Posts

तुम्ही जर योगसाधना करत असाल तर, तुम्ही दुर्बलता, नीचता, इच्छाशक्तीचा अभाव या गोष्टींना अनुमती देता कामा नये. कारण तसे करणे याचा अर्थ ‘ज्ञान झाले पण त्यापाठोपाठ सक्षमता आली नाही’ असा होतो. एखादी गोष्ट असता कामा नये याची जाणीव होणे आणि तरीदेखील ती तशीच चालू ठेवणे हे दुर्बलतेचे लक्षण आहे; अशा दुर्बलतेस कोणत्याही गंभीर तपस्येमध्ये थारा दिला जात नाही. अशा संकल्पशक्तीचा अभाव हा व्यक्तीला अप्रामाणिकतेच्या उंबरठ्यावर आणून सोडतो. तुम्हाला कळते की अमुक एक गोष्ट असता कामा नये, तुम्हाला हे ज्या क्षणी कळते, तेव्हा ती गोष्ट शिल्लक राहता कामा नये, हे ठरविणारे तुम्हीच असता. कारण ज्ञान आणि क्षमता, शक्ती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

म्हणजे असे म्हणता येईल, तुमच्या अस्तित्वाच्या कोणत्याही भागात तुम्ही तुमच्या प्रगतीच्या मध्यवर्ती संकल्पशक्तीला विरोधी असणाऱ्या, वाईट इच्छेच्या छायेला थारा देता कामा नये; कारण तसे केल्याने ज्या अनिष्टाचा तुम्ही नायनाट केला पाहिजे त्याच अनिष्टासमोर तुम्ही पौरुषहीन, दुबळे, धैर्यहीन आणि सामर्थ्यहीन ठरता. अज्ञानातून घडलेले पाप हे पाप नसते; तो या जगतातील सर्वसाधारण अशा अनिष्टाचा एक भाग असतो; पण (अमुक एखादी गोष्ट करणे योग्य नाही हे) माहीत असूनदेखील, तुम्ही जेव्हा पाप करता तेव्हा ते अधिक गंभीर असते.

याचा अर्थ असा की, फळामध्ये ज्याप्रमाणे एखादी अळी दडून बसलेली असते तसा दुरिच्छेचा एखादा घटक तुमच्यामध्ये दडून बसलेला आहे, कसेही करून, त्याला शोधून नष्टच केले पाहिजे, कारण बरेचदा अशा वेळी चालवून दिलेली दुर्बलता ही पुढे जाऊन, कधीच सुधारता न येणाऱ्या अडचणींचे कारण ठरते.

– श्रीमाताजी (CWM 03 : 221)

तुम्ही झटून प्रयत्न केले पाहिजेत, तुम्ही तुमच्या सर्व दुर्बलता आणि मर्यादा यांवर मात करण्यासाठी धडपडले पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे “आता तुझी सद्दी संपली आहे,” असे तुम्ही तुमच्या अहंकाराला सांगितले पाहिजे.

आपल्याला आता एक असा वंश हवा आहे की ज्या वंशातील लोकांना अहंकार नसेल, आणि अहंकाराची जागा ‘दिव्य चेतने’ने घेतलेली असेल. आपल्याला अशी ‘दिव्य चेतना’ हवी आहे की, जिच्यामुळे तो वंश स्वतःहूनच विकसित होईल आणि त्यामधून अतिमानसिक जीव जन्माला येईल.

– श्रीमाताजी [CWM 11 : 307]

माझे असे मत आहे की, पराधीनता किंवा दारिद्रय किंवा धर्माचा व आध्यात्मिकतेचा अभाव हे भारताच्या दुर्बलतेचे मुख्य कारण नाही; तर ‘ज्ञानाच्या या जन्मभूमी’मध्येच अज्ञानाचा फैलाव आणि विचारशक्तीचा ऱ्हास हेच भारताच्या दुर्बलतेचे मुख्य कारण आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 09 : 369)

व्यक्ती जर दुर्बल नसेल तर ती कधीच हिंसक होणार नाही. दुर्बलता आणि हिंसा या दोन गोष्टी हातात हात घालून जातात. आपण हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की, जो माणूस खरोखर बलवान असतो तो कधीही हिंसक नसतो. हिंसा ही नेहमीच कोठेतरी दुर्बलता असल्याचे लक्षण असते. एखादा पीळदार स्नायू असणारा दणकट माणूस स्वतःच्या सर्व ताकदीनिशी दुसऱ्या एखाद्या माणसाला ठोसे लगावत असतो, तेव्हा ते पाहिल्यावर आपण मनात म्हणतो की, “तो माणूस किती बलवान आहे.” पण हे खरे नाही. त्याच्याकडे भलेही पीळदार स्नायू असतील पण तो नैतिकदृष्ट्या दुर्बल असतो. त्यामुळे तो येथे बलवान तर दुसरीकडे दुर्बल असू शकतो. आणि बहुधा हे असेच घडते.

