Posts

साधना, योग आणि रूपांतरण – २२८

अज्ञान आणि अहंभावातून केलेल्या कृतीला म्हणजे, जी कृती अहंकाराच्या तुष्टीसाठी आणि राजसिक इच्छेने प्रेरित होऊन केली जाते त्या कृतीला मी ‘कर्म’ मानत नाही.

अज्ञानाचा जणू शिक्काच असणाऱ्या अहंकार, राजसिकता आणि इच्छावासना यांपासून सुटका करून घेण्याचा संकल्प असल्याखेरीज ‘कर्मयोग’ घडूच शकत नाही.

परोपकार किंवा मानवतेची सेवा किंवा नैतिक किंवा आदर्शवादी अशा उर्वरित सर्व गोष्टी, ज्या गोष्टी कार्याच्या गहनतर सत्याला पर्यायी आहेत, असे मानवी मन मानते, त्या सुद्धा माझ्या दृष्टीने ‘कर्म’ या संज्ञेला पात्र ठरत नाहीत.

जी कृती ‘ईश्वरा’साठी केली जाते, जी कृती ‘ईश्वरा’शी अधिकाधिक एकत्व पावून केली जाते आणि अन्य कशासाठीही नाही तर, केवळ ’ईश्वरा’साठीच केली जाते अशा कृतीला मी ’कर्म’ असे संबोधतो.

साहजिकच आहे की, ही गोष्ट सुरुवातीला तितकीशी सोपी नसते; गहन ध्यान आणि दीप्तिमान ज्ञान यांच्यापेक्षा ती काही कमी सोपी नसते, एवढेच काय पण, अगदी खरेखुरे प्रेम आणि भक्ती यांच्याहूनही ती गोष्ट काही कमी सोपी नसते. परंतु इतर गोष्टींप्रमाणेच या गोष्टीची (कर्माची) सुरुवात देखील तुम्ही सुयोग्य वृत्ती आणि दृष्टिकोन बाळगून केली पाहिजे, तुमच्यामधील सुयोग्य संकल्पासहित ही गोष्ट करण्यास तुम्ही सुरुवात केली पाहिजे, अशा वृत्तीने केलेले ‘कर्म’ हे भक्ती किंवा ध्यान यांच्याइतकेच प्रभावी ठरू शकते. अन्य गोष्टी त्यानंतर घडून येतील. (उत्तरार्ध उद्या)

– श्रीअरविंद (CWSA 29 : 216-218)

आध्यात्मिकता ०९

आपल्या कुटुंबीयांसाठी पैसे कमावणे आणि कौटुंबिक कर्तव्य पार पाडणे; एक भला आणि नीतिसंपन्न माणूस बनणे; सुयोग्य नागरिक, देशभक्त, देशासाठी कार्यकर्ता बनणे ही गोष्ट, कोणत्यातरी दूरस्थ आणि अदृश्य ‘देवते’च्या शोधार्थ, निष्क्रियपणे ध्यानाला बसण्यापेक्षा अधिक ‘आध्यात्मिक’ आहे, असे आपल्याला अलीकडे वारंवार सांगण्यात येते. परोपकार, जनहित, मानवतेची सेवा या गोष्टींना खऱ्या आध्यात्मिक गोष्टी म्हणून मानण्यात येते. मानसिक आदर्शवाद, नैतिक प्रयत्न, सौंदर्यात्मक विशुद्धता या गोष्टींना आधुनिक मनाद्वारे, आध्यात्मिक गोष्टी म्हणून पुढे केले जाते. आपण उत्तमातील उत्तम आणि सर्वोच्च असे जे काही साध्य करून घेऊ शकत असू तर ते हेच आहे असे दर्शविले जाते. – तथापि त्याचवेळी, एकीकडे वाढता भ्रमनिरास, असमाधान, त्यांच्यातील पोकळपणाची भावना या गोष्टीदेखील वाढीस लागत आहेत.

वरील सर्वच गोष्टींचा निश्चितपणे काही उपयोग आहे, कारण प्रत्येक गोष्टीचे त्याच्या त्याच्या स्थानी त्याचे त्याचे एक मूल्य असते आणि जे लोक या गोष्टींनी समाधानी होतात ते त्याला सर्वाधिक महत्त्व देतात, आणि या गोष्टी म्हणजेच सर्वोत्तम गोष्टी आहेत, त्या ‘कर्तव्यकर्म’ आहेत, असे मानून त्या धारण करतात, हे स्वाभाविकच आहे.

परंतु आध्यात्मिकता ही या गोष्टींवर अवलंबून नसते, तर ती स्वतःच्या स्वतंत्र पायावर आधारलेली असते आणि आध्यात्मिक चेतनेखेरीज अन्य कोणत्याही पायावर या गोष्टी जोपर्यंत आधारलेल्या असतात आणि आंतरिक आध्यात्मिक अधिष्ठानावर त्या जोपर्यंत रूपांतरित होत नाहीत तोपर्यंत आध्यात्मिकता त्या गोष्टींचा समावेशदेखील स्वत:मध्ये करून घेत नाही. [क्रमश:]

– श्रीअरविंद [CWSA 28 : 417]

ईश्वराच्या समीपतेसाठी व्यक्तीमध्ये प्रेमाचा आणि सहानुभूतीचा अभाव असणे गरजेचे नाही; उलट, इतरांशी निकटतेची व एकत्वाची भावना असणे या गोष्टी म्हणजे, ईश्वरसान्निध्यामुळे आणि ईश्वराशी ऐक्यभावामुळे साधक ज्या दिव्य चेतनेमध्ये प्रवेश करतो, त्या दिव्य चेतनेचाच एक भाग असतात.

…तर दुसऱ्या बाजूने पाहता, मानवी समाज, मानवी मैत्री, प्रेम, स्नेह, सह-अनुभूती या गोष्टी, अगदी पूर्णतः किंवा सर्वच उदाहरणांबाबत असे नव्हे, पण मुख्यत्वेकरून आणि बऱ्याचदा प्राणिक (vital) आधारावर उभ्या असतात आणि त्यांच्या केंद्रस्थानी अहंकाराची पकड असते. आपल्यावर कोणीतरी प्रेम करत आहे याचे सुख, संपर्कामुळे अहंकार व्यापक होण्याचे सुख, आत्म्याचा परस्परांमध्ये प्रवेश, ज्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वांचे पोषण होते असा प्राणिक देवाणघेवाणीचा उल्हास, या साऱ्या गोष्टींवर माणसांचे सहसा प्रेम असते – आणि यामध्ये इतरही काही आणि याहूनही अधिक स्वार्थी अशा प्रेरणा असतात; त्या प्रेरणा वरील मूलभूत गतिविधींमध्ये मिसळतात. यामध्ये अर्थातच उच्चतर आध्यात्मिक, आंतरात्मिक, मानसिक आणि प्राणिक घटकही प्रवेश करतात किंवा प्रवेश करू शकतात; परंतु एकंदरच ही सर्व गोष्ट खूप गुंतागुंतीची असते, अगदी तिच्या सर्वोत्तम अवस्थेत देखील ती गुंतागुंतीचीच असते. आणि म्हणूनच एका विशिष्ट अवस्थेमध्ये कोणत्यातरी प्रत्यक्ष कारणामुळे किंवा कारणाविनादेखील हे जग, जीवन, मानवी समाज आणि नातेसंबंध तसेच परोपकार या गोष्टी नीरस वाटू लागतात. (इतर सर्व गोष्टींप्रमाणेच हा परोपकारदेखील अहं-प्रेरित असाच असतो.)

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 285-286)