Posts

धम्मपद : रस्त्याच्या कडेलासुद्धा एखादे सुंदर सुवासिक फूल उमललेले आढळते, त्याचप्रमाणे स्वयंप्रकाशित बुद्धांचे शिष्यदेखील, त्यांच्या बुद्धिप्रकाशाच्या योगे, अंध व अज्ञानी जनसमूहात, चारचौघांमध्ये उठून दिसतात.

श्रीमाताजी : येथे काही चांगल्या सूचना करण्यात आल्या आहेत, उदाहरणार्थ, इतर जणं काय करतात किंवा ते कोणत्या चुका करतात याच्याशी तुमचा संबंध असता कामा नये, तर स्वत:चे दोष, निष्काळजीपणा यांकडेच तुम्ही लक्ष पुरविले पाहिजे आणि ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

दुसरी एक सुजाण सूचना अशी की, अशा कोणत्याही गोष्टी, ज्या प्रत्यक्ष कृतीमध्ये कार्यान्वित होत नाहीत, अशा गोष्टींचे वर्णन करताना आपले शब्दपांडित्य खर्च करू नये. कमी बोलावे आणि उत्तम कृती करावी. पोकळ शब्द हे सुगंध नसलेल्या फुलाप्रमाणे असतात.

तुम्ही तुमच्या स्वत:च्या दोषांनी, त्रुटींनी नाउमेद होऊ नका. रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्याच्या ढिगामध्येसुद्धा अतिशय निर्मळ फूल उमललेले आढळून येते. मथितार्थ असा की, ज्यामधून विशुद्ध अशा साक्षात्काराचा जन्मच होणार नाही इतके त्याज्य काहीच नसते.

व्यक्तीचा भूतकाळ कसा का असेना, हातून कोणत्याही चुका का घडलेल्या असेना, माणूस किती का घोर अज्ञानात जगलेला असेना, तरीही प्रत्येकाच्या अंत:करणात खोलवर एक परमोच्च असे पावित्र्य, शुद्धता दडलेली असते की ज्याचे सुंदर अशा साक्षात्कारामध्ये रूपांतर होऊ शकते. केवळ त्याचाच विचार करा, त्यावरच लक्ष केंद्रित करा, इतर सर्व अडचणी, अडथळे, संकटे यांची चिंता करू नका.

तुम्ही जे बनू इच्छिता केवळ त्यावरच लक्ष केंद्रित करा, तुम्ही जे बनू इच्छित नाही ते संपूर्णपणे, शक्य तितके नि:शेषतया विसरण्याचा प्रयत्न करा.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 215)

ईश्वरी कृपा – १४

“खरोखरच, ईश्वरच साऱ्या करुणेचा मूळस्रोत असतो, जर एखाद्याने पुन्हा पुन्हा त्याच त्याच चुका केल्या नाहीत तर त्याच्या सर्व चुका नाहीशा करण्याचे सामर्थ्य त्याच्यापाशीच असते; खऱ्या साक्षात्काराकडे घेऊन जाणारा मार्ग खुला करणारा ईश्वरच असतो.”
— श्रीमाताजी

(आपल्या ह्या विधानावर भाष्य करताना श्रीमाताजी एके ठिकाणी म्हणतात की,)

“व्यक्ती जोवर त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा करत राहते तोपर्यंत त्या चुका नाहीशा होऊ शकत नाहीत, कारण व्यक्ती प्रत्येक क्षणाला त्या चुका नव्याने करत असते. एखादी व्यक्ती जेव्हा चूक करते, मग ती गंभीर असो किंवा नसो, त्या चुकीचा तिच्या जीवनात काही ना काही परिणाम होत असतोच, ते कर्म संपुष्टात आणावेच लागते, पण व्यक्ती जर त्या ‘ईश्वरी कृपे’कडे वळेल तर त्या ‘कृपे’मध्ये, ते परिणाम नष्ट करण्याची ताकद असते; पण यासाठी व्यक्तिने त्याच दोषाची पुनरावृत्ती करता कामा नये. व्यक्ती त्याच त्याच मूर्खपणाच्या गोष्टी अनिश्चित काळपर्यंत करत राहील आणि ईश्वरी ‘कृपा’देखील त्याच्या परिणामांचा निरास अनिश्चित काळपर्यंत करत राहील, असे व्यक्तिने कदापिही समजता कामा नये, कारण हे असे घडत नाही. भूतकाळाचा भविष्यावर कोणताही परिणाम होणार नाही, इतका भूतकाळ पुसला जाऊ शकतो, शुद्ध केला जाऊ शकतो. मात्र एक अट आहे – व्यक्तीने तो भूतकाळ पुन्हा कायमस्वरूपी वर्तमानात ओढून आणता कामा नये, या एकाच अटीवर तो विशुद्ध केला जाऊ शकतो. तुम्ही स्वतःहूनच तुमच्यातील वाईट स्पंदनांना थांबविले पाहिजे, तुम्ही तेच ते स्पंदन पुन्हा पुन्हा अनिश्चित काळपर्यंत निर्माण करत राहता कामा नये.”

– श्रीमाताजी
(CWM 09 : 58)