…क्षोभ, हिंसा, क्रोध या गोष्टी नेहमीच निरपवादपणे दुर्बलतेच्या द्योतक असतात. आणि विशेषतः व्यक्ती जेव्हा त्या भरात वाहवत जाऊन, नको नको ते बोलते, तेव्हा ते खरोखरच भयानक मानसिक दुर्बलतेचे – मानसिक आणि प्राणिक (mental and vital) दुर्बलतेचे लक्षण असते – भयानक दुर्बलतेचे लक्षण असते. तुम्ही असे असाल तर, कदाचित या जगातील सगळे अपमान तुम्हाला ऐकावे लागतील, लोक तुम्हाला शक्य तेवढ्या मूर्खपणाच्या सगळ्या गोष्टी सांगत राहतील; मात्र तुम्ही जर कमकुवत नसाल तर, त्याकडे बघून बाह्यतः तुम्ही हसणारही नाही कदाचित, कारण हसणे ही काही प्रत्येक वेळीच चांगली गोष्ट असते असे नाही, पण खोलवर, आत तुम्ही हसत असता आणि ती गोष्ट तशीच जाऊ देता, ती गोष्ट तुम्हाला स्पर्श करत नाही… साधी गोष्ट आहे, तुम्ही जर तुमच्या मनाला शांत राहण्याची सवय लावून घेतली असेल आणि तुम्हाला जर का तुमच्या अंतरंगात असलेल्या सत्याची जाणीव असेल तर, तुम्ही काहीही ऐकून घेऊ शकता (आणि तरीही त्याचा तुमच्यावर काहीही परिणाम होत नाही.) एखादा हलकासा तरंगदेखील उमटत नाही; सारे काही अगदी अचल, शांत, स्थिर असते. आणि आपण मगाशी बोललो तसे, आपल्यामध्ये असणारा साक्षी जर या साऱ्या हास्यास्पद गोष्टींकडे पाहत असेल, तर तो त्याकडे पाहून नक्कीच हसतो.

पण दुसऱ्या व्यक्तीने स्वत:चा सारा राग, स्वत:चा उद्रेक तुमच्यावर काढला असेल तेव्हा जर, तुमच्यामध्येही तुम्हाला काही तरंग जाणवले तर… (सुरुवातीला कधीकधी होते असे…) अचानकपणे तुम्ही त्यावर प्रतिक्रिया देता, आणि तुम्हीही त्याच्यासारखेच चिडता, रागावता; तेव्हा निश्चितपणे असे समजा की, तुम्हीसुद्धा त्याच्या इतकेच कमकुवत आहात.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 372-373)

पूर्णयोग आणि बौद्धमत – १२

धम्मपद : आपण अशा साधुपुरुषाच्या सहवासाची इच्छा बाळगली पाहिजे की जो आपल्याला आपले दोष दाखवून देतो. तो जणू काही आपला गुप्त खजिनाच आपल्याला दाखवून देतो. अशा व्यक्तीबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करावयास हवेत, कारण तो आपल्याला कोणतीही इजा पोहोचवित नाही. तो आपल्यासाठी हितकारकच ठरेल.

श्रीमाताजी : मानवीप्रगतीसाठी उपयुक्त असणाऱ्या सर्वच धर्मग्रंथांमध्ये नेहमीच असे सांगितलेले आढळते की, जो तुम्हाला तुमचे दोष दाखवून देतो त्याविषयी तुम्ही कृतज्ञ असले पाहिजे आणि त्याच्या सहवासाची इच्छा बाळगली पाहिजे, पण येथे तीच गोष्ट मोठ्या समर्पकपणे सांगितलेली आहे : एखादा दोष तुम्हाला दाखविण्यात आला तर जणू काही तुम्हाला खजिनाच दाखविण्यात आला आहे असे समजा. म्हणजेच ह्याचा अर्थ असा की, जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्यामध्ये एखादा दोष, अक्षमता, आकलनक्षमतेचा अभाव, दुर्बलता, अप्रामाणिकता, तुम्हाला प्रगतीपासून रोखणारे असे जे काही सापडेल तेव्हा ते म्हणजे जणू काही तुम्हाला अद्भुत खजिनाच लाभल्यासारखे वाटेल.

