Posts

साधना, योग आणि रूपांतरण – १५६

पूर्णयोगांतर्गत भक्ती

‘देवा’वर श्रद्धा असणे, ‘देवा’वर भरवसा ठेवणे, ‘दिव्य शक्ती’ला समर्पण व आत्मदान करणे या आवश्यक, अनिवार्य गोष्टी आहेत. पण ‘देवा’वरील भरवसा हा, कनिष्ठ प्रकृतीच्या आवेगांच्या अधीन होण्याचे, किंवा दुर्बलता, निरुत्साह यासाठीचे निमित्त ठरता कामा नये. ‘दिव्य सत्या’च्या मार्गामध्ये जे काही आड येईल त्या सर्वांना सातत्याने नकार देत आणि अथक अभीप्सा बाळगत विश्वासाने मार्गक्रमण केले पाहिजे.

‘ईश्वरा’प्रत समर्पण हे, स्वतःच्या इच्छांच्या, कनिष्ठ गती-प्रवृत्तींच्या अधीन होण्याचे, किंवा स्वतःच्या अहंकाराच्या अधीन होण्याचे किंवा ‘ईश्वरा’चे मायावी रूप धारण केलेल्या, अज्ञान व अंधकाराच्या कोणत्यातरी शक्तींच्या अधीन होण्याचे एक कारण, एक निमित्त होता उपयोगाचे नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 87)

साधना, योग आणि रूपांतरण – ६७

नाउमेद न होता किंवा निराशेच्या गर्तेत जाऊन न पडता अडचणींवर मात करण्यासाठी, (तुम्हाला तुमच्यामध्ये असणाऱ्या) सातत्यपूर्ण उत्कट अभीप्सेचे आणि ईश्वराभिमुख झालेल्या अविचल आणि अढळ इच्छेचे साहाय्य लाभते. परंतु अडीअडचणी येतच राहतात कारण त्या मानवी प्रकृतीमध्येच अंतर्भूत असतात. आंतरिक अस्तित्वामध्ये (ईश्वरविषयक) ओढीचा एक प्रकारे अभाव जाणवत आहे, (त्या दृष्टीने) कोणतीच पावले पडत नाहीयेत असे वाटत राहणे, अशा प्रकारचे साधनेमधील विरामाचे कालावधी अगदी उत्तम साधकांबाबत सुद्धा असतात.

(तुमच्यामधील) भौतिक प्रकृतीमध्ये काही अडचण उद्भवली असेल तर तिचे निराकरण करण्यासाठी किंवा पडद्यामागे काही तयारी चाललेली असेल तर त्यासाठी किंवा तशाच काही कारणासाठी अशा प्रकारचे विरामाचे कालावधी येत असतात.

मन आणि प्राण, जे अधिक घडणसुलभ असतात, त्यांच्यामध्ये जेव्हा साधनेचे कार्य चालू असते तेव्हा अशा प्रकारचे कालावधी वारंवार येतात आणि जेथे शरीराचा प्रश्न असतो (साधना जेव्हा शारीर स्तरावर चालू असते तेव्हा) ते अनिवार्यपणे येतातच. आणि तेव्हा ते सहसा कोणत्याही दृश्य संघर्षाद्वारे दिसून येत नाहीत तर, पूर्वी ज्या ऊर्जा कार्यरत असायच्या त्या आता अचल आणि जड झाल्याचे जाणवणे (यामधून त्या विरामाच्या कालावधीची जाणीव होते.) मनाला ही गोष्ट फार त्रासदायक वाटते कारण आता सारेकाही संपले आहे, प्रगतीसाठी आपण अक्षम झालो आहोत, अपात्र ठरलो आहोत असे काहीसे त्याला वाटू लागते. परंतु वस्तुतः ते तसे नसते.

