप्त होत नाही, अगदी मृत्युमध्येसुद्धा प्राप्त होत नाही. ही ‘सत्ता’, हा ‘आनंद’, हा ‘प्रकाश’, हे ‘ज्ञान’, हा ‘परमानंद’, हे ‘प्रेम’, ही ‘शांती’ ‘ईश्वरी कृपे’पासूनच प्रवाहित होते.

– श्रीमाताजी
(CWM 01 : 380)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ३०

…येथे धैर्याचा अर्थ ‘परम साहसाविषयीची आवड असणे’ असा आहे. आणि परम साहसाची ही आवड म्हणजे ‘अभीप्सा’ (Aspiration). अशी अभीप्सा जी, तुमचा पूर्णपणे ताबा घेते आणि कोणताही मागचा पुढचा विचार न करता, हातचे काहीही राखून न ठेवता, परतीच्या साऱ्या शक्यता नसतानाही, तुम्हाला ‘ईश्वरी’ शोधाच्या ‘महान साहसा’साठी झोकून देण्यास प्रवृत्त करते; ईश्वर-भेटीसाठीच्या महान साहसासाठी आणि त्याहूनही अधिक महान अशा ‘ईश्वरी साक्षात्काराच्या साहसा’साठी तुम्हाला झोकून देण्यास प्रवृत्त करते.

‘पुढे काय होईल?’ याविषयी एक क्षणभरही शंका उपस्थित न करता, मागे वळून न पाहता या साहसामध्ये तुम्ही स्वतःला झोकून देता.

…धैर्य आणि अभीप्सा या गोष्टी हातात हात घालून नांदतात. खरीखुरी अभीप्सा ही धैर्ययुक्त असते.

– श्रीमाताजी

(CWM 08 : 40-41)

मानसिक परिपूर्णत्व – १५

 

आत्मप्रकाशाशी आणि ईश्वरी हाकेशी एकनिष्ठ राहण्यासंबंधी मी जे बोलत होतो त्यामध्ये, मी तुमच्या गतायुष्यातील कोणत्या गोष्टीविषयी किंवा तुमच्यामधील एखाद्या उणिवेविषयी बोलत नव्हतो. तर सर्व संघर्षामध्ये, हल्ल्यांमध्ये आवश्यक असणाऱ्या एका गोष्टीकडे निर्देश करत होतो – सत्यप्रकाशाला, सत्याच्या हाकेला विरोध करणाऱ्या कोणत्याही सूचना, आवेग, प्रलोभन यांचे म्हणणे ऐकण्यास नकार देण्याच्या आवश्यकतेकडे, मी निर्देश करत होतो. सर्व शंकाकुशंका आणि निराशेच्या वेळी असे म्हणावे की, ”मी ईश्वराचा आहे, मी अपयशी होऊ शकणार नाही.” अशुद्धतेच्या आणि अपात्रतेच्या सर्व सूचनांना उत्तरादाखल म्हणावे की, ”मी ईश्वराने निवडलेले अमर्त्यतेचे बालक आहे. मी फक्त माझ्याशी आणि ईश्वराशी प्रामाणिक असावयास हवे, तर विजय निश्चित आहे; अगदी मी जरी पडलो, धडपडलो तरी मी खात्रीने पुन्हा उभा राहीन.” कोणतेतरी कनिष्ठ ध्येय पूर्ण करण्यासाठी, या उच्च्तर ध्येयापासून दूर जाऊ पाहणाऱ्या सर्व आवेगांना उत्तर द्यावे की, “हे सर्वात महान असे ध्येय आहे. माझ्या अंतरंगात वसणाऱ्या आत्म्याचे समाधान करू शकेल असे हे एकमेव सत्य आहे; या दिव्यत्वाच्या प्रवासामध्ये कितीही परीक्षा आणि संकटांना सामोरे जावे लागले, तरी मी धीराने ध्येयापर्यंत पोहोचेनच.” ‘प्रकाशाशी आणि हाकेशी एकनिष्ठता’ याचा मला अभिप्रेत असणारा अर्थ हा होता.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 99)