“अरे देवा, अजून एक दोष !” असे म्हणत न बसता व त्याविषयी खंत बाळगत न बसता उलट तुम्हाला जणूकाही एखादी अद्भुत उपलब्धी झाली असल्याप्रमाणे आनंद झाला पाहिजे. कारण जी गोष्ट तुम्हाला प्रगत होण्यापासून रोखत होती ती गोष्ट आता तुमच्या पकडीत आली आहे. आणि एकदा का तुमच्या ती गोष्ट पकडीत आली की तिला खेचून बाहेर काढा. कारण असे मानले जाते की जो योगसाधना करतो, त्याला ज्या क्षणी अमुक एक गोष्ट करण्याजोगी नाही असे समजते, त्याच क्षणी ती दूर सारणे, बाद करणे आणि नष्ट करणे ही शक्ती त्याच्या ठायी असते.

दोषाचा शोध लागणे ही एक प्राप्ती आहे, उपलब्धी आहे. जणू काही आत्ताच बाहेर घालवून दिलेल्या धूसतेच्या छोट्या कणाची जागा घेण्यासाठी प्रकाशाचा पूर आत शिरला आहे.

जर तुम्ही योगसाधना करीत असाल, तर तुम्ही दुर्बलता, नीचता, इच्छाशक्तिचा अभाव, ज्ञानापाठोपाठ सामर्थ्य न येणे, ह्या बाबींचा स्वीकार करता कामा नये. एखादी गोष्ट असता कामा नये ह्याची जाणीव होणे आणि तरी ती तशीच चालू ठेवणे हे दुर्बलतेचे लक्षण आहे; ही दुर्बलता कोणत्याही गंभीर अशा योगसाधनेत स्वीकारली जात नाही; अशा संकल्पशक्तिचा अभाव हा व्यक्तीला अप्रामाणिकतेच्या उंबरठ्यावर आणून सोडतो. तुम्हाला कळते की, अमुक एक गोष्ट असता कामा नये, तुम्हाला हे ज्या क्षणी कळते, तेव्हा ती गोष्ट राहता कामा नये, हे ठरविणारे तुम्हीच असता. कारण ज्ञान आणि सामर्थ्य ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे असे म्हणता येईल, तुमच्या अस्तित्वाच्या कोणत्याही भागात तुम्ही तुमच्या प्रगतीच्या मध्यवर्ती संकल्पशक्तिला विरोधी असणाऱ्या, वाईट इच्छेच्या छायेला थारा देता कामा नये; कारण तसे केल्याने ज्या अनिष्टाचा तुम्ही नायनाट केला पाहिजे त्याच अनिष्टासमोर तुमची प्रगतीची संकल्पशक्ती पौरुषहीन, दुबळी, धैर्यहीन, सामर्थ्यहीन ठरते.

अज्ञानातून घडलेले पाप हे पाप नसते; तो या जगतातील सर्वसाधारण अशा अनिष्टाचा एक भाग असतो; पण तुम्हाला माहीत असूनदेखील तुम्ही जेव्हा पाप करता तेव्हा ते अधिक गंभीर असते. ह्याचा अर्थ असा की, फळामध्ये ज्याप्रमाणे एखादा कृमी दडून बसलेला असतो तसा दुरिच्छेचा एखादा घटक तुमच्यामध्ये दडून बसलेला आहे, ज्याला शोधून कोणत्याही परिस्थितीत नष्ट केले पाहिजे, कारण बरेचदा अशा वेळी दाखविलेली दुर्बलता ही पुढे जाऊन कधीच दुरुस्त न होऊ शकणाऱ्या अडचणींचे कारण बनते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 221)

