Posts

साधना, योग आणि रूपांतरण – २३६

फक्त उच्चतर चेतनेचे अनुभव आल्यामुळे, प्रकृतीमध्ये परिवर्तन होणार नाही. ज्यांद्वारे हे परिवर्तन घडून येऊ शकते असे पुढील चार मार्ग असतात :
१) एकतर, उच्चतर चेतनेने समग्र अस्तित्वामध्ये गतिशील अवतरण करून, त्या अस्तित्वाचे परिवर्तन केले पाहिजे.
२) किंवा मग, उच्चतर चेतनेने आंतरिक शरीरापर्यंत खाली उतरून, स्वतःला आंतरिक अस्तित्वामध्ये प्रस्थापित केले पाहिजे त्यामुळे आपण बाह्य (स्थूल) शरीरापासून विलग आहोत असा अनुभव आंतरिक शरीराला येऊ शकेल आणि ते बाह्य शरीरावर मुक्तपणे कार्य करू शकेल.
३) किंवा अंतरात्मा अग्रस्थानी आला पाहिजे आणि त्याने प्रकृतीचे परिवर्तन घडविले पाहिजे;
४) किंवा मग, आंतरिक इच्छा जागृत होऊन तिने प्रकृतीस परिवर्तन करण्यास भाग पाडले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 23)

साधना, योग आणि रूपांतरण – २३३

फक्त ध्यानामुळेच प्रकृतीमध्ये परिवर्तन होऊ शकते असा आमचा अनुभव नाही किंवा दैनंदिन कर्मव्यवहार आणि बाह्य व्यापार यांच्यापासून निवृत्त होऊन जे परिवर्तन घडवून आणू पाहत आहेत त्यांनाही त्यापासून फार लाभ झाला आहे असे नाही. किंबहुना अनेक उदाहरणांमध्ये तर ते घातकच ठरले आहे.

काही विशिष्ट प्रमाणात ध्यान-एकाग्रता, हृदयामध्ये आंतरिक अभीप्सा आणि श्रीमाताजींच्या उपस्थितीप्रत चेतनेचे खुलेपण आणि ऊर्ध्वस्थित शक्तीकडून होणारे अवतरण या गोष्टी आवश्यक असतात. परंतु कर्माविना, कोणतेही कार्य न करता प्रकृतीचे खऱ्या अर्थाने परिवर्तन होऊ शकत नाही. परिवर्तन झाले आणि त्यानंतर जर व्यक्ती लोकांच्या संपर्कामध्ये आली तरच त्या व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये परिवर्तन झाले आहे की नाही याची खरी कसोटी लागते.

व्यक्ती कोणत्याही प्रकारचे काम करत असली तर, त्यामध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ असे काहीही नसते. सर्व कर्मं जी श्रीमाताजींना अर्पण केली जातात आणि जी त्यांच्यासाठी आणि त्यांच्या शक्तिनिशी केली जातात ती सर्व कर्मं एकसमान असतात.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 252)

साधना, योग आणि रूपांतरण – २२६

व्यक्ती (योगसाधना करून देखील) जर स्वतःच्या प्रकृतीमध्ये कोणतेही परिवर्तन घडवू शकत नसेल तर, तिने योगसाधना करण्याचे कष्ट घेणे उपयुक्त ठरणार नाही; कारण प्रकृतीमध्ये परिवर्तन घडविण्यासाठीच तर योगसाधना केली जाते, अन्यथा त्याला काही अर्थ नाही, असे श्रीअरविंद आपल्याला सांगतात.
*
‘शांती’चे अवतरण, ‘शक्ती’चे अवतरण, ‘प्रकाशा’चे अवतरण आणि ‘आनंदा’चे अवतरण, या चार गोष्टी ‘प्रकृतीचे रूपांतरण’ घडवून आणतात.

– श्रीमाताजी (CWM 04 : 332), – श्रीअरविंद (CWSA 30 : 449)

साधना, योग आणि रूपांतरण – १७८

‘पूर्णयोग’ हा संपूर्ण ‘ईश्वर’-साक्षात्काराचा, संपूर्ण ‘आत्म’साक्षात्काराचा, आपल्या अस्तित्वाच्या आणि चेतनेच्या संपूर्ण परिपूर्तीचा, आपल्या प्रकृतीच्या संपूर्ण रूपांतरणाचा मार्ग आहे. आणि त्यामध्ये अन्यत्र कोठेतरी असणाऱ्या शाश्वत परिपूर्णतेकडे परत जाणे नव्हे; तर येथील जीवनाचेच संपूर्ण परिपूर्णत्व अभिप्रेत आहे. हे उद्दिष्ट आहे आणि त्याच्या कार्यपद्धतीमध्येसुद्धा तीच परिपूर्णता आहे. कारण कार्यपद्धती परिपूर्ण असल्याशिवाय उद्दिष्टाची समग्रता साध्य होऊ शकत नाही. या पद्धतीमध्ये आपण ज्याचा साक्षात्कार करून घेऊ इच्छितो त्या ईश्वराप्रत आपल्या अस्तित्वाने, प्रकृतीने तिच्या सर्व घटकांसहित, मार्गांसहित, गतिविधींसहित पूर्णत्वाने वळणे, उन्मुख असणे आणि आत्म-दान करणे अंतर्भूत असते.

