Posts

साधना, योग आणि रूपांतरण – २३०

चेतना ‘ईश्वरा’प्रत खुली करणे आणि प्रकृतीमध्ये परिवर्तन घडवून आणणे हे साधनेचे उद्दिष्ट आहे. ध्यान किंवा निदिध्यासन हा यांतील एक मार्ग आहे पण ते केवळ एक साधन आहे, भक्ती हे दुसरे साधन, तर कर्म हे आणखी एक साधन आहे.

साक्षात्काराच्या दिशेने पहिले साधन म्हणून योग्यांकडून चित्तशुद्धीची साधना केली जात असे आणि त्यातून त्यांना संतांच्या संतत्वाची आणि ऋषीमुनींच्या अचंचलतेची प्राप्ती होत असे. पण आम्ही प्रकृतीच्या ज्या रूपांतरणाविषयी बोलतो, ते यापेक्षा काहीतरी अधिक आहे; आणि हे रूपांतरण केवळ ध्यानसमाधीने होत नाही, त्यासाठी कर्म आवश्यक असते. कर्मातील ‘योग’ हा अनिवार्य असतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 208)

साधना, योग आणि रूपांतरण – ५८

जिथे कोणी येणार जाणार नाही अशा एका अगदी शांत कोपऱ्यामध्ये बसले पाहिजे, जिथे तुम्ही अगदी सुयोग्य अशा स्थितीत असाल आणि अगदी नि:श्चल बसलेले असाल आणि (असे असेल तरच) तुम्हाला ध्यान करणे शक्य होईल असे समजण्याची सार्वत्रिक चूक करू नका. यामध्ये काही तथ्य नाही. वास्तविक, कोणत्याही परिस्थितीमध्ये यशस्वीरित्या ध्यान करता येणे ही आवश्यक गोष्ट आहे. डोकं रिकामं करणे याला मी ‘ध्यान’ म्हणत नाही तर ‘ईश्वरा’च्या निदिध्यासनामध्ये स्वत:चे लक्ष एकाग्र करणे याला मी ‘ध्यान’ म्हणते. आणि असे निदिध्यासन तुम्ही करू शकलात तर, तुम्ही जे काही कराल त्याची गुणवत्ता बदलून जाईल. त्याचे रंगरूप बदलणार नाही, कारण बाह्यतः ती गोष्ट तशीच दिसेल पण त्याची गुणवत्ता मात्र बदललेली असेल. जीवनाची गुणवत्ताच बदलून जाईल आणि तुम्ही जे काही होतात त्यापेक्षा तुम्ही काहीसे निराळेच झाले असल्याचे तुम्हाला जाणवेल. एक प्रकारची शांती, एक प्रकारचा दृढ विश्वास, आंतरिक स्थिरता, अढळ अशी निश्चल शक्ती तुम्हाला जाणवेल.

अशा स्थितीमध्ये तुम्हाला कोणी बाधा पोहोचविणे अवघड असते. हे जगत अनेक विरोधी शक्तींनी भरलेले आहे; त्या शक्ती सर्व काही बिघडवून टाकू पाहत असतात; त्यासाठी विविध शक्ती नेहमीच प्रयत्नशील असतात. …पण त्यामध्ये त्या काही प्रमाणातच यशस्वी होतात. तुम्ही प्रगती करण्यास प्रवृत्त व्हावे यासाठी जेवढ्या प्रमाणात बाधा पोहोचविणे आवश्यक असेल तेवढ्याच प्रमाणात त्या तुम्हाला बाधा पोहोचवितात. जेव्हा कधी तुमच्यावर जीवनाकडून आघात होतो तेव्हा तुम्ही लगेचच स्वत:ला सांगितले पाहिजे, “अरेच्चा, याचा अर्थ आता मला सुधारणा केलीच पाहिजे.” आणि मग तेव्हा तोच आघात हा आशीर्वाद ठरतो. अशावेळी तोंड पाडून बसण्यापेक्षा, तुम्ही ताठ मानेने आनंदाने म्हणता, “मला काय शिकले पाहिजे? ते मला समजून घ्यायचे आहे. मला माझ्यामध्ये काय सुधारणा केली पाहिजे? ते मला समजून घ्यायचे आहे”… अशी तुमची वृत्ती असली पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 04 : 121-122)

साधना, योग आणि रूपांतरण – ४०

(ध्यानाची उद्दिष्टे काय असावीत यासंबंधीचा विचार आपण येथे समजावून घेत आहोत. त्याचा हा पूर्वार्ध…)

कधीकधी एखाद्या विशिष्ट विषयावर विचारांची एकाग्रतापूर्वक मालिका या स्वरूपात ‘ध्यान’ (meditation) करायला सांगितले जाते; तर कधीकधी एका विशिष्ट प्रतिमेवर, शब्दावर किंवा संकल्पनेवर मनाची अनन्य एकाग्रता स्थिर करण्यास सांगण्यात येते. येथे ‘ध्यान’ म्हणण्यापेक्षा स्थिर असे ‘निदिध्यासन’ (contemplation) अपेक्षित असते. उपरोक्त दोन पद्धतींव्यतिरिक्त, ध्यानाच्या अन्य पद्धतीही असतात. त्यामुळे या दोन किंवा अधिक पद्धतींमधील निवड ही आपण योगामध्ये आपल्यासमोर कोणते उद्दिष्ट ठेवतो यावर अवलंबून असते.