विचलित न होणे, स्थिर आणि सश्रद्ध असणे हा खचितच योग्य दृष्टिकोन आहे. परंतु त्याचबरोबर, श्रीमाताजी आपले जे संगोपन करत असतात त्यापासून कोणत्याही कारणास्तव विन्मुख न राहणे आणि श्रीमाताजींकडून मिळणाऱ्या साहाय्याचा स्वीकार करणे हे देखील तितकेच आवश्यक आहे. व्यक्तीने स्वत:ची अक्षमता, प्रतिसाद देण्याची अक्षमता यांविषयीच्या कल्पनांमध्ये गुंतून राहणे; स्वतःचे दोष, अपयश ह्या गोष्टी अती उगाळत राहणे आणि त्याबद्दल दुःखीकष्टी होत राहण्यास किंवा त्याविषयी लाज बाळगत राहायला मनाला संमती देणे, या गोष्टी करता कामा नयेत; कारण या सर्व कल्पना, भावना ह्या गोष्टी अंततः व्यक्तीला दुर्बल बनविण्यास कारणीभूत ठरतात.

दुःखसंकटे आली, अपयश आले, ठोकरा खाव्या लागल्या तर, अशा प्रत्येक वेळी व्यक्तीने अविचल राहून त्यांकडे पाहावयास हवे आणि त्यांचा निरास व्हावा म्हणून समचित्ततेने आणि सातत्याने ईश्वरी साहाय्यासाठी धावा करावयास हवा. परंतु उदास होणे, व्यथित होणे वा नाउमेद होणे, ह्या गोष्टींना कधीच थारा देता कामा नये.

योग हा काही सोपा मार्ग नाही आणि प्रकृतीमध्ये पूर्ण परिवर्तन ही काही एका दिवसात घडून येणारी गोष्ट नाही.

-श्रीअरविंद
(CWSA 32 : 294)

(‘जीवनाचे शास्त्र’ या लेखमालिकेमध्ये श्रीमाताजींचे एक वचन असे आहे की – “प्राणतत्त्वाचे सहकार्य मिळाले तर, कोणताच साक्षात्कार अशक्य नाही आणि कोणतेच रूपांतरण अव्यवहार्य नाही.” या विधानाचे अधिक स्पष्टीकरण करताना त्या म्हणतात.)

प्राणतत्त्वाला स्वत:च्या शक्तीची चांगली जाणीव असते; आणि म्हणूनच प्राणाला महत्त्व आहे. त्याच्या ठिकाणी प्रचंड कार्यशक्ती असल्याने कोणतीच अडचण ओलांडणे त्याला कठीण नसते; पण त्याने योग्य गोष्टीला साथ द्यावयास हवी. त्याने सहकार्य केले तर सर्वकाही अद्भुत रीतीने घडून येईल. पण त्याच्याकडून असे सहकार्य सतत मिळणे हे काही तितकेसे सोपे नाही.

प्राण हा एक चांगला कार्यकर्ता आहे; तो अत्यंत चांगल्या रीतीने कर्म करणारा आहे. पण कर्म करत असताना स्वत:चे समाधान मिळविण्यासाठी तो नेहमी धडपडत राहतो. कर्मामधून त्याला काहीतरी हवे असते, कर्मातला सर्व आनंद त्याला हवा असतो, सर्व फायदा त्यालाच पाहिजे असतो; आणि जेव्हा या ना त्या कारणाने (कारण अशी कारणे अनेक असू शकतात) हे समाधान त्याला मिळू शकले नाही तर तो दु:खी होतो, त्याचे सुख अजिबात नाहीसे होऊन जाते : ”हे बरोबर नाही; मी कर्म करतो आणि त्याच्या मोबदल्यात मला काहीच मिळत नाही?” असे म्हणून तो खट्टू होतो. तो जागचा हलत नाही, तो ढिम्म बनतो, काहीच बोलत नाही आणि कधी कधी तर तो असेही म्हणतो, ”म्हणजे मी कोणीच नव्हे, मला अस्तित्वच नाही.” तेव्हा तुमच्या शरीरातून सर्व त्राण निघून जातात, तुम्हाला अतोनात थकवा वाटतो, तुम्हाला गळून गेल्यासारखे वाटते आणि तुम्ही काहीही करू शकत नाही.

