Posts

साधना, योग आणि रूपांतरण – १९२

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०८

एकाग्रतेचा परिणाम सहसा अगदी त्वरेने घडून येत नाही; मात्र काही जणांमध्ये तो एकदम वेगवान आणि अचानकपणे घडून येतो; परंतु बहुतेकांना मात्र पूर्वतयारीसाठी आणि समायोजनासाठी कमीअधिक कालावधी लागतो. विशेषतः अभीप्सा आणि तपस्येद्वारे, जिथे प्रकृतीची काही प्रमाणात का होईना पण पूर्वतयारी झालेली नसते, तिथे अधिक कालावधी लागतो.

ज्ञानमार्गाची एक ‘अद्वैती’ प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेमध्ये व्यक्ती स्वतःच्या मन, प्राण आणि शरीराशी असलेल्या तादात्म्याला नकार देते, ती सातत्याने असे म्हणत राहते की, “मी मन नाही”, “मी प्राण नाही”, “मी शरीर नाही.” या गोष्टींना ती स्वतःच्या खऱ्या ‘स्व’पासून अलग करून पाहते आणि कालांतराने व्यक्तीला साऱ्या मानसिक, प्राणिक, शारीरिक क्रिया-प्रक्रिया आणि मन, प्राण व शरीराच्या स्वयमेव जाणिवासुद्धा बाह्य व बहिवर्ती क्रिया बनत चालल्याचे जाणवू लागते. त्याचवेळी अंतरंगामध्ये, त्यांच्यापासून निर्लिप्त अशी अलग स्वयंभू अस्तित्वाची जाणीव वाढीस लागते, जी जाणीव वैश्विक आणि परात्पर चैतन्याच्या साक्षात्कारामध्ये खुली होते.

अशीच आणखी एक अतिशय शक्तिशाली पद्धत आहे ती म्हणजे सांख्य दर्शनाची पद्धत. या पद्धतीमध्ये ‘पुरुष’ आणि ‘प्रकृती’चे विलगीकरण केले जाते. यामध्ये मनावर ‘साक्षित्वा’ची भूमिका लादली जाते म्हणजे मन, प्राण, शरीराच्या सर्व कृती या ‘मी’ आणि ‘माझे’ यांपासून वेगळ्या असतात, त्या बाह्य क्रिया बनलेल्या असतात, पण ‘प्रकृती’शी संबंधित असतात आणि ‘मी’च्या बाह्य व्यक्तित्वावर लादल्या जातात. या कोणत्याही गोष्टींनी ‘मी’ बांधला जात नाही, ‘मी’ हा त्यांपासून निर्लिप्त असतो; शांत, साक्षी ‘पुरुष’ असतो. परिणामतः व्यक्तीमध्ये एक प्रकारचे विभाजन वाढीस लागते. साधकाला स्वतःच्या अंतरंगामध्ये एका स्थिर, शांत, स्वतंत्र चेतनेच्या वाढीची जाणीव होते, ज्या चेतनेला पृष्ठवर्ती मन, प्राण आणि शारीरिक प्रकृतीच्या खेळापासून आपण स्वतः दूरस्थ आहोत याची जाणीव होते.

सहसा जेव्हा असे घडून येते तेव्हा उच्चतर ‘चेतने’ची शांती, उच्चतर ‘शक्ती’चे कार्य अगदी त्वरेने खाली आणणे शक्य असते, आणि त्यामुळे ‘योगा’ची संपूर्ण वाटचाल वेगाने घडून येऊ शकते. परंतु बरेचदा, आवाहन (call) आणि एकाग्रतेला प्रतिसाद म्हणून ‘शक्ती’च स्वतःहून खाली अवतरित होते आणि मग, उपरोक्त गोष्टी आवश्यक असतील तर ती त्या करते आणि साहाय्यकारी व अनिवार्य अशा इतर मार्गांचा किंवा प्रक्रियांचा उपयोग करते. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 328-329)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – २०

ज्ञानयोग

 

