Posts

(इसवी सन : १८९० ते १९०६)

आपल्याकडे ज्ञानाची कमतरता आहे का? आम्ही भारतीय तर अशा देशात जन्माला आलो आहोत, अशा देशामध्ये आमचे भरणपोषण झाले आहे की, जेथे मानववंशाच्या प्रारंभापासूनचे ज्ञानसंचित आहे, हजारो वर्षांपासून वारशाने मिळालेली संपदा आपल्याकडे आहे. या ज्ञानसंचितामध्ये भर घालण्यासाठी आजही ज्ञानाचे महामेरू आपल्यामधून उदयाला येत आहेत. आपली क्षमता आक्रसलेली नाहीये, आपल्या बुद्धीची धारही बोधट झालेली नाही किंवा कमी झालेली नाहीये, बुद्धिची ग्रहणशीलता आणि लवचीकता यांमध्ये पूर्वीइतकेच वैविध्य आहे. पण हे ज्ञान मृतवत झाले आहे, त्याच्या भाराखाली आम्ही दबून गेलो आहोत; ते ज्ञान आपल्या पायांना आधार देणारे कर्मचारी होण्याऐवजी, आणि ते ज्ञान आपल्या हातांमधील शस्त्र बनण्याऐवजी, आमचा विनाश करणारे विष बनत आहे; कारण सर्वच महान गोष्टींचे स्वरूप हे असेच असते; ते म्हणजे, जर त्या गोष्टी उपयोगात आणल्या गेल्या नाहीत किंवा त्यांचा गैरवापर झाला तर त्या गोष्टी धारण करणाऱ्यावरच उलटतात आणि त्यालाच नष्ट करतात. अशा वेळी, आपले ज्ञान तामसिकतेच्या अति अवजड भाराखाली घुसमटले आहे, नपुंसकत्व आणि जडत्व यांच्या शापाखाली दडपले गेले आहे. आजही आपण कल्पनांमध्ये रमणे पसंत करतो, आपण अशी कल्पना करतो की जर आपण विज्ञान संपादन केले तर, सर्व काही ठीक होईल. पण आपण स्वत:ला आधी हे विचारले पाहिजे की, आपल्याकडे जे ज्ञान आधीपासूनच आहे, त्याचे आपण काय केले? किंवा ज्यांना विज्ञान आधीच प्राप्त झाले आहे, त्यांनी ह्या भारतासाठी काय केले? पुढाकार घेण्यास अक्षम असलेले आणि अनुकरणप्रिय असणारे आपण, आपल्याकडे शक्तिसामर्थ्य नसूनही, इंग्लंडच्या पद्धतींची नक्कल करण्यासाठी धडपडलो आणि आता आपण जपानी लोकांच्या पद्धतींची नक्कल करू पाहणार आहोत, ते तर अधिकच उत्साही लोक आहेत; आपण आता काय त्यांच्यापेक्षाही अधिक यशस्वी होण्याची आशा बाळगत आहोत? ज्ञानाची प्रचंड शक्ती, जी युरोपियन विज्ञानाने दैत्यांच्या हाती शस्त्र म्हणून देऊ केली, ती म्हणजे भीमसेनाच्या हातातील गदा आहे. दुर्बल माणूस तिचे काय करणार, पण ती चालविण्याच्या प्रयत्नात तो स्वत:च चिरडला तर जाणार नाही नां?

– श्रीअरविंद
(CWSA 06-07 : 81)

ईश्वरी कृपा – ०८

एक अशी ‘सत्ता’ आहे, जिच्यावर कोणताही सत्ताधीश हुकमत गाजवू शकणार नाही; असा एक ‘आनंद’ आहे की, जो कोणत्याही लौकिक यशातून प्राप्त होणार नाही; असा एक ‘प्रकाश’ आहे, जो कोणत्याही प्रज्ञेच्या ताब्यात असणार नाही; असे एक ‘ज्ञान’ आहे की, ज्यावर कोणतेही तत्त्वज्ञान किंवा कोणतेही विज्ञान प्रभुत्व मिळवू शकणार नाही; एक असा ‘परमानंद’ आहे की, कोणत्याही इच्छापूर्तीच्या समाधानातून तसा आनंद मिळू शकणार नाही; अशी एक ‘प्रेमा’ची तृष्णा आहे, जिची तृप्ती कोणत्याही मानवी नातेसंबंधातून होऊ शकत नाही; अशी एक ‘शांती’ आहे, जी व्यक्तिला कोठेच प्राप्त होत नाही, अगदी मृत्युमध्येसुद्धा प्राप्त होत नाही. ही ‘सत्ता’, हा ‘आनंद’, हा ‘प्रकाश’, हे ‘ज्ञान’, हा ‘परमानंद’, हे ‘प्रेम’, ही ‘शांती’ ‘ईश्वरी कृपे’पासूनच प्रवाहित होते.

– श्रीमाताजी
(CWM 01 : 380)

मानसिक परिपूर्णत्व – १९

 

ईश्वराप्रत जाण्याचा ध्यान हा एक मार्ग आहे, तो महान मार्ग आहे; पण तो जवळचा मार्ग आहे, असे म्हणता येणार नाही. कारण तो खूप उच्च स्तरावर घेऊन जाणारा असला, तरीही तो बहुतेकांसाठी खूप लांबचा आणि अवघड मार्ग असतो. जर त्यामुळे अवतरण घडून आले नाही तर, तो जवळचा मार्ग आहे असे कदापिही म्हणता येणार नाही आणि तेव्हासुद्धा, म्हणजे अवतरण घडून येते तेव्हासुद्धा लवकर होते ती फक्त पायाभरणीच! नंतर त्या पायावर ध्यानाच्या आधारे, मोठ्या परिश्रमाने एक भली मोठी इमारत उभारावी लागते. हे अगदी अनिवार्य आहे, पण ह्याला जवळचा मार्ग असे म्हणता येईल, असे त्यात काही नाही.

