Posts

साधना, योग आणि रूपांतरण – ७०

अगदी पूर्ण शांतपणे बसावेसे वाटणे आणि निद्रेचा अंमल जाणवणे या गोष्टींचे आळस हे कारण नसते. आणि ही समजूत तुम्ही डोक्यातून पूर्णपणे काढून टाका. अविचल, शांत राहावे आणि अंतरंगामध्ये प्रवेश करावा याकडे तुमचा कल वळत आहे, हे त्याचे कारण आहे. साधना जेव्हा काहीशा उत्कटतेने सुरू होते तेव्हा बऱ्याचदा काही काळ असे वाटत राहते. नंतर आंतरिक आणि बाह्य चेतना यांमध्ये अधिक प्रमाणात समतोल साध्य होतो किंवा असे म्हणणे अधिक उचित ठरेल की, बाह्य चेतनेमध्ये परिवर्तन घडू लागते आणि ती आंतरिक चेतनेशी तादात्म्य पावू लागते. त्यामुळे (ध्यानाच्या वेळी झोप येणे या गोष्टीमुळे) तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका.

*

(ध्यानाच्या वेळी झोप लागण्याच्या प्रवृत्तीबाबत श्रीअरविंद येथे लिहीत आहेत.) योगसाधना करण्यास ज्यांनी नुकताच आरंभ केला आहे अशा व्यक्तींना जाणवणारा हा एक सर्वसाधारण अडथळा आहे. ही झोप हळूहळू दोन मार्गांनी नाहीशी होते.
०१) एकाग्रताशक्ती अधिक तीव्र केल्यामुळे
०२) निद्रा स्वतःच एक प्रकारच्या स्वप्न-समाधीमध्ये परिवर्तित होते; स्वप्न-समाधीमध्ये व्यक्तीला स्वप्नांखेरिज जे आंतरिक अनुभव येत असतात त्यांची तिला जाणीव असते. (म्हणजे, येथे जाग्रत चेतना काही काळासाठी हरविल्यासारखी होते, परंतु तिची जागा निद्रेद्वारे घेतली जात नाही तर ती अंतर्मुख चेतनेद्वारे घेतली जाते. या स्थितीमध्ये व्यक्ती मानसिक किंवा प्राणिक अस्तित्वाच्या अतिभौतिकामध्ये वावरत असते.)

– श्रीअरविंद (CWSA 29 : 319, 320)

साधना, योग आणि रूपांतरण – ६९

एखादी व्यक्ती जेव्हा ध्यान करण्याचा प्रयत्न करू लागते तेव्हा अंतरंगामध्ये शिरण्यासाठी, जाग्रत चेतनेचा विलय करण्यासाठी आणि अंतरंगामध्ये, सखोल अशा आंतरिक चेतनेमध्ये जागृत होण्यासाठी तिला एक प्रकारचा दबाव जाणवत असतो. परंतु हा दबाव म्हणजे निद्रिस्त होण्यासाठीचा दबाव आहे अशी समजूत मन सुरुवातीला करून घेते कारण मनाला निद्रा ही एकाच प्रकारची आंतरिक चेतना सवयीची असते. म्हणूनच ध्यानाच्या माध्यमातून योगसाधनेचा प्रयत्न करत असताना, निद्रा ही बरेचदा पहिली अडचण ठरते. परंतु व्यक्ती जर चिकाटीने प्रयत्न करत राहिली तर हळूहळू निद्रा आंतरिक सचेत स्थितीमध्ये परिवर्तित होते.

*

मला वाटते, डुलकी लागणे ही अशी एक अवस्था आहे की ज्यामधून प्रत्येकजणच जात असतो. साधनेच्या एकाग्रतेमध्ये शरीराला सहभागी करून घेण्याचा जो प्रयत्न केला जातो तेव्हा त्याच्या दबावाला शरीराने दिलेली ती एक प्रकारची यांत्रिक प्रतिक्रिया असते. ही गोष्ट फारशी मनावर न घेणे बरे. चेतना जसजशी वृद्धिंगत होत जाते आणि ती शारीरिक अस्तित्वालासुद्धा जेव्हा तिच्या कक्षेत समाविष्ट करते तेव्हा डुलकी लागणे आपणहून निघून जाते.