आणि एकाएकी ही परिस्थिती अधिकच बिकट होते कारण, मी तुम्हाला हे सांगितलेच पाहिजे की, मनाचे ह्या प्राणतत्त्वाशी बरेच सख्य असते; तर्कसंगत विचार करणाऱ्या मनाची नव्हे तर, भौतिक मनाची ह्या प्राणतत्त्वाशी अगदी घनिष्ठ मैत्री असते. त्यामुळे जेव्हा प्राणतत्त्व म्हणू लागते, “मला अमुक तमुकशी काही कर्तव्य नाही; मला नीट वागणूक मिळालेली नाही, मला त्याच्याशी काहीही संबंध नको आहे,” त्यावेळी साहजिकच हे भौतिक मन प्राणाला पुष्टी देण्यासाठी, त्याचे समर्थन करण्यासाठी, त्याला सबळ कारणे पुरविण्यासाठी पुढे सरसावते, आणि मग पुन्हा एकदा तीच रडकथा सुरु होते :

प्राणतत्त्व म्हणू लागते, “जीवनात काही अर्थ नाही; खरेच मला या लोकांचा अगदी वीट आला आहे. सर्वच परिस्थिती माझ्यावर उलटलेली दिसते. आता येथून निघून गेलेलेच बरे.” इ. इ.. असे नेहमी नेहमी घडून येते; पण कधी तरी, कुठेतरी बुद्धीचा प्रकाश दिसतो आणि ती म्हणते, “पुरे झाले आता हे सगळे नाटक.”

पण जर का हे प्रकरण फारच बळावले आणि तुम्ही वेळीच प्रतिकार केला नाहीत तर, तुम्ही निराशेला बळी पडता आणि म्हणू लागता, ”खरेतर हे जीवन माझ्यासारख्यांसाठी बनविलेलेच नाही. मी स्वर्गामध्ये खरा सुखी होईन. तेथे सर्वजण चांगले वागणारे असतील आणि मला जे काय पाहिजे ते तेथे मला करता येईल.” अशा रीतीने या स्वर्गकल्पना जन्म पावलेल्या असतात.

मला खरोखरीच वाटते की, मन आणि प्राणतत्त्व या दोघांनी मिळून संगनमताने ही स्वर्गकल्पना शोधून काढलेली आहे. कारण, जेव्हा तुमचे जीवन आणि तुमचे अस्तित्व तुमच्या इच्छावासनांशी मिळतेजुळते नसते तेव्हा, तुम्ही शोक करू लागता आणि म्हणता, ”पुरे झाले आता हे जीवन. हे जीवन दुःखमय आहे, फसवे आहे. मला मरण हवे आहे.” त्यानंतर असा क्षण येतो की, जेव्हा परिस्थिती अधिकच गंभीर, बिकट बनते. निराशा बंडखोरीमध्ये पालटते आणि विषण्णता ही असंतोषाचे रूप धारण करते.

मी याठिकाणी वाईट वृत्तीच्या व्यक्तींविषयी बोलत आहे. ….ही वाईट प्रवृत्तीची माणसे संतापतात, चिडतात, त्यांना सर्वकाही मोडून तोडून, खाली खेचून जमीनदोस्त करायचे असते : “आता तुम्ही पाहाच, मला जसे पाहिजे तसे जे वागत नाहीयेत, ते त्याबद्दल शिक्षा भोगतील,” असे ते म्हणू लागतात. आणि तेव्हा मग परिस्थिती अधिकच गंभीर, बिकट बनते; कारण त्याला साथ द्यायला हे भौतिक मन तेथे तयारच असते. मग काय, हे मन सूड उगविण्याच्या नाना अद्भुत कल्पना सुचवू लागते. निराशेच्या भरात तुम्ही एक मूर्खपणा करता आणि या सूडभावनेतून अजून एक!

निराशेच्या भरात तुम्ही केलेल्या मूर्खपणाच्या कृतींचा व्यक्तिश: तुमच्याशी संबंध असतो, पण दुष्टपणाने केलेल्या दुष्ट कृतींचा इतरांशीही संबंध असतो. कधीकधी तर ही अविचारी कृत्ये फारच गंभीर स्वरूपाची हानी पोहोचविणारी असतात.

