Posts

विचार शलाका – ३१

 

व्यक्ती जोवर ‘अज्ञाना’मध्ये जीवन जगत असते तोवर नियती या शब्दाचा काटेकोर अर्थ, व्यक्तीच्या बाह्य अस्तित्वालाच लागू पडतो. आपण ज्याला ‘नियती’ म्हणतो ती म्हणजे वस्तुतः एक परिणाम असतो. जिवाने गतकाळात जी प्रकृती आणि ज्या ऊर्जांचा संचय केलेला असतो, त्यांचे एकमेकांवर जे कार्य चालू असते त्यांचा आणि त्या ऊर्जा ज्या सद्यकालीन प्रयत्नांचा व त्यांच्या भावी परिणामांचा निर्णय करत असतात त्यांचा, तसेच व्यक्तीची सद्यकालीन स्थिती या साऱ्याचा तो परिणाम असतो.

 

पण व्यक्ती ज्या क्षणी आध्यात्मिक मार्गामध्ये प्रवेश करते त्याच क्षणी, या जुन्या पूर्वनिर्धारित नियतीची पिछेहाट व्हायला सुरुवात होते. आणि तिथे एका नवीनच घटकाचा म्हणजे ‘ईश्वरी कृपे’चा, ‘कर्म-शक्ती’पेक्षा भिन्न असणाऱ्या उच्चतर ‘ईश्वरी शक्ती’च्या साहाय्याचा प्रवेश होतो; ही कृपा साधकाला त्याच्या प्रकृतीच्या सद्यकालीन संभाव्यतांच्या पलीकडे उचलून घेऊ शकते. अशा वेळी, त्या जिवाची आध्यात्मिक नियती म्हणजे ईश्वरी निवड असते, जी भविष्याबद्दल आश्वस्त करते. या मार्गावरील चढउतार आणि ते ओलांडून जाण्यासाठी लागणारा वेळ, एवढीच काय ती शंका असते. इथेच, भूतकालीन प्रकृतीच्या दुर्बलतांशी खेळणाऱ्या विरोधी शक्ती, प्रगतीची गती रोखण्यासाठी आणि प्रगतीची परिपूर्ती पुढे ढकलण्यासाठी आटापिटा करत असतात. जे अपयशी ठरतात ते या प्राणिक शक्तींच्या हल्ल्यांमुळे अपयशी ठरतात असे नव्हे, तर ते स्वतः विरोधी ‘शक्तीं’च्या बाजूने होतात आणि आध्यात्मिक सिद्धींपेक्षा ते प्राणिक आकांक्षेला किंवा इच्छेला (आकांक्षा, फुशारकी, लोभ इ. गोष्टींना) अधिक प्राधान्य देतात, हे त्यामागचे कारण आहे.

 

– श्रीअरविंद

(CWSA 28 : 509-510)

विचार शलाका – १३

योगसाधनेद्वारे व्यक्तीला नियतीचा केवळ वेधच घेता येतो असे नाही, तर व्यक्ती तिच्यात फेरफार करून नियतीला जवळपास पूर्णपणे बदलूनही टाकू शकते. सर्वप्रथम, योगशास्त्र आपल्याला असे शिकविते की, आपण म्हणजे एकसंध, साधेसुधे अस्तित्व नसतो; आणि त्यामुळे अनिवार्यपणे, आपली नियती देखील साधीसुधी, तर्कसंगत म्हणता येईल अशी एकच एक असत नाही. उलट आपण हे समजून घेतले पाहिजे की, सर्वसाधारणपणे बहुतांशी माणसांची नियती ही व्यामिश्र (complex) असते, कधी कधी विसंगतही वाटावी इतकी ती टोकाची असते. ह्या व्यामिश्रतेमुळेच आपणाला ती अनपेक्षित, अनिश्चित, आणि परिणामतः असंभाव्य आहे असे भासत नाही का?