अशा प्रकारे आपले मन, इच्छा, हृदय, प्राण, शरीर, आपले बाह्य, आंतरिक आणि आंतरतम अस्तित्व, आपल्या सचेतन घटकांप्रमाणेच आपले अतिचेतन (superconscious) आणि अवचेतन (subconscious) घटकदेखील अर्पण केले पाहिजेत. हे सारे घटक साक्षात्काराचे आणि रूपांतराचे क्षेत्र झाले पाहिजेत, हे सारे घटक म्हणजे माध्यमं झाली पाहिजेत, त्यांनी प्रदीपनामध्ये (illumination) आणि मानवाच्या दिव्य चेतनेमधील व प्रकृतीमधील परिवर्तनामध्येही सहभागी झालेच पाहिजे. हे पूर्णयोगाचे स्वरूप आहे.

– श्रीअरविंद (CWSA 12 : 358)

विचारशलाका ३६

 

सर्वसाधारणपणे आपण ‘अज्ञाना’मध्ये जीवन जगत असतो आणि आपल्याला ‘ईश्वर’ काय आहे हे माहीत नसते. सामान्य प्रकृतीच्या शक्ती या अदिव्य शक्ती असतात कारण त्या अहंकार, इच्छावासना आणि अचेतनेचा जणू एक पडदाच विणतात की, ज्यामुळे ‘ईश्वर’ आपल्यापासून झाकलेला राहतो.

जी चेतना, ‘ईश्वर’ काय आहे ते जाणते आणि त्यामध्ये जाणीवपूर्वक अधिवास करते, अशा उच्चतर आणि गहन, सखोल चेतनेमध्ये आपला प्रवेश व्हायचा असेल तर, कनिष्ठ प्रकृतीच्या शक्तींपासून आपली सुटका झाली पाहिजे आणि ‘दिव्य शक्ती’च्या कृतीसाठी आपण स्वतःला खुले केले पाहिजे; म्हणजे मग ती दिव्य शक्ती आपल्या चेतनेचे ‘दिव्य प्रकृती’मध्ये परिवर्तन घडवून आणेल. ‘दिव्यत्वा’च्या या संकल्पनेपासून आपण प्रारंभ केला पाहिजे – त्याच्या सत्याचा साक्षात्कार चेतनेच्या विकसनातून आणि तिच्या परिवर्तनामधूनच होणे शक्य आहे.

– श्रीअरविंद [CWSA 28 : 07-08]

विचारशलाका – ०१

जेव्हा आपली चेतना बदलेल तेव्हा परिवर्तन म्हणजे काय ते आपल्याला कळेल.

*

‘परिवर्तन’ म्हणजे नक्की काय?…

द्वेषाचे परिवर्तन सुसंवादामध्ये

मत्सराचे परिवर्तन औदार्यामध्ये

अज्ञानाचे परिवर्तन ज्ञानामध्ये

अंधकाराचे परिवर्तन प्रकाशामध्ये

असत्याचे परिवर्तन सत्यामध्ये

दुष्टपणाचे परिवर्तन चांगुलपणामध्ये

युद्धाचे परिवर्तन शांतीमध्ये

भीतीचे परिवर्तन निर्भयतेमध्ये

अनिश्चिततेचे परिवर्तन निश्चिततेमध्ये

संशयाचे परिवर्तन श्रद्धेमध्ये

गोंधळाचे परिवर्तन व्यवस्थेमध्ये

पराभवाचे परिवर्तन विजयामध्ये.