तुम्ही अविचल राहिले पाहिजे आणि (ईश्वरी शक्तीच्या) कार्याप्रति स्वतःला खुले करत गेले पाहिजे किंवा (किमान) तसे करण्याची इच्छा बाळगत राहिली पाहिजे. तसे केल्यास नंतर अधिक प्रगती घडून येईल. अशा कालावधीमध्ये बरेच साधक नैराश्यवृत्तीमध्ये जातात आणि त्यांची भावी (काळा) वरील श्रद्धाच ढळल्यासारखे होते आणि त्यामुळे पुनरूज्जीवनासाठी विलंब होतो, मात्र हे टाळले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 67)

साधना, योग आणि रूपांतरण – ६६

निश्चल-नीरव (silence) स्थितीमध्ये प्रवेश करणे ही सोपी गोष्ट नाही. मानसिक आणि प्राणिक गतिविधींना बाहेर फेकून दिल्यानेच ते शक्य होते. (मात्र) त्या नीरवतेला, त्या शांतीला तुमच्यामध्ये प्रविष्ट होण्यासाठी वाव देणे अधिक सोपे असते. म्हणजे तुम्ही स्वतःला उन्मुख करा, खुले करा आणि तिचे अवतरण होण्यासाठी तिला वाव द्या, हे सोपे असते. हे करणे आणि उच्चतर शक्तींनी अवतरित व्हावे म्हणून त्यांना आवाहन करणे या दोन्हीचा मार्ग समानच असतो. तो मार्ग असा की, ध्यानाच्या वेळी अविचल (quiet) राहायचे, मनाशी झगडा करायचा नाही किंवा ‘शांती’ची शक्ती खाली खेचण्यासाठी कोणताही मानसिक खटाटोप करायचा नाही तर, त्यांच्यासाठी (शांतीसाठी किंवा उच्चतर शक्तींनी अवतीर्ण व्हावे म्हणून) केवळ एक शांत आस, अभीप्सा बाळगायची.

मन जर सक्रिय असेल तर तुम्ही मागे सरून फक्त त्याच्याकडे पाहायला आणि त्याला अंतरंगामधून कोणतीही अनुमती न देण्यास शिकले पाहिजे. मनाच्या सवयीच्या किंवा यांत्रिक गतिविधींना अंतरंगामधून कोणताही आधार न मिळाल्यामुळे त्या हळूहळू गळून पडत नाहीत तोपर्यंत असे करत राहायचे. परंतु मनाच्या गतिविधी तरीही सुरूच राहिल्या तर कोणत्याही तणावाविना किंवा संघर्षाविना त्याला सातत्याने नकार देत राहणे ही एकच गोष्ट करत राहिली पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 36 : 300)

 

साधना, योग आणि रूपांतरण – ६५

मन निश्चल-नीरव करण्यासाठी, येणारा प्रत्येक विचार परतवून लावणे पुरेसे नसते, ती केवळ एक दुय्यम क्रिया असू शकते. तुम्ही सर्व विचारांपासून दोन पावले मागे सरले पाहिजे आणि विचार आलेच तर नीरव चेतना या भूमिकेतून त्यांचे निरीक्षण केले पाहिजे, मात्र स्वतःहून विचार करायचे नाहीत किंवा विचारांबरोबर एकरूप व्हायचे नाही अशा रीतीने त्या विचारांपासून स्वतःला अलग केले पाहिजे. विचार म्हणजे पूर्णपणे बाहेरच्या गोष्टी आहेत, असे तुम्हाला वाटले पाहिजे. तसे झाले तर मग, विचारांना नकार देणे किंवा मनाची अविचलता बिघडवू न देता त्यांना तसेच निघून जाऊ देणे, या गोष्टी सहजसोप्या होतील.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 335)

साधना, योग आणि रूपांतरण – ६४

भौतिक मनाच्या (physical mind) गोंगाटाला, तुम्ही अस्वस्थ न होता, अविचलपणे नकार दिला पाहिजे. इथपर्यंत नकार दिला पाहिजे की तो (गोंगाट) नाउमेद होऊन जाईल आणि मान हलवत निघून जाईल आणि म्हणेल, “छे! हा माणूस फारच शांतचित्त आणि कणखर आहे.”

