Posts

योगाच्या परिभाषेमध्ये चैत्य (Psychic) या संकल्पनेने कशाचा बोध होतो?

‘प्रकृतीमधील आत्म्याचा घटक’ या अर्थाने ‘चैत्य’ ही संकल्पना आहे. मन, प्राण आणि शरीर यांच्या पाठीमागे उभे असणारे ते शुद्ध चैत्य किंवा ईश्वरी केंद्र असते; (ते म्हणजे अहंकार नाही) परंतु आपल्याला त्याची अगदी पुसटशीच जाणीव असते.

हे चैत्य अस्तित्व म्हणजे ईश्वराचा अंश असतो आणि तो जन्मानुजन्म कायम असतो; स्वत:च्या बाह्य साधनांच्या माध्यमातून तो जीवनानुभव घेत राहतो. जसजसा हा अनुभव वाढत जातो तसतसे त्यामधूनच एक चैत्य व्यक्तिमत्त्व विकसित होऊ लागते. ते नेहमीच सत्य, शिव, सुंदरता यांवर भर देते आणि अंतिमत: मग त्याची प्रकृती ही ईश्वराभिमुख होण्यासाठी सज्ज आणि पुरेशी सक्षम होते.

नंतर मन, प्राण, शरीर यांचे पडदे भेदून, हे चैत्य अस्तित्व पूर्णत: पुढे येते व उपजत प्रेरणांचे नियमन करू लागते आणि प्रकृतीमध्ये परिवर्तन घडवून आणते. तेव्हा मग, प्रकृती आत्म्यावर सत्ता गाजवत नाही तर; आत्मा, पुरुष हा प्रकृतीवर अधिकार चालवू लागतो.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 337)

आत्मज्ञान आणि आत्मनियंत्रण यासाठी जी साधना करणे आवश्यक आहे; त्या साधनेचा आरंभबिंदू म्हणजे ‘चैत्य साधना’ होय. आपल्यामधील आपल्या अस्तित्वाच्या सर्वोच्च सत्याचे स्थान असलेल्या मनोवैज्ञानिक केंद्राला आपण ‘चैत्य’ असे म्हणतो. ते केंद्र, या सर्वोच्च सत्याला जाणून घेऊ शकते आणि त्या सत्याला ते गतिशील, कृतिप्रवण करू शकते. त्यामुळे या चैत्य अस्तित्वाविषयी जागृत होणे हे खूप महत्त्वाचे आहे. ते अस्तित्व हे जोवर आपल्यासाठी एक जिवंत असे वास्तव बनत नाही आणि आपण त्याच्याशी एकरूप होत नाही तोपर्यंत, त्या अस्तित्वावर लक्ष एकाग्र करणे, हे खूप महत्त्वाचे असते. त्याच्या आकलनासाठी आणि अंतिमत: त्याच्याशी तादात्म्य प्राप्त करून घेण्यासाठी अनेकविध पद्धती विविध काळामध्ये आणि विविध ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी काही पद्धती मनोवैज्ञानिक आहेत, काही धार्मिक आहेत तर काही अगदी यांत्रिक आहेत.

प्रत्यक्षात, प्रत्येक व्यक्तीने तिला सर्वाधिक योग्य असणारी पद्धत शोधून काढावयास हवी आणि जर व्यक्तीकडे अगदी तळमळीची, अविचल अशी अभीप्सा (Aspiration towards Divine) असेल, सातत्यपूर्ण व गतिशील इच्छा असेल तर, व्यक्तीला त्या ध्येयाप्रत पोहोचण्यासाठी मदत म्हणून कोणता ना कोणता तरी मार्ग निश्चितच सापडतो – बाह्यत: पाहता वाचन व अभ्यास, आणि आंतरिकदृष्टीने पाहता एकाग्रता, ध्यान, साक्षात्कार आणि अनुभूती या त्या पद्धती आहेत.

परंतु एक गोष्ट मात्र अनिवार्य आहे; ती म्हणजे शोध घेण्याची आणि साक्षात्कार करून घेण्याची अनिवार इच्छा. त्याचा शोध आणि साक्षात्कार हा आपल्या जीवाचा अगदी मूलभूत असा एकाग्रतेचा विषय असला पाहिजे, हा असा किमती मोती आहे की जो, आपण कोणतीही किंमत देऊन प्राप्त करून घ्यायलाच हवा. तुम्ही काहीही करत असलात, तुम्ही कोणत्याही उद्योगात, कामात व्यग्र असलात तरीही, तुमच्या जीवाचे सत्य शोधून काढणे आणि त्याच्याशी एकत्व पावणे ही गोष्ट तुमच्यामध्ये नेहमीच जिवंत असली पाहिजे; तुम्हाला जे काही जाणवते, तुम्ही जो काही विचार करता, तुम्ही ज्या कोणत्या कृती करता त्या पाठीमागे कायम तोच ध्यास असला पाहिजे.

आंतरिक शोधाच्या ह्या मोहिमेला पूरक म्हणून, मनाच्या विकसनाकडे दुर्लक्ष न करणे हेसुद्धा हिताचे ठरते. कारण हे मनरूपी साधन खूप साहाय्यकारी ठरू शकते किंवा तितकेच ते मार्गातील मोठी धोंडदेखील ठरू शकते. स्वाभाविक स्थितीत असताना मानवी मनाची दृष्टी नेहमीच संकुचित असते, त्याची समज मर्यादित असते, ते त्याच्या संकल्पनांच्या बाबतीत खूप हटवादी असते आणि म्हणून त्याला व्यापक करण्यासाठी, त्याला अधिक लवचीक आणि अधिक सखोल करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता असते. त्यामुळे एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचे शक्य तेवढे सर्व दृष्टिकोन विचारात घेतले गेले पाहिजेत.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 4-5)

तुम्ही लहान मुलांच्या डोळ्यांत लक्षपूर्वक पाहा, तेथे तुम्हाला एक प्रकारचा प्रकाश दिसेल – काहीजण त्याचे वर्णन निष्पाप असे करतात – परंतु तो प्रकाश खूप खरा असतो, खूपच सत्य असतो, जो या जगाकडे आश्चर्याने टुकूटुकू पाहत असतो.

ही आश्चर्याची भावना, ही चैत्याची (Psychic) आश्चर्यभावना असते, की जी सत्य पाहू शकते पण तिला या जगाविषयी फारसे काही अवगत नसते, कारण ती त्या पासून खूप खूप दूर असते.

लहान मुलांमध्ये ती आश्चर्यभावना असते; परंतु जसजशी मुले शिकू लागतात, अधिकाधिक बुद्धिमान, अधिकाधिक शिक्षित होतात, तसतशी ही आश्चर्यभावना मागे पडत जाते आणि मग त्यांच्या डोळ्यांमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या गोष्टी म्हणजे विचार, इच्छा-वासना, आवेग, दुष्टपणा अशा साऱ्या गोष्टी दिसू लागतात. तेव्हा मात्र, अत्यंत शुद्ध असणारी ही छोटीशी ज्योत, तेथे असत नाही. अशावेळी तुम्ही निश्चितपणे समजा की, तेथे ‘मना’चा प्रवेश झालेला आहे आणि ‘चैत्य’ हा खूप दूरवर मागे लोटला गेला आहे.

– श्रीअरविंद
(CWM 04 : 26-27)