– श्रीमाताजी [CWM 15 : 223]

आध्यात्मिकता ४३

(तिमिर जावो….भाग ०२)

(तुमच्या व्यक्तिमत्त्वामधील) ही काळोखी बाजू ज्याक्षणी तुम्हाला आढळून येते, त्याक्षणी तुम्ही तिचे नीट निरीक्षण केलेत आणि “हा मी आहे,” असे म्हणाला नाहीत, आणि त्याऐवजी जर तुम्ही असे म्हणालात की, “नाही, ही माझी काळी छाया आहे, माझ्यामधून हा अंश बाहेर काढून टाकलाच पाहिजे,” आणि मग त्या काळोख्या भागावर प्रकाश टाकलात, आणि सद्भावनापूर्ण भागाच्या ज्ञानानिशी आणि प्रकाशानिशी, त्या काळोख्या भागाच्या नजरेला नजर भिडवून पाहिलेत, इथे त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करायचा नाही (कारण तसे करणे अतिशय अवघड असते.) पण तुम्ही त्याला शांत राहायला भाग पाडले पाहिजे…

प्रथमतः त्यापासून स्वतःला दूर केले पाहिजे, मग त्यावर तीव्र प्रकाश टाकून, त्याला अशा रीतीने दूर भिरकावून दिले पाहिजे, की ती गोष्ट पुन्हा परतून माघारी येणार नाही. अशीही काही उदाहरणे आहेत की, त्यांच्यामध्ये परिवर्तन घडविणे शक्य झालेले आहे, पण अशी उदाहरणे अगदीच दुर्मिळ असतात.

अशी काही उदाहरणे आहेत की, जेव्हा त्या काळोख्या अंशावर किंवा त्या काळ्या छायेवर इतका प्रखर प्रकाश टाकण्यात आला की त्या प्रकाशाद्वारे त्या भागाचे परिवर्तन झाले आणि त्याचे त्या व्यक्तीच्या सत्तत्त्वामध्ये (truth) रूपांतर झाले. पण ही गोष्ट अगदीच दुर्मिळ आहे. असे करता येते, पण हे अगदीच दुर्मिळ आहे.

सहसा, असे म्हणणे अधिक चांगले की, “नाही, हा मी नाही, मला हे नको आहे, या स्पंदनाचा आणि माझा काही संबंध नाही, ती गोष्ट माझ्यालेखी अस्तित्वातच नाही, ती गोष्ट माझ्या प्रकृतीच्या विरोधी आहे.” आणि अशा रीतीने, सतत त्यावर जोर देऊन, ती हाकलून लावत, त्यावर प्रहार करतकरत, सरतेशेवटी व्यक्ती स्वतःला त्यापासून विलग करू शकते. (क्रमश:…)

– श्रीमाताजी [CWM 06 : 263]

साधनेची मुळाक्षरे – ०९

‘चैत्यीकरण’ (Psychisation) म्हणजे कनिष्ठ प्रकृतीचे परिवर्तन, मनामध्ये योग्य दृष्टी आणणे, प्राणामध्ये योग्य आवेग आणि भावना आणणे, शरीरामध्ये योग्य हालचाली व सवयी आणणे. तसेच या साऱ्या गोष्टी एका ‘ईश्वरा’कडेच वळविणे; या साऱ्या गोष्टी प्रेम, भक्ती यांवर आधारित असणे आणि अंतिमतः ‘श्रीमाताजीं’ची जाणीव व दृष्टी सर्वांमध्ये, सर्वत्र तसेच हृदयामध्ये अनुभवास येणे, त्यांचीच शक्ती आपल्या अस्तित्वामध्ये कार्यकारी आहे इ. जाणवणे, तसेच भक्ती, आत्मनिवेदन आणि समर्पण असणे म्हणजे ‘चैत्यीकरण’

शांती, प्रकाश, ज्ञान, शक्ती आणि आनंद यांचे वरून अवतरण होणे, आत्म्याची आणि ‘ईश्वरा’ची जाणीव होणे आणि उच्चतर वैश्विक चेतना आणि तिच्याप्रत समग्र चेतनेचे परिवर्तन होणे म्हणजे ‘आध्यात्मिक परिवर्तन’ (The spiritual change) होय.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 380)

विचार शलाका – १४

आपल्या चेतनेचे जेव्हा परिवर्तन होईल तेव्हाच परिवर्तन म्हणजे काय ते आपल्याला कळेल.

*

परिवर्तन…

०१. द्वेषाचे परिवर्तन सुसंवादामध्ये
०२. मत्सराचे परिवर्तन औदार्यामध्ये
०३. अज्ञानाचे परिवर्तन ज्ञानामध्ये
०४. अंधाराचे परिवर्तन प्रकाशामध्ये
०५. असत्याचे परिवर्तन सत्यामध्ये
०६. दुष्टपणाचे परिवर्तन चांगुलपणामध्ये
०७. युद्धाचे परिवर्तन शांततेमध्ये
०८. भीतीचे परिवर्तन निर्भयतेमध्ये
०९. अनिश्चिततेचे परिवर्तन निश्चिततेमध्ये
१०. संशयाचे परिवर्तन श्रद्धेमध्ये
११. गोंधळाचे परिवर्तन व्यवस्थेमध्ये
१२. पराभवाचे परिवर्तन विजयामध्ये.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 223)