*

व्यक्ती जेव्हा ध्यान करण्याचा प्रयत्न करते तेव्हा अशा प्रकारे झोप येतेच. तिच्यावर दोन प्रकारे मात करता येते. जिथे शक्य असेल तिथे तिला सजग आंतरिक आणि अंतर्मुख स्थितीकडे वळवायचे आणि शक्य नसेल तेव्हा, कोणताही खटाटोप न करता, अविचलपणे एकाग्र राहून, ग्रहण करण्यासाठी सजगपणे उन्मुख, खुले राहायचे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 319)

साधना, योग आणि रूपांतरण – ०८

व्यक्ती जेव्हा ध्यान करायचा प्रयत्न करू लागते तेव्हा सुरुवातीला येणारा पहिला अडथळा म्हणजे झोप येणे. तुम्ही हा अडथळा ओलांडून पलीकडे जाता तेव्हा अशी एक अवस्था येते की, तुमचे डोळे मिटलेले असतात पण तुम्हाला विविध गोष्टी, माणसं आणि अनेक प्रकारची दृश्यं दिसायला लागतात. ही काही वाईट गोष्ट नाही तर, ते एक चांगले लक्षण आहे. तुम्ही योगसाधनेमध्ये प्रगती करत असल्याचे ते द्योतक आहे, असा त्याचा अर्थ होतो.

बाह्यवर्ती वस्तू पाहणाऱ्या बाह्य चर्मचक्षूंशिवाय, आपल्यामध्ये एक आंतरिक दृष्टीदेखील असते; ही आंतरिक दृष्टी आजवर न पाहिलेल्या आणि आजवर अज्ञात असलेल्या गोष्टी पाहू शकते; ती दूर अंतरावरील गोष्टी पाहू शकते; अन्य स्थळकाळातील किंवा अन्य जगतांमधील गोष्टीसुद्धा ती पाहू शकते; ही आंतरिक दृष्टी तुमच्यामध्ये आता खुली होऊ लागली आहे. श्रीमाताजींच्या शक्तिकार्यामुळे ती तुमच्यामध्ये खुली होऊ लागली आहे आणि तुम्ही तिला अटकाव करण्याचा प्रयत्न करता कामा नये. श्रीमाताजींचे नित्य स्मरण करत राहा, त्यांना आवाहन करत राहा आणि त्यांची उपस्थिती तुम्हाला जाणवावी आणि त्यांच्या शक्तीचे कार्य तुमच्यामध्ये सुरू असल्याचे तुम्हाला जाणवावे अशी आस बाळगा. परंतु त्यासाठी, इथूनपुढे श्रीमाताजींच्या शक्ति-कार्यामुळे, तुमच्यामध्ये या किंवा यांसारख्या ज्या घडामोडी घडून येतील, जे बदल घडून येतील, त्यांना नकार देण्याची आवश्यकता नाही; फक्त इच्छावासना, अहंकार, अस्वस्थता आणि इतर चुकीच्या घडामोडी या गोष्टींना मात्र नकार दिलाच पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 99)

सौंदर्याची तपस्या किंवा साधना आपणांस भौतिक जीवनाच्या तपस्येच्या द्वारा कर्मस्वातंत्र्याप्रत घेऊन जाईल. त्याचा पायाभूत कार्यक्रम म्हणजे सुंदर बांध्याचे, सुसंवादी ठेवणीचे शरीर घडविणे हा असेल. तसेच हालचालींमध्ये चपळ व लवचीक, कृतींमध्ये सामर्थ्यसंपन्न आणि आरोग्य व इंद्रियांच्या कार्याबाबत सुदृढ असे शरीर घडविणे हा असेल. हे सर्व साध्य करून घेण्यासाठी काही विशिष्ट सवयी लावून घेऊन, भौतिक जीवन सुसंघटित करण्यासाठी त्या सवयींचा साहाय्यक म्हणून उपयोग करून घेणे सामान्यतः योग्य ठरेल. कारण नियमित आखीव कार्यक्रमाच्या चौकटीत आपले शरीर अधिक सुगमतेने कार्य करू शकते. Read more