Tag Archive for: निश्चय

 

(बदलाची इच्छा असणाऱ्या व्यक्तीमध्ये, बदलास नाखूष असणारा एक घटक कसा दडलेला असतो हे श्रीमाताजींनी सांगितले आहे. ते आपण कालच्या भागात पाहिले.)

तुमची अभीप्सा जेव्हा क्षीण होते, प्रयत्न मंदावतात तेव्हा तुमच्यामधील बदलास नाखूष असणारा हा घटक गाजावाजा न करता पण पटकन उसळी मारून वर येतो. तो त्याची इच्छा तुमच्यावर लादू पाहतो आणि तुम्हाला जे करायचे नसते नेमके तेच करायला तो तुम्हाला भाग पाडतो. तुम्ही अमुक एक गोष्ट करायची नाही असे ठरविलेले असते पण तुमच्याही नकळत, तुम्ही ती गोष्ट करून मोकळे झालेला असता. असे का झाले, कसे झाले याची तुम्हाला अजिबात कल्पना येत नाही. हे असे घडलेले असते कारण तो घटक तिथे असतो. आणि त्याची वेळ आता आलेली असते. गोष्टी छोट्या असू देत किंवा मोठ्या असू देत, तपशिलाचा भाग असू दे किंवा जीवनाची दिशा ठरविणे असू दे, या सर्व बाबतीत या घटकाची वेळ कधी ना कधी येतच असते.

अशी अनेक माणसं असतात, त्यांना स्वतःमध्ये काय बदल केला पाहिजे हे नेमकेपणाने माहीत असते, पण तरीसुद्धा त्यांना असे वाटत असते की, नाही, तो बदल ते करू शकणार नाहीत. पण असे का वाटत असते, याचे कारण मात्र त्यांना माहीत नसते. पण दुसरेतिसरे काही नसून, हा घटक हेच ते कारण असते. बदल करण्यास नाखूष असणारा हा असा छोटासा भाग असतो आणि तो त्याला संधी मिळण्याची वाट पाहत बसलेला असतो.

आणि मग त्याला संधी मिळण्याचा अवकाश! मग ती संधी तुमच्या ढिलाईमुळे असो, थकव्यामुळे असो, किंवा निद्रानाशामुळे असो, किंवा काहीशा कंटाळ्यामुळे असो, त्या घटकाला डोकं वर काढण्याची संधी तुम्ही दिलीत की मग तो घटक त्याच्या पूर्ण ताकदीनिशी, अगदी एकवटून उफाळून वर येतो आणि तुम्ही जे करायचे ठरविलेले असते त्याच्या अगदी विरूद्ध असे तो तुम्हाला बोलायला, वागायला भाग पाडतो. आणि मग तुम्हाला असे वाटायला लागते की, “छे, हे किती नाउमेद करणारे आहे!” आणि मग काही लोकं विचार करायला लागतात की, “काय करणार, माझं नशीबच फुटकं आहे.” पण हे काही त्यांचे नशीब नसते, तर ते स्वतःच त्याला जबाबदार असतात.

लक्षात घ्या की, त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या शोधविजेरीचा (searchlight), प्रकाशाचा उपयोग केलेला नसतो. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वाच्या छोट्याछोट्या कानाकोपऱ्यात विजेरीचा प्रकाश टाकून पाहिलेले नसते, तिथे सांदीकोपऱ्यात काय दडलेले आहे हे त्यांनी पाहिलेले नसते. ती गोष्ट त्यांनी तिथे तशीच पडीक ठेवलेली असते आणि ती गोष्ट दृष्टीस पडू नये म्हणून त्यांनी स्वतः तिच्याकडे जणू पाठ फिरवलेली असते. असे कितीदा तरी घडते की व्यक्तीला आता काहीतरी (म्हणजे तो घटक) हाती लागणार असते. पण ती गोष्ट तिला दुखावणारी असते, त्रासदायक असते.. मग अशा वेळी ती गोष्ट चिमटीत पकडण्याऐवजी व्यक्ती दुसरीकडेच आपला मोहरा वळवते. आणि मग काय होते तर, प्रगती करण्याची ती संधी तुम्ही दवडलेली असते.