कर्म हा तुलनेने बराच साधासरळ मार्ग आहे – परंतु, त्यामध्ये व्यक्तीचे मन ईश्वराला वगळून, फक्त कर्मावरच खिळलेले असता कामा नये. ईश्वर हे साध्य असले पाहिजे आणि कर्म हे केवळ एक साधन असले पाहिजे. काव्यादींचा उपयोग आपल्या आंतरिक अस्तित्वाच्या संपर्कात येण्यासाठी असतो आणि त्या संपर्काचा उपयोग आपल्या आंतरतम अस्तित्वाच्या थेट संपर्कात येण्यासाठी तयारी म्हणून होतो, पण व्यक्तीने तेथेच थांबता कामा नये, व्यक्तीने सद्वस्तुपर्यंत जाऊन पोहोचायला हवे. जर व्यक्ती स्वतःला साहित्यिक किंवा कवी, चित्रकार समजत असेल आणि साहित्य साहित्यासाठी, कला कलेसाठीच असे मानत असेल तर, ही काही योगिक वृत्ती नाही. आणि म्हणूनच मी कधीकधी असे म्हणत असतो की, आपले काम हे योगी बनणे आहे; केवळ कवी, चित्रकार बनणे हे नाही.

प्रेम, भक्ती, समर्पण, चैत्य खुलेपणा हे ईश्वराप्रत पोहोचण्याचे सर्वात जवळचे मार्ग आहेत किंवा असू शकतात. कारण प्रेम आणि भक्ती ह्या गोष्टी जर जास्त प्राणप्रधान असतील तर, हर्षभरित अपेक्षा आणि विरह, अभिमान आणि नैराश्य या गोष्टींमध्ये दोलायमान स्थिती होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे हा मार्ग जवळचा न राहता, दूरवरचा, वळणावळणाचा होतो. ईश्वराकडे धाव घेण्याऐवजी, थेट झेपावण्याऐवजी, एखादा स्वतःच्या अहंकाराच्या भोवती भोवती घोटाळत राहण्याची शक्यता असते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 212)

भक्ती आणि ज्ञान यांचे परस्परांविषयीचे गैरसमज हे अज्ञानमूलक आहेत; त्याचप्रमाणे कर्ममार्ग कमी दर्जाचा आहे ही या दोन्ही मार्गांची असणारी समजूतही तितकीच अज्ञानमूलक आहे. ज्ञानमार्गी व भक्तिमार्गी म्हणतात की, आध्यात्मिक संपत्ती ही कर्ममार्गापेक्षा श्रेष्ठ दर्जाची आहे; परंतु त्यांचे हे म्हणणेही अज्ञानमूलकच आहे.

अशी एक तीव्र भक्ती, असे एक तीव्र ज्ञान असते की ज्यांना ‘कर्म’ हे बहिर्मुख व विक्षेप उत्पन्न करणारे वाटते परंतु जोवर ईश्वराच्या जाणिवेशी आमची जाणीव एकत्व पावत नाही, ईश्वराच्या कर्मसंकल्प-शक्तीशी आमची कर्मसंकल्प-शक्ती एकत्व पावत नाही; तोवरच ‘कर्म’ हे बहिर्मुख व विक्षेप करणारे आहे असे वाटते. परंतु एकदा का हे एकत्व साधले की, कर्म हीच ज्ञानाची शक्ती बनते आणि कर्म हाच प्रेमाच्या अभिव्यक्तीचा मार्ग बनतो.

ईश्वराशी एकत्वाची अवस्था म्हणजे ज्ञान असेल आणि या एकत्वाचा आनंद म्हणजे भक्ती असेल तर, त्या एकत्वाचा प्रकाश व माधुर्य यांचे जिवंत सामर्थ्य म्हणजे दिव्य कर्म असे म्हणता येईल. कोणत्याही मानवी प्रेमामध्ये जी एक आस असते, ती तशीच आस व प्रेमाची तीच स्पंदने ईश्वराबद्दलच्या प्रेमातही असतात. प्रियकर आणि प्रेयसी दोघेही जगापासून आणि इतर सर्वांपासून दूर कोठेतरी, हृदयाच्या गुह्यतम कोपऱ्यामध्ये दडून, ऐक्याच्या निरपवाद आनंदामध्ये निमग्न राहू इच्छितात. तीच कदाचित भक्तिमार्गावरीलही एक अपरिहार्य अशी मनोवस्था असू शकते.

पण ज्या विशाल अशा प्रेमाची परिपूर्ती ज्ञानामध्ये झालेली असते ते प्रेम हे, हृदयाच्या अंतरगृहातील आनंद आणि बाह्य जग यांच्यात कोणताही भेद किंवा विरोध आहे असे मानत नाही. तर उलट, बाह्य जग हे त्या प्रियकराचे, ईश्वराचे धाम आहे, सर्व प्राणिमात्र हे ईश्वराचेच अस्तित्व आहे असे ही व्यापक भक्ती मानते; आणि व्यापक भक्तीची ही जी दिव्य दृष्टी आहे त्या दिव्य दृष्टीत दिव्य कर्माचा आनंद आहे आणि दिव्य कर्माचे समर्थन आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 24 : 551)