हा प्रश्न सोडविण्यासाठी व्यक्तीला हे माहीत असणे आवश्यक आहे की, ….स्वत:च्या सर्वोच्च चेतनेमध्ये स्वत:ला कायम राखणे आणि अशा प्रकारे, स्वतःच्या सर्वोच्च नियतीला कृती व जीवनाच्या इतर भागांवर प्रभुत्व गाजविण्यास अनुमती देणे, यातच जीवनाची कला सामावलेली आहे. तेव्हा चूक होण्याची यत्किंचितही आशंका न बाळगता व्यक्ती असे म्हणू शकते की, कायम चेतनेच्या सर्वोच्च शिखरस्थानी राहा म्हणजे तुमच्या बाबतीत सर्वोत्तम तेच घडेल. पण ते सर्वोच्च शिखर गाठणे इतके सोपे नसते.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 77-78)

ईश्वरी कृपा – १६

भविष्यामध्ये जो मार्ग उलगडत जाणार आहे, त्या मार्गाला बदलू शकण्यास; पुरेशी प्रामाणिक अभीप्सा आणि पुरेशी उत्कट प्रार्थना या दोन गोष्टी सक्षम नसतात, असे कोण म्हणेल बरे?

ह्याचाच अर्थ असा की, सर्व काही शक्य आहे.

व्यक्तीकडे पुरेशी अभीप्सा आणि पुरेशी उत्कट प्रार्थना मात्र हवी. मानवी प्रकृतिला ती देणगी देण्यात आलेली आहे. ईश्वरी कृपेद्वारे मानवी प्रकृतिला देण्यात आलेल्या बहुमूल्य देणग्यांपैकी ही एक देणगी आहे; मात्र, तिचा उपयोग कसा करायचा हे व्यक्तीला माहीत नसते.

म्हणजे असे म्हणता येईल की, दैववादाच्या आडव्या रेषा असल्या तरीदेखील ह्या आडव्या रेषा ओलांडून पलीकडे कसे जायचे आणि चेतनेच्या सर्वोच्च बिंदुपर्यंत कसे जाऊन पोहोचायचे हे ज्या व्यक्तीला माहीत आहे अशी व्यक्ती गोष्टींमध्ये परिवर्तन घडवून आणू शकते; वरकरणी, ज्या गोष्टी अगदी पूर्णत: पूर्वनिर्धारित असल्यासारख्या दिसतात त्या गोष्टींमध्येदेखील अशी व्यक्ती परिवर्तन घडवू शकते…

– श्रीमाताजी
(CWM 05 : 88)

ईश्वरी कृपा – १५

व्यक्ती अज्ञानामध्ये जीवन जगत असते तोवर नियती या शब्दाचा काटेकोर अर्थ, व्यक्तिच्या बाह्य अस्तित्वालाच लागू पडतो. आम्ही ज्याला नियती म्हणतो ती म्हणजे वस्तुतः एक परिणाम असतो. जिवाने गतकाळात जी प्रकृती आणि ज्या उर्जांचा संचय केलेला असतो, त्यांचे एकमेकांवर जे कार्य चालू असते त्यांचा, आणि त्या ऊर्जा ज्या सद्यकालीन प्रयत्नांचा व त्यांच्या भावी परिणामांचा निर्णय करत असतात त्यांचा, तसेच व्यक्तिची सद्यकालीन स्थिती या साऱ्याचा तो परिणाम असतो. पण व्यक्ती ज्या क्षणी आध्यात्मिक मार्गामध्ये प्रवेश करते त्याच क्षणी, या जुन्या पूर्वनियोजित नियतीची पिछेहाट व्हायला सुरुवात होते. आणि तिथे एका नवीनच घटकाचा म्हणजे ईश्वरी कृपेचा, कर्मशक्तिपेक्षा भिन्न असणाऱ्या उच्चतर ईश्वरी शक्तिच्या साहाय्याचा प्रवेश होतो; ही कृपा साधकाला त्याच्या प्रकृतिच्या सद्यकालीन संभाव्यतांच्या पलीकडे उचलून घेऊ शकते. अशा वेळी, त्या जिवाची आध्यात्मिक नियती म्हणजे ईश्वरी निवड असते, जी भविष्याबद्दल आश्वस्त करते. या मार्गावरील चढउतार आणि ते ओलांडून जाण्यासाठी लागणारा वेळ, एवढीच काय ती शंका असते. आणि इथेच, भूतकालीन प्रकृतिच्या दुर्बलतांशी खेळणाऱ्या विरोधी शक्ती, प्रगतिची गती रोखण्यासाठी आणि प्रगतिची परिपूर्ती पुढे ढकलण्यासाठी आटापिटा करत असतात. जे अपयशी ठरतात ते या प्राणिक शक्तिंच्या हल्ल्यांमुळे अपयशी ठरतात असे नव्हे, तर ते स्वतःहून विरोधी शक्तिंची बाजू घेतात आणि आध्यात्मिक सिद्धिंपेक्षा ते प्राणिक आकांक्षेला किंवा इच्छेला (आकांक्षा, फुशारकी, लोभ इ. गोष्टींना) अधिक प्राधान्य देतात, हे त्यामागचे कारण आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 509-510)