नेहमीच अशा दोन गोष्टी असतात की ज्या वर उफाळून येतात आणि तुमच्या शांत अवस्थेवर हल्ला चढवितात. प्राणाकडून आलेल्या सूचना आणि भौतिक मनाची यांत्रिक पुनरावृत्ती या त्या दोन्ही गोष्टी असतात. दोन्ही बाबतीत शांतपणे नकार देत राहणे हाच उपाय असतो.

अंतरंगात असणारा पुरुष हा प्रकृतीला आदेश देऊ शकतो आणि तिने काय स्वीकारावे किंवा काय नाकारावे हे तिला सांगू शकतो. मात्र त्याची इच्छा ही शक्तिशाली, अविचल इच्छा असते; तुम्ही जर अडचणींमुळे अस्वस्थ झालात किंवा क्षुब्ध झालात तर एरवी त्या ‘पुरुषा’ची इच्छा जितकी परिणामकारक रीतीने कार्य करू शकली असती तितकी परिणामकारक रीतीने (तुम्ही अस्वस्थ किंवा क्षुब्ध असताना) ती कार्य करू शकत नाही.

उच्चतर चेतना ही प्राणामध्ये पूर्णपणे उतरली असताना कदाचित सक्रिय साक्षात्कार (dynamic realisation) होऊ शकेल. उच्चतर चेतना जेव्हा मनामध्ये उतरते तेव्हा ती आपल्याबरोबर ‘पुरुषा’ची शांती आणि मुक्ती तसेच ज्ञानसुद्धा घेऊन येते. ती जेव्हा प्राणामध्ये उतरते तेव्हा सक्रिय साक्षात्कार वर्तमानात प्रत्यक्षात होऊ शकतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 304-305)

साधना, योग आणि रूपांतरण – ६३

(साधना, उपासना काहीच घडत नाहीये असे वाटावे) अशा प्रकारचे कालावधी नेहमीच असतात. तुम्ही अस्वस्थ होता कामा नये, अन्यथा ते कालावधी दीर्घकाळपर्यंत टिकून राहतात आणि साधनेमध्ये अडथळे निर्माण होतात. तुम्ही अविचल राहिले पाहिजे आणि कोणत्याही आवेशाविना स्थिरपणे अभीप्सा बाळगली पाहिजे. किंवा तुम्ही परिवर्तनाच्या दृष्टीने जोर लावत असाल तर तोसुद्धा अविचल, स्थिर असला पाहिजे.

*

नेहमीच काही कालावधी असे असतात की, जेव्हा तुम्ही शांत, स्थिर राहून फक्त अभीप्साच बाळगू शकता. जेव्हा संपूर्ण अस्तित्व सज्ज झालेले असते आणि अंतरात्मा सातत्याने अग्रभागी आलेला असतो तेव्हाच फक्त प्रकाश आणि शक्तीची अव्याहत क्रिया शक्य असते.

*

चेतना झाकोळली गेली आहे (असे वाटण्याचे) असे कालावधी प्रत्येकाच्या बाबतीतच येत असतात. तसे असले तरी, तुम्ही साधना करत राहिले पाहिजे आणि तुम्ही ‘श्रीमाताजीं’कडे कडे वळलात आणि तुमच्या अभीप्सेमध्ये सातत्य ठेवलेत तर, असे कालावधी हळूहळू कमी होत जातील आणि मग तुमची चेतना ‘श्रीमाताजी’प्रति अधिकाधिक खुली होत जाईल.
अशा कालावधींमध्ये (निराशा, वैफल्य, निरसता इत्यादी) गोष्टींना तुमचा ताबा घेऊ देण्यास मुभा देऊ नका, त्याऐवजी, तुम्ही त्यांच्यापासून स्वतःला अलग केले पाहिजे आणि त्या गोष्टी जणू काही परक्या आहेत आणि तुम्हाला त्यांना नकार द्यायचा आहे, असे समजा.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 63)

