Posts

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०९

(महत्त्वाकांक्षा आणि अप्रामाणिकपणा या धोक्यांचा विचार आपण काल केला, आता आणखी एक धोका विचारात घेऊ.)

आणखी एक धोका असतो. तो धोका लैंगिक आवेगांबाबत असतो. शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमध्ये योग तुम्हाला अगदी उघडावागडा करतो आणि तुमच्यामध्ये सुप्त असलेले सारे आवेग आणि इच्छावासना बाहेर काढतो. कोणत्याही गोष्टी लपवायच्या नाहीत किंवा तशाच बाजूला सोडून द्यायच्या नाहीत हे तुम्ही शिकायला हवे. तुम्ही त्यांना सामोरे गेले पाहिजे आणि जिंकले पाहिजे आणि त्यांची पुनर्घडण केली पाहिजे.

योगाचा पहिला परिणाम असा होतो की, मानसिक नियंत्रण सुटते आणि सुप्तपणे पडून असलेल्या साऱ्या वासना अचानकपणे मोकाट सुटतात आणि त्या वर उफाळून येतात आणि व्यक्तीच्या संपूर्ण अस्तित्वावर त्या आक्रमण करतात. जोपर्यंत मानसिक नियंत्रणाची जागा ईश्वरी नियंत्रणाने घेतली जात नाही तोपर्यंत एक संक्रमणकाळ असतो की, जेव्हा तुमची प्रामाणिकता आणि तुमचे समर्पण यांचा कस लागतो. लोक लैंगिक आवेगासारख्या आवेगांची खूप जास्त प्रमाणात दखल घेतात आणि सहसा त्यामुळेच या आवेगांना बळ मिळते. लोक त्या आवेगांचा खूप जोरदार प्रतिकार करतात आणि जबरदस्तीने त्यांच्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करतात, त्यांना दाबून ठेवतात. पण तुम्ही एखाद्या गोष्टीचा जेवढा जास्त विचार कराल आणि म्हणाल, ”मला ही गोष्ट नको आहे, मला ही गोष्ट नको आहे,” तेवढ्या अधिक प्रमाणात तुम्ही त्याने बांधले जाता. तुम्ही काय केले पाहिजे ? तर ती गोष्ट शक्यतो तुमच्यापासून दूर ठेवा, तुमचा त्या गोष्टीशी असलेला संबंध तोडा, तिची शक्य तेवढी कमीत कमी दखल घ्या आणि जरी तुमच्या मनात त्या गोष्टीचा विचार आलाच तरीही नि:संग राहा आणि त्यांच्याबाबत निश्चिंत राहा.

योगाच्या दबावामुळे जे आवेग आणि इच्छावासना पृष्ठभागावर येतील, त्या जणू काही तुम्हाला परक्या आहेत किंवा त्या बाह्य जगाशी संबंधित आहेत असे समजून, अनासक्त वृत्तीने आणि शांत चित्ताने त्यांना सामोरे जा. त्या ईश्वरार्पण केल्या पाहिजेत म्हणजे मग ईश्वर त्यांना आपल्या हाती घेईल आणि त्यांच्यात रूपांतर घडवून आणेल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 05)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०८

पौर्वात्य लोकांपेक्षा पाश्चिमात्त्य लोकांसाठी योगसाधना अधिक धोकादायक असते असे काही नाही. तुम्ही योगाकडे कोणत्या भावनेतून वळता यावर सारे काही अवलंबून असते. जर योगसाधना तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी हवी असेल, स्वतःच्या वैयक्तिक हेतुंच्या पूर्ततेसाठी हवी असेल तर ती धोकादायक बनते. परंतु ईश्वराचा शोध घेणे हे उद्दिष्ट सतत लक्षात ठेवून, एका पवित्र भावनेने तुम्ही जर योगसाधनेकडे वळलात तर, ती धोकादायक तर ठरत नाहीच, उलट ती स्वतःच तुमची एक सुरक्षा, सुरक्षितता बनते.

जेव्हा माणसं ईश्वरासाठी नव्हे तर, शक्ती संपादन करून, योगाच्या पडद्याआडून स्वतःच्या आकांक्षा भागवू इच्छितात तेव्हा योगसाधनेमध्ये अडचणी आणि धोके निर्माण होतात. जर तुम्ही महत्त्वाकांक्षेपासून स्वतःची सुटका करून घेऊ शकत नसाल तर योगसाधनेला स्पर्शदेखील करू नका. मग ती आग आहे, ती सारे काही भस्मसात करून टाकेल.

… तुम्ही जर समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे आचरणात आणलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर समस्या निर्माण होणार नाही. प्रश्न असतो फक्त प्रामाणिकपणाचा! जर तुम्ही प्रामाणिक नसाल तर योगसाधनेला सुरुवातच करू नका. मानवी व्यवहार करत असताना तुम्ही फसवणूक केलीत तर त्यात यशस्वी होण्याची थोडीफार तरी शक्यता असू शकते पण ईश्वरासोबत मात्र फसवणुकीला यत्किंचितही थारा असू शकत नाही. जर तुम्ही विनम्र असाल आणि तुमचा गाभा खुला असेल आणि जर तुमचे साध्य ईश्वराचा साक्षात्कार आणि त्याची प्राप्ती हेच असेल आणि तोच आपला ‘चालविता धनी’ व्हावा हे जर तुमचे साध्य असेल तर तुम्ही या मार्गावरून सुरक्षितपणे जाऊ शकता.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 04-05)