Posts

विचारशलाका ३३

 

चेतना ही अस्तित्वामध्ये सहजस्वाभाविकपणे असणारी एक वस्तुस्थिती आहे. पृष्ठवर्ती भागामध्ये क्रियाशील नसताना जेव्हा ती शांत, गतिविहिन असते तेव्हाही ती तेथेच असते. वरवर पाहता ती दिसत नाही, किंवा बाह्य गोष्टींवर कोणतीही प्रतिक्रिया देत नाही, त्यांच्याविषयी ती जागृत नाही असे वाटत असले तरीही ती तेथेच असते; अंतरंगामध्ये ती अंतर्मुख पद्धतीने, क्रियाशील किंवा निष्क्रिय स्वरूपात असते; तिचे अस्तित्वच नाही असे आपल्याला वाटत असते; किंवा आपल्याला तिचे अस्तित्व अगदी अचेतन किंवा निर्जीव असे भासत असते तरीही ही चेतना तेथेच असते.

*

चेतना म्हणजे केवळ स्वत:बद्दलची किंवा वस्तुमात्रांबाबतची जाणीव शक्ती नव्हे; तर ती एक गतिमान आणि क्रियाशील ऊर्जा असते किंवा तिच्याकडे गतिमान आणि क्रियाशील ऊर्जा असते. ती तिच्या स्वत:च्या प्रतिक्रिया ठरवू शकते किंवा या प्रतिक्रियांपासून स्वत:ला वेगळी ठेवू शकते; ती शक्तींना फक्त प्रतिसादच देते असे नाही, तर ती या शक्ती निर्माण करू शकते किंवा स्वत:मधून शक्तींना बाहेरही काढू शकते. चेतना म्हणजे फक्त ‘चित’ नाही, तर ती ‘चित्शक्ती’देखील असते.

चेतना आणि मन या गोष्टी अभिन्न आहेत, असे सहसा मानले जाते; पण मानसिक चेतना ही अशी एक निव्वळ मानवी कक्षा आहे की, त्या कक्षेपलीकडील चेतनेच्या सर्व संभाव्य श्रेणींना ती कवळून घेऊ शकत नाही. मानवाला जे दिसू शकते किंवा ऐकू येते अशा श्रेणींच्या वर आणि खालीसुद्धा अनेक श्रेणी असतात; त्या श्रेणी मानवाला अदृश्य किंवा अश्राव्य असतात. मानवाची दृष्टी रंगांच्या किंवा त्याची श्रवणशक्ती ध्वनींच्या सर्व श्रेणी कवळू शकत नाही; मानवी चेतनेचेदेखील असेच असते.

मानवी कक्षेच्या वर आणि खालीदेखील चेतनेच्या अनेक श्रेणी आहेत; त्यांच्याशी सामान्य मानवाचा संपर्क नसतो आणि त्यामुळे त्या श्रेणी त्याला एकतर अचेतन (unconscious), अधोमानसिक (submental) किंवा अधिमानसिक (overmental), अतिमानसिक (supramental) अशा वाटतात.

– श्रीअरविंद [CWSA 28 : 15-16]

चित्शक्ती ही दोन घटकांनी बनलेली असते; स्व व वस्तुमात्रांविषयीची जाणीव आणि शक्ती व तिचे सामर्थ्य.

सजगता ही पहिली आवश्यक गोष्ट आहे, तुम्ही वस्तुंबाबत योग्य जाणीव राखत, योग्य प्रकारे जागरुक राहिले पाहिजे, त्यांना त्यांच्यातील सत्याद्वारे जाणून घेतले पाहिजे, पण त्यासाठी केवळ जाणीव असणे पुरेसे नाही. तर ती जाणीव प्रभावी ठरण्यासाठी त्यासोबत संकल्प आणि सामर्थ्य असणे आवश्यक आहे.

कोणता बदल होणे आवश्यक आहे, काय निघून जायला हवे, त्याच्या जागी काय यायला हवे, ह्याबाबतीत कदाचित एखाद्याला पूर्ण जाणीव असू शकेल, परंतु तो बदल घडवून आणण्यास तो असमर्थ असू शकेल. किंवा दुसऱ्या एखाद्याकडे प्रचंड इच्छाशक्ती असू शकेल परंतु, योग्य जागरुकतेच्या अभावी ती इच्छाशक्ती योग्य ठिकाणी आणि योग्य रीतीने कशी वापरावयाची हे समजण्यास तो असमर्थ असू शकेल.

तुम्ही चैत्य जाणिवेमध्ये (Psychic Consciousness) असल्याचा फायदा असा की, तुमच्याकडे योग्य ती जाणीव असते आणि तुमची इच्छा ही श्रीमाताजींच्या इच्छेशी सुसंगत असल्याने, तुम्ही योग्य ते परिवर्तन घडून यावे म्हणून श्रीमाताजींच्या शक्ती-सामर्थ्याचा धावा करू शकता.

पण मन आणि प्राण यांमध्येच ज्या व्यक्ती जगत असतात, अशा व्यक्ती मात्र हे करू शकत नाहीत; अशा व्यक्तींना जास्त करून वैयक्तिक प्रयत्न करणे भाग पडते. तसेच त्यांच्यामध्ये जागरुकता व इच्छा आणि मनाचे व प्राणाचे सामर्थ्य हे विभाजित व सदोष असते; त्यामुळे केलेले कार्यही सदोष असते व ते सर्वोत्तमही असत नाही. केवळ अतिमानसामध्येच जाणीव, इच्छा वा संकल्प, शक्ती ह्या नेहमीच एकत्वाने कार्यरत असतात आणि म्हणून त्या स्वाभाविकपणेच अधिक प्रभावशाली असतात.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 24-25)