साधना, योग आणि रूपांतरण – ०८

व्यक्ती जेव्हा ध्यान करायचा प्रयत्न करू लागते तेव्हा सुरुवातीला येणारा पहिला अडथळा म्हणजे झोप येणे. तुम्ही हा अडथळा ओलांडून पलीकडे जाता तेव्हा अशी एक अवस्था येते की, तुमचे डोळे मिटलेले असतात पण तुम्हाला विविध गोष्टी, माणसं आणि अनेक प्रकारची दृश्यं दिसायला लागतात. ही काही वाईट गोष्ट नाही तर, ते एक चांगले लक्षण आहे. तुम्ही योगसाधनेमध्ये प्रगती करत असल्याचे ते द्योतक आहे, असा त्याचा अर्थ होतो.

बाह्यवर्ती वस्तू पाहणाऱ्या बाह्य चर्मचक्षूंशिवाय, आपल्यामध्ये एक आंतरिक दृष्टीदेखील असते; ही आंतरिक दृष्टी आजवर न पाहिलेल्या आणि आजवर अज्ञात असलेल्या गोष्टी पाहू शकते; ती दूर अंतरावरील गोष्टी पाहू शकते; अन्य स्थळकाळातील किंवा अन्य जगतांमधील गोष्टीसुद्धा ती पाहू शकते; ही आंतरिक दृष्टी तुमच्यामध्ये आता खुली होऊ लागली आहे. श्रीमाताजींच्या शक्तिकार्यामुळे ती तुमच्यामध्ये खुली होऊ लागली आहे आणि तुम्ही तिला अटकाव करण्याचा प्रयत्न करता कामा नये. श्रीमाताजींचे नित्य स्मरण करत राहा, त्यांना आवाहन करत राहा आणि त्यांची उपस्थिती तुम्हाला जाणवावी आणि त्यांच्या शक्तीचे कार्य तुमच्यामध्ये सुरू असल्याचे तुम्हाला जाणवावे अशी आस बाळगा. परंतु त्यासाठी, इथूनपुढे श्रीमाताजींच्या शक्ति-कार्यामुळे, तुमच्यामध्ये या किंवा यांसारख्या ज्या घडामोडी घडून येतील, जे बदल घडून येतील, त्यांना नकार देण्याची आवश्यकता नाही; फक्त इच्छावासना, अहंकार, अस्वस्थता आणि इतर चुकीच्या घडामोडी या गोष्टींना मात्र नकार दिलाच पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 99)

विश्वामध्ये जे जे काही केले जाते, त्या सर्व कृतींमागे ‘ईश्वर’च स्वत:च्या ‘शक्ति’द्वारे विद्यमान असतो पण तो त्याच्या ‘योगमाये’द्वारे झाकलेला असतो आणि कनिष्ठ प्रकृतीमध्ये तो जे कार्य करतो ते ‘जिवा’च्या अहंकाराद्वारे करत असतो. ‘योगा’मध्येही ‘ईश्वर’ हाच ‘साधक’ आणि ‘साधना’ही असतो; त्याचीच ‘शक्ती’ तिच्या प्रकाश, सामर्थ्य, ज्ञान, चेतना आणि ‘आनंद’ यांच्या साहाय्याने आधारावर (मन, प्राण, शरीर यांवर) कार्य करते आणि जेव्हा आधार त्या शक्तिप्रत उन्मुख होतो, तेव्हा या सर्व दिव्य शक्ती त्या आधारामध्ये ओतल्या जातात आणि त्यामुळे ‘साधना’ शक्य होते. परंतु जोपर्यंत कनिष्ठ प्रकृती सक्रिय असते, तोपर्यंत ‘साधका’च्या वैयक्तिक प्रयत्नांची आवश्यकता असतेच. हा आवश्यक असलेला वैयक्तिक प्रयत्न म्हणजे अभीप्सा, नकार आणि समर्पण अशी त्रिविध तपस्या होय.

