साधना, योग आणि रूपांतरण – २५७
प्राणाचे रूपांतरण
एक रणनीती म्हणून प्राणाची उत्क्रांतीमधील सुरुवातच मुळी तर्कबुद्धीच्या आज्ञापालनाने नव्हे तर, भावावेगांना बळी पडण्यातून होते. प्राणाला, ज्या रणनीतीच्या परिघामध्ये त्याच्या इच्छावासना समाविष्ट होतील अशा युक्त्याप्रयुक्त्या असतील फक्त ती रणनीतीच त्याला समजते. त्याला ज्ञानाची आणि प्रज्ञेची वाणी आवडत नाही. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी आहे की, मनुष्याची स्वतःच्या कृतींचे तर्कबुद्धीच्या साहाय्याने समर्थन करण्याची आवश्यकता वाढीस लागली आहे आणि त्यामुळे प्राणिक मनाने खास स्वतःची अशी एक रणनीती तयार केली आहे. स्वतःच्या भावभावना आणि आवेगांचे ज्याद्वारे समर्थन होईल अशा कारणांचा शोध घेण्यासाठी प्राणिक मन (vital mind) त्याची बुद्धी कामास लावते; हीच असते त्याची ती रणनीती.
या खेळामध्ये तर्कबुद्धी विजयी होणार हे जिथे अगदी स्पष्ट असते तेव्हा, प्राण कानच बंद करून घेण्याच्या त्याच्या मूळ सवयीकडे वळतो आणि तो त्याच्या स्वतःच्या मार्गाने जाऊ लागतो. या हल्ल्यामध्ये, तो आपण अपात्र असल्याची सबब पुढे करतो. तो म्हणतो, “तुम्ही माझ्या भावावेगांबाबत संतुष्ट नाही आणि मी तर काही ते बदलू शकत नाही, त्यामुळे मी अपात्र आहे हे दिसून येत आहे तर मी आता निघून जावे हे बरे,” त्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी त्याने अंगीकारलेली ही रणनीती असते.
परंतु या रणनीतीलाही कोणी जर बिनतोड उत्तर दिले तर, प्राणाचा आवेग स्वयमेवच त्या उत्तराला तोंड देण्यास पुरेसा (सक्षम) असतो, कारण तो वैश्विक ‘प्रकृती’कडून आलेला असल्यामुळे सशक्त असतो. त्याच्यावर जो हल्ला झालेला असतो, तो परतवून लावण्यासाठी जुन्या अंध अतार्किक सहजप्रवृत्तीचे तो थोड्या काळासाठी का होईना पण पालन करतो.
– श्रीअरविंद (CWSA 31 : 103)