सद्यस्थितीत विचारी मन (thinking mind) हे आपल्या हाती असणारे असे एक साधन आहे की, ज्याच्या साहाय्याने आपण आपल्या आंतरिक अस्तित्वाचे सचेत रीतीने आत्म-व्यवस्थापन करू शकतो. परंतु बहुतांशी व्यक्तींमध्ये, विचार म्हणजे विविध संकल्पना, संवेदना आणि प्रभाव यांचा एक गोंधळलेला प्रवाह असतो….

ज्याप्रमाणे शरीराच्या कार्यप्रणालीवर व प्राणिक क्रियांवर नियंत्रण आणण्यासाठी आणि स्वातंत्र्य प्राप्त करून घेण्यासाठी हठयोग्यांकडून स्थिर आसन व सुनियंत्रित श्वसनाच्या प्रक्रिया (प्राणायाम) उपयोगात आणल्या जातात, अगदी त्याचप्रमाणे मनाच्या कार्यप्रणालीवर नियंत्रण आणण्यासाठी आणि स्वातंत्र्य प्राप्त करून घेण्यासाठी राजयोग्यांकडून ‘विचारांची एकाग्रता’ ही प्रक्रिया उपयोगात आणली जाते. ध्यानाद्वारे आपण आपल्या चंचल मनाला ताळ्यावर आणतो आणि त्याच्या सर्व ऊर्जांची बचत व्हावी आणि त्या ऊर्जा कोणत्यातरी ईप्सित ज्ञानाच्या प्राप्तीवर किंवा स्वयंशिस्तीवर केंद्रित करता याव्यात यासाठी आपण मनाला एखाद्या व्यायामपटूप्रमाणे प्रशिक्षण देतो. ही गोष्ट माणसं सहसा सामान्य जीवनामध्येही करत असतात परंतु ‘प्रकृती’च्या या उच्चतर कार्यप्रणालीला ‘योग’ आपल्या हाती घेतो आणि तो तिला तिच्या संपूर्ण शक्यतांपर्यंत घेऊन जातो. मन ज्योतिर्मय रीतीने एका विचारवस्तुवर केंद्रित केले असता, आपण सार्वत्रिक ‘चेतने’मधील प्रतिसादाला जाग आणू शकतो आणि त्याच्याद्वारे त्या वस्तुविषयीचे ज्ञान आपल्या मनात ओतले जाऊन, आपल्या मनाचे समाधान केले जाते; किंवा त्याच्याद्वारे, त्या वस्तुचे केंद्रवर्ती किंवा मूलभूत सत्यदेखील आपल्यापाशी उघड केले जाते, योग या तथ्याची दखल घेतो.

(ध्यानाद्वारे) आपण ईश्वरी ‘शक्ती’चा प्रतिसाददेखील जागृत करत असतो, आणि त्यामुळे आपण ज्याचे ध्यान करतो त्याच्या कार्यप्रणालीवर आपल्याला विविध मार्गांनी चढतेवाढते प्रभुत्व मिळविता येते किंवा आपण ज्याचे ध्यान करतो ती गोष्ट आपल्यामध्ये निर्माण करण्यास किंवा आपल्यामध्ये ती सक्रिय करण्यास तो ‘ईश्वरी’ शक्तीचा प्रतिसाद आपल्याला सक्षम बनवितो. (उदाहरणार्थ) अशा प्रकारे, ‘दिव्य प्रेमा’च्या संकल्पनेवर आपण मन केंद्रित केले तर आपल्याला त्याच्या तत्त्वाचे आणि त्याच्या कार्यप्रणालीचे ज्ञान होते, आपण त्याच्याशी सायुज्य पावू शकतो, ते ‘दिव्य प्रेम’ आपल्या स्वतःमध्ये विकसित करू शकतो आणि आपले हृदय व आपली इंद्रिये त्याच्या धर्माचे पालन करतील याकडे आपण लक्ष पुरवू शकतो. (क्रमश:)
– श्रीअरविंद (CWSA 13 : 445-446)

विचार शलाका – ३२

प्रश्न : ध्यान म्हणजे नेमके काय?

श्रीअरविंद : ‘ध्याना’ची भारतीय संकल्पना स्पष्ट करण्यासाठी इंग्रजीमध्ये meditation आणि contemplation हे दोन शब्द उपयोगात आणले जातात. एकाच विषयाचा वेध घेण्यासाठी म्हणून विचारांच्या एका सलग मालिकेवर मनाचे लक्ष केंद्रित करणे म्हणजे ‘ध्यान’. एकाग्रतेच्या आधारे, वस्तुचे, प्रतिमेचे किंवा संकल्पनेचे ज्ञान, मनामध्ये स्वाभाविकरित्या उदित व्हावे म्हणून, कोणत्यातरी एकाच वस्तुवर, प्रतिमेवर किंवा संकल्पनेवर, एकाग्रता करणे म्हणजे ‘चिंतन’. हे दोन्ही प्रकार ही ध्यानाचीच दोन रूपं आहेत. कारण विचारावर असू दे, दृश्यावर असू दे किंवा ज्ञानावर असू दे, पण मनाची एकाग्रता करणे हे ध्यानाचे तत्त्व आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 293-294)