– श्रीअरविंद [CWSA 32 : 06]

साधनेची मुळाक्षरे – ०८

विश्वामध्ये जे जे काही केले जाते, त्या सर्व कृतींमागे ‘ईश्वर’च त्याच्या ‘शक्ति’द्वारा विद्यमान असतो पण तो त्याच्या ‘योगमाये’ने झाकला गेलेला असतो आणि कनिष्ठ प्रकृतीमध्ये तो जे कार्य करतो ते ‘जिवा’च्या अहंकाराद्वारा करत असतो.

‘योगा’मध्ये ‘ईश्वर’ हाच ‘साधक’ आणि ‘साधना’देखील असतो; त्याचीच ‘शक्ती’ स्वतःच्या प्रकाश, सामर्थ्य, ज्ञान, चेतना आणि ‘आनंद’ यांच्या साहाय्याने आधारावर (मन, प्राण, शरीर यांच्यावर) कार्य करते आणि जेव्हा आधार त्या शक्तिप्रत उन्मुख होतो, तेव्हा या सर्व दिव्य शक्ती त्या आधारामध्ये ओतल्या जातात आणि त्यामुळे ‘साधना’ शक्य होते. परंतु जोपर्यंत कनिष्ठ प्रकृती सक्रिय असते, तोपर्यंत ‘साधका’च्या व्यक्तिगत प्रयत्नांची आवश्यकता असतेच.

हा आवश्यक असलेला व्यक्तिगत प्रयत्न म्हणजे अभीप्सा, त्याग आणि समर्पण अशी त्रिविध तपस्या होय.

अभीप्सा जागरुक, निरंतर आणि अविरत असली पाहिजे – मनामध्ये तोच संकल्प, अंत:करणात तोच ध्यास, प्राणतत्त्वाची त्यालाच संमती, भौतिक-शारीरिक चेतना व प्रकृती ग्रहणक्षम आणि लवचीक करण्याची तीव्र इच्छा अशा स्वरूपाची अभीप्सा पाहिजे.

कनिष्ठ प्रकृतीच्या सर्व गतिवृत्तींना नकार – मनाच्या कल्पना, मते, आवडीनिवडी, सवयी आणि रचना यांना नकार, की ज्यामुळे निश्चल-नीरव मनामध्ये खऱ्या ज्ञानाला पूर्ण मोकळी जागा मिळेल, – प्राणिक प्रकृतीच्या वासना, मागण्या, लालसा, संवेदना, आवेग, स्वार्थीपणा, गर्व, उद्धटपणा, कामुकता, लोभ, मत्सर, हेवेदावे, ‘सत्या’शी वैर यांचा त्याग, की ज्यामुळे निश्चल, विशाल, समर्थ आणि समर्पित अशा प्राणमय अस्तित्वामध्ये वरून खरी शक्ती आणि आनंद यांचा वर्षाव होईल – भौतिक-शारीरिक प्रकृतीची मूढता, संशय, अविश्वास, दिङ्मूढता, दुराग्रह, क्षुद्रता, आळस, परिवर्तन-विमुखता, तामसिकता यांचा त्याग, की ज्यामुळे सतत अधिकाधिक दिव्य होत जाणाऱ्या देहात प्रकाश, शक्ती आणि ‘आनंद’ यांचे खरे स्थैर्य प्रस्थापित होईल.