तुमच्यापाशी थोडीशी जरी सदिच्छा असेल तर, जेव्हा अशा रीतीने तुम्ही तीव्र भावनांनी पछाडले जाता, तेव्हा काहीच कृती करायची नाही असे ठरवून तुम्ही स्वत:ला जर सांगितलेत की, “मी मुळीच हलणार नाही, हे वादळ शांत होईपर्यंत मी असाच स्तब्ध राहीन.” तर फारच चांगले; कारण जर तुम्ही तसे केले नाहीत तर, तुमचे कित्येक महिन्यांचे नियमितपणे केलेले परिश्रम काही क्षणात धुळीस मिळतात.

(श्रीमाताजी ‘जीवनाचे शास्त्र’ या लेखमालिकेतील काही भाग वाचतात आणि म्हणतात की, ‘याठिकाणी आता मी तुम्हाला एक दिलासा दिला आहे.” तो भाग असा -)

“ज्यांनी आपल्या चैत्यपुरुषाशी इतका पुरेसा संबंध प्रस्थापित केला आहे की, ज्यामुळे ते अभीप्सा-ज्योती व प्राप्तव्य ध्येयाची जाणीव जितीजागती ठेवू शकतात, त्या लोकांच्या बाबतीत असे आणीबाणीचे कसोटीचे प्रसंग फार काळ टिकत नाहीत. आणि त्यापासून त्यांना फारसा धोकाही पोहोचत नाही. (चैत्यपुरुषाशी संपर्क प्रस्थापित झालेल्या) अशा व्यक्ती, एखाद्या बंडखोर मुलाला एखादी व्यक्ती जशी हाताळते त्याप्रमाणे, ध्येयाविषयीच्या या जाणिवेच्या साहाय्याने, धीराने व चिकाटीने सत्य व प्रकाश दाखवून देऊन, त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करत, आपल्या प्राणाला हाताळू शकतात आणि क्षणभरासाठी झाकोळला गेलेला सद्भाव परत जागृत होतो.

(श्रीमाताजी आता पुढे विवेचन करत आहेत) आणि आता हा अखेरचा दिलासा. जे कोणी अंत:करणाने खरेखुरे सच्चे आहेत, जे खरेखुरे सद्प्रवृत्त आहेत, त्यांच्याबाबतीत मात्र प्राणाचे हे उद्रेक, हे क्षोभ प्रगतीसाठीचे उपयुक्त असे साधन होऊ शकतात. ज्या ज्या वेळी तुम्हावर असा आघात होईल, असे वादळ तुम्हामध्ये उठेल, त्या प्रत्येक वेळी, तुम्ही त्याचे स्वरूप बदलून, त्याचा नवीन प्रगतीसाठी उपयोग करून घेऊ शकाल. ध्येयप्राप्ती साध्य करून देणारे एक पुढचे पाऊल असे त्याला रूप येऊ शकेल.

अगदी नेमकेपणाने सांगायचे तर, जर तुमच्यामध्ये, या आघाताच्या मूळ कारणाकडे म्हणजे तुम्ही जे चुकीचे वागलात, तुम्ही जे चुकीचे विचार केलेत, तुमच्या ज्या चुकीच्या भावना होत्या – त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवून पाहण्यासाठी आवश्यक असणारी खरीखुरी प्रामाणिकता जर तुमच्यापाशी असेल; तुम्ही ती दुर्बलता, ती हिंसा, तुमचा तो पोकळ अभिमान जर तुम्ही पाहू शकाल; (मी एक गोष्ट तुम्हाला सांगायला विसरले की प्राणतत्त्वामध्ये मनापेक्षाही पुष्कळ अधिक मिथ्याभिमान असतो.) आणि या सर्व गोष्टींकडे जर तुम्ही रोखून बघितलेत, अगदी जणू डोळ्यात डोळे घालून रोखून पाहिलेत आणि अगदी प्रामाणिकपणे, मनापासून जर तुम्ही कबूल केलेत; जर तुम्हाला पटले की, तुमच्या चुकीमुळे, तुमच्या दोषामुळे अमुक एक गोष्ट घडली आहे तर, त्या भागावर तुम्ही जणू जळजळीत निखारा ठेवू शकाल. त्यामुळे तुमची दुर्बलता शुद्ध होईल आणि एका नवीन चेतनेमध्ये तिचे परिवर्तन होईल. मग तुम्हाला कळून येईल, वादळानंतर तुमच्यात बदल झालेला आहे, तुमचा थोडातरी विकास झालेला आहे, तुम्ही खरोखरीच काही प्रगती साधली आहे.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 50-52)