आणि मग त्या गोष्टीची शेपूट पकडून तिला बाहेरचा रस्ता दाखविण्यासाठी किंवा तिचे कान उपटण्यासाठी तुम्हाला बराच काळ वाट पाहावी लागते, त्यापूर्वी पुन्हा काही चुका घडतात. तेव्हा कुठे एकदा तुमच्या पकडीत ती गोष्ट येते आणि मग तुम्ही म्हणता, “नाही. आता तू माझ्यापासून लपून राहू शकत नाहीस. तू जशी आहेस तशी मला तू स्पष्टपणे दिसत आहेस, आता एकतर तुला माझ्यामधून बाहेर पडावे लागेल नाहीतर तुला स्वतःमध्ये बदल तरी करावा लागेल.” पण हे असं सारं करण्यासाठी, व्यक्तीची स्वतःवर मजबूत पकड हवी आणि तिच्यापाशी अविचल दृढ निश्चय असला पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 06 : 243-244)

लोक तुमच्याविषयी द्वेषपूर्ण उद्गार काढतात, तुम्हाला मूर्खात काढतात त्यामुळे तुम्ही जर चिंताग्रस्त झालात, दुःखी झालात किंवा नाउमेद झालात तर तुम्ही (योग)मार्गावर फार प्रगत होऊ शकणार नाही. अशा गोष्टी तुमच्या वाट्याला येतात याचे कारण तुम्ही दुर्दैवी आहात किंवा तुमच्या नशीबातच सुख नाही असे मुळीच नाही; तर उलट दिव्य चेतने‌ने व दिव्य कृपे‌ने तुमचा संकल्प गांभीर्याने घेतला आहे असा त्याचा अर्थ होतो. तुमचा निश्चय किती प्रामाणिक आहे, मार्गातील अडचणींना सामोरे जाण्यासाठी तुम्ही खंबीर आहात का, याची पारख करण्यासाठी, तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा कसोटीच्या दगडाप्रमाणे (सोन्याची पारख करण्याचा सोनाराकडे असणारा कसोटीचा दगड) दिव्य चेतनेकडून व दिव्य कृपेकडून वापर केला जात असतो, हे त्यामागचे खरे कारण असते.

म्हणून जर कोणी तुमचा उपहास केला किंवा कोणी तुमच्याविषयी निंदाजनक शब्द उच्चारले तर, तुमच्या खऱ्या गुणांची लोकांना कदरच नाही असे वाटून तुम्ही उदास, संतप्त किंवा उद्विग्नही होता कामा नये. उलट, अशावेळी पहिली गोष्ट तुम्ही केली पाहिजे ती अशी की, तुमच्यातील कोणत्या दुर्बलतेमुळे वा कोणत्या अपूर्णतेमुळे तुमच्याविषयी तसे उद्गार काढले गेले ते तुम्ही अंतर्मुख होऊन पाहिले पाहिजे. एवढेच नव्हे तर, तुमच्यातील कोणता दोष, कोणती दुर्बलता वा कोणती विकृती तुम्ही दुरुस्त केली पाहिजे हे दाखवून दिल्याबद्दल, तुम्ही दिव्य कृपे‌विषयी कृतज्ञ असले पाहिजे. दुःखीकष्टी होण्याऐवजी, तुम्ही पूर्णपणे समाधानी झाले पाहिजे आणि तुमचे अहित व्हावे असा जो तुमच्या निंदकांचा हेतू होता, त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ करून घेतला पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 03 : 282)

मानसिक परिपूर्णत्व – २०

 

(येथे श्रीअरविंद एका साधकाला पत्राच्या माध्यमातून उत्तर देत आहेत.)

तुमच्यासाठी या पृथ्वीवर करण्याजोगी हीच एकमेव गोष्ट शिल्लक राहिली आहे, अमुक अमुक गोष्ट करावयाची आहे हे एकदाच कायमचे ठरवून टाका ; मग बाकी भूकंप, ढासळती सभ्यता… इ. इ. बाह्य गोष्टी आहेतच. आणखी असे की, जी गोष्ट तुम्ही करणे आवश्यक आहे, ती तुम्हाला करता यावी म्हणून तुमच्या साहाय्यासाठी एक गोष्टदेखील पाठविलेली आहे. तुम्ही म्हणता, तुम्ही ठरविलेली ती गोष्ट अवघड आहे, मार्ग दूरवरचा आहे आणि त्यामानाने देण्यात आलेले प्रोत्साहन अल्प आहे पण म्हणून काय झाले? एवढी मोठी गोष्ट एवढ्या सहजासहजी मिळावी किंवा एकतर त्यात अगदी वेगाने यश प्राप्त व्हावे, नाहीतर नकोच, अशी अपेक्षा तुम्ही का बाळगता? अडचणींना सामोरे गेलेच पाहिजे आणि जेवढ्या आनंदाने तुम्ही त्यास सामोरे जाल, तेवढ्या लवकर तुम्ही त्या अडचणींवर मात करू शकाल.

…यशाचा मूलमंत्र, विजयाचा निर्धार, दृढ संकल्प कायम राखणे हीच एक गोष्ट केली पाहिजे. अशक्यता अशी कोणती गोष्टच मुळात अस्तित्वात नाही. हां, अडचणी असू शकतात, गोष्टींना वेळ लागू शकतो, पण अशक्य असे काही नाही. व्यक्तीने एकदा का अमुक एक गोष्ट करण्याचा दृढ निश्चय केला की, आज ना उद्या ती शक्य होतेच.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 115-116)