भारत हाच जगातील असा एकमेव देश आहे…
श्रीअरविंदांच्या जन्मापूर्वी, धर्म आणि आध्यात्मिकता या गोष्टी भूतकाळातील व्यक्तींभोवती केंद्रित झालेल्या होत्या. आणि त्या व्यक्ती ‘पृथ्वीवरील जीवनाला नकार हे (जीवनाचे) उद्दिष्ट’ असले पाहिजे असे सांगत असत. तेव्हा त्याकाळी तुमच्यापुढे दोन पर्याय ठेवले जात :
किरकोळ आनंद किंवा यातना, सुख किंवा दु:ख यांच्या चक्रामध्ये फिरत राहणारे हे इहलोकातील जीवन जगत असताना जर तुम्ही चुकीचे वर्तन केलेत (तुमच्याकडून पापाचरण घडले) तर तुम्हाला नरकाची भीती दाखविली जात असे. हा पहिला पर्याय असे.
दुसरा पर्याय म्हणजे, ऐहिक जीवनाचा त्याग करून स्वर्ग, निर्वाण, मोक्ष इत्यादी गोष्टींच्या प्राप्तीसाठी कोणत्यातरी दुसऱ्याच जगामध्ये पलायन करायचे.
तुम्हाला या दोन्हीपैकी एका पर्यायाची निवड करावी लागत असे, खरंतर त्यामध्ये निवड करण्यासारखे काहीच नसे कारण दोन्ही पर्याय एकसारखेच अयोग्य, सदोष आहेत.
श्रीअरविंदांनी आपल्याला असे सांगितले आहे की, अशा प्रकारचा विचार करणे हीच मूलभूत चूक होती; कारण त्यातूनच भारताची अवनती घडून आली आणि या गोष्टीच भारताच्या दुर्बलतेला कारणीभूत झाल्या…
मात्र, हेही तितकेच खरे आहे की, भारत हाच जगातील असा एकमेव देश आहे की, ज्याला आजही, जडभौतिकाच्या पलीकडेही काही असते याची जाणीव आहे. युरोप, अमेरिका आणि इतर देशांना याचा विसर पडलेला आहे. आणि म्हणूनच जतन करण्यायोग्य आणि विश्वाला देण्यायोग्य एक संदेश आजही भारताकडे आहे.
श्रीअरविंदांनी आम्हाला हे दाखवून दिले की, या भौतिक जीवनापासून पळ काढण्यामध्ये सत्य सामावलेले नाही; तर या भौतिक जीवनात राहूनच, त्याचे रूपांतरण करायचे आहे. या भौतिक जीवनाचे रूपांतरण ‘दिव्यत्वा’मध्ये केल्यामुळे, ‘ईश्वर’ या ‘इथे’च, या ‘जडभौतिक विश्वा’मध्ये आविष्कृत होऊ शकेल.
– श्रीमाताजी (CWM 12 : 210-211)