जीवात्म्याने शांत परमात्म्यात, परमशून्यात किंवा अनिर्वचनीय केवलात विलीन व्हावे म्हणून पारंपरिक ज्ञानमार्ग निरसनाचा, नकाराचा पाढा वाचीत जातो. (‘हे शरीर म्हणजे मी नव्हे’, ‘हा प्राण म्हणजे मी नव्हे’, ‘हे हृदय म्हणजे मी नव्हे’, आणि ‘हे विचार म्हणजे मी नव्हे’ असे म्हणत, तो क्रमाक्रमाने ह्या साऱ्यांना दूर सारतो.) तर पूर्णज्ञानाचा मार्ग असे मानतो की, आपण पूर्ण आत्मपरिपूर्ती गाठावी, अशी ईश्वरी योजना आहे. आणि म्हणून, आपण एकच गोष्ट दूर करायची आहे; ती म्हणजे, आपली स्वत:ची नेणीव (unconsciousness), आपले अज्ञान आणि आपल्या अज्ञानाचे परिणाम. आपल्या अस्तित्वाचे ‘मी’ म्हणून वावरणारे खोटे रूप आपण दूर करावे, म्हणजे मग आपल्यामध्ये आपल्या खऱ्या अस्तित्वाला अभिव्यक्त होता येईल. केवळ वासनेची धाव या रूपात व्यक्त होणारा प्राणाचा खोटेपणा आणि आपल्या भौतिक अस्तित्वाचे यंत्रवत त्याच त्या फेऱ्यात फिरत राहणे, हे आपण दूर करावे. हे खोटे रूप दूर केले म्हणजे, ईश्वरीय शक्तीत वसणारा आमचा खरा प्राण व्यक्त होईल, अनंताचा आनंद प्रकट होईल. भौतिक दिखाऊपणा आणि संवेदनांची द्वंद्वे यांच्या अधीन झाल्यामुळे, आलेला इंद्रियांचा खोटेपणा दूर केला तर, आपल्यातच दडलेली अधिक महान इंद्रियशक्ती, वस्तुमात्रांमध्ये असलेल्या दिव्यत्वाप्रत खुली होऊ शकते आणि त्यांना तसाच दिव्य प्रतिसाद देऊ शकते. वासना-विकारांनी व द्वंद्वात्मक भावभावनांनी कलुषित झालेल्या आपल्या हृदयाचा खोटेपणा दूर केला की, अधिक खोलवर असणारे हृदय अखिल जीवमात्रांविषयीच्या अपार दिव्य प्रेमानिशी खुले होते; अनंत ईश्वराने आपल्याला प्रतिसाद द्यावा, अशी अपरिमित तळमळ त्याला वाटू लागते. अपूर्ण सदोष मानसिक रचना, अरेरावीचे होकार नकार, संकुचित आणि एकांगी केंद्रीकरणे ही आपल्या विचाराची खोटी संपदा दूर केली म्हणजे तिच्या मागे असलेली महान ज्ञानशक्ती ईश्वराच्या खऱ्याखुऱ्या स्वरूपास, जीवात्म्याच्या, प्रकृतीच्या, विश्वाच्या खऱ्याखुऱ्या रूपास उन्मुख होऊ शकते.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 291-292)

पारंपरिक ज्ञानमार्ग व पूर्णज्ञानाचा मार्ग :

जीवात्म्याने शांत परमात्म्यात, परमशून्यात किंवा अनिर्वचनीय केवलांत विलीन व्हावे म्हणून पारंपरिक ज्ञानमार्ग नकाराचा, दूरीकरणाचा पाढा वाचीत जातो. ‘हे शरीर म्हणजे मी नव्हे’, ‘हा प्राण म्हणजे मी नव्हे’, ‘ही इंद्रिये म्हणजे मी नव्हे’, ‘हे हृदय म्हणजे मी नव्हे’ आणि ‘हे विचार म्हणजे देखील मी नव्हे’ असे म्हणत तो क्रमाक्रमाने ह्या साऱ्यांना दूर सारतो. मात्र पूर्णज्ञानाचा मार्ग असे मानतो की, आपण जीवात्म्यांनी संपूर्ण आत्मपरिपूर्ती गाठावी अशी ईश्वरी योजना आहे. आणि म्हणून, आपण एकच गोष्ट दूर करावयाची आहे : ती म्हणजे, आपली स्वत:ची नेणीव (unconsciousness), आपले अज्ञान आणि आपल्या अज्ञानाचे परिणाम.

अस्तित्वाचा खोटेपणा : आमच्या अस्तित्वाचे ‘मी’ म्हणून वावरणारे खोटे रूप आम्ही दूर करावे, म्हणजे आमच्या ठिकाणी आमच्या खऱ्या अस्तित्वाला अभिव्यक्त होता येईल;

प्राणाचा खोटेपणा : केवळ वासनेची धाव या रूपात व्यक्त होणारा प्राणाचा खोटेपणा आणि आमच्या भौतिक अस्तित्वाने यंत्रवत त्याच त्या फेऱ्यात फिरत राहणे हे आम्ही दूर करावे. हे खोटे रूप दूर केले म्हणजे, ईश्वरीय शक्तीत वसणारा आमचा खरा प्राण व्यक्त होईल, अनंताचा आनंद व्यक्त होईल.

इंद्रियांचा खोटेपणा : भौतिक दिखाऊपणा आणि संवेदनांची द्वंद्वे यांच्या आधीन झाल्यामुळे आलेला इंद्रियांचा खोटेपणा दूर केला तर, आपल्यातच दडलेली अधिक महान इंद्रियशक्ती, वस्तुमात्रांमध्ये असलेल्या दिव्यत्वाप्रत खुली होऊ शकते आणि त्यांना तसाच दिव्य प्रतिसाद देऊ शकते.

हृदयाचा खोटेपणा : वासना-विकारांनी व द्वंद्वात्मक भावभावनांनी कलुषित झालेल्या आमच्या हृदयाचा खोटेपणा दूर केला की, अधिक खोलवर असणारे हृदय अखिल जीवमात्रांविषयीच्या अपार दिव्य प्रेमानिशी खुले होते; अनंत ईश्वराने आपल्याला प्रतिसाद द्यावा अशी अपरिमित तळमळ त्याला वाटू लागते.

विचारांचा खोटेपणा : अपूर्ण सदोष मानसिक रचना, अरेरावीचे होकार-नकार, संकुचित आणि एकांगी केंद्रीकरणे ही आमच्या विचाराची खोटी संपदा असते, ही दूर केली म्हणजे तिच्या मागे असलेली थोर ज्ञानशक्ती; ईश्वराच्या खऱ्याखुऱ्या स्वरूपास, जीवात्म्याच्या, प्रकृतीच्या, विश्वाच्या खऱ्याखुऱ्या रूपास उन्मुख होते.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 291-292)