Posts

ईश्वरी कृपा – ११

मनाच्या पलीकडे, ‘ईश्वरी कृपे’वरील श्रद्धाच आपल्याला सर्व अग्निपरीक्षांमधून बाहेर पडण्याचे, आपल्या सर्व दुर्बलतांवर मात करण्याचे सामर्थ्य देते आणि ती श्रद्धाच आपला दिव्य चेतनेशी संपर्क करून देते, ही ‘दिव्य चेतना’ आपल्याला केवळ शांती आणि आनंदच देत नाही तर, शारीरिक संतुलन आणि उत्तम आरोग्यसुद्धा प्रदान करते, ही सारी शिकवण आपल्याला देण्यासाठीच जीवनातील सर्व परिस्थिती घडविण्यात आलेली असते.

– श्रीमाताजी
(CWM 10 : 320)

मी आंतरिक सत्य, प्रकाश, सुमेळ आणि शांती यांचे काहीएक तत्त्व, पृथ्वीचेतनेमध्ये आणू पाहत आहे. मला ते वर दिसत आहे आणि ते काय आहे हे मला माहीत आहे. जाणिवेमध्ये उतरू पाहणारी त्याची तेज:प्रभा मी सातत्याने अनुभवत आहे. आज मानवाची प्रकृती अर्धप्रकाश, अर्धअंधकार अशा दशेत आहे; त्याने त्याच दशेमध्ये राहण्यापेक्षा, मानवाचे समग्र अस्तित्वच, त्या सत्य-तत्त्वाने स्वत:च्या अंगभूत शक्तीमध्ये सामावून घ्यावे, हे त्या सत्य-तत्त्वाला शक्य व्हावे म्हणून मी झटत आहे. या पृथ्वीवरील अंतिम उत्क्रांती असे जिला म्हणता येईल, अशी उत्क्रांती म्हणजे दिव्य चेतनेचा विकास; तो विकास घडून येण्यासाठीचा मार्ग या सत्य-तत्त्वाच्या अवतरणाने खुला होईल, अशी मला खात्री आहे.

-श्रीअरविंद
(CWSA 35 : 281)