बहुधा कोणतेही दोन मार्ग अगदी एकसारखेच असत नाहीत, प्रत्येकाने स्वत:चा मार्ग स्वत:च शोधावयास हवा. पण याचा अर्थ असा नव्हे की, तो मार्ग बुद्धीने ‘शोधायचा’, तो मार्ग अभीप्सेच्या (aspiration) आधारे ‘शोधावयास’ हवा; विश्लेषण आणि अभ्यास याद्वारे नव्हे तर अभीप्सेची तीव्रता आणि आंतरिक उन्मुखतेबद्दलची निष्ठा यांच्या माध्यमातून शोधावयास हवा.
जेव्हा व्यक्ती खरोखर आणि पूर्णपणे त्या आध्यात्मिक सत्यालाच अभिमुख झालेली असते, मग त्याला नाव कोणतेही दिलेले असू देत, बाकी सर्व गोष्टी तिच्या दृष्टीने गौण ठरतात; जेव्हा ते आध्यात्मिक सत्यच तिच्या लेखी अपरिहार्य आणि अटळ गोष्ट बनते, तेव्हा त्याकडून उत्तर मिळण्यासाठी, त्याकडून प्रतिसाद मिळण्यासाठी तीव्र व संपूर्ण एकाग्रतेचा केवळ एक क्षणदेखील पुरेसा असतो.
अशा उदाहरणामध्ये अनुभव आधी येतो, त्याचा परिणाम आणि स्मृती म्हणून त्या अनुभवाची मांडणी नंतर स्पष्ट बनते. त्यामुळे व्यक्तीला खात्री असते की, कोणतीही चूक घडणार नाही. ही मांडणी कमी-अधिक यथार्थ असू शकते, पण त्याला तितकेसे महत्त्व नाही; जोपर्यंत व्यक्ती त्याचा सिद्धांत बनवीत नाही तोपर्यंत काही अडचण नाही.
ती मांडणी तुमच्यासाठी चांगली आहे, हेच केवळ महत्त्वाचे आहे. ती कशीही असू दे, अगदी ती स्वयंपूर्ण असली तरीदेखील जेव्हा तुम्ही ती इतरांवर लादू पाहता तेव्हाच ती मिथ्या बनते.
यामुळेच धर्मांची नेहमी गल्लत होते – अगदी नेहमीच – कारण धर्म त्या अनुभवांच्या अभिव्यक्तीचे प्रमाणीकरण करू पाहतात आणि तेच निर्विवाद सत्य असल्याचे मानून प्रत्येकावर लादू पाहतात. ती अनुभूती सत्य होती, ती अनुभूती स्वत:परिपूर्ण होती, ज्याला ती अनुभूती आली होती त्याला ती पटण्यासारखी होती. त्या अनुभूतीची जी मांडणी त्याने केली होती ती उत्कृष्ट होती – पण ती फक्त त्याच्यापुरती. पण सिद्धान्तरूपाने ती इतरांवर लादू पाहणे ही एक मूलभूत चूक असते, ज्याचे अत्यंत भयंकर परिणाम दिसून येतात आणि ते नेहमीच सत्यापासून दूर दूर घेऊन जाणारे असतात.
आणि यामुळेच धर्म, मग ते कितीका चांगले असले तरी, ते कायमच माणसाला अतिहीन अशा टोकांकडे घेऊन गेलेले आहेत. धर्माच्या नावाखाली झालेले गुन्हे, भयानक हिंसाचार ह्या मानवी इतिहासातील काळिमा फासणाऱ्या गोष्टी आहेत. ह्या साऱ्याचे कारण आहे मुळातील एक छोटीशी चूक; ती म्हणजे, जे एका व्यक्तीसाठी सत्य आहे ते समूहासाठी किंवा समाजासाठी सत्य असले पाहिजे असे मानणे.
मार्ग दाखविला पाहिजे, प्रवेशद्वारे खुली केली पाहिजेत पण प्रत्येकाने स्वत:चा मार्ग स्वत:च आक्रमिला पाहिजे, प्रत्येकाने त्या प्रवेशद्वारांमधून जात, स्वत:च्या वैयक्तिक साक्षात्काराच्या दिशेने स्वत:च वाटचाल करावयास हवी. अशा वेळी, केवळ एकच मदत मिळू शकते आणि तीच स्वीकारली पाहिजे. ती मदत असते ईश्वरी कृपेची, ही कृपा, प्रत्येकामध्ये ज्याच्या त्याच्या गरजेनुरूप, स्वत:ची अशी योजना करीत असते.
– श्रीमाताजी
(CWM 09 : 406-407)