‘ईश्वर’ आणि त्याची ‘शक्ती’ यांना आपण आपल्या स्वत:चे, आपण जे काही आहोत आणि आपल्याजवळ जे काही आहे त्या सर्वाचे, चेतनेच्या प्रत्येक स्तराचे आणि आपल्या प्रत्येक स्पंदनाचे समर्पण केले पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 06)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ३१

नकार
(श्रीअरविंदांनी साधकांना लिहिलेल्या पत्रांमधून…)

मी ज्या योग्य स्पंदनांविषयी म्हाणालो ती स्पंदने एकतर अंतरात्म्याकडून किंवा वर असणाऱ्या आध्यात्मिक प्रांतामधून आलेली असतात अथवा अंतरात्म्याच्या किंवा आध्यात्मिक प्रभावाने मनामध्ये किंवा प्राणामध्ये (vital) आकाराला येतात. एखादी व्यक्ती प्रामाणिकपणे अभीप्सा बाळगेल आणि जे त्याज्य आहे त्यास शक्य असेल तितका नकार देईल, तर तेव्हा आंतरात्मिक आणि आध्यात्मिक प्रभाव अधिकाधिक कार्य करेल, अधिकाधिक खरा सद्सदविवेक आणेल, योग्य स्पंदनांची निर्मिती करेल, त्यांना प्रोत्साहन देईल, त्यांना आधार देईल आणि चुकीची स्पंदने शोधून, त्यांना हतोत्साहित करेल आणि ती वगळेल. श्रीमाताजी आणि मी हीच पद्धत सर्वांना सांगत असतो.

*

इच्छांचा विलय म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे, हे मला समजले नाही. इच्छांना व्यक्तित्वातून बाहेर काढून टाकणे, नकार देणे, हे या योगाचे एक तत्त्व आहे. जी गोष्ट मनामधून नाकारण्यात येते ती बरेचदा प्राणामध्ये जाते, प्राणाने नाकारलेली गोष्ट ही शारीरिक स्तरावर जाऊन पोहोचते आणि शरीराने नाकारलेली गोष्ट ही अवचेतनामध्ये (subconscient) जाते, हे खरे आहे. अवचेतनातून हद्दपार केलेली गोष्ट ही तरीही वातावरणातील चेतनेमध्ये रेंगाळत राहण्याची शक्यता असते – तेथे तिचा व्यक्तीवर कोणताही ताबा नसतो आणि त्यामुळे ती समूळ काढून टाकणे शक्य असते.

*

प्रत्येक गोष्ट बाहेरून, म्हणजे वैश्विक प्रकृतीमधून येत असते, हे सर्वज्ञात वास्तव आहे. परंतु येणारी प्रत्येक गोष्ट स्वीकारलीच पाहिजे असे कोणतेही बंधन व्यक्तीवर असत नाही, व्यक्ती ती गोष्ट स्वीकारू शकते किंवा नाकारू शकते. भूतकाळामध्ये स्वीकाराची एक चिवट सवय जडलेली असेल तर, एकदम नकार द्यायला जमेल असे नाही, पण जर नकार देण्यामध्ये स्थिरपणे सातत्य राखले तर सरतेशेवटी व्यक्ती त्यात यशस्वी होईल. तुम्ही काय केले पाहिजे तर, कनिष्ठ अनुभवांना नकार दिला पाहिजे आणि आपले लक्ष एकमेव आवश्यक गोष्टीवर, म्हणजे… ‘प्रकाश’, ‘स्थिरता’, ‘शांती’, ‘भक्ती’ यांवर केंद्रित केले पाहिजे, त्याबाबत स्थिर अभीप्सा बाळगली पाहिजे. तुम्ही कनिष्ठ प्राणिक अनुभवांमध्ये रुची घेता आणि त्यांचे निरीक्षण करत राहता, त्यांच्याविषयी विचार करत राहता म्हणून त्या गोष्टी तुमचा ताबा घेतात आणि त्यामुळेच ईश्वराशी असलेला ‘संपर्क’ सुटतो आणि गोंधळ निर्माण होतो. तुम्ही या आधीही अशा प्रकारचे बरेच अनुभव घेतलेले आहेत आणि आता जेव्हा ते येतील तेव्हा त्यांना दृढपणे नकार देण्यासाठी तुम्ही तुमच्या मनाची तयारी केली पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 64-65)