यानंतर आपण अगदी स्वाभाविकपणे चार मुक्तींकडे वळतो की ज्या ह्या सिद्धीची सघन अशी रूपे असतात. अतिमानसिक एकत्वाचा पूर्ण साक्षात्कार झाल्याने, भावनांची मुक्ती म्हणजे त्याच वेळी दुःखभोगापासूनही मुक्ती असेल.

मानसिक मुक्ती किंवा अज्ञानापासून मुक्तता झाली म्हणजे ज्योतिर्मन (Mind of light) किंवा विज्ञानमय चेतनेची (Gnostic consciousness) आपल्या अस्तित्वामध्ये प्रस्थापना होईल, जिच्या अभिव्यक्तीमध्ये शब्दाचे सृजनशील सामर्थ्य असेल.

प्राणिक मुक्ती किंवा वासनामुक्ती प्राप्त झाल्याने, व्यक्तीला स्वत:ची इच्छा दिव्य इच्छेमध्ये संपूर्णत: आणि जाणीवपूर्वक एकरूप करण्याची क्षमता येईल आणि त्यामुळे नित्य शांती, प्रसन्नता आणि त्यांच्यापासून निर्माण होणारी शक्ती यांची प्राप्ती होईल.

अखेरचे शिखर म्हणजे शारीरिक मुक्ती; म्हणजेच भौतिक जगामध्ये असणाऱ्या कार्यकारणभावाच्या नियमापासूनही मुक्ती. संपूर्ण आत्मप्रभुत्वाचा परिणाम म्हणून, व्यक्ती आता प्राकृतिक नियमांची दास बनून राहत नाही. माणसांना अवचेतन वा अर्धचेतन भावावेगांच्या द्वारा कृती करावयास भाग पाडणा-या आणि सामान्य जीवनाच्या चाकोरीत बांधून ठेवणाच्या प्राकृतिक नियमांच्या आधीन आता अशी व्यक्ती राहत नाही. या मुक्तीच्या साहाय्याने मग, व्यक्ती कोणता मार्ग निवडावयाचा, कोणते कार्य पूर्ण करावयाचे हे पूर्ण जाणीवेने ठरवू शकते. आणि अंध नियतीच्या सर्व पाशांमधून ती व्यक्ती स्वत:ला मोकळे करते; की ज्यायोगे, व्यक्तीच्या जीवनक्रमामध्ये उच्चतम संकल्पशक्ती, सर्वोच्च सत्यमय ज्ञान, अतिमानसिक जाणीव यांखेरीज दुसऱ्या कोणाचाही हस्तक्षेप करू दिला जात नाही.

 

– श्री माताजी
(CWM 12 : 71)